चारठाणकर पुरस्कार कृतज्ञतेचा दीप !

विवेक मराठी    27-Nov-2018
Total Views |

हैदराबाद स्वातंत्र्यलढयातील एक अग्रणी म्हणजे सेलूचे विनायकराव चारठाणकर. विनायकरावांना 1988मध्ये स्वातंत्र्यसैनिकांनी व इतरांनी निधी गोळा करून एक लाख रुपयांची थैली अर्पण केली. विनायकारावांनी या निधीत स्वत:चीही भर घालून सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्याची योजना सर्वांसमोर मांडली. तेव्हापासून - म्हणजे 1988पासून सेलूसारख्या छोटया गावात दर वर्षी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, पत्रकारिता आदी क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या मराठवाडयातील व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.

हैदराबाद मुक्तिसंग्राम हा वरवर पाहता एका जुलमी राजवटीविरुध्दचा लढा असल्याचे चित्र समोर येते. ते खरेही आहे. तसेच हा लढा मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेविरुध्द सामाजिक पातळीवरचासुध्दा होता. त्यामुळे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतरही (17 सप्टेंबर 1948) या लढयातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:ला विधायक सामाजिक कार्यात झोकून दिले. शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ग्रंथालये, व्यायामशाळा, गणेशोत्सवातील संगीत मेळे, खादी ग्रामोद्योग समिती, प्रौढ साक्षरता अशा कितीतरी कामांमध्ये हे स्वातंत्र्यसैनिक अग्रेसर राहिले. औरंगाबादेतील सरस्वती भुवन, नांदेड येथील पीपल्स महाविद्यालय, परभणीचे नूतन विद्यालय, सेलूची नूतन शिक्षण संस्था, अंबाजोगाईचे योगेश्वरी महाविद्यालय, लातूरचे पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन, 'मराठवाडा' वृत्तपत्र, परभणीचे गणेश वाचनालय, औरंगाबादचे बलवंत वाचनालय अशा कितीतरी संस्था स्वातंत्र्यसैनिकांनी लोकाश्रयांतून उभ्या केल्या आणि सचोटीने चालवून दाखविल्या.

अशा हैदराबाद स्वातंत्र्यलढयातील एक अग्रणी म्हणजे सेलूचे विनायकराव चारठाणकर. विनायकरावांना 1988मध्ये स्वातंत्र्यसैनिकांनी व इतरांनी निधी गोळा करून एक लाख रुपयांची थैली अर्पण केली. त्यांनी स्वातंत्र्यलढयासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, त्याचे उतराई व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. पण विनायकरावांनी हा निधी कुठल्याही वैयक्तिक कामासाठी न वापरता सार्वजनिक कामासाठीच वापरण्याचा निर्णय घेतला. या निधीत स्वत:चीही भर घालून सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्याची योजना सर्वांसमोर मांडली. तेव्हापासून - म्हणजे 1988पासून सेलूसारख्या छोटया गावात दर वर्षी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, पत्रकारिता आदी क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या मराठवाडयातील व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.

महाराष्ट्रात आणि विशेषत: मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेच्या मराठवाडयात सामाजिक क्षेत्रात सर्वस्व झोकून देऊन काम करण्याची आवश्यकता धुरीणांना जाणवली. खरे तर टिळक-आगरकर या वादाचे विश्लेषण अभ्यासक काहीही करोत, पण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक सुधारणा हातात हात घालूनच चालत होत्या. स्वातंत्र्यानंतर परकीयांविरुध्द लढण्याची गरज संपल्याने बहुतांश स्वातंत्र्यसैनिकांनी सक्रिय राजकारणातून बाजूला सरकत इतर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक बाबींमध्ये लक्ष केंद्रित केले.

हैदराबाद मुक्तिलढयाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी पहिल्या दोन निवडणुकांत खासदारकीची निवडणूक लढवून खासदारकी निभावल्यानंतर राजकीय क्षेत्रातूनही संन्यास घेतला. त्यांचाच आदर्श डोळयासमोर ठेवत पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, श्यामराव बोधनकर, विनायकराव चारठाणकर, मुकुंदराव पेडगावकर, अनंत भालेराव यांनी काम केले. आजही यांनी उभ्या केलेल्या संस्था समाजात मोलाचे काम करत आहेत.

स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर यांच्या हयातीत सुरू झालेला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा त्यांच्या मृत्यूनंतरही विश्वस्त संस्थेने त्याच तोलामोलाने चालू ठेवला आहे. या वर्षी सामाजिक श्रेत्रातील योगदानासाठी औसा येथील रवी बापटले, अभिनय क्षेत्रातील संकर्षण कऱ्हाडे आणि साहित्यिक ऋषीकेश कांबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या 30 वर्षांत 90 व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यात नुकतेच ज्यांचे निधन झाले, ते मराठवाडयातील गांधी म्हणून ओळखले जाणारे गंगाप्रसादजी अग्रवाल, थोर स्वातंत्र्यसेनानी श्यामराव बोधनकर, कॉ. चंद्रगुप्त चौधरी, कलेच्या क्षेत्रातले 'वऱ्हाड'कार लक्ष्मण देशपांडे, सूरमणी कमलाकर परळीकर, उस्ताद गुलाम रसूल, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ, रा.रं. बोराडे, ना.धों. महानोर, तु.शं. कुलकर्णी ते अगदी पुढच्या पिढीचे कवी इंद्रजीत भालेराव, दासू वैद्य यांच्यापर्यंतची नावे या यादीत आहेत. 

दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात सेलूत होणाऱ्या या सामाजिक कृतज्ञता सोहळयाला एक अनौपचारिक घरगुती स्वरूप प्राप्त झाले आहे. चारठाणकर-वाईकर कुटुंबीय आपल्या परीने एखाद्या घरगुती मंगल सोहळयासारखे याचे आयोजन करतात. या काळात नातेवाईक मंडळी गोळा होतात. आपल्या घराण्यातील विनायकराव या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतीत हा सोहळा मोठया उत्साहाने साजरा करतात. ही भावना फार मोलाची आहे. सध्याच्या काळात सामाजिक कार्याचे पूर्णत: 'एनजीओ'करण झालेले आहे. एक व्यवसायिकता, सरकारी कामाची रूक्षता आणि उपचार उरकून टाकावा अशी औपचारिकता त्याला आली आहे. अशा रूक्ष काळात विनायकराव चारठाणकरांच्या स्मृतीत एक मोठा सोहळा उत्साहात साजरा होतो आहे, याला जास्त महत्त्व आहे.

दुसऱ्या बाजूने हा सोहळा म्हणजे सामाजिक क्षेत्रात एक आदर्श म्हणूनही पाहता येईल. स्वातंत्र्योत्तर कालखंडात विनायकराव चारठाणकरांसारख्या ज्येष्ठांना सामाजिक कामाची तळमळ वाटली. त्यांनी त्यांच्या परीने ही सामाजिक लढाई सर्व शक्तीनिशी लढली. आता यासाठी पुढच्या पिढीने पुढे येण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात सामाजिक कामाची गरज कधीच संपत नाही. विविध आव्हाने समोर येत जातात. मराठवाडयासारख्या भागात तर अजूनही सरंजामी मानसिकता विविध विकासकामांत आड येताना दिसते.

एकेकाळी मोंढयामधील कापूस व्यापारी कापसाच्या प्रत्येक गोणीमागे विशिष्ट रक्कम सामाजिक, शैक्षणिक कामासाठी देणगी म्हणून द्यायचे, अशी सेलूची परंपरा आहे. व्यापाऱ्यांना सामाजिक कामात शत्रू समजायची एक विचित्र मांडणी सामाजिक चळवळीत केली गेली. पण सेलूत मात्र व्यापाऱ्यांनी सामाजिक कामात केवळ देणग्याच दिल्या असे नाही, तर प्रत्यक्ष सहभागही नोंदविला. श्रीरामजी भांगडियांसारखे लोक तन-मन-धनाने येथील सामाजिक चळवळीत उतरले होते. आज त्याच भांगडियाजींच्या नावाने असलेली सार्वजनिक बाग उद्ध्वस्त झालेली पाहून मन विदीर्ण होते.

या सामाजिक कृतज्ञता सोहळयानिमित्ताने विनायकराव चारठाणकरांच्या पत्नी गीताबाई यांचेही स्मरण करणे आवश्यक आहे. त्या केवळ विनायकरावांचा संसार सांभाळणाऱ्या या अर्थाने अर्धांगिनी होत्या असे नव्हे, तर त्यांनी विनायकरावांचा सामाजिक संसारही मोठया हिमतीने सांभाळला. त्याही अर्थाने 'अर्धांगिनी'पद सार्थ केले. ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव यांनी 'कावड' या आपल्या पुस्तकात गीताबाईंचा मोठा गौरवाने उल्लेख केला आहे - '.. स्टेट काँग्रेसचा 47 ते 48 हा निर्णायक लढा, सशस्त्र प्रतिकार, सारे एकापाठोपाठ एक करून अंगावर कोसळत गेले. विनायकराव लढले यात नवल नाही. परंतु एखाद्या योध्दयाचे कौशल्य व शर्थ करून यश ओढून घेण्याचे शौर्य गीताबाईंनी या काळात दाखविले. निजामी पोलीसही त्यांना वचकून असत.'

महाराष्ट्राच्या विविध भागात नि:स्पृहपणे, निरलसपणे स्वातंत्र्यलढयात लढून पुढे सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेली बरीच उदाहरणे आहेत. त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातत्याने सामाजिक सोहळे घेणे हे एक कठीण, किचकट काम आहे. पण ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून प्रतिष्ठानचे सचिव ऍड. श्रीकांत वाईकर आणि त्यांचे सर्व सहकारी हे काम अव्याहतपणे करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे.

सेलू-चारठाणा-कौठा-जिंतूर-धानोरा या परिसरात सामाजिक कार्याबरोबरच संगीताची, नाटकांचीही मोठी परंपरा आहे. हरिभाऊ चारठाणकरांसारखे गुणी प्रतिभावंत गायक, हिराबाई बडोदेकरांचे सहकारी असलेले गायक नट रंगराव जिंतूरकर देशपांडे याच मातीत होऊन गेले. हरिभाऊंच्या स्मृतीत संगीत महोत्सव साजरा होतो आहे.

सेलूसारखी जिल्हा नसलेली छोटी तालुक्याची गावे ही आता सामाजिक-सांस्कृतिक चळवळीची खऱ्या अर्थाने केंद्रे बनली आहेत. महाराष्ट्रभर अशा गावांमधील परंपरा हेरून तेथील कार्यकर्त्यांना व संस्थांना जोडून सामाजिक, सांस्कृतिक कामाची एक मोठी चळवळ उभी केली गेली पाहिजे. सध्या महाराष्ट्रभर व्याख्यानमाला, संगीत महोत्सव, दिवाळी पहाट असे कार्यक्रम राजकीय नेत्यांच्या अमर्याद हस्तक्षेपाने आपला मूळ हेतूच हरवून बसले आहेत. ज्याला पुरस्कार द्यायचा, ज्या वक्त्याचे व्याख्यान ठेवायचे, त्याच्यापेक्षा आमदार खासदार-मंत्री यांचा मोठा फोटो फ्लेक्सवर लावून गावभर मिरविला जातो. मंचावरही त्या राजकीय नेत्याचा, त्याच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रभाव आढळून येतो.

चारठाणकर प्रतिष्ठानसारख्या, शांतपणे आपले काम करणाऱ्या संस्था अशा काळात अंगणात तुळशी वृंदावनापुढे लावलेल्या दिव्यासारख्या जाणवतात. कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळीत सांगायचे, तर

नवलाख तळपती दीप विजेचे येथ

उतरली तारकादळे जणू नगरात

परी स्मरते आणिक करते व्याकूळ केव्हा

त्या माजघरातील मंद दिव्याची वात

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद