गीत गोपाल - गदिमांची आठवण रसाळ

विवेक मराठी    24-Sep-2018
Total Views |

 

गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुप्रसिध्द गायक पं. विश्वनाथ दाशरथे आणि श्रध्दा जोशी यांनी या जन्माष्टमीला औरंगाबादला 'गीत गोपाल'वर एक सुंदर कार्यक्रम सादर केला. लक्ष्मीकांत धोंड यांनी याची आखणी केली होती. त्यानिमित्त 'गीत गोपाल'च्या आठवणी परत जागविल्या गेल्या. एकीकडे गाणे आणि दुसरीकडे कॅनव्हासवर रंगांची उधळण अशी जुगलबंदी रसिकांना अनुभवायला येत होती.

  गदिमांची जन्मशताब्दी चालू आहे. त्यांच्या आठवणींत महाराष्ट्रभर कार्यक्रम होत आहेत. पण गदिमांच्या एका रचनेची मात्र फारशी आठवण काढली जात नाही, ती म्हणजे कृष्णकथेची गदिमांनी केलेली रसाळ मांडणी - 'गीत गोपाल'. 'गीत रामायणा'ला प्रचंड लोकप्रियता लाभली, तशी 'गीत गोपाल'ला लाभली नाही.

गदिमांनी कृष्णकथेची 35 गीते लिहिली. यातील 17 गाण्यांना सी. रामचंद्र यांनी मधुर स्वरसाज चढवला. ही गीते 1967मध्ये पहिल्यांदा पुस्तकरूपात प्रसिध्द झाली. लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांनी आपल्या 'केसरी प्रकाशना'च्या वतीने हे प्रसिध्द केले. अनंत सालकरांनी त्याची सुंदर अशी सजावट केली आहे.

सुप्रसिध्द गायक पं. विश्वनाथ दाशरथे आणि श्रध्दा जोशी यांनी या जन्माष्टमीला औरंगाबादला 'गीत गोपाल'वर एक सुंदर कार्यक्रम सादर केला. लक्ष्मीकांत धोंड यांनी याची आखणी केली होती. त्यानिमित्त 'गीत गोपाल'च्या आठवणी परत जागविल्या गेल्या.

कृष्ण गोकुळ सोडून गेल्यावर राधिका एकाकी झाली आहे. कदंबतळी बसून ती आसवे ढाळत कृष्णाची आठवण काढत आहे. या प्रसंगावर गदिमांनी लिहिलेले गीत होते -

शरच्चंद्रिका मूक हुंकर देते

वनी राधिका गीतगोपाल गाते

जगा विस्मरे गोपिका कृष्णवेडी

स्मृतींनी सख्याचें चरिच्चित्र काढी

सुगंधापरी वाहती भावगीतें

स्वत: सी. रामचंद्र यांनीच हे गीत गायले आहे. गदिमांनी जे लिहिले, तसेच 'सुगंधापरी वाहती भावगीतें' अशी ही सगळी मधुर गीते आहेत.

कृष्ण गोकुळात वाढत असताना 'दिवस मास चालले, बाळकृष्ण वाढतो। समय-पुरुष भूवरी, स्वर्ग-चित्र काढतो।' अशा शब्दांत गदिमांनी वर्णन केले आहे. या गाण्याला सी. रामचंद्र यांनी गुजराती लोकसंगीतातील गरब्याची सुरावट योजली आहे.

'आई तू गोरी, बाबा गोरे, मी गोरा, मग हा कृष्णच का काळा?' असा एक बालीश प्रश्न छोटया बलरामाला पडतो. आणि गदिमांनी यावर एक अतिशय गोड गाणे लिहिले. 'दूद नको पाज्यूं हलीला, काल्या कपिलेचे। काला या मनती आई ग पोल गुलाख्याचे'। काळया कपिलेचे दूध प्यायल्याने हा काळा झाला, असा निरागस गोड तर्क गीतांतून मांडला आहे. याला चालही  बालगीताची सुंदर लावली आहे. राणी वर्मा यांच्या आवाजात हे गाणे आहे.

औरंगाबादला हा कार्यक्रम चालू असताना चित्रकार सरदार जाधव हे चित्र रेखाटत होते. प्रत्यक्ष मंचावर सर्व प्रेक्षकांच्या साक्षीने कोऱ्या कॅनव्हासवर रंगांची उधळण चालू होती. हळूहळू चित्र आकार घेत होते. आधी त्यांनी पिवळा रंग कडेकडेने फासून घेतला. मधल्या मोकळया जागेला हळूहळू कृष्णाचा आकार येत गेला.

'प्रलय घन दाटले, चहुदिशी अंबरी। जलनिधी पालथे होति जणु भूवरी' असे घनगंभीर आवाजातील गीत विश्वनाथ दाशरथे यांनी सुरू केले आणि सरदार यांनी कॅनव्हासवर वरच्या बाजूला निळे-काळे पावसाळी रंग ब्रशने पसरवायला सुरुवात केली. त्याचे काही ओघळ अपसूकच खाली आले आणि त्यातून कोसळणाऱ्या पावसाची एक सुंदर अशी आकृती तयार झाली.

एकीकडे गाणे आणि दुसरीकडे कॅनव्हासवर रंगांची उधळण अशी जुगलबंदी रसिकांना अनुभवायला येत होती.

'सर्पफणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही, अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही' हे गाणे गदिमांनी प्रासादिकपणे लिहिले. हे गाणे स्वत: सी. रामचंद्र यांनीच गायले आहे. हे गाणे चालू असताना सरदार जाधव यांनी चित्राच्या मधल्या मोकळया जागेच्या तळाशी यमुनेचा प्रवाह आणि त्यात सर्पफणी अशी योजना ब्रशच्या फटकाऱ्यात केली. आणि जेव्हा गाणे संपत आले, तेव्हा ब्रशच्या एका फटकाऱ्यात त्यावर नाचणारी कृष्णाची आकृती प्रकट झाली.

'गीत गोपाल'मध्ये कोजागिरीच्या चांदण्यावर एक अप्रतिम गीत आहे. 'शरदामधल्या संध्याकाळी, शांती नांदे उभ्या गोकुळी। निळया नभाच्या भाळावरती, पूर्ण चंद्र साजतो। पावा वनिं वाजतो ॥' हे गाणे श्रध्दा जोशीच्या सुरेल आवाजात सादर झाले. हे गाणे चालू असताना चित्रकार सरदार यांनी कृष्णाच्या हृदयस्थानी थोडे खाली निळसर रंगांच्या छटा काढल्या आणि अचानक ब्रश खाली ठेवला आणि रंगांच्या त्या ओघळांमधून अंगठयाच्या साहाय्याने चंद्राची कोर रेखली. व्हिन्सेंट व्हॅन गॉग याच्याबद्दल अशी दंतकथा सांगितली जाते की 'गव्हाच्या शेतावरील कावळे' या चित्राच्या प्रसंगी शेतात उघडयावर तो चित्र रेखाटत असताना आभाळ दाटून आले. व्हॅन गॉगने त्वरित ब्रश टाकून दिला आणि  पेस्ट तशाच कॅनव्हासवर पिळून बोटांनी त्या रंगाला आकार दिले. सरदार यांनी बोटाच्या आधाराने चंद्रकोर रेखली, तेव्हा रसिकांना ही आठवण आली असावी आणि गाण्याला दाद द्यावी तशी त्या चंद्रकोरीलाही दाद मिळाली.

'गीत गोपाल'मधील शेवटचे गीत म्हणजे एक प्रकारे भैरवीच आहे. राधा खिन्न एकटी बसलेली आहे आणि तिला सगळे आठवत आहे अशी सुरुवात आहे. मग हीच राधिका अशी अपेक्षा व्यक्त करते आहे की

'माझ्यासाठी तरी एकदा। गोकुळी येऊन जाई मुकुंदा॥ या गाण्यामध्ये गदिमांनी एक आर्त कडवे असे काही लिहिले आहे की कुणाच्या डोळयात अश्रू दाटून यावे.

पाजिलेंस तू अमृत पार्था

एक अश्रू दे मजला आर्ता

एकवार दे दृढालिंगना

तीच घटी मज ठरो मोक्षदा॥

गदिमांच्या या रसाळ रचनेची आठवण औरंगाबादकरांनी  गोपाळकाल्याच्या दिवशी जागविली. या गाण्यांवर कथ्थक शैलीतील नृत्यही सादर झाले. कथ्थक नृत्यांगना प्रीती विखरणकर आणि त्यांच्या शिष्यांनी चार गाण्यांवर नृत्य सादर केले. 'सर्पफणीवर कृष्ण नाचला' या गाण्यात गोपी यमुना तटावरती खेळ खेळत आहेत असा एक प्रसंग आहे. त्यांच्या हातात चेंडू त्या उडवतात आणि झेल घेतात. रसिकांसमोर नृत्य करताना बासरीच्या सुरावर ही झेलाझेली अतिशय अप्रतिम अशी सादर केली गेली. 'काजळ कसले रंग रात्रीचा नेत्री मी भरते। भेटते स्वप्नी श्रीहरीते॥ या गाण्यावरचे नृत्यही सुंदर होते. यातील गोपीची भावना कथ्थक मुद्रांमधून नजाकतीने पेश झाली. 

गदिमांची आठवण जागविताना सी. रामचंद्र यांच्या सांगीतिक प्रतिभेचाही अनुभव रसिकांना येत होता. शब्द-सूर यांची तर जुगलबंदी होतीच, त्याचबरोबर नृत्याच्या रूपाने घुंगरांचीही जुगलबंदी पाहायला मिळाली.

शेवटच्या गाण्यात श्रध्दा जोशी हिचा आर्त सूर लागला होता आणि तेव्हाच चित्रकार सरदार जाधव यांनी चित्राच्या खालच्या बाजूला जिथे पौर्णिमेच्या निळया नभाचे ओघळ कृष्णाच्या हृदयापासूनच जणू येत आहेत असे भासणारे, त्यांच्या छायेत विरहदग्ध राधा रंगवायला सुरवात केली. भैरवी संपली, तेव्हा राधेचेही चित्र पूर्ण झाले होते.

दोन तासांच्या कार्यक्रमात कोऱ्या कॅनव्हासवर बघता बघता 'गीत गोपाल'चे रंग उमटले होते. त्यात यमुनातटीच्या गायी होत्या, गोवर्धन पर्वत होता, रास खेळणाऱ्या गोपी होत्या, दही घुसळण्याठी डेरा होता, प्रेमाची भाषाच असलेली राधा होती आणि सगळयाच्या मध्ये अलवारपणे कृष्णाची आकृती उमटून आली होती. (हे चित्र सोबत जोडले आहे.)

या चित्राचा शेवटी लिलाव केला गेला व कार्यक्रमाची सर्व रक्कम केरळ पूरग्रस्त निधीसाठी देण्यात आली.

कार्यक्रमाचा हासुध्दा एक वेगळाच पैलू नावाजला गेला पाहिजे. 'ए मेरे वतन के लोगो' हा कार्यक्रम युध्दनिधीसाठी मदत म्हणून सादर झाला होता, अशी आठवण नेहमी सांगितली जाते.  भारतात कलाकार आपली सामाजिक बांधिलकी नेहमीच जपत आले आहेत. केरळच्या पूरग्रस्त निधीसाठी गायक, वादक, चित्रकार, नृत्यांगना, नट हे एकत्र येतात आणि एक अप्रतिम स्वर-नृत्य-चित्र आविष्कार सादर करतात, हे विशेष.

आकाशवाणी कलाकार लक्ष्मीकांत धोंड यांनी काही कविता वाचून दाखवल्या. त्यातील शब्दकळेचे सौंदर्य त्यांच्या प्रभावी वाचनाने रसिकांच्या मनात जोमदारपणे ठसले.

कृष्णाची गाणी आणि बासरी नाही असे होऊच शकत नाही. 'पावा वनी वाजतो'सारखे गाणे तर केवळ बासरीचेच. तरुण बासरीवादक गिरीश काळे यांनी आपल्या दमदार फुंकरीने कृष्णाचाच आभास जणू सभागृहात उत्पन्न केला. बासरी हे अगदी आद्य असे वाद्य समजले जाते. लक्ष्मीकांत तांबोळी यांची एक रचना निवेदन करताना सांगितली गेली. राधा असे म्हणते आहे कृष्णाला -

ओढाळ गुरू हाकाया। मी दिली तुला जी काठी

तू केला त्याचा पावा। या तुझ्या राधिकेसाठी

या ओळी खरेच अप्रतिम आहेत. एक साधी काठी, पण कृष्णाने त्याची बासरी बनवली आणि जगाला कलेची अप्रतिम अशी देणगी मिळाली. राधेला उत्तर देताना कृष्ण असे सांगतो आहे -

तू गीत दिले मज बाई। मी केली त्याची गीता

कान्हाच होऊनी काना। गीतेत अडकला आता।

गीत आणि गीता यातील सूक्ष्म फरक कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी अतिशय नेमका असा आपल्या शब्दांत मांडला आहे.

या कार्यक्रमाच्या रूपाने औरंगाबादकर रसिकांना एक अतिशय कलासमृध्द असा अनुभव मिळाला.

एकीकडे समाजात असहिष्णुतेचे वातावरण आहे असे आपण म्हणतो. पण दुसरीकडे दहीहंडीचा आरडाओरडा बाजूला ठेवून कुणी सुरेल अशी संगीतसाधना करतो आहे, कुणी त्या सुरांवर आपल्या कोऱ्या कॅनव्हासवर रंग भरतो आहे, कुणी त्याला बासरीचा अप्रतिम सूर देऊन स्वर्गीय संगीताचा भास निर्माण करतो आहे... कवी आपल्या शब्दांनी रसिकांना बांधून ठेवत आहेत आणि रसिक त्याला भरभरून दाद देत आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी उदार अंत:करणाने देणग्या दिल्या. केरळ पूरग्रस्तांसाठी ही सगळी मदत करण्यात आली. हे सगळे फारच महत्त्वाचे आणि सकारात्मक असे आहे.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575