वाङ्मयीन 'अस्मिते'चा 'आदर्श' - डॉ. गंगाधर पानतावणे

विवेक मराठी    31-Mar-2018
Total Views |

 

ज्येष्ठ विचारवंत व दलित साहित्याचे अभ्यासक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे 27 मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. पानतावणे सरांनी दलित साहित्याला आणि साहित्यिकांना 'अस्मितादर्श'च्या रूपाने व्यासपीठ दिले. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा लेख.

औरंगाबादच्या वायव्येला मकबऱ्यांचा आणि लेण्यांचा मोठा रम्य असा टेकडयांचा परिसर आहे. याच परिसरात बाबासाहेबांनी आपल्या 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' या संस्थेसाठी जागा घेतली आणि मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. तेव्हापासून हा परिसर 'मिलिंद परिसर' म्हणून ओळखला जातो. तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठाची स्थापनाही याच परिसरात झाली. पुढे याच विद्यापीठाच्या नामांतराचा लढा मोठा गाजला. या परिसरातील बौध्द लेण्यांमुळे हा परिसर भारलेला भासतो.

याच परिसरात विद्यापीठाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर 'श्रावस्ती' हा पानतावणे सरांचा बंगला म्हणजे दलित साहित्य चळवळीचे मोठे ऊर्जा केंद्र. आपल्या 'अस्मितादर्श' या नियतकालिकाचा कारभार सर शेवटपर्यंत याच ठिकाणाहून पाहत होते. सरांना पद्मश्री सन्मान जाहीर झाला. त्यांचे सगळे विद्यार्थी, चाहते, अस्मितादर्शचे वाचक सरांचा मोठा भव्य सत्कार सोहळा करण्यासाठी उत्सुक होते. पण त्यांच्या निधनाची वार्ता आली आणि सगळेच मनापासून हळहळले.

पानतावणे सर मूळचे विदर्भातील. सुरुवातीला ते मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून लागले आणि पुढे तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले ते अगदी निवृत्त होईपर्यंत.

सरांची राहणी टापटीप असायची. पूर्ण बाह्यांची चॉकलेटी रंगाची सफारी, डोळयांना जाडसर फ्रेमचा चश्मा, धारदार स्वच्छ आवाज, शांतपणे पण ठासून बोलायची शैली अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप समोरच्यावर पडून जायची. सरांच्या कविता सुरुवातीला प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या नियतकालिकात प्रसिध्द झाल्या. पण नंतर आपल्या सर्जनात्मक लेखनाला बाजूला ठेवून त्यांनी नवोदित दलित लेखकांच्या लेखनाची पाठराखण करायचा अवघड मार्ग अवलंबिला. 'लिंबोणीच्या झाडामागे' या अंगाईमध्ये एक ओळ अशी आहे 'देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी'. पण पानतावणे सरांनी देवकी असूनही हे नवोदितांच्या लेखनाची पाठराखण करण्याचे यशोदेचे काम केले.

सरांनी गेली 60 वर्षे अखंडपणे चालविलेल्या 'अस्मितादर्श' या नियतकालिकासाठी मराठी साहित्य विश्वात त्यांची ओळख ठसली गेली आहे. जेव्हा 'दलितांचे साहित्य' असा शब्दप्रयोगही रुजला नव्हता, तेव्हा दै. मराठवाडाने या विषयावर एक परिसंवाद घेतला. त्याच काळात मराठवाडा साहित्य संमेलनातही या विषयावर चर्चा झाली.

60च्या दशकात सुरू झालेल्या या चर्चेने गंभीर स्वरूप धारण केले. बघता बघता दलित साहित्याचा एक अतिशय जोमदार असा प्रवाह मराठीत खळाळू लागला. या प्रवाहाचे संगोपन करण्याचे काम 'अस्मितादर्श'ने केले.

पानतावणे सरांचा पिंड मिलिंद परिसरात तयार झाला होता. प्राचार्य म.भि. चिटणीस, म.ना. वानखेडे यांच्यासारख्यांनी  मे.पुं. रेगे, भालचंद्र फडके आदींबरोबर मिलिंदच्या विद्यार्थ्यांची मनोभूमी सुपीक करण्याचे मोठे काम केले. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने भारलेली ही पिढी. बाबासाहेबांच्या संस्थेत काम करत असताना पुरोगामी विचारांचे वारे इथे सतत कसे वाहत राहतील याचाच विचार केला गेला. पानतावणे सरांना याच परिसरात प्रेरणा मिळाली. सरांना शेवटपर्यंत याची जाणीव होती. पुरोगामी चळवळीत दलितेतर प्राध्यापक, विचारवंत, लेखक यांनीही मोठे योगदान दिले. या सगळयांना पानतावणे सरांनी उदारपणे 'अस्मितादर्श'च्या व्यासपीठावर स्थान दिले. केवळ जन्माने दलित आहे तोच दलित साहित्यिक असे न मानता दलितांबद्दल लिहिणारा प्रत्येक जण त्यांना आपला वाटायचा.

केवळ नियतकालिक काढून भागणार नाही, हे ओळखून पानतावणे सरांनी अस्मितादर्श साहित्य मेळावेही आयोजित करायला सुरुवात केली. तेव्हाच्या प्रस्थापित साहित्य संमेलनांमध्ये (जे अजूनही चालूच आहे) नवीन लेखकांची कोंडी होत होती. जिथे सगळयाच नवीन लेखकांची कोंडी होते, तेथे नवीन दलित लेखकांना कोण विचारणार? ही कोंडी फोडण्यासाठी हे अस्मितादर्श मेळावे उपयुक्त ठरू लागले. या मेळाव्यांचे स्वरूप व्यापक होत गेले. संपूर्ण महाराष्ट्रात सदर मेळाव्यांचे आयोजन करून सरांनी कार्यकर्त्यांचे एक मोठे जाळे तयार केले.

एरव्ही दलित चळवळ म्हणजे रस्त्यावर उतरून काहीतरी मोर्चा काढणार, आंदोलन करणार असे स्वरूप असताना साहित्य चळवळीद्वारे एक वैचारिक पाठबळ पुरविण्याचे काम पानतावणे सरांनी केले, हे फार मोलाचे होते.

 

स्वातंत्र्यानंतर दलिचे शहरांत मोठया प्रमाणात स्थलांतर सुरू झाले. या शहरी दलितांना अगदी राहण्यासाठी जागाही मुख्य वस्तीत दिल्या जात नव्हत्या. शहराच्या मुख्य सांस्कृतिक साहित्यिक संस्थांत दलितांचा सहभाग अतिशय नगण्य असायचा. अशा काळात साहित्यिक सांस्कृतिक दलित अस्मिता काळजीपूर्वक जोपासणे व मोठी करणे, मुख्य प्रवाहाशी फटकून न राहता समन्वय साधणे हे फार जिकिरीचे किचकट काम पानतावणे सरांनी केले. शहरी दलितांमधील मध्यमवर्ग सांस्कृतिक चळवळीत पुढे आला पाहिजे, त्यांनी आपल्या समाजाची वैचारिक जाण उंचावत नेली पाहिजे अशी त्यांची भूमिका असायची.

पानतावणे सरांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. त्यांचा पराभव झाला, तरी त्यांनी त्याची कटुता मनात बाळगली नाही. साहित्य महामंडळाकडून पहिल्या विश्व संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव एकमताने आला आणि अध्यक्षपदी त्यांची निवड झाली, तेव्हा त्यांनी हे पद मोकळेपणाने स्वीकारले. जुन्या पराभवाची खंत उगाळली नाही. सरांच्या अशा वागण्याने त्यांचा पराभव करणारेच खजील झाले असतील.

सरांनी कधी वैचारिक अस्पृश्यता बाळगली नाही. सर संघप्रणित समरसता व्यासपीठावर गेले, तेव्हा त्यांच्यावर तथाकथित पुरोगाम्यांनी प्रचंड टीका केली. पण सरांनी असल्या विरोधाला फारशी भीक घातली नाही. ''मी आंबेडकरी विचारांचा पाईक आहे. हा विचार कुठल्याही मंचावरून मी मांडेन. त्याला विरोध झाला, तर मी त्या मंचावर जाणार नाही'' अशी सरांची स्वच्छ भूमिका होती.

सरांचे स्वत:चे संदर्भ ग्रंथालय अतिशय समृध्द असे होते. पुस्तकांच्या गराडयातच ते राहत, असे म्हणायला हरकत नाही. अस्मितादर्श नियतकालिकाचे सगळे जुने अंक डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवण्याचा प्रकल्प त्यांच्या मनात आकारत होता. त्या दृष्टीने कामही सुरू झाले होते. पण त्याला गती मिळू शकली नाही. सरांच्या समोर जर हे काम झाले असते, तर त्यांना मोठे समाधान मिळाले असते.

दलित समाजात पानतावणे सरांसारखे बुध्दिमान प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वे संख्येने कमी आहेत. दलित समाज आणि इतर समाज यांच्यात संवादाचा पूल म्हणून हे लोक महत्त्वाची भूमिका निभावत असतात. राखीव जागांचे धोरण ठरवत असताना हे आरक्षण प्रातिनिधिक असावे, असे घटनाकारांच्या डोळयासमोर होते. आरक्षण मिळालेल्या व्यक्तीने आपल्या समाजासाठी याचा वापर करावा, हा आशय पुरता ध्यानात ठेवून पानतावणे सरांनी साहित्यिक-सांस्कृतिकदृष्टया काम केले.

त्यांना दोन गोष्टींची खंत सतत जाणवायची आणि ते बोलूनही दाखवायचे. बाबासाहेबांच्या 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' या संस्थेच्या कारभारावर ते अत्यंत नाराज असायचे. ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श संस्था व्हायला हवी होती. तसे झाले असते, तर बाबासाहेबांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकारले असते असे त्यांना वाटायचे.

तसेच दुसरी बाब म्हणजे रिपब्लिकन राजकारणाची झालेली फरफट. रिपब्लिकन गटांचे ऐक्य व्हावे व उपेक्षितांना न्याय देणारा एक समर्थ राजकीय पर्याय उभा राहावा, या मताचा सरांनी सतत पाठपुरावा  केला.

एक विचारवंत म्हणून आपली भूमिका निभावण्यात त्यांनी कुठेही कुचराई केली नाही. बोलण्यातला सौम्यपणा कधी बिघडू दिला नाही. शिव्यांनी भरलेली जहाल भाषा त्यांनी कधीच वापरली नाही.

मराठवाडयात नाटककार दत्ता भगत, प्रा. अविनाश डोळस आणि डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दलितत्वाचा शिक्का न मिरविता मुख्य प्रवाहातील वैचारिक साहित्यिक व्यक्तिमत्त्व म्हणून सन्मानाचे स्थान पटकावले. पानतावणे सरांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचे तर मोठे नुकसान झाले आहेच, तसेच दलित व इतर समाजाच्या संवादाचा सेतू असणारे व्यक्तिमत्त्व गेले, हे दु:ख मोठे आहे. 

सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575