काश्मिरी संगीताने महाराष्ट्र दिन साजरा

विवेक मराठी    12-May-2018
Total Views |

***श्रीकांत उमरीकर***

महाराष्ट्र दिनानिमित्त हा कार्यक्रम साजरा झाला, हेसुध्दा एक वैशिष्टय. ज्या काश्मीरमधून हे कलाकार देवगिरीच्या जवळ आले, त्याबाबत एक सुंदर माहिती लक्ष्मीकांत धोेंड यांनी या कार्यक्रमात सांगितली. आठशे वर्षांपूर्वी काश्मिरातून एक कुटुंब देवगिरीच्या यादवांच्या दरबारात आले. त्या कुटुंबातच पुढे महान संगीतज्ञ शारंगदेवाचा जन्म झाला, ज्याने याच परिसरात 'संगीत रत्नाकर' या संगीतातील अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली. आजही हा ग्रंथ संगीत क्षेत्रात प्रमाण मानला जातो. लिपीबध्द शास्त्रीय स्वरूपातील संगीताला आपल्याकडे 'मार्गी' संगीत असे संबोधले जाते.

देवगिरी किल्ल्याच्या जवळ तळयाच्या पायथ्याशी हिरण्य हुरडा पर्यटन केंद्र आहे. त्याच्या हिरवळीवर दर वर्षी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रम साजरा होतो. या वर्षी आयोजक मेधा पाध्ये-सुनीत आठल्ये या कलाप्रेमी जोडप्याने काश्मिरी कलावंतांना आमंत्रित केले होते. हे कुणी फारसे लोकप्रियता लाभलेले आंतरराष्ट्रीय कलाकार नव्हते, तर होते लोककलाकार. त्यांना काश्मिरी भाषेशिवाय इतर कुठलीही भाषा फार सफाईने बोलता येत नव्हती. त्यांच्या वादनाविषयी काही माहिती सांगा म्हटले, तर त्यांनी लाजून 'इससे अच्छा हमको और बजानेको बोलो' अशी भावना व्यक्त केली.

संतूर, सारंगी, रबाब आणि मटका अशी चार वाद्ये वाजविणारे हे चार कलाकार. ही सगळी वाद्येही वैशिष्टयपूर्ण आहेत. संतूर तर केवळ आणि केवळ काश्मीरचेच वाद्य आहे. शिवकुमार शर्मा यांनी या संतूरला जागतिक पातळीवर प्रसिध्दी मिळवून दिली. त्यांनी या वाद्याला ज्याप्रमाणे शास्त्रीय वाद्य म्हणून मान्यता मिळवून दिली, त्याचप्रमाणे काश्मिरी लोकसंगीतातील काही धून वाजवून त्याही संगीताला लोकप्रियता मिळवून दिली. 'कॉल ऑॅफ द व्हॅली' हा तर त्यांचा प्रसिध्द अल्बम आहेच, त्याशिवाय इतरही काही अल्बम आहेत.

काश्मिरी संगीत मूळ स्वरूपात सादर करणारे हे लोककलाकार. त्यांच्या वादनाने महाराष्ट्रीय श्रोत्यांना थक्क करून टाकले. दाक्षिणात्य संगीतात तालासाठी घटमचा उपयोग केला जातो. या काश्मिरी कलाकारांच्या संचात मटका वादक आहेत. हा मटका विशेष कलाकुसर केलेला आणि वेगळया पध्दतीचा असतो. त्याच्या वादनात ठेक्याबरोबर मटक्याच्या उघडया तोंडावर हाताने आघात करून एक वेगळाच घुमार निर्माण केला जातो. त्याने या संगीताची मजा आणखीनच वाढते. हा मटका काश्मिरी शालीसारखा कलाकुसरीने नटलेला असतो. सारंगीवरही अशी कलाकुसर आढळून येते.

रबाब हे अफगाणी वाद्य. हिंदी चित्रपटांतील कितीतरी गाण्यात अफगाणी संस्कृतीच्या कलेचा स्वाद रसिकांना देण्यासाठी या वाद्याचा उपयोग केला गेला आहे. (अलिफ लैला मालिकेचे संगीत, यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगीसारखी लोकप्रिय गाणी, काबुलीवाला चित्रपटाच्या संगीतात सलिल चौधरी यांनी केलेला रबाबचा वापर रसिकांच्या कानात अजूनही रेंगाळतो). पण हे काश्मिरी कलाकार जे रबाब वाजवितात, ते जरासे वेगळे आहे. त्याला काही जास्तीच्या तारा लावून एक वेगळाच काश्मिरी रंग या कलाकारांनी भरला आहे.

सारंगी हे तसे उत्तर भारतात लोकप्रिय वाद्य. साथीचे वाद्य म्हणून हे जास्त ओळखले जाते. कोठयावरचे वाद्य किंवा मुजरा गाण्यांसाठी साथीचे वाद्य अशी याची जास्त ओळख आहे. पण काश्मीरच्या कलाकारांची सारंगी जरा वेगळी आहे. ती एक तर कलाकुसर असलेली आहेच, शिवाय तिच्या तारांची लांबी नेहमीच्या सारंगीपेक्षा जास्त आहे. परिणामी तिचा आवाज वेगळा उमटतो. केवळ करुणच नव्हे, तर इतर रस व्यक्त करण्यासाठीही हे कलाकार सारंगीचा वापर करून घेतात.

या काश्मिरी कलाकारांच्या वादनाची शैली मोठी मोहक आहे. रबाबवाला किंवा सारंगीवाला इतरांसाठी एक चाल देतो. त्या अनुषंगाने संतूरचे स्वर उमटत राहतात. सारंगी पार्श्वभूमीवर स्वरांचा पडदा धरून ठेवते आणि त्यावर इतरांचे सूर काही सांगीतिक चित्र रेखाटत जातात, असा विलक्षण अनुभव हे संगीत ऐकत असताना येत राहतो.

ज्याला आपण मंगलाचरण असे म्हणतो, त्याप्रमाणे ते कुठेही गेले तर सुरुवातीला एक धून वाजवत राहतात. मग त्यानंतर विविध प्रसंगी वाजविण्यात येणाऱ्या धून सादर केल्या जातात. उदा., लग्न समारंभ, प्रियकराने प्रेयसीची केलेली आळवणी किंवा परदेशी प्रियकराच्या दु:खात होरपळत गेलेल्या प्रेयसीची आर्त वेदना, निसर्गात सर्वत्र फुले फुललेली असताना होणारी आनंदाची भावना, बर्फाळ दिवस संपून ऊन पडून लख्ख दिवस उजाडतो तो आनंद... अशा कितीतरी भावना या लोकधूनांमधून व्यक्त केल्या जातात.

हे कलाकार वागायलाही अतिशय साधे असे आहेत. त्यांच्या संगीतावर बोलायलाही ते तयार होत नाहीत. प्रियकराची भावना व्यक्त करणारी धून समजावून सांगताना संतूर वादक उमरचे गाल गुलाबी होऊन गेले होते. आधीच काश्मिरी माणसांचा रंग गोरा गुलाबी.

महाराष्ट्र दिनानिमित्त हा कार्यक्रम साजरा झाला, हेसुध्दा एक वैशिष्टय. ज्या काश्मीरमधून हे कलाकार देवगिरीच्या जवळ आले, त्याबाबत एक सुंदर माहिती लक्ष्मीकांत धोेंड यांनी या कार्यक्रमात सांगितली. आठशे वर्षांपूर्वी काश्मिरातून एक कुटुंब देवगिरीच्या यादवांच्या दरबारात आले. त्या कुटुंबातच पुढे महान संगीतज्ञ शारंगदेवाचा जन्म झाला, ज्याने याच परिसरात 'संगीत रत्नाकर' या संगीतातील अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली. आजही हा ग्रंथ संगीत क्षेत्रात प्रमाण मानला जातो. लिपीबध्द शास्त्रीय स्वरूपातील संगीताला आपल्याकडे 'मार्गी' संगीत असे संबोधले जाते. तर याच्याशिवाय जे मौखिक परंपरेत चालत आले आहे, ज्याचे नियम-कायदे अजून कुणी कागदावर मांडू शकलेले नाही, अशा संगीताला 'देशी' समजले जाते. खरे तर देशीतूनच मार्गी विकसित होत जाते. आठशे वर्षांपूर्वी आलेल्या शारंगदेवाने इथे येऊन ग्रंथरचना करत मार्गी संगीताचा पाया रचला. तर आज त्याचा पाठलाग करत हे लोककलाकार 'देशी' परंपरेतील त्याच प्रदेशातील संगीत इथे येऊन सादर करत आहेत. एक विलक्षण अशी गोष्ट म्हणून अभ्यासकांना न सापडलेल्या कितीतरी सांगीतिक बाबींचा खुलासा या लोककलाकारांच्या संगीतातून होतो.

आपल्याकडे तशीही वसंतोत्सव साजरा करण्याची परंपरा आहेच. महाराष्ट्र दिन वसंतातच येतो. तेव्हा महाराष्ट्र दिनानिमित्त काही वेगळे संगीत ऐकविण्याची संयोजकांची धडपड विलक्षणच म्हणावी लागेल. यापूर्वीही वीणेसारखे दुर्मीळ वाद्य, जलतरंगसारखे फारसे परिचित नसलेले वाद्य या कार्यक्रमात सादर झाले आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात संगीत ऐकणे हासुध्दा एक विलक्षण अनुभव आहे. पौर्णिमा आदल्याच दिवशी होऊन गेली होती. त्यामुळे स्वच्छ आभाळात हसणारा पूर्ण चंद्र, वसंतातील सुगंधित हवा आणि कानावर पडणारे काश्मिरी संगीत याचा एक वेगळाच अनुभव रसिकांना येत होता. या परिसरात लिंबाची झाडे खूप मोठया प्रमाणात आहेत. लिंबाच्या मोहोराचा एक मादक सुगंध वसंतात अनुभवायला येतो.

बहाव्याची पिवळीजर्द झुंबरासारखी फुले याच काळात फुलतात. गुलमोहराची लाल मोहिनी याच काळात पसरायला सुरुवात झालेली असते. थोडेसे आधी पळसाच्या रंगांनी होळीच्या दरम्यान कमाल करून टाकलेली असते. या वातावरणात संगीत-नृत्य यांचे महोत्सव साजरे होणे खरेच सयुक्तिक आहे. जागतिक नृत्य दिवसही 29 एप्रिलला असतो. त्या निमित्ताने विविध ठिकाणी काही आयोजन केले जाते.

1 मे हा जागतिक कामगार दिवस आहे. दिवसभर श्रमणारे लोक संध्याकाळी एकत्र जमून नाच-गाणी म्हणतात, अशी आपल्याकडे परंपरा आहे. खरे तर लोकसंगीत हे कष्टकऱ्यांनीच जिवापाड जपले आहे. तेव्हा या कामगारांनी जपलेले हे लोकसंगीत आता वेगळया स्वरूपात सादर होणे आवश्यक आहे. जगभरात लोककलांना मोठया आस्थेने जपले जाते. जगभरचे पर्यटक विविध ठिकाणच्या लोककला महोत्सवांना आवर्जून हजर राहतात. हे आपल्याकडे होणे गरजेचे आहे. शासकीय पातळीवरून होणाऱ्या प्रचंड खर्चीक कोरडया महोत्सवांपेक्षा असे छोटे उपक्रम खूप चांगले आहेत.

देवगिरीच्या परिसरात पळस, लिंब, गुलमोहर, बहावा ही झाडे मोठया प्रमाणात आहेत. तेव्हा हा नृत्य-संगीताबरोबरच रंगाचाही उत्सव होऊन जातो. अजिंठयाच्या रूपाने चित्रांची एक मोठी परंपरा या परिसरात होती, याचा जागतिक पातळीवरचा पुरावाच उपलब्ध आहे. वेरूळचे जगप्रसिध्द कैलास लेणेही एकेकाळी केवळ दगडाचे नसून संपूर्ण रंगीत होते. तेव्हा असा संगीत-नृत्य-रंग महोत्सव मोठया प्रमाणात होणे आवश्यक आहे. 23 एप्रिल रोजी शेक्सपिअर दिवस आहे. तेव्हा नाटयाचीही जोड याला देता येईल.

(1 मे रोजी सादर झालेल्या काश्मिरी संगीताच्या कार्यक्रमात हे कलाकार सहभागी होते - गुलाम मोहम्मद लोन (रबाब), जहूर अहमद भट (सारंगी), उमर माजीद (संतूर), गुलजार अहमद गाश्रु (मटका). याच कार्यक्रमात सुष्मिता डावळकरचे सुमधुर शास्त्रीय संगीत सादर झाले.)

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575