मालकीचे घर म्हणजे समृध्दीत भर

विवेक मराठी    30-Jul-2018
Total Views |


 

शहाण्या माणसाने तरुण वयात उत्पन्न कमावू लागताच मालकीचे घर उभारावे, हा मोलाचा सल्ला मला माझ्या आईने सुरुवातीलाच दिला होता. अर्थात ते पहिले घर घेताना माझी जी दमछाक झाली, त्यावरून आपल्याकडे 'घर पाहावे बांधून' अशी म्हण का पडली, याचा पडताळा मला आला. पण त्याच वेळी आईच्या सल्ल्याचे महत्त्वही उमगले. त्यामुळे उद्योजकीय मार्गदर्शनात मी तरुणांना आवर्जून सांगतो, की ''बाबांनो! आयुष्यात पहिले स्वप्न स्वत:च्या घराचे साकारा.''

 धनंजय दातार

लग्नानंतर पत्नीसमवेत दुबईत राहून मी आमच्या दुकानाचे काम सांभाळत होतो आणि आई-बाबा मुंबईत राहून निवृत्तीचे आयुष्य घालवत होते. आम्ही त्यांना नियमित भेटायला येत असू. अशाच एका भेटीत आई मला म्हणाली, ''दादा! तू व्यवसायात चांगली प्रगती करत असलास, तरी अद्याप स्वत:ची म्हणावी अशी तुझी वास्तू झालेली नाही. किमान मुंबईत तरी स्वत:च्या नावावर एखादा फ्लॅट का घेत नाहीस?'' मी आश्चर्यचकित होऊन विचारले, ''आई! अगं, मला स्वतंत्र फ्लॅटची गरज काय? दुबईत आम्ही दोघेच असतो आणि मुंबईत आलो की तुमच्याजवळ राहतो. विनाकारण गुंतवणूक करून आणखी एक घर कशासाठी घ्यायचे?''

त्यावर आई म्हणाली, ''दादा! शहाण्या माणसाने तरुण वयातच स्वकमाई सुरू होताच मालकीचे घर उभारावे. त्यामुळे खूप फरक पडतो. वडिलोपार्जित मालमत्ता अखेर वारसांचीच असते हे खरे असले, तरी ती पूर्वजांनी त्यांच्या कष्टाने उभारलेली असते आणि वंशज केवळ त्याचा उपभोग घेतात. इस्टेटीच्या वाटण्यांवरून भाऊबंदकी होण्यापेक्षा प्रत्येकाने आपले कर्तृत्व सिध्द करावे, हे उत्तम. दुसरी गोष्ट म्हणजे तुझे लग्न झाले आहे. आपल्या नवऱ्याच्या नावावर मालकीचे घर किंवा दुकान यापैकी काहीच नाही, असा विचार तुझ्या पत्नीच्या मनात आलाच तर तू त्यावर काय स्पष्टीकरण देणार आहेस? मी पुष्कळ जगरहाटी बघितली आहे. स्वयंपाकघर, संसार, कुटुंब आपल्या हक्काचे असावे, अशी सुप्त इच्छा प्रत्येक स्त्रीच्या मनात असते, पण फार कमी स्त्रियांना तो स्वयंनिर्णयाचा हक्क सुरुवातीलाच मिळतो. सुदैवाने मला लग्नानंतर लगेच ते स्वातंत्र्य मिळाले आणि आता ते माझ्या सुनेलाही मिळावे, अशी माझी इच्छा आहे.''

आईचे म्हणणे एका अर्थी खरे होते, पण फ्लॅट घेण्यासाठी माझ्यापुढे बऱ्याच अडचणी होत्या. निवृत्ती पत्करली असली तरी दुकानांचे मालक बाबाच होते, कारण त्यांच्याच कमाईचा सर्व पैसा धंद्यात गुंतला होता. मी त्यांचा मुलगा असलो, तरी त्यांनी संपूर्ण व्यवसाय माझ्या नावावर केलेला नव्हता. उलट ते मला माझ्या कामाचा पगार नियमित देत होते. पण ते उत्पन्न माझा पगार आहे आणि मी नोकरी करतो आहे, याचे बँकेला आवश्यक असणारे सॅलरी स्लिपसारखे पुरावे मी देऊ  शकत नव्हतो. मुख्य अडचण अशी होती, की बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी तारण ठेवायला माझ्याकडे स्वत:चे असे काहीच नव्हते. मी निराश झालो असे दिसताच आई मदतीला धावून आली. तिने तिच्याकडचे शिलकीत साठवलेले पाच लाख रुपये माझ्या हवाली केले आणि सोईस्कर उपनगरात फ्लॅटचा शोध घेण्यास सांगितले.

मी उत्साहाने ते पैसे माझ्या बँक खात्यात भरले. इतकी मोठी रक्कम बरेच दिवस बचत खात्यात पडून राहिल्याचे लक्षात आल्याने बँकेच्या मॅनेजरने एक दिवस मला विचारले, ''साहेबऽ, तुम्ही बचत खात्यात खूपच रक्कम विनावापर साठवून ठेवली आहे. गरज लागेपर्यंत तुम्ही ही रक्कम मुदत ठेव म्हणून का ठेवत नाही? त्यावर तुम्हाला जास्त दराने व्याज मिळेल.'' त्यावर मी ऐटीत उत्तर दिले, ''मला घर घ्यायचे आहे आणि कोणत्याही क्षणी पैसे लागतील म्हणून मी ती रक्कम तयार ठेवली आहे.'' त्यावर त्या मॅनेजरला गंमत वाटली. तो तिरकसपणे म्हणाला, ''काय गंमत करताय का? पाच लाख रुपये एवढयाशा रकमेत मुंबईत साधी झोपडीही येणार नाही आणि तुम्ही फ्लॅटचे स्वप्न बघताय?'' हा शेरा ऐकताच माझा चेहरा पडला. त्या माणसाची बोलण्याची पध्दत योग्य नसली, तरी तो सत्य तेच सांगत होता. खरोखरच तेवढया रकमेत मुंबईत कुठेही फ्लॅट मिळणार नव्हता. मग मी नाइलाजाने मुंबईबाहेरच्या उपनगरांकडे मोर्चा वळवला आणि कुठे स्वस्तात फ्लॅट मिळतोय का, याचा शोध घेऊ  लागलो.

त्या सुमारास ठाणे शहराच्या बाहेर नव्या इमारतींचे बांधकाम सुरू होते, तेथे एक तीन खोल्यांचा फ्लॅट 13 लाख रुपयांना मिळत होता. मी आईकडे गेलो व तिला ही किंमत सांगितली. आईने स्वत:कडचे पैसे दिलेच होते. आता उरलेल्या रकमेसाठी तिने बाबांकडे शब्द टाकला. बाबांनी प्रथम ही कल्पनाच फेटाळून लावली. ''त्याला सांग, दुकान नीट सांभाळ म्हणावं, स्वत:चे घर घ्यायला निघालाय. लग्न झाले म्हणून लगेच वेगळे राहण्याची नाटके नकोत,'' अशा शब्दांत त्यांनी फटकारले. पण आई मात्र तिच्या विचारावर ठाम होती. तिने गोडीगुलाबीने आपला मुद्दा पटवून देऊन बाबांना राजी केले. मग बाबांनीही स्वत:कडचे पाच लाख रुपये दिले.

मला हायसे वाटले आणि मी विचार केला, की ''चला, आता सगळे सोपे झाले. तेरा लाखांपैकी दहा लाखांची तरतूद झाली. आता वरचे तीन लाख रुपये आपण सहज उभारू.'' पण तेही वाटले तितके सोपे ठरले नाही. हमखास मदत करतील असा विश्वास ज्यांच्याबाबत होता, त्यांनी ऐन वेळी उसनवारीला नकार देऊन अनेक सबबी सांगायला सुरुवात केली. मला वाईट वाटले आणि गंमतही वाटली. काही मिळणार असेल तर माणसांचे वागणे निराळे असते आणि द्यायची वेळ आल्यास वागणे निराळे असते. गरजेच्या वेळी पैसा मिळवताना किती ऐकून घ्यावे लागते, हा धडाही याच प्रसंगातून शिकायला मिळाला. तीन लाख रुपये ही रक्कम आताच्या काळात मामुली वाटेल, पण त्या वेळी ती उभारताना माझी पुरती दमछाक झाली. अखेर दोन-तीन मित्रांकडून आणि नातेवाइकांकडून परतफेडीचे पुढचे वायदे करून मी कशीबशी ती रक्कम जमवली आणि एकदाचा फ्लॅट घेऊन टाकला.

खरे तर आई-बाबांच्या जिवावर आयता फ्लॅट घ्यायला मी नाराज होतो, पण आईने त्यावरही एक तोडगा काढला. ती म्हणाली, ''बँकेने जसा तुझ्या पगारातून कर्जाचा हप्ता घेतला असता, तसेच तूसुध्दा दरमहा तुझ्या पगारातून ठरावीक रक्कम आम्हाला देऊ  कर. मुदतीची अट नाही आणि व्याजही नाही. दहा लाख रुपये फिटताच व्यवहार संपला.'' मी ते मान्य केले आणि पुढील काळात नियमितपणे माझ्या वार्षिक उत्पन्नाचा हिस्सा बाजूला काढून तो आई-बाबांना परतफेड म्हणून देत गेलो.

आयुष्यात प्रथमच एका मालमत्तेला माझे नाव लागले होते. मला त्या फ्लॅटने अपार आनंद आणि समाधान दिलेच, तसेच माझ्यात आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावनाही निर्माण केली. आईचे दूरदृष्टीचे शब्द अगदी खरे ठरले. मुंबईत जागांचे भाव आवाक्याबाहेर जाताच गरजूंनी शहराच्या सीमेवरच्या उपनगरांची निवड करायला सुरुवात केली. त्यामुळे मुंबईचा शेजारी जिल्हा असलेल्या ठाण्यात बांधकाम उद्योगाचा एवढया वेगाने विस्तार झाला की मी घेतलेल्या फ्लॅटची किंमत अल्पावधीतच दुप्पट झाली. मी पैशाच्या मोहाने फ्लॅट विकून झटपट नफा कमवण्याच्या फंदात पडलो नाही. पुढे मी आमच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक झाल्यावर आणि कंपनी फायद्यात चालू लागल्यावर मगच तो फ्लॅट विकून मुंबईच्या मध्यवर्ती भागात आणखी प्रशस्त फ्लॅट घेतला. एकंदरीत पहिला फ्लॅट माझ्या प्रगतीला चालना देणारा ठरला.

मित्रांनोऽ, मालकीच्या घराचे एक वेगळे महत्त्व असे असते की तेथे तुम्हाला मानसिक सुरक्षितता लाभते. घरखरेदीसाठी कर्ज घेतल्यास प्राप्तिकरात दीर्घकालीन सवलत मिळते. घरातून व्यवसाय चालवताना, आपले कार्यालय किंवा माल साठवण्याचे गोदाम म्हणूनही आपल्या वास्तूचा वापर करता येतो. भारतातील छोटे व्यावसायिक आजही 'नीचे दुकान, उपर मकान' याच यशस्वी सूत्राचा उपयोग करतात. 'भाडयाचे घर अन् खाली कर' असा कटू अनुभव येऊ  द्यायचा नसेल, तर शहाण्याने सुरुवातीलाच स्वत:चे घर घेण्यास प्राधान्य द्यावे. एक प्रसिध्द संतवचन नेहमी लक्षात ठेवावे.

ऐसी बात बोलो, जो कोई न कह सकेगा झूठ।

ऐसी जगह चुनो, जहाँसे कोई न कह सकेगा ऊठ॥

 

(या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकतात.)