***आनंद फाटक****
अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्र हे नोबेल क्षेत्र मानून सेवा देणारे डॉक्टर फारच कमी दिसतात. कोणत्याही भौतिक लाभाच्या किंवा प्रसिध्दीच्या मोहात न पडता आपले आयुष्य वैद्यकीय सेवेसाठी खर्च करणारे डॉ. संजीव वेळंबे हे अशांपैकीच एक. नाशिक, मालेगाव, नामपूर, डांग अशा परिसरात ते कार्यरत होते. डॉ. बेळंबे यांची प्राथमिक आरोग्य केंद्रे नाशिक जिल्ह्यात कायम पहिल्या पाचमध्ये राहिली. 1987 ते 2007 या काळात त्यांनी 16000 कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या. या सर्व कठीण प्रवासात रेखावहिनी सर्वार्थांनी त्यांच्या सोबत राहिल्या.
अनेक सरकारी विभाग हे कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे, कामाच्या व्यापकतेमुळे व अगडबंब आकारामुळे प्रसिध्द असतात. सार्वजनिक आरोग्य हा विभाग त्यातीलच एक. दुर्दैवाने अनेकदा या खात्याविषयी काही विशिष्ट संकटांमुळे जशी टीका होते, तशी या खात्यात छान काम करणाऱ्यांचे कौतुक फारसे होताना दिसत नाही. दृष्ट लागेल असे काम करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी जवळपास सर्व जिल्ह्यांत, तालुक्यांत काही प्रमाणात असतातच. यातील एकाचा हा परिचय.
बारावीला खूप छान गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक पटकावून औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. ते साल होते 1979. (त्या काळी CET किंवा NEET नसे.) घर लातूरला. तीन भाऊ व सर्वात लहान बहीण, हा मधला भाऊ. वडील वकील, पण त्यांनी शेतीच सांभाळली. त्या काळी ते जनसंघाचे काम करत. कनिष्ठ मध्यमवर्गीय घर. एम.बी.बी.एस.च्या द्वितीय वर्षात काश्मीर सहल ठरली पूर्ण वर्गाची. वडलांच्या खूप मागे लागून त्या काळी पूर्ण सहलीचा खर्च म्हणून लागणारी रक्कम त्याने हट्टाने मागून घेतली. वडिलांनी थोडे उशिरा का होईना, पण पैसे पाठवले. सहल छान झाली.
वर्षे पुढे सरकली. एम.बी.बी.एस. पूर्ण झाले. हवे होते ते पुढचे शिक्षण घेणे शक्य नाही असे लक्षात आले. हेही समजले पुढे कधीतरी कळले की वडिलांनी सहलीसाठी पाठवलेले पैसे खूप कष्टपूर्वक व कदाचित उसनवार करून पाठवले होते.
निश्चय झाला. सार्वजनिक आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करण्याचा.
पण जायचे कुठे? कोणत्या जिल्ह्यात?
वडील लातूर जिल्ह्यात जनसंघाचे जुने कार्यकर्ते म्हणून प्रसिध्द होते. त्यामुळे लातूर जिल्हा नको असे ठरवले. सहज वडील बोलता बोलता म्हणाले की ''नाशिक जिल्ह्यात जा, तेथे वातावरण थंड व छान असते.''
- आणि डॉ. संजीव बलवंतराव बेळंबे आवश्यक त्या दोन बॅगा भरून नाशिकला निघाला.
काही जाणते अनुभवी डॉक्टर्स, 'रुग्ण हे आपले गुरू असतात' असे नवख्या डॉक्टरांना उगाच सांगत नाहीत.
नाशिकला सार्वजनिक आरोग्य खात्यात नोकरीसाठी अर्ज केला व लगेच सांगून टाकले की मला नाशिक जिल्ह्यात कुठेही पाठवा. वरिष्ठांनी जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले एक प्राथमिक आरोग्य केंद्र देऊ केले, तर ते याने नाकारले. खरे तर सख्खे काका मुंबईला सार्वजनिक आरोग्य खात्यात अत्यंत वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांच्या मदतीने हवे ते सोयीचे ठिकाण मिळवणे सहज शक्य होते. पण लहानपणापासून घरी येणाऱ्या, निवास करणाऱ्या अनेक संघ प्रचारकांच्या सहवासामुळे असे करणे योग्य वाटले नाही. त्यामुळे कधीही स्वत:होऊन या नात्याचा फायदा घेतला नाही.
शेवटी मालेगाव तालुक्यातील सोनज प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉ. संजीव बेळंबे रुजू झाले. ती तारीख होती 13 जुलै 1985. दवाखान्याला स्वतंत्र इमारत नव्हती.
दवाखाना ग्राामपंचायत ऑफिसमध्येच चाले. रुग्णांना भरती करणे शक्य नव्हते. जागाच नव्हती. पहिले 3 दिवस रात्री तेथेच मुक्काम करावा लागला. चौथ्या दिवशी गावात एक खोली मिळाली राहण्यासाठी. या सव्वादोन वर्षांत उघडयावरच शौचाला जावे लागे. सकाळी व संध्याकाळी ग्राामपंचायतीत रुग्ण तपासले जात. घरी जाऊन खूप रुग्ण तपासावे लागत. पहिला पगार हाती पडला, ती रक्कम होती 2134 रुपये. स्वयंपाक येत नसल्याने गावातच लोक प्रेमाने जेवू घालत. अशा प्रेमाच्या व्यवहारात पैसा कुठे येत नसतो.
3 नोव्हेंबर 1987ला मालेगाव तालुक्यातीलच दाभाडी येथे बदली झाली. येथे छान मोठे बांधलेले प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) होते. येथे असतानाच डॉ. संजीव यांनी स्त्रियांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याची सुरुवात केली. आधी त्याचे पुरेसे प्रशिक्षण घेतले. आता जणू त्यांच्या कर्तृत्वाला बहर येऊ लागला. रोजची ओपीडी साधारण 150 रुग्ण, महिन्याला 50-60 बाळंतपणे व महिन्याला 70-80 कुटुंबनियोजन महिला शस्त्रक्रिया होऊ लागल्या. याचा पुढचा टप्पा महत्त्वाचा होता.
प्रश्न योग्य होता व तो अचूक जागी जाऊन रुतला. डॉ. संजीव बेळंबे यांनी नामपूरच्या इतिहासात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेबल प्रॅक्टिस बंद केली. येथे मोठया संख्येने सर्पदंशाचे व विषबाधेचे रुग्ण येत.
प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करताना काही अडचणीही येत. कागद, वीज, औषधे कमी असत. पुरवलेल्या पैशांतून तेवढा खर्च भागत नसे. विशेषत: भरपूर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही अडचण जाणवतेच. याला पर्याय म्हणून नामपूर आरोग्य केंद्रात एक दानपेटी ठेवण्यात आली. गावातील आरोग्य समितीच्या सदस्यांनी सह्या करून ती बंद (सील) करण्यात आली. दर 3-4 महिन्यांनी ती उघडून पैसे मोजून आवश्यक तो खर्च करणे सुरू झाले. दवाखाना छान झाला. दवाखान्यात प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांना याच दानपेटीतील पैशातून टीव्हीसुध्दा बघता येऊ लागला.
1996मध्ये स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई गाठली. 8 महिने काम केल्यानंतर कामाचा ताण, वाढते वय याचा विचार करून परत नाशिक जिल्ह्यात यायचे ठरवले.
1997 ते 2003 हा काळ सटाणा तालुक्यातीलच डांग सौदाणे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेला. हा सगळा दुर्गम आदिवासी भाग. येथे सर्पदंशाचे खूप रुग्ण बघावे लागले. अनेकांना जीवदान देता आले. मळगाव, भवाडे, पिसोरे या अत्यंत दुर्गम गावांना पायी चालत जाऊन भेट देणारे ते पहिलेच वैद्यकीय अधिकारी. सकाळी घरून पोहे, बिस्किटे घेऊनच बाहेर पडावे लागे. बरोबर सर्व कर्मचारी एकत्र हेच खात.
त्यांच्या आयुष्यात अविस्मरणीय काय वाटते?
सरकारी नोकरीत राहूनही ग्राामीण आदिवासी लोकांची सेवा करण्याची संधी मिळू शकते. सरकारी योजना उत्तम असतात, त्यांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी डॉक्टर्सनी सेनापतीप्रमाणे लढले पाहिजे. निराश होऊ नये. माता बालआरोग्याचे काम उत्साहवर्धक आहे. लसीकरण छान सुरू आहे. कुटुंबनियोजन साधने व्यवस्थित उपलब्ध आहेत.
अत्यंत साधा, निगर्वी, वस्तुस्थिती नीट समजून घेऊन सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या, तरीही ठरवलेल्या तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या अशा माणसाला भेटणे म्हणजे मोठा आनंदच आहे!