संतभूमीत इसिसचे व्हायरस!

विवेक मराठी    01-Aug-2016
Total Views |

मराठवाडयातील या दहशतवादाला एक पार्श्वभूमी आहे. हा एकेकाळचा निजाम राजवटीखालचा भाग आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हैदराबादच्या निजामाने हे संस्थान स्वतंत्र भारतात सामील न करता एकतर वेगळेच ठेवायचे किंवा पाकिस्तानात सामील करायचे, असा फितूर विचार केला होता. पाकिस्तानशी संधान बांधण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र हैदराबाद संस्थानमधील बहुसंख्य सामान्य जनता याला तयार नव्हती. हा लढा म्हणजे देशाच्या आणखी एका फाळणीचे कारस्थान उधळून लावण्यासाठी सामान्य लोक कसा संयमित लढा देतात, याचे एक अलौकिक उदाहरण ठरेल. त्या वेळी निजामाने थेट आपल्या सैनिक किंवा पोलिसांकरवी जनतेवर दबाव न आणता रझाकार नावाची दहशतवादी तरुणांची संघटनाच स्थापन केली होती. कासिम रझवी हा या रझाकारांचा प्रमुख होता. हे रझाकार कोणत्याही घरात घुसून काहीही लुटून नेण्यापासून ते कोणाचाही खून पाडण्यापर्यंत अत्याचार करत होते. काश्मिरी पंडितांप्रमाणे हजारो लोक त्या काळात मराठवाडा, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागांतून जीव मुठीत धरून घरेदारे सोडून पंढरपूर, सोलापूर, नगर जिल्हा, विदर्भ अशा स्वतंत्र भारताच्या लगतच्या भागात पळून गेले होते. निर्वासित झाले होते. रझाकारांना कोणत्याही थराला जाऊन हिंसा करण्याची पूर्ण मोकळीक होती. इसिसचाच तो एक मिनी अवतार होता.


राठवाडा ही संतांची भूमी समजली जाते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत बहिणाबाई, समर्थ रामदास स्वामी, चक्रधरस्वामी यांची ही भूमी. मात्र आता जगात हिंसक कारवाया करणाऱ्या इसिस या संघटनेशी संबंध ठेवल्यावरून दोन तरुणांना परभणीतून अटक करण्यात आली आहे. आठ मुस्लीम तरुण बेपत्ता असल्याची बातमी येऊन इसिसशी त्यांचे काही कनेक्शन आहे काय याचा अंदाज करेपर्यंत बेपत्ता तरुणांची संख्या 25 वर गेली. ते प्रसिध्द होईपर्यंत एका आमदाराने आरोप केला की शंभर मुस्लीम तरुण बेपत्ता आहेत. 

या बेपत्ता तरुणांची अतिरंजित संख्या माध्यमांमधून किंवा राजकारण्यांच्या वक्तव्यातून येत असली, तरी हे सगळेच असत्य किंवा तथ्य नसलेले आहे असे म्हणून हे सोडून देता येणार नाही. या बेपत्ता तरुणांमध्ये काही मतिमंद आहेत, काही रोजगारासाठी गाव सोडून गेलेले आहेत. मात्र काही तरुण डोक्यात दहशतवादाचे खूळ घेऊन देशविरोधी शक्तींच्या गळाला लागले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचे कारण महाराष्ट्रात दहशतवादाचे अनुभव येऊ लागले, तेव्हापासून मराठवाडयात दहशतवादी मनोवृत्तीची कुणकुण लागलेली आहे. अगदी मुंबईला बाँबस्फोटांची जी मालिका झाली, त्यामध्येही भोकरदन तालुक्यातील धावडयाचा शहानवाजखान हा दहशतवादी सामील असल्याचे पुरावे पुढे आले होते. खेळणा गेस्ट हाउस, जाफराबाद आणि सिल्लोड शहरात तो लपल्याच्या संशयावरून जळगावच्या पोलिसांनी छापे टाकले होते.

मराठवाडयातील या दहशतवादाला एक पार्श्वभूमी आहे. हा एकेकाळचा निजाम राजवटीखालचा भाग आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हैदराबादच्या निजामाने हे संस्थान स्वतंत्र भारतात समील न करता एकतर वेगळेच ठेवायचे किंवा पाकिस्तानात सामील करायचे, असा फितूर विचार केला होता. पाकिस्तानशी संधान बांधण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र हैदराबाद संस्थानमधील बहुसंख्य सामान्य जनता याला तयार नव्हती. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा चालविला होता. हा लढा म्हणजे देशाच्या आणखी एका फाळणीचे कारस्थान उधळून लावण्यासाठी सामान्य लोक कसा संयमित लढा देतात, याचे एक अलौकिक उदाहरण ठरेल. त्या वेळी निजामाने थेट आपल्या सैनिक किंवा पोलिसांकरवी जनतेवर दबाव न आणता, दहशतवादी तरुणांची रझाकार नावाची संघटनाच स्थापन केली होती. मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन असे या संघटनेचे अधिकृत नाव होते. कासिम रझवी हा या रझाकारांचा प्रमुख होता. हे रझाकार कोणत्याही घरात घुसून काहीही लुटून नेण्यापासून ते कोणाचाही खून पाडण्यापर्यंत अत्याचार करत होते. हजारो लोक काश्मिरी पंडितांप्रमाणे त्या काळात मराठवाडा, तेलंगाण आणि  उत्तर कर्नाटक या भागांतून जीव मुठीत धरून घरेदारे सोडून पंढरपूर, सोलापूर, नगर जिल्हा, विदर्भ अशा स्वतंत्र भारताच्या लगतच्या भागात पळून गेले होते. निर्वासित झाले होते. रझाकारांना या जनतेवर अत्याचार करताना निजामाचे पोलीस पकडत नसत. त्यांना कोणत्याही थराला जाऊन हिंसा करण्याचीर् पूण मोकळीक होती. इसिसचाच तो एक मिनी अवतार होता. पुढे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनीही तिरकी चाल करत 'पोलीस ऍक्शन' असे नाव देऊन निजामाच्या संस्थानात सैन्य घुसविले. प्रतिकार करणारे रझाकार मारले गेले. काही पळून गेले. कासीम रझवी पाकिस्तानात पळून गेला. सरदार पटेल यांच्यापुढे झुकत निजाम शरण आला. हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात बिनशर्त विलीन झाले. स्वराज्यानंतरच्या काळात राजकीय लोकांनी ढोंगी सेक्युलॅरिझमच्या नावाखाली केलेल्या लांगूलचालनामुळे आणि पाकिस्तानातून मिळत असलेली फूस आणि मदत यांमुळे याभागात आता पुन्हा दहशतवाद वाढतो आहे.

मुंबईच्या बाँबस्फोट प्रकरणात शहानवाजखानचे नाव आले. नंतर मराठवाडयातून सक्तीने धर्मांतर करण्याची काही प्रकरणे पुढे आली. औरंगाबादला क्षुल्लक कारणावरून दंगली घडविण्याचे अनेक प्रयत्न झाले. कधी अयोध्येच्या बाबरीचे मातम करण्यावरून, तर कधी कुराणाची पाने सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये वापरली म्हणून, कधी राणा गुरुजी यांच्या सप्रमाण लिहिलेल्या पुस्तकावरून, तर कधी चपलांवर उर्दू अक्षरे आली म्हणून! मराठवाडयात धर्माबाद परिसरात अतिरेकी कारवाया चालत असल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांनी लोकसभेत दिली होती.

पुढे नांदेडला एका संघस्वयंसेवकाच्या घरात स्फोट झाला. त्याचे निमित्त करून पोलिसांनी 'हिंदू दहशतवाद' या काँग्रेसजनांच्या आवडत्या कल्पनेला हा स्फोट जोडण्याचा खेळ केला. परभणी, पाथ्री, जालना अशा शहरांत मशिदीच्या आवारात, मुस्लीम भागात काही स्फोट झाले. त्या सगळया स्फोटांचा संबंध मालेगावच्या स्फोटाशी जोडण्याचा बराच आटापिटा करण्यात आला. मराठवाडयात एकामागून एक दहशतवादी तरुणांची नावे आणि सहभाग उघड होत असताना दहशतवादविरोधी पथक (एटीएस) मात्र 'हिंदू दहशतवाद' ही संकल्पना सिध्द करण्याचा खुळेपणा करत होते. त्यांनी मराठवाडयात नांदेड, परभणी,र् पूणा, जालना येथे झालेल्या स्फोटांचा संबंध मालेगावच्या स्फोटाशी जोडण्याचा प्रचंड आटापिटा केला. मात्र जे वास्तव नव्हतेच ते सिध्द कसे करणार? कितीही काल्पनिक कुभांड रचूनही कोर्टात काही सिध्द झाले नाही. मात्र या काळात मराठवाडयात दहशतवादी तयार होण्याला कसे बळ मिळते आहे यावर लक्ष ठेवण्याऐवजी दुर्लक्षच झाले.

या भागात मुस्लीम तरुणांना सतत द्वेषाचे बाळकडू विविध ठिकाणी मिळत होते. 'हमने यहाँ राज किया है' अशा वल्गना केल्या जात होत्या. हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाला उर्दू पुस्तकात आणि वर्तमानपत्रात मुस्लिमांवर झालेला अन्याय अशा पध्दतीने मांडले जात असते. त्यामुळे या भागात या काळात एक भयंकर दहशतवादी मानसिकता वाढत होती. मात्र त्यात सीबीआय, पोलीस या तपास यंत्रणांना कसलाही पुरावा सापडला नाही. हिंदू दहशतवाद सिध्द करण्याच्या नादात या भागात फोफावत असलेल्या दहशतवादी कारवायांकडे पोलिसांचे चांगलेच दुर्लक्ष झाले.

वेरूळच्या डोंगरात मोठया प्रमाणावर स्फोटके सापडली. स्फोट वगैरे काही झालेले नव्हते. त्यामुळे या घटनेकडे पुढे पोलिसांचे नीट लक्ष असायला हवे होते. या स्फोटकांच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बीडचा जबीउद्दीन अन्सारी पाकिस्तानात पळून गेला. तोच पुढे अबू जिंदाल बनून त्याने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड म्हणून अतिशय नीच काम केले. त्याच स्फोटके प्रकरणातील हिमायत बेग हा जर्मन बेकरी स्फोटातील प्रमुख आरोपी होता. घाटकोपरला बसमध्ये झालेल्या स्फोटात सिमी संघटनेचा संभाजीनगरचा डॉ. मतीन हा एक आरोपी होता. सिमी संघटनेच्या दहशतवाद्यांनीच आता इसिसचे काम सुरू केले असल्याची माहिती पुढे आलेली आहे. मध्य प्रदेशातून तुरुंग फोडून पळून आलेल्या एका दहशतवाद्याला औरंगाबाद शहरात पोलिसांनी चकमकीत गोळया घालून मारले होते. आज आता इसिसची चर्चा सुरू झाली, तेव्हा हा सगळा इतिहास समोर येतो. या पार्श्वभूमीमुळेच मराठवाडयातील तरुण एकामागून एक इसिसच्या संपर्कात असल्याचे दिसून येते आहे. परभणी येथे सापडलेला चाउसबीन हा बाँब तयार करत होता, हे उघड झाले आहे. शाहीदखान या दुसऱ्या दहशतवाद्याच्या घरात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत. त्याच्या संगणकाचा डाटाही ताब्यात घेतला आहे. त्याच्या घरातून एटीएसने आयईडी बाँब जप्त केला आहे. हा बाँब तयार करण्याचे शिक्षण आणि साहित्य त्याने कोठून मिळविले याचा तपास आता चालू आहे. मराठवाडयातील काही राजकारण्यांचेही दहशतवादाशी कनेक्शन असल्याचे काही प्रसंगात समोर आले होते. मात्र त्यावर फार चर्चा झाली नाही.

आता जेव्हा इसिसचा बोलबाला सुरू झाला, तेव्हा द्वेषाने पछाडलेल्या या तरुणांमधील काही तरुण या दहशतवादाला बळी पडल्याचे दिसत आहे. दहशतवादाशी संबंध ठेवणारे, इसिसशी इंटरनेटवरून संपर्क साधणारे एकामागून एक पकडले जात आहेत. विनाकारण संशयाचे आणि भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

बेपत्ता तरुण हे इसिसचे नाहीत असे सांगण्याचा आटापिटा चालू आहे. काही बेपत्ता तरुण इसिसशी संबंधित नसतील. मात्र त्याचा अर्थ सगळेच निर्दोष आहेत असे समजून हा विषय बंद करणे परवडणारे नाही. अबू जिंदाल, हिमायत बेग अशा दुर्लक्षातूनच मोठे दहशतवादी झाले, हे लक्षात घेतले पाहिजे. काही माध्यमांनी आणि वर्तमानपत्रांनी आपण वेगळे वृत्त देत असल्याच्या आविर्भावात आता मुस्लीम तरुण इंटरनेट वापरणेच नको अशा भूमिकेत आले असल्याच्या बातम्या दिल्या आहेत. अशा बातम्या अप्रत्यक्षपणे पोलीस तपासावर दबाव आणणाऱ्या आणि दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढविणाऱ्या आहेत. हैदराबादपासून ते नांदेडपर्यंत संशयावरून दहशतवादी तरुण पकडले की रझाकारांचेच नाव घेऊन स्थापन झालेल्या एमआयएम या राजकीय पक्षाचे नेते त्यांना निरपराध असल्याचे प्रमाणपत्र देत त्यांना न्यायालयीन कामकाजात मदत करणार असल्याचे निर्लज्जपणे जाहीर करत आहेत. हा तर राजकीय स्वार्थासाठी देशद्रोह आहे. दहशतवाद्यांना निरपराध असल्याची प्रमाणपत्रे वाटण्याचे उद्योग कोणीही करता कामा नये.

कोणत्याही परिस्थितीत या दहशतवादी कारवायांकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यांना पाठीशी घालता कामा नये. कोणतेही लटके कारण देत त्यांना दहशतवादाच्या आरोपातून सटकण्याची संधी देता कामा नये. ही विषवल्ली दिसेल तिथे मुळापासून उखडून टाकली पाहिजे. मूठभर दहशतवादी उचापती तरुणांमुळे सगळा मुस्लीम समाज बदनाम होतो आहे. मुस्लीम समाजातील राष्ट्रीय विचारांच्या मुसलमानांनी असल्या शक्तीला कसून विरोध करत त्यांना उघडे पाडले पाहिजे.

9422202024

dilip.dharurkar@gmail.com