स्वाईन फ्ल्यू

विवेक मराठी    10-Feb-2018
Total Views |

  

 १% लोकांना एखाद्या रोगाची लागण होणे याला ‘साथ’ म्हणायचं का पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की स्वाईन फ्ल्यू हा आजार प्रत्येक वेळी जीवघेणा असतो का? तर नाही. तो औषधांनी बरा होणारा आजार आहे. आजदेखील मलेरिया, क्षय यांची लागण यापेक्षा कितीतरी जास्त लोकांना होते आणि ते आजार मनुष्याला मृत्युदायक ठरण्याची शक्यता देखील जास्त आहे. असं असून माध्यमातून या सो कॉल्ड (मराठीत तथाकथित) साथीचा इतका गवगवा केला जातो की भीतीची साथ मात्र नक्की पसरते....

  ‘एका कैद्याला मृत्यूची शिक्षा ठोठावली असताना त्याला सांगण्यात आलं की तुला फाशी ऐवजी नागदंश करवून मारण्यात येईल. त्याचे डोळे बांधून त्याला फक्त सेफ्टी पिन टोचण्यात आली असता तो कैदी खरोखर मृत्यू पावला आणि पोस्टमार्टेममध्ये त्याच्या शरीरात विष सापडलं. त्याच्या मनातल्या भीतीनं ते शरीरानं स्वतःच निर्माण केलं होतं.’ ही गोष्ट गेले बरेच दिवस सोशल मिडीयावर फिरते आहे. हिची सत्यासत्यता पडताळून बघायला हवी हे खरं असलं तरी मानवी मन कल्पनेनं काय काय करू शकतं याची यातून चुणूक जरूर मिळते.

    मानवी मनाच्या या ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ वृत्तीचा प्रत्यय येतो तो स्वाईन फ्ल्यूच्या मधूनमधून उचल खाणाऱ्या साथीत. वास्तविक चार कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात चारशे जणांना (या चारशेतला प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे हे गृहीत धरून) म्हणजे १% लोकांना एखाद्या रोगाची लागण होणे याला ‘साथ’ म्हणायचं का पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की स्वाईन फ्ल्यू हा आजार प्रत्येक वेळी जीवघेणा असतो का? तर नाही. तो औषधांनी बरा होणारा आजार आहे. आजदेखील मलेरिया, क्षय यांची लागण यापेक्षा कितीतरी जास्त लोकांना होते आणि ते आजार मनुष्याला मृत्युदायक ठरण्याची शक्यता देखील जास्त आहे. असं असून माध्यमातून या सो कॉल्ड (मराठीत तथाकथित) साथीचा इतका गवगवा केला जातो की भीतीची साथ मात्र नक्की पसरते. दोन वर्षापूर्वीच्या अशाच भीतीच्या साथीत माझ्या एका जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या मैत्रिणीला दिवसाला ३००-३०० रुग्ण बघावे लागत होते. (म्हणजे एका रुग्णाला किती मिनिटे? करा गणित) तेदेखील चांगले महिनाभर. एरवी सर्दीपडसं झाल्यावर दुकानातून २/४ गोळ्या घेऊन स्वचिकित्सा करणारे रुग्ण (अर्थात हे चुकीचं आहे) स्वाईन फ्ल्यूच्या भीतीनं दवाखान्यात येत होते. आश्चर्यकारकरित्या यातील एकही रुग्ण स्वाईन फ्ल्यूचा नव्हता, असं तिनं मला सांगितलेलं मला चांगलं आठवतंय. (या रोगाचं प्रमाण किती कमी आहे हे समजण्यासाठी हा दाखला दिला.)

     स्वाईन फ्ल्यू हा आजार मुळात डुकरांचा आजार आहे. त्याचं मूळ मेक्सिको देशातलं. पण आज पृथ्वी हे एक जागतिक खेडं झालं असल्यानं कुठलेही आजार कुठेही पसरू शकतात. २०१० साली WHO (world health organisation) नं स्वाईन फ्ल्यूची साथ संपली असं घोषित केलं आहे. तरी तुरळक स्वरूपात तो अजूनही कुठे कुठे आढळतो.

     या रोगाचे विषाणू फक्त एकाच प्रकारचे नाहीत. H1N1, H3N2, H1N2, H2N1, H3N1, H2N3 असे एकूण सहा प्रकारचे विषाणू (व्हायरस) असतात. एका प्रकारच्या विषाणूच्या लसीचा दुसऱ्या प्रकारच्या विषाणूसाठी उपयोग नसतो. त्यामुळे लस घेतली की सगळं काही आलबेल होतं (तरी सरकार लस पुरवण्यात चालढकल करतं आणि त्यामुळं माणसं मरतात) हा गैरसमज पाळू नये.

    डुक्कर पालन करणारे शेतकरी (आपल्याकडे यांचं प्रमाण नगण्य आहे.) या आजाराचे पहिले शिकारी असतात. शेतकरी नसले तरी डुक्कर पालन हा आता स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. तिथल्या कामगारांना याची लागण होऊ शकते. ज्या गावांमध्ये डुकरांचा सुळसुळाट आहे त्या गावांमध्येदेखील हा आजार लवकर पसरू शकतो. (मात्र डुकराच्या मांसातून हा आजार पसरत नाही. कारण याचे विषाणू जिवंत पेशीतच जिवंत राहून वाढू शकतात.) यासाठी प्रतिबंध म्हणून डुकरांना स्वाईन फ्ल्यूची लस देण्यात येते. डुक्कर फार्मिंग करणाऱ्या व्यावसायिकांनी हे काम अवश्य करावं. डुकरांच्या सान्निध्यात काम करणाऱ्या व्यक्तींनी ग्लोव्हज, मास्क यांचा वापर अवश्य करावा. काम झाल्यावर योग्य ती स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे.

   एकदा हा आजार मनुष्याला झाला की पसरणं सोपं असतं. बाधा झालेल्या रुग्णाची शिंक, खोकला, कपडे, हाताचा स्पर्श यातून हे विषाणू सर्वत्र पसरतात. एकत्र जेवण, एकाच पेल्यानं पाणी किंवा चहा पिणं, एकाच चमच्यानं खाणं, एका बिछान्यावर झोपणं, एकच फोन किंवा मोबाईल वापरणं, सर्व प्रकारचे स्पर्श, एकमेकांचे कपडे वापरणं, हस्तांदोलन, गर्दीतला वावर असे अनेक मार्ग त्यासाठी चालू शकतात. यातल्या कितीतरी गोष्टी, ‘आपण मागासलेले नसून सुधारेलेले आहोत; भेदभाव किंवा अस्पृश्यता पाळत नाही’ हे दाखवण्यासाठी आजच्या काळात आपण (विशेषतः युवा वर्ग) सर्रास करत असतो. हे टाळलं तर केवळ स्वाईन फ्ल्यूच नव्हे तर अन्य अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आपल्याला उत्तमरित्या करता येईल. ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा ‘आरोग्य’ हा एक ‘चांगला’ साईड इफेक्ट (की मुख्य प्रभावच?) नक्की असू शकतो. आपण त्याबाबतीत किती गंभीर आहोत हे महत्त्वाचं!

9322790044

vaidyasuchitra@gmail.com