ख्रिस्ती प्रचारकांनी पोखरलेला पूर्वांचल

विवेक मराठी    07-Feb-2017
Total Views |

भारतातील ईशान्य भागातील अगदी अंतर्गत दूर असलेल्या भागात ख्रिश्चन धर्मगुरू व नन्स तेथील अडचणींची पर्वा न करता धर्मप्रचार सातत्याने करीत आहेत व त्यांना आता येशू ख्रिस्त तुमच्याकडे तुमच्यावरील प्रेमाने आला आहे असे सांगत आहेत. ज्या ठिकाणी कोणीही जाण्याचे धैर्य दाखवले नाही, तेथील लोक आता त्यांच्याकडे येत आहेत. याचे मुख्य कारण हे धर्मगुरू व नन्स त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखेच जीवन जगत आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या बोटचेप्या धोरणामुळे पूर्वांचल प्रदेश ही एक डोकेदुखी असणारा प्रश्न झाला आहे. याची सुरुवात नागालँडपासून झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्वेस आसाम हा एक मोठा भूप्रदेश होता. नागालँड, मणिपूर, मेघालय वगैरे राज्ये इंदिराबाईंच्या कारकिर्दीत अस्तित्वात आली. फिझो म्हणून नागालँडमधील पुढारी होता, त्याला ब्रिटिशांची चिथावणी होती. त्यांचे म्हणणे होते की, नागालँड हा भारताचा हिस्सा नसून स्वतंत्र राज्य आहे. कारण भारतातील External Affairsमधून त्याचा राज्यकारभार होतो. तेथे त्यांनी Federal government of Nagaland म्हणून आपले सरकार निर्माण केले. त्यांचा तथाकथित पंतप्रधान कुधारो सुखी यांनी पं. नेहरूंबरोबर सहा वेळा चर्चा केली. या चिथावणीला कारण म्हणजे 19व्या शतकापासूनच ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी तेथे प्रवेश केला होता. त्याला अर्थातच ब्रिटिश सरकारचा पाठिंबा होता. हा संपूर्ण भाग डोंगराळ असून तेथे असंख्य जमातींच्या टोळया आहेत. त्यांच्या वेगवेगळया भाषा आहेत. तेथे रेव्हरंड स्कॉट हा मिशनरी कार्यरत होता व तो या फुटीरतेला अप्रत्यक्ष पाठिंबा देत होता. रेव्हरंड स्कॉटला भारतातून हाकलून द्यावे म्हणून पं. नेहरूंकडे पुष्कळ पुढाऱ्यांनी मागणी केली होती, पण पं. नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले.

पं. नेहरूंचे पुतणे बी.के. नेहरू हे 1968 साली आसामचे राज्यपाल होते. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, (पृष्ठ 537) 19व्या शतकात ब्रिटिश सरकारचा प्रमुख उद्योग व त्याला पारमार्थिक तत्त्वज्ञान जोडून या विभागात जे पतित (Heathens) लोक जंगलात राहतात, त्यांना ख्रिश्चन धर्मात आणणे जरूरी आहे आणि त्यांचा उध्दार करण्याकरिता त्या कामाला वाहून घेतलेल्या मिशनरींची आवश्यकता आहे. त्याकरिता त्यांना नुसती बायबलची आवश्यकता नसून त्यांना शिक्षण व औषधोपचाराची जरुरी आहे. (This enlightenment was eventually brought by dedicated missionaries who along with Gospel gave to the tribes education, medical attention and turned them away from head hunting.) बी.के. नेहरूंनी पुढे लिहिले आहे की, नेफा - NEFA, ज्याला आपण अरुणाचल प्रदेश म्हणतो, तेथे रोमन कॅथलिक मिशनरींनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात आल्यानंतर बी.के. नेहरूंनी तेथील शाळांमधून हिंदी शिकवण्याचे आदेश दिले. त्या दरम्यान राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी तेथे भेट दिली असताना इंग्लिशमध्ये बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा तेथील पुढारी बोकुम एटे (Bokum Ete) यांनी सांगितले की, तेथील विद्यार्थ्यांना इंग्लिश समजत नाही. त्यानंतर डॉ. राधाकृष्णन हिंदीत बोलले.

आज अशी स्थिती आहे की नागालँड, मिझोराम, मेघालय व इतर राज्यांत जवळजवळ 70 टक्के लोकांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देण्यात आली आहे. विवेकानंद केंद्राने आता तेथे लक्ष घालून त्या लोकांकरिता शाखा चालू केल्या आहेत. रा.स्व. संघाच्या प्रचारकांचे काम चालूच आहे. तेथील काही कार्यकर्त्यांचे खून झालेले आहेत.

या संदर्भात हिंदू व्हॉइसमध्ये Elise Harris या लेखकाचा एक लेख आला आहे. (catholicnewsagency.com). त्याने लिहिले आहे, भारतातील ईशान्य भागातील अगदी अंतर्गत दूर असलेल्या भागात ख्रिश्चन धर्मगुरू व नन्स तेथील अडचणींची पर्वा न करता धर्मप्रचार सातत्याने करीत आहेत व त्यांना आता येशू ख्रिस्त तुमच्याकडे तुमच्यावरील प्रेमाने आला आहे असे सांगत आहेत. ज्या ठिकाणी कोणीही जाण्याचे धैर्य दाखवले नाही, तेथील लोक आता त्यांच्याकडे येत आहेत. याचे मुख्य कारण हे धर्मगुरू व नन्स त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखेच जीवन जगत आहेत. तेथील शेण-बांबूच्या झोपडयांतून राहतात. या ठिकाणी कसल्याही सुखसोई उपलब्ध नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांच्याबरोबर जमिनीवर बसून तेथील लोक जे जेवण बनवतात ते त्यांच्याबरोबर खातात.

केरळमध्ये या लोकांनी ठिकठिकाणी चर्चेस बांधून तेथील शाळांतून धर्मप्रचार केला, तसे न करता त्यांनी हा नवा मार्ग स्वीकारला आहे, तो म्हणजे त्यांच्यासारखेच राहणे व त्यांना येशू ख्रिस्ताची ओळख पटवून त्यांना येशू ख्रिस्त तुमच्यावरील प्रेमाने येथे येणार असल्याचे सांगणे. Catholic Near East Walfare Association या संस्थेच्या कार्यकर्त्याने सर्व पूर्वांचल व आसामला नोव्हेंबर 20 ते डिसेंबर 2 दरम्यान भेट दिली व तेथील लोकांना येशू ख्रिस्ताची ओळख व मोठेपणा सांगितला. एवढेच नव्हे, तर तेथील पूर्वांचलातील चर्चेस तेथे गरिबांकरिता कार्य करते त्यांनादेखील भेट दिली. या दरम्यान उत्तरेतील आर्च बिशप कुरिआकोसे (Kuriakose) (Syro Malabar Diocese of Faridabad) आणि बिशप जेकब मार बर्नाबास Diocese of Gurgan यांनी खूप मदत केली.

पूर्वांचल झाल्यानंतर दिल्ली व हरियाणामधील Syro Malabarनी तेथे ज्या शाळा काढल्या होत्या, त्यांनासुध्दा कोझरनी भेट दिली. वास्तविक या शाळांना शिक्षण मंत्रालयाची मान्यता नसूनदेखील त्या शाळा तेथील लहान मुलांना तेथे शिकवण्याची सोय करतात.

कोझर यांनी सांगितले की, जेथे जेथे ते गेले तेथे त्यांचे मन:पूर्वक (Very Very Warmly) स्वागत करण्यात आले. तेथील स्त्री-पुरुषांनी तेथील लोकनृत्य आणि गाणी म्हणून त्यांचे स्वागत केले.

तो भाग एवढा डोंगराळ व पोहोचण्यास दुर्गम आहे की, तेथे त्यांनी पहिल्यांदा या गोऱ्या माणसाला पाहिले. या भागात नुसतेच जंगल नसून तेथे वन्य हिंस्र पशूदेखील असून तेथील माणसांवर हल्ले करतात.

कोझर यांनी पुढे सांगितले की, त्या भेटीदरम्यान तेथील एका महिलेवर वाघाने हल्ला करून त्या बाईला ठार केले होते. दुसऱ्या एका भागात जंगली हत्तींनी एका मनुष्याला आपल्या पायाखाली चिरडले होते. तेथे असे प्रसंग नेहमीच घडत असतात. त्या ठिकाणी Syro Malankara चर्चने तेथील स्थानिक लोकांकरिता बरेच काम केले आहे. मुख्य शिक्षण म्हणजे येशू ख्रिस्त व मेरी यांची ओळख, बायबलमधील प्रार्थना व त्यातील उतारे वाचून दाखवण्यात येतात व त्यांच्याकडून प्रार्थना म्हणून घेऊन त्यांना प्रार्थनेचे महत्त्व पटवतात.

कोझर पुढे सांगतात, - यात घाई करून उपयोग नाही. आम्ही हळूहळू त्यांना आमच्या कळपात ओढून घेणार आहोत. या बाबतीत Syro Malankara चर्च त्यांना बाटवण्याचे (Baptism) काम फार जबाबदारीने व योग्य रितीने करीत आहेत. लोकांचा प्रतिसाद फार चांगला आहे व दोन वर्षांत तेथे हे Baptism ख्रिस्तीकरणाचे काम पुरे होईल अशी त्यांना आशा आहे.

एका चर्चच्या पायाभरणी प्रसंगाकरिता आणि धार्मिक कार्याकरिता तेथे 575 लोक आले होते. ते केवळ तेथील नव्हे, तर डोंगराळ भागातील, दुसऱ्या भागांतून ट्रकमधून 7 तास प्रवास करून आले होते. काही जण तर अनवाणी चालत आले होते.

त्या लोकांनी आपली वेषभूषा केली होती व आपापली वेगवेगळया प्रकारची नृत्ये व गाणी म्हणून समारंभ साजरा केला. हे केवळ चर्चमुळेच झाले व त्यांच्या प्रयत्नाने त्यांना वेगवेगळया भागांतून येथे आणण्यास मदत केली. येथील कित्येक लोक जवळच्या Tea Estatesमध्ये काम करतात व तेथे शाळा नसल्यामुळे लहान लहान 7 वर्षांची मुले विटांच्या कारखान्यात काम करतात.

काही मुले शाळांमधून जातात, पण त्यांना ते शिक्षण झेपत नाही व शाळा सोडून जातात. त्यामुळे तेथे चर्चने तेथे उघडयावर शाळा (Open School) चालू केल्या आहेत. तेथे मूलभूत शिक्षण दिले जाते. या Open Schoolला सरकारी मान्यता नसूनदेखील चर्च तेथे शाळा चालू करते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

जी मुले बाहेर कचरा किंवा टाकून दिलेल्या वस्तू जमा करीत, त्यांच्याकरिता या शाळा त्यांना वरदान आहेत. कारण त्यांना चांगल्या रितीने शिक्षण दिले जाते.

काही काही ठिकाणी तर 400-500 फूट उंच घाणीचे डोंगर आहेत व आजूबाजूचे ट्रक्स येथे आणखी कचरा आणून टाकतात. तेथील लोक त्या कचऱ्यातून लोखंडाचे किंवा अन्य धातूंचे काही तुकडे, प्लॅस्टिकच्या वस्तू वगैरे गोळा करतात.

कोझरनी सांगितले की, येथील लोक आमच्याशी फार चांगल्या तऱ्हेने वागतात व काही प्रसंगी आम्हाला संरक्षण देतात. काही लोकांनी सांगितले की तुमच्या नन्सना कोणी त्रास दिला किंवा छेडछाड केली तर आम्हाला सांगा. आम्ही ताबडतोब येऊन त्यांना संरक्षण देऊ.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या सरकारचे तेथे अजून दुर्लक्ष झाले आहे व ख्रिस्तीकरण उघडउघड चालू आहे.

022-28728226