चित्रपट साक्षरतेसाठी प्रयत्नांची गरज

विवेक मराठी    22-Jan-2018
Total Views |

'चित्रपट साक्षरता' असा एक शब्दप्रयोग या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. त्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. अगदी अलीकडे मराठीतसुध्दा 'कोर्ट', 'कासव', 'लेथ जोशी' यासारखे वेगळी चित्रभाषा असलेले चित्रपट येत आहेत. चित्रपट संस्कृती म्हणत असताना त्यात चित्रपट सोसायटया, चित्रपट महोत्सव, चित्रपटांवरील चांगले लिखाण, चित्रपटांवर चर्चा, मोठया प्रयोगशील दिग्दर्शकांशी संवाद, चित्रपटविषयक मासिके या सगळयांचा अंतर्भाव आहे.

 गोव्यात नोव्हेंबर 2017मध्ये 48वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. पुण्याचा चित्रपट महोत्सव सुरू आहे. औरंगाबादला 18 ते 21 जानेवारीला होत आहे. नागपूर-सोलापूरलाही चित्रपट महोत्सव रुजले आहेत. मुंबईत स्थापन झालेले 'प्रभात चित्र मंडळ' आता आपला सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. 5 जुलै 1968 रोजी या फिल्म सोसायटीची स्थापना झाली.

बऱ्याच जणांना असे वाटते की आपल्याला डोळे आहेत, तेव्हा चित्रपट पाहण्यासाठी वेगळे काही करण्याची गरजच काय? तसे चित्रपट हे भारतात अतिशय लोकप्रिय माध्यम राहिले आहे. चित्रपट तुफान चालतात. नायक-नायिकांना अतोनात पैसे मिळतात. रसिकांचे प्रेम मिळते. मग या सगळयात फिल्म सोसायटी काढून महोत्सव भरवून वेगळे असे सांगण्याची काय गरज?

आधी चित्रपट पाहायचा तर टॉकीजवर जावे लागायचे. आता टीव्हीमुळे तो आपल्या घरात शिरला आहे; इतकेच काय, मोबाइलमुळे आता तर तो अगदी हाताच्या मुठीतच आला आहे. मनोरंजन म्हणून चित्रपटाकडे पाहणाऱ्यांचा काही प्रश्नच नाही. त्यांना काही म्हणून प्रश्न पडतच नाहीत. दोन-एक तास फुल्ल करमणूक झाली की विषय संपला. वर्षातून असे निदान पाच-दहा चित्रपट तरी हिंदीत निघतातच. बाकी हॉलीवूडला तर गल्लाभरू चित्रपटांची भरमसाठ संख्या असते. बिनडोक करमणूकवाल्यांची गरज भागते.

पण याशिवाय चित्रपट ही एक कला आहे. जागतिक पातळीवर या कलेकडे गांभीर्याने पाहणारे लोक आहेत. निर्माते, दिग्दर्शक जगभर विविध प्रयोग करत आहेत. गेल्या शंभर-दीडशे वर्षांपासून जगभर चित्रपटांचा प्रवास चालू आहे. हे चित्रपट पाहताना त्यातील कलात्मकता काही लोकांच्या लक्षात यायला लागली. मग चित्रपट कसा पाहावा? त्याची म्हणून वेगळी चित्रभाषा असते, ती कशी समजून घ्यावी? अभिजात चित्रपट कसा असतो? हे प्रश्न जास्तच तीव्रतेने पडायला लागले आहेत. यासाठी जगभर 'फिल्म सोसायटी'ची चळवळ वाढीस लागली. मुंबईत आणि तेही परत मराठी माणसांच्या पुढाकाराने 'प्रभात चित्र मंडळ' स्थापन झाले.

सत्यजीत राय यांचे नाव सर्वांना माहीत असते. त्यांच्या चित्रपटांची माहिती असते. त्यांचे काही चित्रपट पाहिलेलेही असतात. त्यांच्या चित्रपटांवर चांगले लिखाण अगदी मराठीतही आता आले आहे. पण याच सत्यजीत राय यांनी बंगालीत चित्रपट सोसायटयांची मोठी चळवळ राबविली, याची फारशी माहिती नसते.

महाराष्ट्रात विभागीय केंद्र शोभावीत अशी जी मोठी गावे आहेत, निदान तिथे तरी चित्रपट सोसायटी - 'फिल्म क्लब' स्थापन झाले पाहिजेत. वर्षभर विविध चित्रपट, त्यांच्यावर चर्चा, तज्ज्ञांची भाषणे, माहिती मिळाली पाहिजे, चिकित्सा झाली पाहिजे. वर्षभर अशा उपक्रमांची परिणती म्हणजे मग त्यातून एक वार्षिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविला गेला पाहिजे.

बऱ्याच जणांना वाटते की चित्रपट काय, कुठेही पाहायला मिळतात. पण तसे होत नाही. अजूनही बरेच चांगले दर्जेदार चित्रपट यू टयूबवर किंवा इतरत्र कुठेच उपलब्ध नाहीत. शिवाय चांगल्या चित्रपटांची माहितीही उपलब्ध होत नाही. खरे तर आता जी संपर्काची साधने आहेत, त्यांचा वापर करून चांगल्या चित्रपटांची सविस्तर माहिती रसिकांपर्यंत पोहोचविता येते.

चित्रपट महोत्सवात केवळ नवेच चित्रपट दाखविले जातात. त्यातील बरेच चित्रपट तर पुढे प्रदर्शित होतही नाहीत किंवा कुठे/केव्हा प्रदर्शित होतात हेही कळत नाही. मग असे चांगले चित्रपट गोळा करून ते चित्रपट सोसायटयांच्या माध्यमांतून दाखविता येऊ शकतात.

असाही आरोप केला जातो की आजकालची तरुण पिढी चांगले दर्जेदार चित्रपट पाहातच नाही. त्यांना काहीतरी अश्लील, बिभत्स हाणामारी पाहण्यातच रस असतो. औरंगाबादला मागच्या वर्षी उद्धाटनाच्या सत्रात 'रऊफ' हा तुर्की भाषेतला चित्रपट दाखविला गेला. बारा वर्षाच्या एका मुलाचे मोठया मुलीशी असलेले एकतर्फी प्रेम आणि पार्श्वभूमीवर त्या प्रदेशातील युध्दजन्य परिस्थिती असा गंभीर विषय होता. पण त्याला तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. इतकेच नाही, तर सगळयांनी आग्रह करून संयोजकांना या चित्रपटाचा आणखी एक खेळ ठेवण्यास भाग पाडले.

'चित्रपट साक्षरता' असा एक शब्दप्रयोग या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. त्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. अगदी अलीकडे मराठीतसुध्दा 'कोर्ट', 'कासव', 'लेथ जोशी' यासारखे वेगळी चित्रभाषा असलेले चित्रपट येत आहेत. हे कुठल्याच रूढ अर्थाने मराठी चाकोरीबध्द चित्रपट नाहीत. 'लेथ जोशी' या अजूनही प्रदर्शित न होऊ शकलेल्या चित्रपटात पार्श्वसंगीतासाठी सारंग कुलकर्णी या तरुण कलाकाराच्या सरोद वादनाचे तुकडे अप्रतिमरित्या चपखल असे वापरले आहेत. तरुण दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी संपूर्ण चित्रपटाची हाताळणी अतिशय वेगळी केली आहे. (हा चित्रपट अगदी अलीकडचा आहे, म्हणून हा उल्लेख केला.)

जागतिक पातळीवर 'मूव्ही, म्युझिक, मॅथेमॅटिक्स' या तीन '3 एम'ची भाषा आंतरराष्ट्रीय म्हणून ओळखली जाते. आपल्याकडे संगीत आणि गणित यांची फार मोठी परंपरा आहे. पण तसे चित्रपटांच्या बाबतीत मात्र म्हणता येत नाही. खरे तर आपला महाराष्ट्र भारतीय चित्रपटांची जननीच आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून दादासाहेब फाळके या मराठी माणसाची ओळख आहे. परेश मोकाशी यांनी फाळकेंवर 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा अतिशय सुंदर चित्रपट बनविला आहे. पण हा अजूनही फारसा पाहिला गेला नाही.

दादासाहेब फाळकेंवर जया दडकरांनी अतिशय मोलाचा ठरावा असा चरित्रग्रंथ लिहिला आहे. 'दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व' या नावाचा हा ग्रंथराज मौज प्रकाशनाने प्रसिध्द केला आहे. पण आपण अजूनही हा ग्रंथ सर्वत्र पोहोचविण्यात अपुरे पडलो आहोत. (पहिली आवृत्ती 22 डिसेंबर 2010).

चित्रपट संस्कृती म्हणत असताना त्यात चित्रपट सोसायटया, चित्रपट महोत्सव, चित्रपटांवरील चांगले लिखाण, चित्रपटांवर चर्चा, मोठया प्रयोगशील दिग्दर्शकांशी संवाद, चित्रपटविषयक मासिके या सगळयांचा अंतर्भाव आहे. विष्णुपंत दामलेंवर 'दामले मामा' (लेखिका मंगला गोडबोले, आवृत्ती जून 2013) हे अतिशय चांगले, महत्त्वाचे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिध्द केले आहे. चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या आणखी कितीतरी व्यक्तिमत्त्वांवर असे लिखाण होणे गरजेचे आहे.

'वास्तव रूपवाणी' या नावाने चित्रपटविषयक एकमेव मराठी नियतकालिक (संपादक - प्रा. अभिजित देशपांडे) प्रभात चित्र मंडळाच्या वतीने प्रसिध्द होते आहे. करोडोंची उलाढाल असलेल्या या चित्रपट व्यवसायात चित्रपट महोत्सव, चित्रपट सोसायटया, चित्रपटविषयक नियतकालिके अशा उपक्रमांसाठी मात्र पैसे नसतात, ही एक शोकांतिका आहे. 'वास्तव रूपवाणी' चालविण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान घ्यावे लागते. अजूनही ते दर महिन्याला 'मासिक' स्वरूपात निघू शकत नाही, ही गोष्ट आपली बौध्दिक दिवाळखोरी जाहीर करते. प्रभाकर पेंढारकर यांनी 'दो आंखे बारा हाथ' चित्रपटाच्या निर्मितीवरच एक पुस्तक लिहिले आहे. अशा प्रयत्नांना आपण किती पाठबळ देतो?

या सगळयाचा विचार करता चित्रपट महोत्सवांची संस्कृती रुजविणे म्हणजेच चित्रपट साक्षरता वाढविणे. अजूनही आपण चित्रपटांना अस्मितेचा विषय बनवून विरोध करतो, चित्रपट न पाहताच आपल्या अस्मितेच्या तलवारी उपसल्या जातात, तळपू लागतात. समलैंगिकतेवर चित्रपट आला की आपण त्यावर बंदी घालतो. ('अलिगढ' या चित्रपटाचे प्रदर्शन या गावातच रोखले गेले.) याला काय म्हणावे?

बदलत्या काळात खूप वेगळया प्रकारचा चित्रपट समोर येतो आहे. जागतिक पातळीवर त्याची एक भाषा बनत चालली आहे आणि जगभरचे रसिक त्याला प्रतिसाद देत आहेत. इराण, तुर्की, चिनी, भारतीय चित्रपटाला जगभरातून प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे. तेव्हा ही संस्कृती रुजविण्यासाठी आपण सगळयांनी मिळून एक सकारात्मक प्रयत्न करायला हवा.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575