संमेलनाध्यक्ष निवड की निवडणूक ?वाचकांची केवळ फसवणूक!

विवेक मराठी    07-Jul-2018
Total Views |


 अखिल भारतीय साहित्य महामंडळाने, साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पध्दत रद्द करून महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन अध्यक्ष निवडला जाईल, अशी घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही किचकट प्रक्रिया पार पडून हा निर्णय अमलात येईल. या परिस्थितीत काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत आणि महामंडळाकडे सध्या त्यांची उत्तरे नाहीत. ही वाचकांची निव्वळ फसवणूक आहे.

सतत अपघात करणाऱ्या, नीट न चालणाऱ्या गाडीबद्दल गांभीर्याने चर्चा चालू होती, चालविणारा बदलला पाहिजे. चालक निवडण्याची पध्दत बदलली पाहिजे असे मुद्दे चर्चेत होते. नवीन पध्दतीने चालकाची निवड करण्यात आली. पण अडचण अशी की तरी अपघात होतच राहिले. मग लक्षात आले की गाडीची दिशाच चुकली आहे. गाडी आता पार जुनी होऊन गेली आहे. तेव्हा लक्षात आले - केवळ चालविणारा बदलून किंवा तो निवडायची पध्दत बदलून काहीच होणार नाही. गाडीच भंगारमध्ये टाकण्याची वेळ आली आहे.

 अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे असेच होऊन बसले आहे. नुकतेच साहित्य महामंडळाने साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पध्दत रद्द करून महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन अध्यक्ष निवडला जाईल, अशी घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही किचकट प्रक्रिया पार पडून हा निर्णय अमलात येईल.

पण आता नवीन परिस्थितीत काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत आणि महामंडळाकडे सध्या त्यांची उत्तरे नाहीत.

1995ला परभणीला 68वे साहित्य संमेलन झाले होते. त्या वेळी एकूण खर्च झाला होता 32 लाख रुपये. (जमा झाले होते 40 लाख रुपये. शिल्लक 8 लाख रुपयांचा 'अक्षर प्रतिष्ठा' नावाने ट्रस्ट केला गेला.) पुस्तकांची विक्री मोठया प्रमाणात झाली होती. त्या काळी चांगल्या मराठी ललित पुस्तकाची आवृत्ती 1100 ते 2000 प्रतींची असायची. (सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या सर्व मिळून 8 हजार होती.)

2016मध्ये संमेलनाचा खर्च 10 कोटीपर्यंत पोहोचला आहे आणि चांगल्या मराठी ललित पुस्तकाची आवृत्ती 300 प्रतींची निघायचीही मारामार होऊन बसली आहे. (सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या 25 हजाराच्याही पुढे गेली आहे.)

हे कशाचे लक्षण आहे?

विद्यापीठात मराठी शिकणाऱ्याची संख्या प्रचंड घटली आहे. इतकेच नाही, तर मराठी भाषेसंबंधी जी कामे बाहेर व्यवहारात केली जातात, त्यासाठी अभ्यासक्रमात कसलीही तरतूद केलेली आढळत नाही. ही तक्रार केली, तर या बाबी महामंडळाच्या कक्षेबाहेरच्या आहेत असा युक्तिवाद केला जातो. मग महामंडळाच्या कक्षेत काय येते?

संगणक-मोबाइल-मेल करताना मराठी टंक (फाँट) कसे सुलभ पध्दतीने वापरता येतील अशी राज्य मराठी विकास संस्थेने (डॉ. नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्ष असताना) 4 वर्षांपूर्वी चर्चा सुरू केली. विभागवार बैठका घेतल्या. त्यातून काय निष्पन्न झाले ते तेच जाणोत. पण काही दिवसांतच सीईडीटी या संस्थेच्या तरुण अभियंता मुलांनी 'स्वरचक्र' या नावाने सुंदर असे मराठी फाँटचे ऍप विकसित केले. सर्व मोबाइल धारकांना हे वापरासाठी आंतरजालावर (नेटवर) मोफत उपलब्ध करून दिले. लाखो लोकांनी हे आपल्या मोबाइलवर उतरवून घेतले आणि आता मोठया प्रमाणात वापरले जात आहे. आणि इकडे राज्य मराठी विकास संस्था बैठकाच घेत बसली आहे.

महामंडळाची हीच परिस्थिती होऊन बसली आहे. साहित्य संमेलनाला पर्याय म्हणून मोठया प्रमाणावर 'लिटरेचर फेस्टिवल'चे आयोजन करण्यात येत आहे. छोटया मोठया प्रमाणात साहित्यविषयक ार्यक्रमांचे आयोजन अभिनव पध्दतीने केले जात आहे. त्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंग्लिशमध्ये होणारे 'लिट फेस्ट' आता मराठी साहित्यासाठीही भरत आहेत. रटाळ कार्यक्रमांना फाटा देऊन आकर्षक स्वरूपात चटपटीत मुलाखती, अभिवाचन, स्टँड-अप कॉमेडी या विविध रूपांनी नवीन साहित्य मुलांना आकर्षून घेते आहे.

नवीन चित्रपट, लघुपट, नाटके, मंचीय सादरीकरण या सगळयांतून लेखकांना एक महत्त्वाचे स्थान दिले जात आहे. कवितांचा वापर प्रभावीपणे केला जातो आहे. ललित गद्याचे उतारे मंचावर सादर करताना विविध प्रयोग केले जात आहेत. मुलाखतींपेक्षाही वेगळया अशा वाङ्मयीन अनौपचारिक गप्पा रसिकांना मोहवीत आहेत.

गंभीर लिखाणावरही चर्चा मोठया हिरिरीने समाज माध्यमांवर (सोशन मीडियावर) केल्या जातात. यातील बहुतांश चर्चा उथळ असतात, त्यांना आपण बाजूला ठेवू. पण किमान 20 टक्के चर्चा अतिशय गांभीर्याने केल्या जाताना आढळतात. चांगल्या पुस्तकांचे संदर्भ दिले जातात. त्यातील वैचारिक मांडणीवरून खंडन मंडन होताना दिसते. काही व्हॉट्स ऍप ग्रूप महामंडळापेक्षाही गांभीर्याने साहित्यावर चर्चा करतात, कार्यक्रमांचे नियोजन करतात.

या सगळयात एक रसरशीतपणा भरून राहिला आहे. नवीन चित्रपटांवर मोठया प्रमाणात गांभीर्याने लिहिले जात आहे. समाज माध्यमांवर भाषेचा वापर फार मोठया प्रमाणावर होताना दिसतो आहे. जो वर्ग कधी लिहू शकेल याचा विचारही आपण केला नव्हता, असा मोठा वाचकवर्ग आपले मत धाडसाने मांडताना दिसतो आहे. आणि हे सगळे उत्साहाने भरलेले वातावरण सभोवताली असताना साहित्य महामंडळ काहीतरी जुनकट पांघरून कुबट वास मारत अंधाऱ्या कोपऱ्यात पडून असलेले दिसून येत आहे.

संगणकाचा वापर प्रचंड प्रमाणात होत असताना, हातातील मोबाइल संगणकात बदलून जात असताना कुणीतरी जुन्या टायपिंग मशीनवर बसून खडल खट खडल खट टाइप करत बसावे, तसे महामंडळाचे झाले आहे. दोन्ही हाताचे अंगठे वापरत तरुणाई पटापट लिहीत चाललेली असताना हे महामंडळ जुन्या अर्थाने अंगठेबहाद्दर बनून गेलेले आढळते आहे.

खरे तर महामंडळ, त्याच्या घटक संस्था, त्यांचे आजीव सभासद, त्यांचे क्षुद्र राजकारण, साहित्य संमेलन, रटाळ परिसंवाद, पुस्तक प्रकाशनांचे कृत्रिम कार्यक्रम, जुन्या पध्दतीची नीरस कविसंमेलने, अगम्य विषयांवरील भरताड भाषणे हे सगळेच नवीन लेखक-वाचक पिढीने मोडीत काढून टाकले आहे.

उर्दू भाषेवरचा 'सुखन'सारखा अनोखा प्रयोग नवीन मुले प्रचंड ताकदीने करत आहेत. दोन हजार वर्षांपूर्वीच्या हाल सातवाहनाच्या 'गाहा सत्तसई'सारख्या अभिजात वाङ्मयावर जोशपूर्ण मंचीय सादरीकरण होत आहे, महानोरांच्या पंचाहत्तरीत त्यांच्या 'अजिंठा' या खंडकाव्याला मंचावर गीत नृत्य अभिवाचनाद्वारे रंगवले जात आहे, प्रकाश नारायण संतांच्या कथा अभिवाचनातून सामान्य रसिकांच्या काळजाला थेट भिडवल्या जात आहेत, कालिदासाचे 'मेघदूत' अशा अभिनव पध्दतीने सादर होत आहे की तरुण कालिदासची पुस्तके शोधत आहेत, शेक्सपिअर प्रचंड मेहनतीने मंचावर अवतरत आहे,  असे कितीतरी नवीन आयाम साहित्याला मिळत चालले आहेत.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना साहित्य संस्थांनी कधीच जवळ केले नाही. मंचीय सादरीकरणाची पुण्यात जी 'फिरोदिया करंडक' स्पर्धा होते, त्यात हीच अभियांत्रिकीची मुले अभिजात वाङ्मयातील मंटो, गालिब, फैज यांच्या रचनांचा उत्तम वापर करून नवनवे प्रयोग करतात, अक्षर सुलेखनाचा (कॅलिग्राफीचा) देखणा आविष्कार मंचावरून घडवितात आणि या सगळयांच्या बाबतीत महामंडळ व त्याच्या घटक संस्था अनभिज्ञ आहेत.

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा निवडला जावा? संमेलन कसे असावे? घटक संस्थांनी काय काम करावे? यावर चर्चा करत बसण्यात काहीही अर्थ नाही. नवीन पिढीने हे मोडीत काढले आहेच. आता अधिकृतरित्या शासनाने यांचा निधी बंद करून यांना कडक समज दिली पाहिजे. या संस्थांची समाजाला गरज असेल, तर समाजाने आपल्या जिवावर त्या पोसल्या पाहिजेत.

एकेकाळी तमाशासारखी कला लोकांनी आपल्या जिवावर पोसून वाढविलेली याच महाराष्ट्राने अनुभवली आहे. कीर्तनाला आजही लोकाश्रय आहे. पंढरीची वारी आजही लोकांच्या आशीर्वादाने, आश्रयाने यशस्वी झालेली दिसते. शासकीय अनुदानाचा डोस घेणारे कुपोषित आहेत, पण तेच लोकांचा पाठिंबा असलेले स्टँड अप कॉमेडी शो बाळसे धरताना दिसत आहेत.

चेतन भगतवर कुणी कितीही टीका करो, पण त्याने मोठया प्रमाणात तरुणांना वाचनाकडे खेचून घेतले, हे मान्य करावे लागेल. देवदत्त पट्टनायकच्या पौराणिक कथांच्या पुस्तकांवर वाचकांच्या उडया पडल्या आहेत. त्याच्या पुस्तकांना साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान देण्याची गरज पडली नाही.

नवीन पिढीला साहित्याबाबत प्रचंड आस्था आहे. पण या पिढीसाठी हे पाणी आमच्याच ओंजळीतून गेले पाहिजे हा हट्ट महामंडळासारख्या संस्थांनी सोडून दिला पाहिजे. उलट ज्या खळाळत्या नदीकाठावर रसिक या साहित्यरसाचा आस्वाद घेत आहेत, तेथे चार-दोन बरे घाट बांधून काही पुण्य करता येत असेल, तर ते काम महामंडळाने करावे. अन्यथा हा सगळा उद्योग संपूर्णत: बंदच करून टाकण्याच्या लायकीचा उरला आहे.  

 जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575