लेखकाच्या स्मृती जपण्यासाठी सांस्कृतिक सोहळे

विवेक मराठी    21-Sep-2017
Total Views |

 बी. रघुनाथांच्या स्मृतीनिमित्त सामान्य रसिक एकत्र येऊन सोहळा साजरा करतात, हे जास्त महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच हा उत्सव टिकून आहे. त्यात औपचारिकता नसून उत्स्फूर्तता आहे. आषाढीला महाराष्ट्रभरातून विविध संतांच्या नावाने दिंडया निघतात आणि त्या सगळया मग आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जमा होतात. याप्रमाणेच विविध साहित्यिकांच्या नावाने महाराष्ट्रभर वर्षभर सोहळे साजरे व्हावेत आणि या सगळयांची 'वाङ्मयीन एकादशी' साहित्य संमेलनाच्या रूपात साजरी व्हावी. 

काळ अतिशय प्रतिकूल असा, स्वातंत्र्यापूर्वीचा. जात्यंध-सरंजामदारी निजामी राजवटीचा. एक लेखक अतिशय हलाखीच्या स्थितीत हैदराबाद या राजधानीच्या गावापासून मैलो दूर परभणीसारख्या तेव्हाच्या खेडेवजा शहरात राहून वाङ्मयनिर्मिती करतो. एक-दोन नाही, तर तब्बल सात कादंबऱ्या, पाच कथासंग्रह, सव्वाशे कविता इतकी निर्मिती अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात करतो. ओढगस्तीत त्याची तब्येत खालावत जाते. शेवटी नोकरीच्या ठिकाणीच, 7 सप्टेंबर 1953 रोजी हृदय बंद पडून त्याचा करुण देहान्त होतो. तो दिवस असतो पोळयाचा. अमावस्येचा.

बरोबर पन्नास वर्षांनी 7 सप्टेंबर 2002 रोजी अमावस्याच असते. या लेखकाची स्मृती जपण्यासाठी एक कोटी रुपये खर्च करून भव्य स्मारक उभारले जाते. ग्रेससारख्या प्रतिभावंत कवीच्या हस्ते त्या स्मारकाचे उद्धाटन होते.

कविवर्य बोरकरांनी असे लिहून ठेवले होते -

मी विझल्यावर त्या जागेवर

नित्याच्या जनरितीप्रमाणे

विस्मरणाची थंड काजळी

उठेल थडगे केविलवाणे

मी विझल्यावर त्या जागेवर

पण कोण्या अवसेच्या रात्री

धुळीत विखुरल्या कविता माझ्या

धरतील चंद्र फुलांची छत्री

ओळी लिहिल्या बोरकारांनी, पण त्या अगदी शब्दश: खऱ्या ठरल्या या लेखकाच्या बाबतीत. अमावस्येलाच या कवीच्या कवितांनी, त्याच्या साहित्यानेच त्याच्यावर चंद्र फुलाची छत्री धरली. त्याचे सुंदर स्मारक साकार झाले. या कवीचे नाव आहे बी. रघुनाथ.

भगवान रघुनाथ कुलकर्णी हे त्या लेखकाचे मूळ नाव. निजामी राजवटीत तेलगू पध्दतीप्रमाणे त्यांनी लेखक म्हणून टोपणनाव स्वीकारले 'बी. रघुनाथ'.

या लेखकाच्या नावाने परभणीत स्मारक उभारले गेले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या मृत्यूनंतर लगेच 1956मध्ये भर गावात एक सभागृह उभारण्यात आले होते. नंतर 2002मध्ये नवीन स्मारक पुतळयासह उभारण्यात आले. इतकेच नाही, तर गेली 15 वर्षे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सप्टेंबर महिन्यात चार दिवसांचा 'बी. रघुनाथ महोत्सव' भरविला जातो. बी. रघुनाथांच्या नावाने मोठे महाविद्यालय परभणी शहरातच सुरू करण्यात आले आहे.

औरंगाबादला गेली 28 वर्षे 'बी. रघुनाथ स्मृती संध्येचे' आयोजन करण्यात येते. त्यांच्या नावाने एक मोठा वाङ्मयीन पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी प्रा. नितीन रिंढे यांच्या 'लिळा पुस्तकांच्या' या पुस्तकाला प्रख्यात नाटककार अजित दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे.

एखाद्या लेखकाचे स्मारक उभारणे आणि त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ असे सोहळे साजरे करणे हे महाराष्ट्रात फार दुर्मीळ आहे. केशवसुतांचे मालगुंडला देखणे स्मारक उभे आहे.  पु.ल. देशपांडे यांच्या नावाने मुंबईला एक अकादमी स्थापन करण्यात आली आहे. पु.लं.चा पुतळाही रवींद्र नाटय मंदिराच्या परिसरात आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृती नाशिककर सतत जागवत असतात. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने मोठे कामही उभे केले आहे. नांदेडला प्रा. नरहर कुरुंदकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. जळगावला 'काव्य रत्नावली' चौक उभारून कवींची स्मृती जागविली गेली आहे. हे ठळक अपवाद वगळले तर लेखकाची स्मृती जपण्याचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. उलट विखारी जातीय भूमिका घेत लेखकांचे पुतळेच उखडून टाकण्याची मात्र उदाहरणे आहेत.

साहित्य संमेलनांची मोठी परंपरा महाराष्ट्रात असताना लेखकांची मात्र उपेक्षा कशामुळे केली जाते?

 सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, महत्त्वाच्या लेखकाच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व साहित्याचे पुनर्मुद्रण झाले पाहिजे. जे लिखाण प्रसिध्द झाले नसेल ते प्रकाशात आले पाहिजे. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे त्या लेखकाच्या महत्त्वाच्या कलाकृतींवर आधारित विविध कार्यक्रमांचे सादरीकरण. रवींद्रनाथ टागोरांवर आजही बंगालात विविध कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. आजही तरुण कलाकार मोठया उत्साहाने रवींद्र संगीताचे सादरीकरण करतात.

पण मराठीत हे होताना दिसत नाही. आधुनिक काळातील लेखक तर नंतरची बाब आहे. पण ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, चोखामेळा, महदंबा, सोयराबाई, मुक्ताबाई, जनाबाई यांच्या समग्र लिखाणाची अर्थासह स्पष्टीकरण देणारी सटीप आवृत्ती आहे का?

अण्णाभाऊंचे पुतळे जातीय राजकारणाच्या सोयीसाठी गावोगाव उभारलेले दिसतात. पण त्याचा साहित्यप्रेमाशी काडीचाही संबंध आढळून येत नाही.

एक अतिशय साधी योजना आखता येऊ शकते. त्या त्या परिसरातील दिवंगत साहित्यिकाच्या स्मारकासाठी त्या  त्या परिसरातील 'अ' दर्जाच्या ग्रंथालयाला विशिष्ट निधी देऊन त्यांना पुतळा उभारणे, पुस्तके प्रकाशित करणे, स्मृती सोहळे साजरे करणे यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. महाराष्ट्रात 235 जिल्हा 'अ' दर्जाची शासनमान्य ग्रंथालये आहेत. यांना नियमित अनुदानही दिले जाते. सर्व ग्रंथालयांची स्वत:ची छोटी-मोठी इमारत आहे, सभागृह आहे, पुतळाच उभारायचा असेल तर जागाही उपलब्ध होऊ शकते. काही ठिकाणी नगरपालिकेची, महानगरपालिकेची खुली जागा ग्रंथालयांना लागून असेल, तर तीसुध्दा पुतळयासाठी उपलब्ध होऊ शकते. काही लेखकांचे नातेवाईक जे आर्थिकदृष्टया सुस्थितीत असतील, ते देणगीही देऊ शकतात. (औरंगाबादला पत्रकार अनंत भालेराव यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा पुतळा साहित्य परिषदेला देणगीदाखल दिलेला आहे.)

काही शैक्षणिक संस्थाही यासाठी पुढाकर घेऊ शकतात. नांदेडला नरहर कुरुंदकर स्मारकासाठी तेथील शैक्षणिक संस्थेने असा पुढाकार घेतलाही आहे.

प्रत्येक वेळी शासनाची मदत पाहिजे, अनुदान पाहिजे असेही नाही. गावोगावी विविध उत्सव दणक्यात साजरे होतच असतात. अगदी खेडयागावातही हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह होतात. त्यावर प्रचंड खर्चही होतो. मग काही ठिकाणी अशा संस्थांनी पुढाकार घेऊन हेच सोहळे त्या त्या भागातील प्रतिभावंतांच्या स्मृतीत साजरे केले, तर कुठे बिघडले?

हे का करायचे? तर हे प्रतिभावंत काळाच्या पुढचे पाहत असतात. ज्यांची प्रतिभा काळावर टिकते, त्यांची दखल आपण घ्यायलाच हवी. बी. रघुनाथ यांनी 1945मध्ये असे लिहिले होते -

राउळी जमतो भावुक मेळा

गुरवाचा गांजावर डोळा

त्यातही डोळे किती निराळे

भक्त कुणा समजावे ।

आज कुणाला गावे ॥

संन्याशाच्या छाटीत चोळी

मुमुक्षु  फिरतो गल्ली बोळी

विविधरंगी या शुका-बकातील

नितळ कसे निवडावे ।

आज कुणाला गावे ॥

आज जिकडे तिकडे सामान्य भक्तांची दिशाभूल करणाऱ्या बाबा/बुवा/बापूंचा विषय चर्चेत आहे आणि सत्तर वर्षांपूर्वी एक कवी नेमके हेच टिपून ठेवतो, हे त्याच्या प्रतिभेचे मोठेपण नाही का?

बी. रघुनाथांच्या स्मृतीनिमित्त सामान्य रसिक एकत्र येऊन सोहळा साजरा करतात, हे जास्त महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच हा उत्सव टिकून आहे. त्यात औपचारिकता नसून उत्स्फूर्तता आहे.

आषाढीला महाराष्ट्रभरातून विविध संतांच्या नावाने दिंडया निघतात आणि त्या सगळया मग आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जमा होतात. याप्रमाणेच विविध साहित्यिकांच्या नावाने महाराष्ट्रभर वर्षभर सोहळे साजरे व्हावेत आणि या सगळयांची 'वाङ्मयीन एकादशी' साहित्य संमेलनाच्या रूपात साजरी व्हावी. 

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575