व्हायरल फीवर

विवेक मराठी    03-Mar-2018
Total Views |

‘व्हायरल फीवर’ या आजाराचं नाव आजकाल आपल्याला वारंवार आणि मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतं. शिवाय ते अत्यंत गांभीर्यानं घेतलं जातं. भाव असा असतो की कुठलातरी भयानक मोठा आजार झाला आहे. (खरं तर कुठलाही आजार झाला तरी गांभीर्य हवं, पण भीती नसावी. म्हणजे त्यातून बाहेर पडण्याचे उत्तम उपाय सर्वतोपरी केले जातात.) बरं, म्हणतात व्हायरल, पण त्यावर प्रतिजैविकं (antibiotics) खात असतात. कधी कधी तर डॉक्टर बदलून बदलून एकाच आजारात दोन/तीन प्रतिजैविकं देखील रिचवत असतात. (तसाही भारत देश हा प्रतिजैविकांच्या अविवेकी वापराबद्दल जगभर बदनाम आहे. डॉक्टरांची बेफिकिरी त्याला जितकी कारण आहे; त्याहीपेक्षा जास्त रुग्णांचा अधीरपणा त्याला जबाबदार आहे.) नक्की काय आहे हा आजार? बरा होणारा आहे का? त्याचा योग्य उपाय कोणता? आणि मुख्य म्हणजे आयुर्वेदात त्याला काही औषध आहे का? (‘इंग्रजी नाव असलेल्या कुठल्याही आजाराला आयुर्वेदात औषध असणं अवघड असतं. अलिकडे काही संशोधन झालं असेल तर फक्त तेच औषध उपयोगी पडू शकतं. अन्यथा आयुर्वेदाचा सामान्य वैद्य या आजारांवर काय उपचार करणार?’ असा लोकांचा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. दुर्दैवानं काही वैद्य देखील या गैरसमजाचे बळी आहेत.)  हे जाणण्यासाठी आधी आपण व्हायरल फीवर काय असतो ते समजावून घेऊ.

     व्हायरस हे आजार निर्माण करणारे सूक्ष्म जीव आहेत. यांना आपण ‘विषाणू’ म्हणू शकतो. हे विषाणू अत्यंत सूक्ष्म असतात. केवळ RNA किंवा DNA चा धागा इतकंच त्यांचं शरीर असतं. त्याची रचना ते कधीही बदलू शकतात. फक्त जिवंत पेशीमधेच त्यांची वाढ होऊ शकते. समस्त प्राणी आणि वनस्पती सृष्टीमध्ये हे व्याधी निर्माण करू शकतात. त्यांचं स्वरूप बदलत असल्यानं, प्रयोगशाळेत त्यांचं परीक्षण करणं थोडं जिकिरीचं असतं. त्यांनी शरीरात केलेल्या बदलांवरून, ते शरीरात असल्याचं अनुमान करावं लागतं. एका प्राण्यापासून दुसऱ्याला होणारी यांची लागण झटपट असते. श्वास, स्पर्श, वस्त्र, पाणी, थुंकी, मल असा कुठलाही मार्ग या शत्रूला चालतो. डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू, एड्स, डायबेटीस इतकंच काय आता तर कॅन्सर देखील विषाणूजन्य असल्याचे शोध लागत आहेत. इतकंच की या आजारांचे विषाणू विशिष्ट असून, संशोधनानंतर त्यांच्याविषयी काही माहीती उपलब्ध झाली आहे. वरचेवर येणाऱ्या तापाचं तसं नाही.

    सामान्यतः एक ऋतू संपून दुसरा ऋतू चालू होण्याच्या ऋतुसंधीकाळात या विषाणूजन्य तापाची साथ येते. (भारतातील शहरांमध्ये लोकसंख्येची घनता खूप जास्त असल्यानं, सोप्या भाषेत दरडोई अगदी कमी जागा उपलब्ध असल्यानं यांचा प्रसार फार झपाट्यानं होतो.) नाक किंवा घसा याठिकाणी काही पूर्वरूपं एक/दोन दिवस दिसतात. मग ताप येतो. साधारणत: १०१ ते १०४ F या प्रमाणात ताप असतो. त्यासोबत अंगदुखी, घसादुखी, घशात खवखव, डोकेदुखी, नाकातून पाणी गळणं, नाक चोंदणं, खोकला, भूक मंदावणं, अशक्तपणा, कधी पोटदुखी, कधी जुलाब, मळमळ, क्वचित उलटी अशी काही लक्षणं दिसतात. (सगळी लक्षणं एकाच वेळी एकाच रुग्णात दिसत नाहीत आणि दिसूही नयेत.) सामन्यत: ताप एक ते चार दिवस टिकतो. कधी कधी सात दिवस देखील राहतो. मात्र अन्य लक्षणं कमी व्हायला दहा ते बारा दिवस लागतात. 

     विषाणूजन्य आजारांचा प्रतिकार करण्याचे दोन उपाय सध्या उपलब्ध आहेत. पहिला आहे प्रतिबंधक लस. विषाणूंची संख्या आणि प्रकार यांचा पसारा बघता तो व्यवहार्य नाही. दुसरा उपाय आहे अँटीव्हायरल औषधं. एकतर यांची उपलब्धी खूप कमी आहे. शिवाय यांच्या वापराचे दुष्परिणाम देखील जरा जास्तच आहेत. अन्य साध्या उपचारांनी बऱ्या होणाऱ्या तापावर, अशी घातक औषधं कशाला वापरायची?

      एक/दोन दिवसात ताप उतरला नाही की लोक अधीर होऊन डॉक्टर बदलतात. डॉक्टर देखील बदनामी आणि अपयश यांना घाबरून असतात. मग गरज नसलेल्या प्रतिजैविकांचा वापर केला जातो. इतकं करून आजार त्याचा ठराविक काळ घेतोच. यात फायदा होतो तो प्रतिजैविकं बनवणाऱ्या औषधी कंपन्यांचा. रुग्णाचं तर केवळ  नुकसानच होतं.

      म्हणून क्या खाना तो दम खाना!