शारंगदेव समारोह समृध्द संगीत परंपरांचा विलोभनीय आविष्कार

विवेक मराठी    30-Jan-2018
Total Views |

 

गेली 8 वर्षे औरंगाबादला महागामी गुरुकुल 'शारंगदेव समारोह' आयोजित करते आहे. यात संपूर्ण भारतातील विविध नृत्यप्रकार, लोककला, लोकवाद्य, अभिजात कलाप्रकार, विविध वाद्य प्रकार यांचे सादरीकरण होते. याहून महत्त्वाचे म्हणजे या महोत्सवाचाच एक अतिशय मोलाचा भाग म्हणजे 'शारंगदेव प्रसंग', म्हणजेच संगीतातील विविध विषयांवर विद्वानांची भाषणे, निबंधवाचन, वाद्यांच्या निर्मितीवर कलेच्या विकासावर चर्चा घडवून आणली जाते.

विद्वान चर्चा करत होते की तेराव्या शतकात देवगिरी किल्ल्यावर यादवांच्या दरबारातील महान संगीतकार शारंगदेव याच्या संगीत रत्नाकर ग्रंथात वर्णन केलेली 'किन्नरी वीणा' आता अस्तित्वात आहे का? कुणी ती वाजवत असेल का? आणि आश्चर्य म्हणजे तेलंगणातील सुदूर खेडयात असा एक वादक सापडला, जो आजही ही किन्नरी वीणा वाजवतो. या महान कलाकाराचे नाव दर्शनम मोगुलैय्या. या कलाकाराला तेलगूशिवाय कुठलीही भाषा येत नाही. संगीत अभ्यासक डॉ. इंद्राणी चक़्रवर्ती यांनी हा कलाकार शोधून काढला. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या 'शारंगदेव समारोह'मध्ये दर्शनम मोगुलय्या यांच्या 'किन्नरी वीणा' सादरीकरणाने रसिक थक्क झाले. या वाद्यावर विदुषी डॉ. इंद्राणी चक्रवर्ती यांनी आपला निबंध वाचला, तेव्हा त्यावर चर्चा करताना इतर अभ्यासकांना प्रश्न पडला की या वाद्यावर सा रे ग म हे स्वर कसे वाजतात? सगळे दर्शनम मोगुलय्या यांना ते वाजवून दाखविण्याचा आग्रह करत होते. पण दर्शनम यांना इतरांची भाषा कळेना. त्यांना खुणेने जेव्हा वाद्य वाजवून दाखविण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी ते खालून वर वाजवायला सुरुवात केली. सगळे विद्वान चकित झाले की एरव्ही वरून खाली तंतुवाद्य वाजविले जाते. त्याची सरगम तशी आरोहात्मक सांगितलेली आहे. मग हा कलाकार असे खालून वर का वाजवीत आहे?

राजस्थानमधील असेच एक वाद्य 'रावणहत्था', याचा अभ्यास करणऱ्या डॉ. सुनीरा कासलीवाल यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथाचा संदर्भ देत अवरोहात्मक वादनाचा उल्लेख केला आहे. हे लोक कलाकार शिक्षित नाहीत, त्यांना वाचता येत नाही, पण परंपरेने त्यांनी 700 वर्षांपासून हे ज्ञान पक्के आत्मसात केले आहे.

गेली 8 वर्षे औरंगाबादला महागामी गुरुकुल 'शारंगदेव समारोह' आयोजित करते आहे. यात संपूर्ण भारतातील विविध नृत्यप्रकार, लोककला, लोकवाद्य, अभिजात कलाप्रकार, विविध वाद्य प्रकार यांचे सादरीकरण होते. याहून महत्त्वाचे म्हणजे या महोत्सवाचाच एक अतिशय मोलाचा भाग म्हणजे 'शारंगदेव प्रसंग'. म्हणजेच संगीतातील विविध विषयांवर विद्वानांची भाषणे, निबंधवाचन, वाद्यांच्या निर्मितीवर कलेच्या विकासावर चर्चा घडवून आणली जाते.

या गंभीर चर्चेचा परिणाम म्हणजे 'किन्नरी वीणा'सारखे वाद्य सापडणे आणि अवरोहात्मक संगीत व्याख्येचे कोडे उलगडणे. या समारोहाचे हे एक अतिशय मोठे फलित आहे.

लिखित संगीताची जवळपास एक हजार वर्षांची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यातील ज्या नोंदी आहेत, त्याप्रमाणे सादर होणाऱ्या कला, वाजविली जाणारी वाद्ये यांचे सादरीकरण हे अतियश अवघड काम आहे.

या वर्षी पियल भट्टाचार्य यांच्या कोलकातास्थित कलामंडळाने 'मार्ग नाटय' हा एक हजार वर्षांपूर्वीचा नाटयाविष्कार मंचावर सादर केला. आधुनिक कलाविष्काराचा कोणताही प्रभाव न पडू देता भरताच्या नाटयशास्त्राच्या आधारे रंगमंच सादरीकरण करणे हे अतिशय अवघड आहे. पण पियल भट्टाचार्य यांच्या तरुण सहकाऱ्यांनी सादर केलेले हे 'संकीर्ण भाणक' (विविध भाषांचा उपयोग केलेले - उदा., संस्कृत, पाली, बंगाली, मागधी इ.) रसिकांना खिळवून ठेवणारे होते.

राजस्थान येथील सुगना राम आणि त्यांचे सहकारी यांनी पारंपरिक 'रावणहत्था' या वाद्याचा प्रमुख वापर करून 'झुमर' हा लोककलेचा प्रकार सादर केला, जो रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. व्हायोलीन या गज फिरवून वाजविल्या जाणाऱ्या आधुनिक पाश्चिमात्य वाद्याची प्रेरणा या 'रावणहत्था'तून आलेली असल्याचे आता विद्वानांनी संशोधनाने सिध्द केले आहे. हे वाद्य वाजविणारे हे कलाकार जन्मजात वादक आहेत. त्यांच्या घराण्यात हे वाद्य 700 वर्षांपासून चालू आहे. हे वाद्य ते स्वत:च तयार करतात. लुप्त होत जाणारी ही कला आता शासनाच्या आणि कलाप्रेमींच्या आश्रयामुळे, जागरूकतेमुळे वाचली आहे. या वाद्याचे वैशिष्टय म्हणजे याच्या गजाला घुंगरू बसविलेले असतात. म्हणजे तंतुवाद्य वाजविताना नादही आपोआप प्राप्त होतो.

भारतीय उपखंडातील इतर देशांवरही भारतीय कलांचा प्रभाव पडलेला आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मलेशिया येथील प्रसिध्द उडिसी नर्तक 'रामली इब्राहीम'. त्यांना ओडिसी नृत्याचे विविध विभ्रम मंचावरून सादर करताना पाहून विश्वासच बसत नव्हता की यांचे वय 65 आहे. ओडिसी गुरू देवप्रसाद दास यांच्या नृत्यपरंपरेचे गुरुकुल ते मलेशियात मोठया चिकाटीने चालवीत आहेत.

महागामी गुरुकुलाच्या संचालिका, ओडिसी व कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता यांनी या महोत्सवात 'धृपदांगी कथ्थक' हा ऊर्जापूर्ण नृत्यप्रकार सादर करून रसिकांना संमोहित केले. कथ्थक म्हणजे वाजिद अली शाहच्या दरबारातून विकसित झालेला नृत्यप्रकार हीच प्रतिमा सर्वत्र ठसलेली आहे. असे असताना कथ्थकला धृपदाशी जोडून त्याचे विविध आविष्कार रंगमंचावर सादर करणे हे फार अवघड आव्हान आहे. पार्वती दत्ता यांनी हे आव्हान लीलया पेलले. त्यांनी या प्रकारात सादर केलेले जगदंबा स्तुती नृत्य अभ्यासकांसाठी पर्वणीच होती.

ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित सत्यशील देशपांडे यांना गाण्याप्रमाणे या विषयातील अभ्यासू विद्वान म्हणून ओळखले जाते. शेवटच्या सत्रात त्यांचे गायन आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे ख्याल गायनावर व्याख्यान असा दुहेरी लाभ रसिकांना मिळाला.

ख्यालाचे संदर्भ राजस्थानी संगीतातून आधीपासून सापडतात, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. तसेच 'खयाल'पासून ख्याल शब्द आला असेच नसून तालाशी, लयीशी केलेली क्रीडा म्हणजेच खेळ यापासूनही हा 'खयाल' शब्द आला असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. आपले गुरू पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीची उदाहरणे देत त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या पारंपरिक बंदिशीही सादर केल्या.

ज्येष्ठ हिंदी कवी अशोक वाजपेयी यांनी आपल्या व्याख्यानातून परंपरा आणि शास्त्र यांच्यातील नाते उलगडून दाखविले. अशोक वाजपेयी यांनी आपल्या देशातील विविधांगी परंपरांचा मागोवा घेत शास्त्राचे जाणकार शास्त्राच्या मर्यादा उल्लंघून कसे पुढे जातात हे पं. कुमार गंधर्व यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.

शारंगदेव समारोहात दर वर्षी एका संगीत विद्वान कलाकार व्यक्तिमत्त्वाला 'शारंगदेव सन्मान' देऊन त्याचा गौरव केला जातो.  कथ्थक गुरू पद्मविभूषण पं. बिरजू महाराज, धृपद गायक उस्ताद झिया फरीदुद्दीन डागर, पं. हरिप्रसाद चौरसिया, भरतनाटयम गुरू पद्मा सुब्रह्मण्यम आदींना यापूर्वी हा सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. या वर्षी संस्कृततज्ज्ञ, संगीतकार, अभ्यासक पद्मश्री डॉ. मुकुंद लाठ यांना हा सन्मान देण्यात आला. मराठी लोकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे
डॉ. लाठ यांनी नामदेवांच्या हिंदी रचनांचा समीक्षात्मक अभ्यास केला असून त्यांचा ग्रंथ संदर्भ म्हणून अतिशय मोलाचा आहे.

'शारंगदेव समारोह' एका वेगळया पध्दतीने आयोजित केला जातो आहे. संगीत रत्नाकर हा महान ग्रंथ शारंगदेवांनी जिथे लिहिला, त्या देवगिरीच्या परिसरात हा समारोह साजरा होतो आहे याला एक वेगळे महत्त्व आहे. मकर संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते, त्या मुहूर्तावर या समारोहाचे आयोजन केले जाते. महागामीचा सगळा परिसर गुरू पार्वती दत्ता यांनी अतिशय कलात्मक रितीने सजविला आहे. या परिसरात प्लास्टिकचा तुकडाही आढळत नाही. (खर्ुच्याही नाहीत. बसायचा लाकडी, लोखंडी अथवा दगडी बाक आहेत. गवताच्या चटया आहेत. सुती सतरंज्या आहेत.) कलाकारांचे कपडे सुती-रेशमीच असतात. कृत्रिम धाग्यांना इथे बंदीच आहे. एकूणच काय, तर सगळयाच कृत्रिमतेला बंदी आहे.

या महोत्सवाला शासकीय पातळीवर पाठिंबा मिळणे अतिशय आवश्यक आहे. युनेस्कोने गौरविलेले महाराष्ट्रातील हे एकमेव गुरुकुल आहे. या महोत्सवाला परदेशी पर्यटकसुध्दा मोठया संख्येने हजेरी लावतात, कारण त्यांना आपल्या परंपरा समजून घेण्यात रस आहे. 'रावणहत्था' वाद्याच्या अभ्यासक सुनीता कासलीवाल यांनी सांगितले की परदेशी अभ्यासक जेव्हा हे वाद्य शिकतात, तेव्हा ते अगदी शाकाहारच घेतात आणि आवर्जून गंगेत स्नान करणे, मंदिरात जाऊन दर्शन घेणे हेसुध्दा करतात. परंपरा समजून घेताना आपणही परंपरेचा आदर करावा याचे भान ते बाळगून असतात.  

आपल्यालाच हे भान बाळगायची गरज सद्यकाळात निर्माण झाली आहे.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.

9422878575