सवाई गंधर्व महोत्सव गर्दीसाठी की दर्दींसाठी?

विवेक मराठी    06-Jan-2018
Total Views |


 

महोत्सवाला जमा होणारी प्रचंड गर्दी ही तर सगळयांचाच चर्चेचा विषय झाली. खरे तर भारतीय शास्त्रीय संगीताचे  स्वरूप असे हजारोंच्या जमावात सादर व्हावे असे मुळातच नाही. दोन-पाचशे इतक्या मोजक्या श्रोत्यांच्या संख्येत हे संगीत फुलू शकते. रविशंकरांसारख्या मोठया कलाकाराने हे लिहूनच ठेवले आहे की नवीन काही सुचलेले सादर करायचे असेल, तर अगदी छोटी मैफलच कशी लाभदायी ठरू शकते. कारण त्यात रसिकांशी संवाद साधता येतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचता येतात. पण आता जो हजारोंचा सागर समोर पसरलेला असतो, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचणे अशक्य आहे.

गेली 65 वर्षे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव पुण्यात भरतो आहे. शास्त्रीय संगीताचा सर्वात मोठा उत्सव असे मोठया अभिमानाने या महोत्सवाबाबत सांगितले जाते. भीमसेन जोशींनी त्यांचे गुरू रामभाऊ  कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा महोत्सव सुरू केला. भीमसेन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नावही या महोत्सवाला जोडले गेले.

महोत्सव सुरू झाला तेव्हा भारतातील परिस्थिती अतिशय वेगळी होती. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. आतापर्यंत विविध क्षेत्रांत होत असलेली गळचेपी दूर होऊन स्वातंत्र्याची आल्हाददायक झुळूक जाणवत होती.

शास्त्रीय संगीत क्षेत्राची अडचण अशी होती की हे संगीत पूर्वापार राजेरजवाडे, जमीनदार, संस्थानिक यांच्या हवेल्यांत अडकून पडले होते. दक्षिणेत मंदिरात धार्मिक उत्सवात गाणे सादर केले जाई. या बंदिस्त संगीताला मोकळे करण्याचे दोन मोठे प्रयत्न विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाले. भातखंडे यांनी शास्त्रीय संगीताला लिपीबध्द करण्यात यश मिळवले, तर पलूस्करांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या माध्यमातून तेव्हाच्या अखंड भारतात शास्त्रीय संगीत प्रसाराची सुरुवात केली. पहिल्यांदाच संगीत शिक्षणाची वाट सामान्य गायनेच्छूसाठी मोकळी झाली. कारण तोपर्यंत मोठया उस्ताद गुरूंच्या मर्जीवरच हे संगीत शिक्षण अवलंबून होते.

या पार्श्वभूमीवर भीमसेन जोशींनी तिसरे महत्त्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे सर्वसामान्य रसिकांना मोठमोठे गायक-वादक कलाकार ऐकायला मिळावे, अशी सोय सवाई गंधर्व महोत्सवाच्या माध्यमातून करून दिली. त्यापूर्वी संगीत महोत्सव होत होतेच. पण त्यांचे स्वरूप वेगळे होते. एखाद्या तालेवार गायकाने आपली सगळी पुण्याई पाठीशी लावून यशस्वी करून दाखवलेला हा एकमेव महोत्सव होता.

स्वत: भीमसेन भारतभर (आणि बाहेरही) प्रचंड दौरे करत. स्वत: ड्रायव्हिंग करत त्यांनी भारत उभा-आडवा पिंजून काढला होता. त्यांना जागोजागचे आयोजक, गायक-वादक, रसिक यांची चांगलीच ओळख होती. कलाकाराला येणाऱ्या अडचणी, आयोजकांच्या अडचणी, प्रयोजकत्व मिळवताना होणारी दमछाक हे सगळे ते जाणून होते. या सगळयावर मात करत सामान्य रसिकांसमोर उत्तमोत्तम कलाकारांची कला सादर होणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले व त्याप्रमाणे स्वत:चा अनुभव पणाला लावून महोत्सवाची आखणी केली.

आज या महोत्सवाला वाढलेली गर्दी सर्वांना दिसते, पण त्याबरोबरच वादक कलाकार, ध्वनिमुद्रण करणारे, वाद्य तयार करणारे कारागीर, छोटी छोटी रसिक मंडळे, संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्था यांची मोठया प्रमाणात पुण्यात वाढ झाली, हे कुणी फारसे लक्षात घेत नाही. फार कशाला, संगीतकारांवर देखण्या दिनदर्शिका तयार करणारे सतीश पाकणीकरांसारखे कलाकारही या महोत्सवातून रसिकांसमोर ठळकपणे आले. या महोत्सवाची ध्वनिमुद्रणे अलूरकर म्युझिक हाउससारख्या कंपन्यांनी बाजारात आणली. संगीतावर लिहिणारे उच्च दर्जाचे समीक्षक समोर आले. पुणे परिसरात शास्त्रीय संगीत क्षेत्राची एक सर्वांगीण अशी विकासात्मक वाढ होत असलेली आढळून येते.

सुरुवातील भीमसेन जोशी भारतभर फिरून मोठया नावाजलेल्या कलाकारांबरोबरच नव्याने गाणारे उमेदीचे कलाकार हूडकून त्यांना अगत्याने बोलवायचे. त्यांचे गाणे  जाणकार रसिकांसमोर सादर झाल्यावर त्याला एक मान्यता मिळायची. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे आजचे आघाडीचे गायक उस्ताद राशीद खां यांना तरुणपणीच भीमसेनांनी आपल्या राहत्या घरी बोलवून, जाणत्यांसमोर त्यांची मैफल घडवून आणली होती. परिणामी अगदी थोडया काळातच राशीद खां यांचे नाव या क्षेत्रात सर्वत्र पसरले. कौशिकी चक्रवर्ती यांचेही उदाहरण असेच आहे.

पण नंतर नंतर मात्र भीमसेन यांचे दौरे वयमानपरत्वे कमी झाले, तसतशी नवीन कलाकार हूडकून बोलावण्यावर मर्यादा पडली. आता नवीन गाणारा काय आणि कसा आहे, हे त्याच्याबाबत लॉबीइंग करणाराच सांगायला लागला. सवाई गंधर्व महोत्सवाच्या आयोजकांवर त्याचा एक दबाव यायला लागला. मोठमोठे कलाकार आपल्या विशिष्ट शिष्यांनाच पुढे करायला लागले. याचा एकत्रित परिणाम म्हणजे अगदी अस्सल तेच या मंचावर सादर होईल हा विश्वास लयाला गेला.

आता उलटी परिस्थिती झाली. या मंचावरून ज्याला संधी मिळाली, तो इतरत्र त्या पात्रतेवरून मिरवायला लागला. म्हणजे एकेकाळी मोठया कलाकारांमुळे आणि नवोदित पण प्रतिभावंत गुणी कलाकारांमुळे हे व्यासपीठ ओळखले जायचे. आता या व्यासपीठामुळे कलाकार ओळखला जायला लागला.

महोत्सवाला जमा होणारी प्रचंड गर्दी ही तर सगळयांचाच चर्चेचा विषय झाली. खरे तर भारतीय शास्त्रीय संगीताचे स्वरूप असे हजारोंच्या जमावात सादर व्हावे असे मुळातच नाही. दोन-पाचशे इतक्या मोजक्या श्रोत्यांच्या संख्येत हे संगीत फुलू शकते. रविशंकरांसारख्या मोठया कलाकाराने हे लिहूनच ठेवले आहे की नवीन काही सुचलेले सादर करायचे असेल, तर अगदी छोटी मैफलच कशी लाभदायी ठरू शकते, किंवा बऱ्याचदा छोटया मैफलीतच कशा नवीन संकल्पना सुचू शकतात. कारण त्यात रसिकांशी संवाद साधता येतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचता येतात. पण आता जो हजारोंचा सागर समोर पसरलेला असतो, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचणे अशक्य आहे. शिवाय हे सर्व रसिक एकाग्रतेने गाणे ऐकतात असेही नाही. मधूनच उठणे, मोबाइलशी खेळणे, खाणे, पेपर वाचणे हे अखंड चालू असते. इतकेच काय, तर काही जण मंडपात चक्क झोपा काढतात. मग अशा माहौलमध्ये 'याद पिया की आये' रंगणार कसे? शास्त्रीय संगीतातील बारकावे समजून घ्यायचे असतील, तर कलाकाराइतकीच रसिकांनाही कमालीची एकाग्रता लागते. झुंडशाहीत ही एकाग्रता साधणार कशी?

रसिकांनी अशा महोत्सवात काही पथ्ये कडकपणे पाळायला हवीत. आपले मोबाइल बंद ठेवले पाहिजेत. खाण्याचे पदार्थ आणि लहान मुलांना सोबत नेऊ नये. आयोजकांइतकीच ही रसिकांचीही जबाबदारी आहे. पु.ल. देशपांडे यांनी 'पूर्वी संगीत लोकाभिमुख करण्याचा कुणी प्रयत्न करत नव्हते, तर संगीताभिमुख लोकच चांगले गाणे शोधत फिरत असायचे' असे म्हटले आहे. त्यातील व्यंग, उपहास सोडून द्या. पण रसिकांनी संगीत परंपरेची, तिच्या गांभीर्याची बूज ठेवायला हवी.

खरे तर सामान्य रसिकांना शास्त्रीय संगीताचा आस्वाद चांगल्या पध्दतीने घेता यावा, म्हणून काही वेगळया पध्दतीचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. अनुजा कामत ही तरुण गायिका यू टयूबवर शास्त्रीय संगीत-त्यावर आधारित हिंदी चित्रपट गीते-पाश्चिमात्य लोकप्रिय गीते असा एक सुंदर कार्यक्रम सादर करते. तो तरुणांमध्ये लोकप्रियही आहे. या माध्यमातून संगीताचा कान तयार होण्यास हातभार लागू शकतो.

हा महोत्सव केवळ पुण्यातच न घेता सुरुवातीला महाराष्ट्रभर आणि नंतर भारतभर त्याचे आयोजन केले जावे. महाराष्ट्राचा विचार केला, तर पुण्या-मुंबईच्या बाहेर पडून उत्तर महाराष्ट्रात नाशिक-जळगाव, विदर्भात अमरावती-नागपूर, मराठवाडयात औरंगाबाद-नांदेड, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर-सोलापूर असे आयोजन करण्यात यावे. पुढे मग महानगरपालिका असलेल्या शहरांमध्ये त्याची व्याप्ती वाढविली जावी. हेच भारतभर करता येईल.

यासाठी स्वतंत्रपणे काही करायची गरज नसून ज्या संस्था आणि व्यक्ती या क्षेत्रात सर्वत्र काम करत आहेत, त्यांना जोडून घेण्याचे काम करावे. शास्त्रीय संगीत तरुणांपर्यंत पोहोचावे म्हणून 'स्पिकमॅके' (सोसायटी फॉर प्रमोशन ऑॅफ इंडियन क्लासिकल म्युझिक अमंग यूथ्स)सारख्या संस्था आजही मोठया चिवटपणे काम करतात. त्यांना बळ दिले गेले पाहिजे. म्हणजे भीमसेनजींचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होऊ शकेल. अन्यथा हा महोत्सव म्हणजे केवळ भव्य 'इव्हेंट' ठरेल. त्यातून शास्त्रीय संगीताच्या आणि रसिकांच्या पदरात फारसे काही पडणार नाही.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575