सावळे सुंदर रूप मनोहर

विवेक मराठी    14-Feb-2017
Total Views |

सं म्हणतात की माणूस एकविसाव्या शतकात आला आहे, त्याने खूप प्रगती केली आहे. चंद्र जुना झाला.. आता तर त्याने मंगळावर पाऊल ठेवलं आहे. समजा, पर्यावरणाचा सत्यनाश करून आपण पृथ्वीचा विनाश घडवून आणला, तर त्यानंतर मंगळाचा नाश कसा करता येईल यावर संशोधन सुरू आहे... इ. इ. इ. इतक्या सगळया विकासात, वेगात, बदलांमध्ये एक गोष्ट मात्र अगदी ठामपणे टिकून आहे... ती म्हणजे 'गोरी बायको हवी'! आजकाल शहरातल्या मुली त्याला महत्त्व देत नाहीत. 'आहे हे असं आहे' अशी त्यांची भूमिका बनत चालली आहे. खेडयात मात्र, चांगला नवरा मिळवायचा असेल तर किमान रंग तरी गोरा हवा हा गैरसमज शिल्लक आहे. हे कमी की काय, म्हणून यच्चयावत भारतीय लोकांच्या विचारांवर प्रभावीपणे नियंत्रण करणाऱ्या जाहिराती गोऱ्या रंगाला अवास्तव महत्त्व देतात. चांगला नवराच काय, चांगली नोकरी, चांगले मित्रमैत्रिणी, नोकरीत बढती, अभिनयातले पुरस्कार, तोंडी परीक्षेत चांगले गुण, मुलांचं प्रेम, आत्मविश्वास, व्यावसायिक यश... डॅम एनिथिंग.... गोरा रंग असेल तरच मिळतं, असा एक मठ्ठ संस्कार त्यांनी समाजमनावर केला आहे. त्यांच्या उत्पादनांचा खप होण्यासाठी असं उल्लू बनवणं गरजेचं आहे. पण भोळीभाबडी भारतीय जनता उल्लू बनते, हे घातक आहे.
वास्तविक संपूर्ण पृथ्वीवरील सगळया माणसांचे रंग सारखे नाहीत. गोरा, सावळा, काळा, पिवळा (चिनी लोकांचा) असं त्यात बरंच वैविध्य आहे. 'Melanin' या त्वचेतील तत्त्वामुळे तिला हा रंग मिळतो. आपली त्वचा ही आपली सगळयात मोठी संरक्षक संस्था आहे. यात काही विशिष्ट पेशी असतात, ज्या हे तत्त्व बनवतात. सगळया माणसांमध्ये मेलॅनिन बनवणाऱ्या पेशींची संख्या सारखीच असते. पण उष्ण प्रदेशात प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी या पेशी जास्त प्रमाणात मेलॅनिन बनवतात, तर थंड प्रदेशात कमी. कारण मेलॅनिन हे आपल्या शरीरातलं नैसर्गिक sunscreen आहे. बाजारातलं कुठलंही sunscreen याच्याइतकं प्रभावी आणि निरुपद्रवी नाही. घातक अशा अतिनील (ultraviolet) किरणांपासून मेलॅनिन शरीराचं रक्षण तर करतंच, शिवाय त्वचेचा कर्करोग, विषाणूजन्य (viral) आजार यांच्या प्रतिकारासाठी शरीराला संरक्षक कवच प्रदान करतं. आपली रोगप्रतिकारक्षमता शाबूत ठेवतं. शरीरातील folic acid उन्हात जाळू देत नाही. ड जीवनसत्त्व बनवायला मदत करतं. स्वेदग्रंथींवर नियंत्रण ठेवून तापमान आणि शरीरातील पाणी संतुलित राखायला मदत सरतं.


आता सांगा, बाजारातली फेअरनेस क्रीम्स आपल्याला कसं गोरं करणार? मेलॅनिन बनवणाऱ्या पेशींना मारून? की त्यांना कमी मेलॅनिन बनवायला शिकवून? की बनलेलं मेलॅनिन धुऊन टाकून? ही कामं शरीराच्या मर्जीविरुध्द करणं कुणालाच शक्य नाही. समजा केली, तरी ती आपल्यालाच घातक नाहीत का? मेलॅनिनची ही वर सांगितलेली आवश्यक कामं कोण करणार? ती फडतूस क्रीम्स?

पण आपण त्या जाहिरातींना भुलतो. जगातल्या अतिश्रीमंत कंपन्या अधिक श्रीमंत बनण्यासाठी या धंद्यात उतरल्या आहेत. त्यांच्यासाठी भारत ही सगळयात मोठी बाजारपेठ आहे. (कारण भारताची मोठी लोकसंख्या. आख्ख्या युरोप-अमेरिकेत जेवढे ग्राहक मिळणार नाहीत, तेवढे एकटया भारतात मिळू शकतात. चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. पण भारतात पैसे मिळवण्याचं आणि ते मनासारखे खर्च करण्याचं जे स्वातंत्र्य आहे - ज्याची भारतीयांना काडीची किंमत नाही - ते चीनमध्ये नाही. म्हणून चीन ही पाश्चात्त्य लोकांसाठी कधीच उत्तम बाजारपेठ नाही.)

जाहिरातीद्वारे त्या कंपन्या आपल्या युवा पिढीच्या मनात रंगाविषयी न्यूनगंड निर्माण करतात, त्यांच्या उत्पादनाविषयी विश्वास निर्माण करतात आणि तुमचा रंग बदलला, की चित्रपटातल्या कलाकारांप्रमाणे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता, असं गाजर दाखवतात. आज या एकाच व्यवसायात कित्येक अब्जावधी डॉलर्सची उलाढाल चालू आहे. दर वर्षी यात 18% वाढ होते. दर वर्षी इतका पैसा आपण स्वखुशीने आणि बेफिकिरीने परदेशात पाठवतो.

पाश्चात्त्य लोक जे करतात ते प्रामाणिकपणे, विज्ञानाला धरून आणि काटेकोर संशोधन करून असतं, हा आपला आणखी एक भाबडा गैरसमज! त्यामुळे 'त्यांनी बनवलेली सौंदर्यप्रसाधनं स्टँडर्ड असतात' असं प्रमाणपत्र आपणच त्यांना मनातल्या मनात देऊन टाकतो. वस्तुस्थिती अशी आहे की सौंदर्यप्रसाधनं, त्यातील रासायनिक घटक, त्यांचे त्वचेवर होणारे परिणाम किंवा दुष्परिणाम यांच्यावर फारसं संशोधन झालेलं नाही. ही प्रसाधनं अन्न किंवा औषध या दोन्ही गटात बसत नसल्याने त्यांच्यासाठी कुठलेही कडक नियम बनवलेले नाहीत. बनवणारे लोक व्यापारी वृत्तीने बनवतात आणि आपण आंधळेपणे वापरतो.

ही क्रीम्स वापरून आपण काय मिळवतो? बऱ्याच क्रीम्समध्ये असलेल्या ब्लीचमुळे तात्पुरता गोरेपणा मिळतो. पण त्या मोहात पडून वारंवार/रोज त्यांचा वापर केला, तर पुढे जाऊन काय मिळतं? आजारी त्वचा, त्वचेवरील डाग, अधिक काळा (करपलेला/भाजलेला) रंग, त्वचेचा कर्करोग, ब आणि ड जीवनसत्त्वांची कमतरता, सूर्याच्या प्रखर किरणांचे दुष्परिणाम, रोगप्रतिकारक्षमतेची हानी...इ.इ.इ.

मग काय आम्ही कधी गोरे होणारच नाही? कसे होणार? आमचा देश आणि आनुवंशिकताच अशी आहे की आमच्या त्वचेत गडद मेलॅनिन तयार होतं, फिकट नाही. त्यावर काही उपाय करून एखादी शेड बदलू शकते. जाहिरातीत दाखवतात तसा पाच पाच शेडचा फरक होतो असा दावा करणं आणि त्यावर विश्वास ठेवणं - दोन्ही मूर्खपणाचं आहे.

लहानपणी आपल्याला बगळा आणि कावळा यांची गोष्ट सांगितली जायची. त्यातला कावळा, बगळयासारखा शुभ्र रंग मिळवण्यासाठी दगडाने अंग घासून, रक्तबंबाळ होऊन मरतो.. हा शेवट आपण विसरतो. आज आपण शब्दश: मरत नसलो, तरी सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करून जो वारेमाप पैसा सहज परदेशात पाठवतो, तेही तितकंच घातक आहे.

हां, आता आपला मुळातला सावळा/काळा रंग जास्त तेजस्वी (निखारवाला) होऊ शकतो. त्याचा आपण 'आयुर्वेदाच्या' पध्दतीने विचार करू या.

मुळात त्वचेचा निखार जाण्याची कारणं काय आहेत, ती समजून घेऊन ती टाळता आली तर जास्त फायदा आहे, नाही का? रात्रीची जागरणं, शिळं अन्न, फास्ट फूड, आंबट आणि खारट पदार्थांचं अतिरेकी सेवन, कोरडा आहार, तेल-तूपविरहित आहार, दिवसा झोप, अजिबात घाम न येणं, केसांना लावले जाणारे रासायनिक रंग, उन्हात काम... हे सगळे आपल्या त्वचेच्या प्राकृत वर्णाचे वैरी आहेत. करियरच्या किंवा अभ्यासाच्या मागे लागून तहान-भूक-झोप याचं भान हरवलेल्या व्यक्तींची किंवा फिटनेसच्या चुकीच्या कल्पनांपायी शरीराची चिपाडं झालेल्या व्यक्तींची त्वचा रसरशीत दिसेलच कशी? या चुका यथेच्छ चालू ठेवून, महागडया क्रीम्सच्या कितीही डब्या जरी चोपडल्या, तरी काही फायदा नाही. त्यामुळे ज्यांना आपला वर्ण सुधारायचा आहे, त्यांनी आधी आपली दिनचर्या सुधारावी.

रंग सुधारण्यासाठी त्वचेला लावायला कच्चं दूध, दही, कोरफडीचा/पपईचा/आंब्याचा गर, टोमॅटोचा रस, दूध+लिंबू रस, शतधौत घृत, कुंकुमादि तेल असे उपाय वैद्यांच्या सल्ल्याने करावे. (मनाने करू नयेत. कारण कुठल्या त्वचेला काय चालतं हे ठरवावं लागतं.)

रात्री दहाच्या आधी झोपणं, सकाळी सहाला उठणं, घाम गळेपर्यंत व्यायाम, गरम आणि ताजा आहार, आहारात देशी गाईचं दूध आणि तूप, फास्ट फूडला रामराम, योगासनं, प्राणायाम, अभ्यंग असे जीवनशैलीतले छोटे छोटे बदल केवळ आपलाच नाही, तर जीवनाचा रंगदेखील बदलतात.... करून बघा.

शेवटी भारतीयांसाठी संदेश हाच - जी गोष्ट निसर्गदत्त आहे, तिचा कसला आलाय न्यूनगंड? अहो, आपले तर देवदेखील सावळे आहेत. ते सौंदर्यात कुठेतरी उणे आहेत का? उलट त्यांचं रूप निरतिशय देखणं, आपल्याला वश करून घेणारं आणि मन प्रसन्न करणारं असंच आहे.

तुकोबांची माफी मागून आणि त्यंाच्या शब्दांत थोडा बदल करून मी तर म्हणेन की भारतीयांनो,

सावळे सुंदर। रूप मनोहर। राहो निरंतर। स्मरणी माझे॥

9322790044