मलिक अंबर कबर - पर्यटक बेखबर!

विवेक मराठी    28-Jul-2018
Total Views |


 

खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीबद्दल माहिती दर्शविणारे फलक आहेत. औरंगजेबाच्या पन्नास वर्षे आधी दौलताबाद-खडकी परिसराचा विकास करून या परिसराला सुंदर बनविणाऱ्या, त्याच कबरीच्या जवळ असलेल्या मलिक अंबर कबरीबाबत मात्र अनास्था आहे.

दक्षिण भारताची एक अस्मिता जागृत करण्याचे काम एका परदेशी गुलामाने केले असे सांगितले, तर तरुण पिढीला कदाचित आश्चर्य वाटू शकेल. ज्याने शहाजी महाराजांचे लग्न जिजाबाईंशी लावून दिले, ज्याने शिकविलेल्या गनिमी काव्याचा वापर करून पुढे चालून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला, ज्याने जमिनी मोजणीची आदर्श व्यवस्था उभी करून दाखविली, ज्याने महसुलाची रचना आखून दिली, ज्याने मध्ययुगात शहर नियोजनाचा (टाउन प्लॅनिंगचा) पाया घातला, ज्याने भूमिगत जल योजना 16व्या शतकात कार्यान्वित करून एक चमत्कार घडविला, ज्याने इमारत बांधकामाचा एक सुरेख नमुना सादर केला, औरंगाबाद (तेव्हाच्या खडकी) शहराला देखणेपण प्राप्त करून दिला, त्या मध्ययुगातील 86 वर्षे जगलेल्या या माणसाचे नाव आहे मलिक अंबर.

या मलिक अंबर याचा मृत्यू 14 मे 1626 रोजी झाला. दौलताबादजवळ खुलताबाद येथे त्याची कबर आहे. खुलताबादपासून थंड हवेचे ठिकाण असलेल्या म्हैसमाळला जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर सुफी संत जर्जरी बक्ष यांच्या दर्ग्यापाशी ही कबर आहे. त्याला लागूनच सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रसिध्द असे विश्रामगृह आहे. विश्रामगृहातील चिनी मातीची कलात्मक क्रोकरी, सोन्या-चांदीचा वर्ख असलेली भांडी यासाठी व या ठिकाणच्या खानसाम्याने बनविलेल्या सामिष भोजनासाठी एकेकाळी हे विश्रामगृह अतिशय प्रसिध्द होते. हे ठिकाण सर्वांना माहीत आहे. याला लागूनच चार छोटे घुमट आहेत. त्यापैकी सर्वांत टुमदार, देखणा घुमट म्हणजे मलिक अंबरची कबर.

मलिक अंबरचा जन्म नेमका केव्हा झाला, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण 1550मध्ये बगदाद येथे मीर कासीम या व्यापाऱ्याने अंबरला गुलाम म्हणून विकत घेतल्याची नोंद आहे. तेव्हा तो साधारण 10 वर्षांचा असावा. म्हणजे त्याचा जन्म साधारणत: 1540चा असल्याचे मानावे लागते. हा व्यापारी अहमदनगरच्या निजामाकडे व्यापारासाठी आला असताना निजामशाहीतील एक सरदार चेंगीजखान याने अंबरला त्याच्याकडून खरेदी केले. आपल्या कर्तृत्वाने अंबर निजामशाही सैन्यात पुढे जात राहिला. 1595मध्ये निजामशाहीत सुंदोपसुंदी-मोगलांचे आक्रमण-चांदबिबीचा खून अशा घटना घडत गेल्या. या सगळयात मलिक अंबर पुढे सरसावला आणि त्याने निजामशाही मजबूत करण्यास सुरुवात केली. चांदबिबी ही निजामशहाची मुलगी व अदिलशहाची सून होती. परिणामी या नातेसंबंधाचा फायदा घेत त्याने दक्षिणेतील राजवटींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मोगल हे बाहेरचे असून सर्व दक्षिणेतील राजांनी त्याविरुध्द एकवटले पाहिजे, हा विचार अंबरने पहिल्यांदा मांडला. अंबर हयात असेपर्यंत मोगलांना निजामशाही संपविता आली नाही. पुढे त्याच्या मृत्यनंतर दहा वर्षांतच निजामशाहीचा अंत झाला.

मलिक अंबरविषयी जहांगीरनाम्यात आलेला मजकूर असा - 'युध्दकला, सेनापतित्व, व्यवहारज्ञान आणि राज्यशासन यांमध्ये मलिक अंबराच्या तोडीचा दुसरा कोणीही आढळत नाही. त्याने दंगेखोर लोकांना धाकामध्ये ठेवले आणि शेवटपर्यंत आपला मोठा दर्जा राखून सन्मानाने आपली कारकिर्द संपविली. इतिहासामध्ये एक हबशी गुलाम एवढया मोठया पदावर चढल्याचे दुसरे उदाहरण नाही.'

शहाजी महाराजांवर मलिक अंबरचे पुत्रवत प्रेम होते. त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहूनच, लखुजी जाधव यांना त्यांची मुलगी त्यांनी शहाजीला द्यावी असा आग्रह अंबरने धरला. लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादवांच्या घराण्याचे वंशज. त्यांना आपल्या घराण्याचा अभिमान. त्या तुलनेत शहाजींचे वडील मालोजीराजे हे वेरूळचे पाटील. पण मुलगा भविष्यात नाव काढेल हे ओळखून मलिक अंबरने हा आग्रह धरला, त्यांचा अंदाज पुढे खरा सिध्द झाला. गनिमी काव्याचे तंत्र मलिक अंबरकडून शहाजींनी आणि पुढे शिवाजी महाराजांनी शिकून घेतले.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात जी एक शिस्त होती, तिचे धागेदोरेही मलिक अंबरपर्यंत पोहोचतात.

मलिक अंबरने जमिनीची मोजणी करवून घेतली. बागायती व जिरायती हे जमिनीचे दोन प्रकार निश्चित करून त्याप्रमाणे सारा ठरविला. जमिनीच्या उत्पन्नाच्या दोन पंचमांश भाग सारा म्हणून देण्याची प्रथा रूढ केली. धान्यरूपाने सारा गोळा करण्याच्या पध्दतीत दोष आढळून आल्याने पुढे चालून धान्याची किंमत ठरवून त्या किमतीचा तिसरा हिस्सा रोखड घेण्याची पध्दत त्याने सुरू केली. याचा चांगला परिणाम असा झाला की लढाया सुरू असल्याच्या अस्थिर काळातही  सरकारी खजिना भरलेला राहिला. शेरशहा सुरीने व्यवहारात नाण्यांचा वापर सुरू केला. त्याच्यानंतर शंभर वर्षांनी मलिक अंबरनेही नाण्यांच्या स्वरूपात सारा वसुलीला सुरुवात केली. हे पाऊल त्या काळाच्या मानाने फारच महत्त्वाचे होते. सैनिकांचे पगार, जमिनीची योग्य मोजणी, सारा वसुलीची पध्दत या सर्व गोष्टी पुढे शिवाजी महाराजांच्या काळात मलिक अंबर पध्दतीनेच चालू राहिल्या. त्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर त्या काळात महाराजांची जी जबरदस्त पकड राहिली, त्याचे काहीसे श्रेय मलिक अंबरला जाते.

जुन्या औरंगाबाद शहराची रचना पाहिल्यास मलिक अंबर एक शहर रचनाकार म्हणूनही कसा द्रष्टा होता याची साक्ष मिळते. आज थोडयाशा पावसात शहरांची जी दैना उडते आहे, ती पाहिली की मलिक अंबरसारख्यांचे महत्त्व जास्तच जाणवत राहते. पाण्याची व्यवस्था केवळ अमीर-उमराव, राजे-रजवाडे यांच्यासाठीच न करता सामान्य लोकांसाठी करून मलिक अंबरने एक वेगळी दृष्टी दाखविली होती. तो स्वत: गुलामीतून पुढे असल्यामुळे असेल कदाचित, सामान्य रयतेवर त्याचे कायम प्रेम राहिले. त्याने जे सैन्य उभे केले, तेही बेरडांचे होते. शिवाजी महाराजांना मावळयांचे सैन्य उभे करण्याची प्रेरणा हीच असावी.

शासनाने मलिक अंबरच्या कबरीपाशी अजूनही माहिती फलक लावला नाही. इतक्या दिवसांपासून इतिहासप्रेमींनी पाठपुरावा केल्याने कबरीच्या दुरुस्तीचे काम बऱ्यापैकी सुरू झाले आहे. पुरातत्त्व खात्याने संरक्षित वास्तू असल्याचा फलक लावला आहे. शिवाय एक चौकीदार नेमून सुरक्षेची सोय केली आहे. कबरीच्या परिसरातील मुसाफिरखान्याच्या दुरुस्तीचे कामही मार्गी लागले आहे.

खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीबद्दल माहिती दर्शविणारे फलक आहेत. औरंगजेबाच्या पन्नास वर्षे आधी दौलताबाद-खडकी परिसराचा विकास करून या परिसराला सुंदर बनविणाऱ्या, त्याच कबरीच्या जवळ असलेल्या मलिक अंबर कबरीबाबत मात्र अनास्था आहे.

औरंगजेबाने आपल्या दक्षिण सुभ्याचा कारभार इथून पाहिला. पण ही काही त्याची राजधानी नव्हती. या परिसराला यादवांनंतर मोहंमद तुघलकाने संपूर्ण भारतवर्षाची राजधानी बनविली होती. त्यानंतर या परिसरावर खऱ्या अर्थाने कुणी प्रेम केले असेल, जीव लावला असेल तर तो मलिक अंबरने. निजामशाहीची राजधानी त्याने अहमदनगरहून देवगिरी किल्ल्यावर आणली. खडकी या छोटया खेडयाचे मोठे आकर्षक शहर बनविले. बावन्न पुरे आणि बावन्न दरवाजे असे हे देखणे औरंगाबाद शहर म्हणजे मलिक अंबरचे स्वप्न होय.

पण याच मलिक अंबरची कबर आज उपेक्षेत आहे. मलिक अंबरच्या सर्व वास्तूंवर साखळीला खालच्या बाजूला जमिनीकडे तोंड करून असलेले फूल असे बोधचिन्ह दगडांत कोरलेले असते. आपण गुलाम होतो याची खूण म्हणजे ही साखळी आणि त्याच्या प्रदेशातील अफगाणी फूल यांना या बोधचिन्हावर स्थान आहे. अगदी अंबरच्या कबरीवरही हेच बोधचिन्ह कोरलेले आहे.

मलिक अंबरने ज्या किल्ल्यावर मोगलांच्या बलाढय सेनेचा पराभव करून दक्षिणेच्या राजवटींना जीवनदान दिले, तो अंतूरचा किल्ला अजिंठयाच्या डोंगररांगांत अगदी उपेक्षित अवस्थेत होता. त्या किल्ल्याच्या डागडुजीचे कामही आता बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. पण किल्ल्याला जायला चांगला रस्ताच नाही.

मलिक अंबरकालीन बऱ्याच वास्तू औरंगाबाद परिसरात अगदी धूळ खात पडून आहेत. काही दरवाजे तर अगदी मोडकळीस आले आहेत. जे दरवाजे चांगले आहेत, त्यांचे तरी सुशोभन करणे व रस्ता त्यांच्या बाजूने काढून देणे गरजेचे आहे.

मलिक अंबरवर वि.स. वाकसकर यांनी लिहिलेले 'मलिक अंबर' हे छोटे पुस्तक (प्रकाशक - शब्दालय, श्रीरामपूर) आणि नरेंद्र मोहन यांनी हिंदीत लिहिलेले नाटक वगळता फारसे साहित्य उपलब्ध नाही. दक्षिणेच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून मलिक अंबरची आठवण सदैव जागती ठेवली पाहिजे. अंबर नसता, तर या प्रदेशाची अस्मिता मोगलांनी चिरडून टाकली असती. 

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

(छायाचित्र सौजन्य : Vincent Paskilini)