शंभरीच्या उंबरठयावर अंबडचा दत्त जयंती संगीत महोत्सव

विवेक मराठी    01-Jan-2019
Total Views |

 

जालना जिल्ह्यातील अंबड हे गाव केवळ मत्स्योदरी देवीच्या नावानेच ओळखले जाते असे नसून हे एक प्रागैतिहासिक स्थळ आहे. भारतातील जांबुवंताचे एकमेव मंदिर, जवळच जामखेडला खडकेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, प्रत्यक्ष अंबड नगरीत देवीच्या मंदिराबरोबरच जेजुरीची प्रतिकृती असलेले खंडोबाचे अप्रतिम असे मंदिर, पुष्करणी बारव आणि त्या बारवेतील महादेव मंदिर अशा ऐतिहासिक पौराणिक स्थळांनी नटलेले हे गाव. जांबुवंताच्या मंदिरात नारदाचे गायन गर्वहरण झाल्याचा पुराणात उल्लेख आहे. अहिल्याबाईंनी या शहरातील मंदिरांचा जीर्णोध्दार केला. त्यांच्या या महान कार्याची आठवण ठेवून मत्स्योदरी देवीच्या पायऱ्यांजवळ अहिल्याबाईंचा पुतळा उभारला गेला आहे.

या परिसरातील पुरातन अशा खडकेश्वर महादेव मंदिरात वाद्य वाजविणाऱ्या, गायन-नर्तन करणाऱ्या सुंदरींचे शिल्प आहे. त्यावरून या परिसरात संगीताची परंपरा आढळते.

95 वर्षांपूर्वी अंबडजवळ भणंग जळगाव येथे त्र्यंबक नारायण कुलकर्णी यांना त्यांच्या गुरूंनी दत्त जयंतीनिमित्त संगीत सेवा सुरू करण्याचा आदेश दिला. त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्र्यं.ना. कुलकर्णी यांनी हे कार्य सुरू केले. त्र्यंबकरावांच्या पोटी गायनाचार्य गोविंदराव जळगावकर यांचा जन्म झाला. त्यांच्या लहानपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. हैदराबादचे प्रसिध्द गायक वासुदेव नामपल्लीकर यांच्याकडून गोविंदरावांना आग्रा घराण्याच्या गाण्याचा वारसा मिळाला. गोविंदरावांनी पुढे अंबड शहरात वास्तव्यास आल्यावर अंबडला दत्त जयंती संगीत महोत्सव सुरू केला. तेव्हापासून ते आजतागायत अंबड शहरात ही गायन चळवळ अखंडपणे चालू आहे.

चार वर्षांपूर्वी अंबड नगरपालिकेने पं. गोविंदराव जळगावकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य असे सभागृह उभारले आहे. त्यांचा सुंदर असा अर्धाकृती पुतळा सभागृहाच्या दर्शनी भागात उभारण्यात आला आहे. एखाद्या गायकाच्या नावाने ग्रामीण भागात भव्य सभागृह असणे आणि संगीत महोत्सवातून अखंडपणे त्याची आठवण जतन केली जाणे हे दुर्मीळ उदाहरण आहे. आजघडीला अंबडइतकी जुनी परंपरा असलेला संगीत महोत्सव दुसरा नाही. मोठया शहरांमधून आता नव्याने भव्य असे संगीत सोहळे आयोजित केले जात आहेत. त्या सोहळयांमध्ये भरपूर झगमगाट पाहायला मिळतो. अशा महोत्सवांना प्रसिध्दीही भरपूर मिळते. कलाकारांची सोय उत्तमरीत्या केली जाते.

अंबडसारख्या गावात दत्त जयंती संगीत महोत्सवाची स्थिती मात्र वेगळी आहे. हा शुध्द शास्त्रीय संगीताचाच महोत्सव आहे. इथे फ्यूजनच्या नावाखाली चाललेली भेसळ सहन केली जात नाही. रात्रभर उशिरापर्यंत श्रोते शास्त्रीय संगीत ऐकत बसतात हा अतिशय दुर्मीळ अनुभव असल्याचे इथे आलेले गायक नेहमीच सांगतात. आयोजनात साधेपणा आणि अगत्य आढळून येते.

दत्त जयंती संगीत महोत्सव गोविंदराव जळगावकरांच्या पश्चात त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आला आहे. 1998मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक कार्यकर्ते, मराठवाडयातील कलाप्रेमी रसिक आणि कलाकार यांच्या सहकार्याने गेली वीस वर्षे सातत्याने ही चळवळ चालविलेली आहे.

या वर्षी 22, 23 डिसेंबरला हा संगीत महोत्सव झाला. निरंजन भालेराव या तरुण बासरी वादकाने महोत्सवाची सुरुवात केली. यमननंतर त्याने सादर केलेल्या पहाडी धूनला रसिकांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली. तरुण कलाकारांना हे व्यासपीठ त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभ आशीर्वाद वाटत आले आहे. चिकित्सक रसिकांची नेमकी दाद पाहून कलाकारही आनंदित होत होते. पं. गिरीश गोसावी यांना तंतुवाद्यांवर जास्त करून साद होणारा किरवाणी सादर करण्याची ऊर्मी या चिकित्सक रसिकांमुळेच मिळाली. पिकलेले रसाळ फळ असावे असा गिरीश गोसावींचा किरवाणी वाटत होता.

या मंचावर लोकप्रिय रागांबरोबरच अनवट राग सादर झाले आणि त्याला रसिकांनी दाद दिली, हे महत्त्वाचे. पं. राजेंद्र कंदलगावर यांनी सदाबहार दरबारी कानडा रंगवल्यानंतर पं. हेमंत पेंडसे यांनी धनकोनी कल्याणसारखा अनवट राग मुद्दाम निवडला. मराठवाडयाचे महान गायक पं. सी.आर. व्यास यांनी या रागाची रचना केली आहे आणि हा राग याच मराठवाडयाच्या भूमीत सादर झाला, याचे समाधान पं. हेमंत पेंडसे यांनी व्यक्त केले.

या संगीत महोत्सवासाठी पं. विश्वनाथ दाशरथे यांच्यासारखा गायक कला सादर करतो, यापेक्षाही संगीत संयोजनाची जबाबदारी स्वीकारतो, आपल्या आठ-दहा तरुण शिष्यांना घेऊन तिथे दोन दिवस मुक्काम ठोकून राहतो, या निमित्ताने अंबड शहरात संगीत शिक्षणाचा उपक्रम सुरू करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. शांतिभूषण चारठाणकरसारखा हार्मोनियम वादक संगीतकार हा महोत्सव म्हणजे आपल्या घरचेच कार्य असल्यासारखे समजून नियोजनात सहभागी होतो, ही वृत्ती महत्त्वाची आहे.

स्व. गोविंदराव यांनी गोळा केलेली वाद्ये आजही त्यांच्या घरात आहेत. या जुन्या दुर्मीळ वाद्यांसाठी अंबड शहरात एक चांगले संग्रहालय करण्याची गरज आहे. संगीत महोत्सवानिमित्त शहरात दोन दिवस मुक्काम होता, तेव्हा आम्हाला असे आढळले की या ठिकाणी अतिशय पोषक असे वातावरण आहे. एक चांगले संग्रहालय होऊ शकते. पं. गोविंदराव जळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पं. विश्वनाथ दाशरथे यांनी संगीत विद्यालय सुरू केले आहे.

शहरात आज तरुण पिढी शास्त्रीय संगीताकडे फिरकत नाही अशी तक्रार केली जाते. अशा स्थिती असताना अंबडसारख्या ठिकाणी शास्त्रीय संगीतासाठी जमा झालेल्या गर्दीत अर्ध्यापेक्षा जास्त संख्या तरुणांची असते, हे चित्र खूप आशादायक आहे. याच तरुणांचा प्रतिनिधी म्हणून निरंजन भालेराव (बासरी), शाश्वती चव्हाण (गायन) या कलाकारांनी महोत्सवात आपली कला सादर केली. पं. गिरीश गोसावी, पं. हेमंत पेंडसे यांच्यासारखे ज्येष्ठ अनवट वेगळे राग सादर करून या तरुणांसमोर एक आदर्श उदाहरण घालून देत होते. संगीत क्षेत्रासाठी हे चित्र ऊर्जा देणारे आहे.

गोविंदराव जळगावकरांच्या घराण्यात त्यांचे चिरंजीव धनंजय जळगावकर हे उत्तम तबला वादक आहेत. या महोत्सवात गोविंदरावांच्या घरी परंपरागत कीर्तनही सादर झाले. अगदी काल्याचे कीर्तन झाल्यानंतरच मुख्य संगीत महोत्सवाला सभागृहात सुरुवात झाली. परंपरा आणि नवता यांचा मेळ अतिशय चांगल्या पध्दतीने घातला गेला. या महोत्सवाचे समन्वय करणारे महेश वाघमारेंसारखे कार्यकर्ते प्रत्येक गावात तयार झाले पाहिजेत.

आज सगळी चळवळ ही शहरकेंद्री बनलेली आहे. पण शहरी वातावरण कलेला फारसे पोषक नाही. केवळ व्यवहारिक पातळीवर तेथे प्रायोजक मिळतात, आर्थिक उलाढाल मोठी होते, आकाशवाणी-दूरदर्शनसारखी माध्यमे असतात, धनिक रसिक तेथे आहेत म्हणून शास्त्रीय संगीत शहरात फोफावलेले आहे असे भासते. प्रत्यक्षात छोटया गावांमधून कलाकार अपरिहार्यपणे शहरात स्थलांतर करतो. त्याच्या व्यावहारिक अडचणींसाठी त्याला शहरात राहावे लागते. अन्यथा कलाकार म्हणून त्याला समाधान देणाऱ्या मैफलींचे आयोजन शहरात क्वचितच होते. अगदी मोठया महोत्सवात तर रसिकांचा चेहराही कलाकाराला दिसू शकत नाही अशी व्यवस्था केलेली असते. अशा झगमगाटात शास्त्रीय संगीताचा जीव घुसमटतो. हे संगीत अतिशय वेगळे आहे. याला 'रॉक' पध्दतीचे आयोजन सोसत नाही. याची हाताळणी करण्यासाठी आयोजकांनी वेगळी दृष्टी बाळगायला हवी.

महाराष्ट्रात अंबडसारखी किमान 50 छोटी गावे अशी आहेत, जिथे या शास्त्रीय संगीताचा चांगला प्रसार होऊ शकतो. अंबडबरोबरच आता सेलू येथे ज्येष्ठ गायक संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत सोहळा होत आहे. अशा पध्दतीने महाराष्ट्रातील छोटी गावे निवडून तिथे संगीत महोत्सव भरविण्याचे काम सुरू झाले, तर ती एक मोठी संगीत चळवळ ठरेल. मराठवाडयात सेलू, किनवट, वसमत, माजलगाव, उमरगा, अंबाजोगाई, उदगीर येथे असे संगीत महोत्सव नियमित स्वरूपात होऊ शकतात. मराठवाडयातील आणि बाहेरही अशी स्थळे निवडून प्रयत्न करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रभर छोटया छोटया गावांमध्ये संगीत परंपरा रुजलेल्या आहेत. मंदिरांमध्ये कीर्तनाच्या निमित्ताने या परंपरा जतन केल्या जातात. आजही मंदिरांमध्ये पखवाज वाजवणारे हमखास आढळतात. पुजाऱ्यांचे गळे चांगले असतात. एकादशी, दत्त जयंती, शिवरात्र, गुरुवारची पंचपदी, हरिनाम सप्ताह या निमित्ताने गायन परंपरा पुढे जात आहे, हे आपण फारसे लक्षात घेत नाहीत. खरे तर याची जाणीव ठेवून संगीत चळवळीत काम करणाऱ्यांनी असे विखुरलेले बिंदू जोडून भव्य अशी रांगोळी तयार केली पाहिजे.

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद