'सुंभ 'जळला तरी...

विवेक मराठी    24-Jun-2017
Total Views |


पवार परवा पुण्यात बसले होते. अफजलखान, शाहिस्तेखान यांचीही वेगळया प्रकारची चरित्रे या मंडळींनी निर्माण केली आहेत. त्यांच्या चरित्रकथनांचे प्रयोगही पुण्यात होत असतात. ''महाराष्ट्राच्या गावखेडयात उभ्या असलेल्या पुरातन मंदिरातल्या प्राचीन मूर्ती ज्या भग्नावस्थेत आजही पाहायला मिळतात, त्या इस्लामी आक्रमकांनी तोडल्या नसून त्यांनी हाती घेतलेले ते मंदिर जीर्णोध्दाराचे अपुरे काम आहे'' असेदेखील पवार उद्या सांगू शकतात.

व्वदीच्या दशकात रामजन्मभूमी आंदोलन सर्वदूर पसरले होते. जातिभेद विसरून सगळा हिंदू समाज या आंदोलनात सहभागी झाला होता. हे सामाजिक अभिसरण घडत असताना पवारांच्या तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात एक घोषणा गाजत होती - 'दलित-मुस्लीम भाई-भाई, हिंदू कौम कहाँसे आई?' आता ही घोषणा कोणी दिली? का दिली? कुणाच्या सांगण्यावरून दिली? याचा शोध स्वत:ला पुरोगामित्वाचे ठेकेदार म्हणविणाऱ्यांनी नक्कीच घ्यावा. पवारांचे अफजलखानाविषयीचे परवाचे विधान याच जातीयवादी विषारी राजकारणाचा एक भाग आहे. पुरोगामित्वाचे कातडे पांघरून आणि आपल्या भाटांकडून सतत सुसंस्कृत असण्याचे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या पवारांनी हे 'सोशल इंजीनिअरिंग' जोरदार केले. सकल समाज महाराष्ट्र म्हणून एकत्र येण्याकरिता प्रयत्न करण्यापेक्षा जातीय टक्केवारीत तो विभागून ठेवायचा.... एकसंध समाज हाताळायची क्षमता नसली, की मग हे तुकडयातले लाचार म्होरके सांभाळत बसायचे, हे पवारांचे राजकारण. मायावतींनी एकेकाळी उत्तर प्रदेशात जातींचे सोशल इंजीनिअरिंग यशस्वीरित्या केल्याचे सांगितले जाते. अत्यंत धूर्तपणे मायावतींनी आपल्या जुनी घोषणा 'हाथी नही गणेश है, ब्रह्मा-विष्णू-महेश है' अशी बदलून घेतली आणि उत्तर प्रदेशात राजकीय यश संपादन केले. मायावतींचे हे राजकारण तत्कालीन होते आणि त्याचे त्यांना तसेच तत्कालीन यशही मिळाले. जे यश मायावतींना उत्तर प्रदेशात मिळाले, तसे यश पवारांना महाराष्ट्रात स्वत:चा पक्ष काढल्यावर कधीच मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अंध भक्तांचा हा 'जाणता राजा' जाणता-अजाणता असेच गलिच्छ राजकारण करीत राहिला. ज्या मंडळींच्या मांडीला मांडी लावून पवारांनी कालचे उद्गार काढलेत, त्या सगळया मंडळींनी जातीच्या आधारावर महाराष्ट्र तोडण्याची घाऊक कंत्राटे मिळविली होती. कधी दादोजी कोंडदेव, कधी जन्मोत्सव, तर कधी आणखी काही. कर्नाटकातल्या वीरगळांमध्ये जी शिवाजी महाराजांची शिल्पे आहेत, त्यात त्यांच्यासोबत एक कुत्रा आहे. पण या गलिच्छ लोकांनी त्या इमानी वाघ्या कुत्र्यालासुध्दा आपल्या हीन राजकारणात ओढले आणि दादोजींनंतर वाघ्या कुत्र्यावरून राजकारण करून मराठा समाजातील तरुणांची माथी भडकविण्याची कामे केली. महापुरुषांना फक्त स्वत:च्या जातीची लेबले लावण्याची विकृती सर्वच समाजांत आहे. असे लोक सर्वच जातींत आहेत. त्यांना भावनिकदृष्टया चिथावले की 'एक विरुध्द दुसरा' असा संघर्ष उभा करणे आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळया भाजून घेणे सोपे असते. याला दोन्ही बाजूंची मंडळी बळी पडतात आणि जातीय राजकारण करणाऱ्यांचे चांगभले होते.

 जातीय राजकारण ही भारतीय राजकारणाची अपरिहार्यता होऊन बसली होती, तेव्हा जातींना आपल्या पक्षाच्या बाजूने आणून उभे करण्याचे काम भाजपानेही केले आणि त्याची फळेही मिळविली. महाराष्ट्राच्या राजकारणातला 'माधव' फॅक्टर हादेखील असाच प्रयोग होता, मात्र त्यातून गोपीनाथ मुंडेंसारखा 'लोकनेता' उभा राहिला. बहुजन समाजातील एक माणूस 'नेता' म्हणून पुढे आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक खमके पर्यायी व्यक्तिमत्त्व उभे राहिले. याउलट पवारांच्या जातीय राजकारणातून पुढे आलेली माणसे आजही आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. पवार जे बोलले, ते मुंब्य्राच्या गल्ल्यांमध्ये गाझा पट्टया वाचवायला निघालेल्या जितेंद्र आव्हाडांनी यापूर्वीही टीव्ही चॅनेलवर सांगितले आहे. पवार यांनी जे सांगितले, त्यातील बरीचशी गरळ त्यांनीच पाळलेल्या राजकीय पिलावळीने आधीच ओकली आहे. खरे तर यांना शिवाजी महाराजही नकोच आहेत. पण सर्वसामान्यांच्या मनावर शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की यांच्यासारख्या कितीतरी लोकांनी कितीही कोल्हेकुई केली, तरी त्या शिवगर्जना उत्तुंगच वाटत राहतात. हिंदू अस्मितेचे जाज्वल्य प्रतीक असलेले छत्रपती इतके स्वयंभू आहेत की, यांच्यासारख्या कितीतरी लोकांनी ते कसेही वाकवून पेश करायचे ठरविले, तरी मूळ छत्रपती त्यांच्या हिंदू तेजाने तळपतच राहतात. गोविंदराव पानसरेंसारख्या डाव्या विचारवंतांनीही वेगळा शिवाजी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना तो शोषितांसाठी लढणारा वाटतो. महापुरुष ज्या कोणत्या दृष्टीकोनातून पाहिले जातात, त्या-त्या दृष्टीकोनातून ते मोठेच भासतात, हे त्यांचे वेगळेपण असते. पण जातीय राजकारण करणाऱ्यांनी तर कळसच केले. शिवचरित्राचे पर्यायी लिखाण करणाऱ्यांसोबतच पवार परवा पुण्यात बसले होते. अफजलखान, शाहिस्तेखान यांचीही वेगळया प्रकारची चरित्रे या मंडळींनी निर्माण केली आहेत. त्यांच्या चरित्रकथनांचे प्रयोगही पुण्यात होत असतात. ''महाराष्ट्राच्या गावखेडयात उभ्या असलेल्या पुरातन मंदिरातल्या प्राचीन मूर्ती ज्या भग्नावस्थेत आजही पाहायला मिळतात, त्या इस्लामी आक्रमकांनी तोडल्या नसून त्यांनी हाती घेतलेले ते मंदिर जीर्णोध्दाराचे अपुरे काम आहे'' असेदेखील पवार उद्या सांगू शकतात.

 वस्तुत: रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी जाहीर झाले आणि पवारांचे सगळे राजकारण संपले. तसेही पवार राष्ट्रपती कधीच होणार नव्हतेच, पण त्यांच्या अंध भक्तांना कुणी समजवावे? नरेंद्र मोदींनी भारताच्या राजकारणाचा जो काही पोत बदलला, त्यात असले अनेक सुंभ जळून राख झाले, पण काहींचे पीळ अजून बाकी आहेत. जातीयतेच्या राजकारणापलीकडे जाऊन मोदींनी भारतीयांना विकासाच्या अजेंडयावर आणून मतदान करायला लावले. लालू, पवार, मुलायम, मायावती ही अशी माणसे आज राजकारणाच्या पटलावरून हळूहळू अस्तंगत होत चालली आहेत. त्यामुळे त्यांची विधाने ऐकताना त्यांची तडफड समजून घेतली पाहिजे.

buletforbulet@gmail.com