आशिया खंडातला साहित्याचा मोठा उत्सव अशी उपाधी अवघ्या 6 वर्षांत मिळवणारा 'जयपूर लिटरेचर फेस्टीवल' हा वार्षिकोत्सव यंदाही होत आहे आणि होण्याआधीच साहित्यबाह्य घटनांनी लक्ष वेधून घेत आहे. त्याला कारणीभूत आहेत 'पर्सन ऑफ इंडियन ओरीजिन' असं प्रमाणपत्र बाळगणारे सलमान रश्दी हे ब्रिटनस्थित जगप्रसिध्द वादग्रस्त लेखक! याआधीही या फेस्टीवलला हजर राहलेल्या रश्दींना आयोजकांकडून यंदाच्या वर्षीही निमंत्रण मिळणं ही गोष्ट समजण्यासारखी आहे. पण तेच रश्दी यावेळी इकडे फिरकू नयेत म्हणून केंद्र सरकारच्या दबावाखाली, आडून मागणी करणाऱ्या राज्य सरकारची केविलवाणी धडपड मात्र सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडची आहे.
रश्दींची 'द सॅटॅनिक व्हर्सेस'ही कादंबरी 1988 मध्ये प्रकाशित झाली आणि हे लेखनच त्यांच्या जीवावर उठलं. या कादंबरीत मुस्लिमांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक मजकूर असल्याचा समज करून घेत, जगभरातल्या मुस्लिमबहुल राष्ट्रांनी त्यावर कडवी टीका केली. रश्दींनी आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला पण ती समजून घेतली गेली नाही. संतप्त मुस्लिमांकडून ठार मारले जाण्याची धमकी तर त्यांना अनेकदा मिळाली. पुस्तकावर बंदी घातली गेली. अगदी ज्या भारताच्या राज्यघटनेत 'धर्मनिरपेक्षता' आणि 'लेखनस्वातंत्र्य' असे दोन मूलभूत हक्क नमूद केले आहेत त्या भारतातही रश्दींच्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. कारण उघड होतं... संतप्त भारतीय मुसलमानांनी केलेली पुस्तकबंदीची मागणी आणि जगभरातल्या मुस्लिम विश्वात या पुस्तकाविरोधात उठलेलं वादळ. मात्र पुस्तकावर बंदी घातली गेली असली तरी रश्दींच्या भारतभेटीवर बंदी नव्हती आणि म्हणूनच ते याआधीच्या जयपूर फेस्टीवलला हजर राहू शकले, त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधू शकले. आज मात्र सुरक्षिततेच्या मुद्दयावरून त्यांना भेट नाकारली जात आहे.
ज्या दारुल उलूम देवबंदने रश्दींच्या येण्याला आडकाठी करणारा फतवा काढला आहे आणि ज्या 'सिमी'मुळे रश्दींच्या जीवाला धोका असल्याची शक्यता केंद्र आणि राज्य सरकारला वाटते आहे या दोन्ही कट्टरपंथी मुस्लिम संघटनांचा जन्म काही कालपरवाचा नाही. याआधी रश्दी आले तेव्हाही त्या इथे होत्याच आणि ज्या कादंबरीने मुस्लिम संतप्त झाले ती 'सॅटॅनिक व्हर्सेस' तर 25 वर्षं इतकी जुनी आहे. मग ही बंदीची मागणी आत्ताच का केली जात आहे, हा मुद्दा आहे...
...तर रश्दींना राजस्थान प्रवेश नाकारण्याचं कारण आहे, उत्तर प्रदेशसारख्या मुस्लिमबहुल राज्यात पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका. हातातून एकेक राज्य गमवत चाललेल्या काँग्रेससाठी आणि युवराज राहुलसाठी अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी देशातल्या मोठया राज्यातली ही निवडणूक रश्दींच्या भारतभेटीमधे मांजरीसारखी आडवी आली आहे... मात्र असं थेट आडवं जाण्याची हिम्मत काँग्रेस आत्ता तरी दाखवू शकत नाही. कारण, याचा संबंध उत्तर प्रदेशातील निवडणुकांशी आहे हा संदेश सर्वांपर्यंत पोचेल आणि त्याचाही प्रतिकूल परिणाम निवडणूक निकालांवर होईल ही भीती आहे. म्हणूनच फेस्टीवलच्या आयोजकांना मधे घालून रश्दींची वाट अडवण्याचा खटाटोप चालू आहे. हा अंक प्रकाशित होईपर्यंत रश्दींनी ही बंदी किती गांभीर्याने घेतली हे स्पष्ट झालेलं असेल.
या निमित्ताने आणखी एका मुद्दयावर विचार केला जायला हवा, तो असा... रश्दींच्या ऐवजी अन्य कोणी असता तर तिस्ता सेटलवाडसारखी स्वत:ला 'निधर्मी' समजणारी मंडळी जी या बंदीविरोधात बंडाचा झेंडा फडकवत मैदानात उतरली असती ती आता कुठे आहेत? या मौनाचा नेमका अर्थ काय? की यांचं निधर्मीपण हे 'सिलेक्टीव' आहे?
भारतीय नागरिक आज वेगवेगळया क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असतानाच, या देशातला बहुतांश मुस्लिम समाज मात्र आजही मागास स्थितीत आहे. याचं एकमेव कारण म्हणजे, धर्माचा धाक घालून सर्वसामान्य मुस्लिमांच्या प्रगतीच्या वाटेवर जागोजागी अडथळे निर्माण करणाऱ्या 'दारुल उलूम देवबंद', 'सिमी' सारख्या कट्टरपंथी संघटना. 'मोदींच्या राज्यात सर्वधर्मियांना विकासाच्या समान संधी आहेत', असं प्रमाणपत्र दिल्याने अस्वस्थ होणारी आणि त्याचं 'बक्षीस' म्हणून डॉ. मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवींना प्रमुखपदावरून तात्काळ दूर करणारी ही 'दारुल उलूम' ही संघटना... तिच्या संकुचित विचारसरणीवर प्रकाश टाकायला हा एक दाखला पुरेसा आहे. या देशातल्या पुरोगामी विचारसरणीच्या मुस्लिमांच्या वर्तमान स्थितीचंही दर्शन यातून घडतं. त्यांचा आवाज आजही किती क्षीण आहे याची कल्पना येते. जगाबरोबर चालू पाहणाऱ्या या मुस्लिमांना पाठिंबा देण्याची धमक आपल्या राज्यकर्त्यांमधे नाही. कारण आपल्या समाजाला अशिक्षित, अडाणी आणि अंधश्रध्देच्या विळख्यात ठेवण्यात धन्यता मानणाऱ्या 'दारुल उलूम'च्या सुरात सूर मिसळण्यात राजकीय धूर्तता आहे. पुरोगामी विचारसरणीचे संख्येने अत्यल्प असलेले मुस्लिम सत्तेचा सोपान चढण्यासाठी आपल्या कामाचे नाहीत तर ज्यांच्या आदेशावर सर्वसामान्य मुस्लिम जनता मतदान करेल अशांची पाठराखण करणं यातच भलाई आहे, हा धूर्त विचार त्यामागे आहे आणि काँग्रेसला खिंडीत गाठायची हीच योग्य वेळ आहे हे कळण्याची हुशारी दारुल आणि सिमीकडेही आहे. नक्की कोणी कोणाला खेळवलं आणि स्वार्थासाठी कोणी कोणाचा वापर केला हे आणखी काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण जे चाललं आहे ते राजकारणातील चिंताजनक स्थितीचं निदर्शक आहे. शिक्षित नेत्यांचं प्रमाण वाढत असताना राजकीय प्रगल्भतेत वाढ होण्याऐवजी राजकारण दिवसेंदिवस संकुचित विचारांचं होत चाललं आहे. या संकुचिततेचं ग्रहण रश्दींच्या भेटीला लागलं आहे, ते आणखी कशाकशाला ग्रासणार हा खरा प्रश्न आहे.
.
|