अल्पेश ठाकोरांनी सोडला  काँग्रेसचा ‘हात’

विवेक मराठी    22-Apr-2019
Total Views |
 काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. अल्पेश हे गुजरातमधील ओ.बी.सी. गटाचे नेते समजले जातात. सत्ता जिंकायची असेल तर ठाकोर क्षत्रिय सेनेची जी काही मागणी आहे, ती विचारात घेऊन काँग्रेसने वागायला हवे होते. त्यांच्या उमेदवाराला काही जागा सोडायला हव्या होत्या. प्रसंगी पडते घेऊन आपले राजकीय चातुर्य दाखवायला हवे होते. पण हे काहीच झाले नाही.

गुजरातमधील काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांनी आपल्या दोन सहकारी आमदारांसह (धवलसिंग ठाकोर, भरतजी ठाकोर) काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला एक धक्का बसणारी ही बातमी बहुतांश माध्यमांनी दाबून टाकली आहे. त्याचे तसे एक कारणही आहे. अल्पेश ठाकोरसारख्यांना माध्यमांनीच मोठे केले होते. त्यामुळे आपली चूक ते कशाला जाहीरपणे मांडत बसतील?

मुळात अल्पेश काही काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत. पण मोदींच्या अंधविरोधासाठी गुजरात विधानसभा निवडणुकीत माध्यमांनी ज्याला जमेल त्याला हाताशी धरत विरोधी प्रचाराची राळ उडवून दिली होती. गुजरातमधून तीन वेगळे चेहरे तेव्हा माध्यमांच्या हाती लागले. त्यात दलित चळवळीतून पुढे आलेला जिग्नेश मेवाणी, पाटीदार आंदोलनातील हार्दिक पटेल आणि गुजरात ठाकोर क्षत्रिय सेनेचे अल्पेश ठाकोर हे प्रमुख होते. यातील कोणीच मूळचा काँग्रेसी नाही. पण केवळ भाजपाविरोध या एका सूत्रात सगळ्यांना बांधून भाजपाचा पराभव घडवून आणण्याचा माध्यमांचा हेतू होता. 

भाजपाविरोधाच्या या दबावात अल्पेश ठाकोरांच्या गुजरात ठाकोर क्षत्रिय सेना या संघटनेने काँग्रेसशी आघाडी केली. काँग्रेसच्या चिन्हावर त्यांच्या संघटनेचे तीन आमदार निवडूनही आले. आता स्वाभाविक यांची अपेक्षा होती की त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्याची दखल घेतली जावी. पण काँग्रेस मुळातच एक ढिसाळ अशी संघटना आहे. सत्तेच्या स्वार्थाने ते जोडून ठेवले गेलेले दिसत होते. पण आता सत्ताही नाही. त्यामुळे माणसे जोडून ठेवणे जमेना. खरा संघर्ष तेव्हा सुरू झाला, जेव्हा काँग्रेसने पाटीदार आंदोलनाशी जवळीक सुरू केली. हे आंदोलन पटेलांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून पेटले. ही मागणीच मुळात अल्पेश ठाकोर यांच्या ओ.बी.सी. हिताच्या विरोधी आहे. कारण पटेलांना आरक्षण देण्यासाठी ओ.बी.सी.मध्ये त्यांचा समावेश करावा लागणार. आणि तसे केले, तर जे आधीपासून या प्रवर्गात मोडतात, त्यांच्यावर अन्याय होणार. आधीच जागा थोड्या. त्यात पटेलांसारखी तगडी जात यात आली, तर आपला निभाव लागणार नाही अशी एक भावना इतर मागासवर्गीयांमध्ये निर्माण झाली.

हा केवळ गुजरातचाच प्रश्‍न नाही. सर्वत्र जिथे जिथे शेती करणार्‍या गावगाड्यांतील प्रमुख जाती आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्या, तिथे तिथे त्या जाती आणि ओ.बी.सी. यांच्यात एक सुप्त संघर्ष आहे. उदा., महाराष्ट्रात मराठा वि. कुणबी, मराठा वि. माळी असा एक संघर्ष आहे. 

भाजपाला विरोध करताना असले परस्परविरोधी घटक एकत्र आणून माध्यमे एक मोट बांधू पाहत होते. राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस त्याचा फायदा घेऊ इच्छित होती. आणि त्यांनी तो तसा घेतलाही. पण हे फार काळ टिकणारे नव्हते.
लोकसभेचा बिगुल वाजायला सुरुवात झाली, तेव्हा ठाकोर क्षत्रिय सेनेने आपल्या उमेदवाराला लोकसभेत तिकीट मिळावे अशी मागणी केली होती. पण ती काही काँग्रेसने स्वीकारली नाही. तेव्हा या संघटनेच्या कार्यकारिणीत काँग्रेसला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस स्वत: अल्पेश ठाकोर हजर नव्हते. त्यांना 24 तासांच्या आत काँग्रेस सोडा अन्यथा संघटना सोडा असे ‘अल्टिमेटम’ देण्यात आले. त्याला प्रतिसाद देत अल्पेश ठाकोर यांनी दोन आमदार सहकार्‍यांसह काँग्रेसचा राजीनामा देणे पसंत केले.

एक राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस किंवा भाजपा यांची धोरणे काय आणि कशी आहेत, हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. पण माध्यमांनी गेले काही दिवस ‘महागठबंधन’ची पतंगबाजी सुरू केली होती. त्याच्या अशा रोज चिंधड्या उडत आहेत, ही गंभीर विचार करण्यासारखी एक मोठी गोष्ट आहे.

ज्या पद्धतीने गुजरात विधानसभेत अल्पेश-जिग्नेश-हार्दिक यांना भाजपाविरोधी म्हणून मिरविले गेले, त्यांचा वापर करून घेतला गेला, ते आज लोकसभेच्या वेळी कुठे आहेत? माध्यमांतली ही पुरोगामी मंडळी त्याचा पाठपुरावा का करत नाहीत? हार्दिक पटेल यांच्यावर गुन्हा असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली गेली आहे. जिग्नेश मेवाणी पार बिहारात जाऊन कन्हैय्या कुमारसाठी बेगुसरायमध्ये सभा घेत आहे, पण गुजरातमध्ये फिरायला आणि काँग्रेसचा प्रचार करायला तयार नाहीत. आणि अल्पेश यांनी तर काँग्रेसच सोडली आहे.

‘महगठबंधन’ची पतंगबाजी आणखी एका उदाहरणात दिसून आली. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत गोरखपूर या योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात भाजपाचा पराभव करून समाजवादी पक्षाचा उमेदवार जिंकला होता. त्याचे नाव होते प्रवीण निषाद. हा काही मूळचा समाजवादी पक्षाचा उमेदवार नव्हता. त्याला या निवडणुकीपुरते उसने घेण्यात आले होते. पाठोपाठ इतरही मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला की लगेच महागठबंधनच्या पतंगबाजीस सुरवात झाली होती. आता नेमके लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रवीण निषाद यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडून भाजपात प्रवेश केला आहे आणि तो आता तिथून निवडणूक लढवत आहे. 
अल्पेश ठाकोर भाजपात जातील का, हे अजून स्पष्ट नाही. ते तसे जाणार नाहीत असे आपण गृहीत धरू. पण मूळ प्रश्‍न तसाच राहतो की या सगळ्यांना भाजपाविरोधी आघाडीत सामील करून घेत असताना भक्कम अशा एखाद्या पक्ष संघटनेने सांभाळून का नाही घेतले? भाजपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-नितीशकुमारांचा जनता दल-अकाली दल यांच्याशी जुळवून घेत प्रसंगी पडते घेत, जिंकलेल्या काही जागा सोडत तडजोड करतो आहे. तामिळनाडूत नवीन समीकरणे जुळविली जात आहेत. ईशान्य भारतात तर अतिशय नव्याने सगळी जुळवाजुळव केली आहे. अरुणाचल प्रदेशमधून एक खासदार बिनविरोध निवडून आणण्यात भाजपाला यश मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रमुख विरोधी पक्ष असलेला, गेल्या लोकसभेत 19 टक्के मते मिळविणारा काँग्रेस पक्ष कसा वागत आहे? महाराष्ट्राचा अपवाद वगळता आख्ख्या भारतभर कुठेही काँग्रेसने आपल्या सहकारी पक्षांशी समाधानकारकरीत्या जुळवून घेतलेले नाही. दिल्लीतील आम आदमी पक्षाची तर अशी अवस्था आहे की काँगे्रसने त्यांना इतके झुलविले आहे की आता प्रत्यक्ष अर्ज भरायची शेवटची तारीख निघून गेली, तरी आघाडी झाली की नाही हे सांगता येणार नाही. आता आघाडी निकालानंतरच करू, असे म्हणायची पाळी आली आहे.

अल्पेश ठाकोर यांच्या उदाहरणावरून एक स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत विरोधकांना हरविण्यासाठी राजकीय तडजोडी केल्या जातात. पण विजय मिळविल्यानंतर तो पचविण्यासाठी आणखी जास्त मेहनत करावी लागते. सत्ता जिंकायची असेल तर ठाकोर क्षत्रिय सेनेची जी काही मागणी आहे ती विचारात घेऊन काँग्रेसने वागायला हवे होते. त्यांच्या उमेदवाराला काही जागा सोडायला हव्या होत्या. प्रसंगी पडते घेऊन आपले राजकीय चातुर्य दाखवायला हवे होते. पण हे काहीच झाले नाही.

आता राजकीय अभ्यासक, पुरोगामी पत्रकार, विचारवंत यांनी उत्तर द्यायला हवे. एक तटस्थ विश्लेषक म्हणून तुम्ही भाजप-शहा-मोदी-संघाला विरोध करता. पण त्याचबरोबर या विरोधासाठी म्हणून काँग्रेसचे दोष काय म्हणून झाकून ठेवता? त्यांच्याकडे तटस्थपणे पाहून का नाही विश्लेषण केले जात?

अल्पेश ठाकोर-हार्दिक पटेल यांच्यातील विरोधाचे मुद्दे पत्रकारांना माहीत नव्हते का? कन्हैय्या कुमार आणि काँग्रेस यांच्यातील विरोध, कन्हैय्या आणि दलित संघटना यांच्यातील ताणतणाव पत्रकारांनी का नाही समजून घेतला?

ज्या पद्धतीने 1977 साली काँग्रेसला विरोध करत विविध पक्ष एकत्र आले होते, पण ते सगळे आपसांत एक नव्हते, 1989ला जनता दलाला पाठिंबा देणारे सगळे एकजिनसी एक विचाराचे नव्हते, याच पद्धतीने आता भाजपाविरोधी म्हणून जे कुणी आहेत, ते सगळे एकत्र असतील असे का गृहीत धरले जात आहे?

तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भाजपा-काँग्रेसविरोधी स्वतंत्र तिसरी आघाडी अशी एक व्यवहार्य संकल्पना मांडली होती. पण डाव्यांनाच काँग्रेसप्रेमाचा उमाळा आला होता. ‘आप’लाही काँग्रेसशिवाय करमत नव्हते. महाराष्ट्रात शरद पवारांना एक चांगली संधी चालून आली होती. त्यांनी ज्या मुद्द्यावर काँग्रेस सोडली व मुख्यमंत्रिपद मिळविले, तीच काँग्रेसविरोधाची दिशा पकडत या तिसर्‍या आघाडीला बळ देता आले असते. शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, बिजू पटनायक, जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, एम.के. स्टॅलिन, मायावती, अखिलेश अशी एक भक्कम तिसरी आघाडी उभी राहिली असती. प्रत्येकाचे प्रभावक्षेत्र वेगवेगळे असल्याने मतभेदाचा मुद्दाच नव्हता. आणि पुढे पंतप्रधानपद ज्याच्या त्याच्या संख्येने ठरले असते. पण काँग्रेसला सोबत घेण्याचा एक दबाव माध्यमांनी विचित्र पद्धतीने यांच्यावर टाकला. पुरोगामी विचारवंत काँग्रेसचे भाट असल्यासारखे भाजपाची भीती दाखवीत यांना काँग्रेसच्या कळपात खेचत राहिले. परिणामी भाजपाविरोधी कुठलीच भक्कम आघाडी उभी राहू शकली नाही. 1971च्या निवडणुकांत ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी आपसांत लढून इंदिरा गांधींना विजय सहज करून दिला होता, तशीच ही स्थिती आहे. सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून मोदींची वाट सोपी करून दिली आहे.

आज अल्पेश ठाकोरसारखी उदाहरणे समोर येत आहेत. निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षांमध्ये आणखी फाटाफूट दिसून येईल.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद