तरुणांच्या लेखणीतून उमटत आहेत बुध्द कबीर तुकाराम

विवेक मराठी    15-Feb-2018
Total Views |

 

विद्यापीठाच्या पातळीवर युवम महोत्सव भरवला जातो. पण त्याचे स्वरूप एक मोठया स्नेहसंमेलनासारखे गोंगाटी होऊन गेले आहे. यात वाङ्मयीन उपक्रमांना फारसा वाव मिळत नाही. उदा. कवितेचाच विचार करावयाचा, तर तरुणांनी आपल्या कविता लिहून आणलेल्या असतात. त्यांना त्या वाचायच्या असतात. त्यातील विषयांवर चर्चा करायची असते. अगदी प्राथमिक वाटतील अशा बाळबोध शंका विचाराच्या असतात. पण या सगळयासाठी मोठया झगमगाटी कार्यक्रमांत उसंतच मिळत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना 'प्रतिभा संगम' हे हक्काचे व्यासपीठ वाटते.

निळा रंग म्हणजे बुध्द नव्हे

प्रत्येक रंगातलं निळेपण बुध्द आहे

ही अप्रतिम ओळ आहे रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिकणाऱ्या विजयकुमार बिळूर या विद्यार्थ्याची. त्याची ही कविता प्रतिभा संगम साहित्य संमेलनात पहिल्या क्रमांकाची ठरली.

आजच्या तरुणांबद्दल सतत तक्रार करणाऱ्यांनी विजयसारख्यांच्या कविता व त्यांची संवेदनशीलता खरेच प्रमाणिकपणे समजून घ्यावी, म्हणजे त्यांना कळेल आजचे तरुणही किती अप्रतिम विचार आपल्या कवितेतून मांडत आहेत. विजयने आपल्या कवितेचा शेवट जो केला आहे, तोही अप्रतिम आहे -

बुध्द तुमच्यात माझ्यात

आपल्यात नक्कीच आहे

गरज आहे ती फक्त

आपापल्या देवळांची

रचना बदलण्याची

तुम्हाला तुमच्या देवळातही

बुध्द दिसेल..

बामियानाच्या बुध्द मूर्ती तालिबान्यांनी पाडल्या, त्याची तीव्र प्रतिक्रिया आज विजयसारख्या तरुणांच्या कवितेतून शांतपणे उमटताना दिसत आहे. केवळ विजयच नव्हे, तर दुसरा क्रमांक पटकावलेला एम.जे. महाविद्यालय जळगावचा गोपाल बागुल नामदेव ढसाळांच्या कवितेशी आपले नाते सांगत लिहून जातो -

गटारीत फेकून मारलेली कविता

कुणाच्या कविसंमेलनात वाचायची?

ती जन्मजात होती

अभिजात

मुक्तछंदात

मग कुणी कापले

तिचे स्तन,

कुणी कापले तिचे हात?

आकलनाने रचलेले शब्द

कसे बिथरले?

या तरुणांचा विचारांचा आवाका बघितला की खरेच अवाक व्हायला होते. विजय किंवा गोपाल यासारख्यांच्या कवितांना सामाजिक संदर्भ आहेत, तसेच स्वप्निल चव्हाणसारखा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी अलगदपणे लिहून जातो उबदार माया करणाऱ्या घराची कविता -

ज्या घरांच्या भिंतींनाही जाणवतो स्पर्श

आपुलकी आणि जिव्हाळयाचा

ज्या घरांतली माणसं आसुसलेली असतात

माणसांना आपल्यात सामावून घेण्यासाठी

ज्या घरांच्या स्पंदनांच्या लयीत

सहज विरघळत जातो गडद एकटेपणा

ज्या घरांतली माणसं परस्परांशी

माणसांसारखी वागतात

प्रेमाचा अभिनय न करता

एकमेकांवर नितांत प्रेम करतात

अशा घरांचे 'ऍड्रेस'

'बॅटरी डेड' होईस्तोर

शोधत राहतो 'गुगल मॅप्स'वर

कुणीतरी...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले सोळावे प्रतिभा संगम साहित्य संमेलन नुकतेच पुण्यात पार पडले. त्यात सहभागी तरुण कविमित्रांच्या या पारितोषिकप्राप्त प्रातिनिधिक कविता.

मुले वाचत नाहीत असा सररास आरोप केला जातो. पण अशा संमेलनांमधून समोर येणारे चित्र या आरोपाच्या विपरीत अतिशय आशादायी आहे. मुलांना चांगले वाचायचे आहे, ते आजूबाजूचे वर्तमान, आपली नाजूक भावना, आपल्या तरुण मनाची स्पंदने तरलपणे टिपू पाहत आहेत. पण आपणच त्यांची योग्य दखल घेण्यास अपुरे पडत आहोत.

विद्यापीठाच्या पातळीवर युवम महोत्सव भरवला जातो. पण त्याचे स्वरूप एक मोठया स्नेहसंमेलनासारखे गोंगाटी होऊन गेले आहे. यात वाङ्मयीन उपक्रमांना फारसा वाव मिळत नाही. उदा. कवितेचाच विचार करावयाचा, तर तरुणांनी आपल्या कविता लिहून आणलेल्या असतात. त्यांना त्या वाचायच्या असतात. त्यातील विषयांवर चर्चा करायची असते. अगदी प्राथमिक वाटतील अशा बाळबोध शंका विचाराच्या असतात. पण या सगळयासाठी मोठया झगमगाटी कार्यक्रमांत उसंतच मिळत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना 'प्रतिभा संगम' हे हक्काचे व्यासपीठ वाटते.

या आयोजनाचे वेगळेपण म्हणजे इथे एक संपूर्ण दिवस गटचर्चा ठेवलेल्या असतात. 20-25 विद्यार्थ्यांचे गट केले जातात. हे विद्यार्थी आपल्या कविता प्रथितयश साहित्यिकांसमोर वाचतात. एकमेकांच्या कविता ऐकतात. चर्चा करतात. रात्री कविसंमेलनात मान्यवरांसोबतच निवडक विद्यार्थ्यांना कविता वाचण्याची संधी मिळते. प्रेमाच्या अवथर नाजूक तरल अशा कवितांपासून दाहक समाजवास्तवाचा अंगार शब्दांतून व्यक्त करणाऱ्या कवितांपर्यंत सगळया प्रकारच्या कविता सादर होतात. आयोजकांनी राखलेल्या शिस्तीमुळे कवितेचे गांभीर्य राखले जाते. परिणामी चांगली कविता तरुणांच्या मनापर्यंत व्यवस्थित पोहोचते.

प्रतिभा संगमचे सगळयात मोठे वैशिष्टय म्हणजे महाविद्यालयीन तरुणच संपूर्ण आयोजन करतात. विजय सुतारसारखा तरुण चांगला कवी यावेळीस संमेलनाचा प्रमुख कार्यकर्ता होता. या वेळचा विजेता पुढच्या वेळी संयोजकाच्या भूमिकेत जातो. ही एक चांगली प्रथा आयोजकांनी निर्माण केली आहे.

आता इतकी वर्षे झाल्यानंतर आयोजकांनी काही उणिवांचा विचारही करायला हवा. अतिशय चांगले लिहिणारे कवी जसे आढळून आले, तसे किमान दर्जाही नसलेली कविता फार मोठया प्रमाणावर आढळून आली. यासाठी विद्यापीठ पातळीवर काहीतरी गाळणी लावली गेली पाहिजे. मुळात महाविद्यालयीन पातळीवर वाचक मंच स्थापन करून निदान मराठीतील महत्त्वाची 100 पुस्तके उपलब्ध करून दिली गेली पाहिजेत. ही पुस्तके नीट वाचून त्यावर चर्चा घडवून आणल्या गेल्या पाहिजेत. ऑॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाचक मंचचे उपक्रम जोरकसपणे महाविद्यालयीन पातळीवर चालले पाहिजेत. मग दिवाळीनंतर प्रतिभा संगमचे आयोजन साधारणत: डिसेंबर-जानेवारी महिन्यात जेव्हा होणार असेल, तेव्हा या वाचक मंडळातील निवडक विद्यार्थ्यांना सहभागी करत हे साहित्य संमेलन महाराष्ट्र पातळीवर भरविण्यात यावे.

दुसरी एक त्रुटी जाणवते, ती म्हणजे विदर्भातील विद्यार्थी यात सहभागी झालेले दिसत नाहीत. विद्यार्थी परिषदेच्या रचनेत विदर्भ हा वेगळा प्रांत आहे हे इतर कार्यक्रमांसाठी समजले जाऊ शकते. पण साहित्य संमेलन सगळया मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांचा प्रतिभा संगममध्ये सहभाग आवश्यक वाटतो.

या कार्यक्रमात कवितेबरोबर वैचारिक लिखाण, ब्लॉग, कथाकथन या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. सगळया आयोजनात तरुण मुले-मुली ज्या खेळकरपणे एकमेकांशी वागत बोलत होती, ती खूपच आशादायी बाब जाणवली. सध्याच्या वातावरणात मुले-मुली एकमेकांत मिळून मिसळून काही एक सकारात्मक सांस्कृतिक काम करत आहेत ही खूपच दिलासा देणारी बाब आहे.

विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी आता या संमेलनाच्या आयोजनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575