स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव

विवेक मराठी    18-May-2019
Total Views |

सावरकर अभ्यासक अक्षय जोग ह्यांचे 'स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव' हे सावरकरांवरील सर्व आरोपांचे साधार, पुराव्यासह खंडन करणारे पुस्तक 28 मे 2019 रोजी मृत्यंजय प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. ह्या पुस्तकातील संक्षिप्त भाग.

सावरकर इंग्राजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले! नुसती क्षमा मागून नाही, तर मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे अशी सपशेल शरणागती पत्करू न सुटले व ह्याचे पुरावे नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' उपलब्ध आहेत... अशा प्रकारे सावरकरांवर सदैव आरोप केला जातो. (पाहा - Krishnan Dubey, Venkitesh Ramakrishnan, Far from heroism - The tale of 'Veer Savarkar, 7 Apr. 1996, Frontline.)

ज्या व्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचले आहे, त्यांना ह्या आरोपातील फोलपणा त्वरीत लक्षात येईल. प्रथम सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या तुरुंगात खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. कारागृहात राहून या आमच्या मातृभूमीची जी सेवा करता येत आहे, त्याहून काहीतरी अधिक प्रत्यक्ष सेवा करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे, तर समाजहिताचे दृष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे. (सावरकर, वि.दा., माझी जन्मठेप, पृष्ठ 362) व तसेच अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्रघातकी मात्र होणारी होती. (जन्मठेप, पृष्ठ 298) अशी त्यांची मनोभूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक-देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत.

तसेच हे केवळ सावरकरांचे मत नव्हते, तर त्यांचा आंग्ल-मित्र डेव्हिड गार्नेटचेही हेच मत होते. सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागारात जीवन कंठित असलेली मी सहनच करू शकत नाही. (Garnett, David, In the first volume of his autobiography, The Golden Echo, Harcourt, Brace and Company, New York, 1954)

सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी होते. अफजलखान वधाआधी, सिद्दी जोहरच्या वेढयाच्या वेळी त्यांनी अशीच शत्रूला बेसावध करणारी पत्रे पाठवली होती, तसेच पुरंदरच्या तहाच्या वेळी महाराजांनीही वेळप्रसंगी औरंगजेबापुढे शरणागती पत्करल्याचा असाच देखावा केला होता, त्याच्या अटी मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त होताच ह्याचा सूड घेतला. हा राजकीय कूटनीतीचा एक भाग असतो.

पहिले महायुध्द 1914मध्ये सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले, ते पत्र मुळातूनच वाचावे, मी त्याचा मुख्य आशय उद्धृत करतो - हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता (Colonial-Self Government) द्यावी, वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत व त्या बदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुध्दात साहाय्य देतील अशा मागण्या केल्या होत्या व 'युरोपात बहुतेक राष्ट्रे आपआपले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश 'राजद्रोही' बंदीही सुटले होते' अशी उदाहरणेही दिली होती. तसेच सरकारने मला न सोडता अंदमानतल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अडकून पडलेल्या राजबंदीवानांस तत्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल, अशी निःस्वार्थी मागणीही केली होती. म्हणजे सावरकरांची आवेदनपत्रे-मागण्या क्रांतिकारकांच्या वतीने होत्या, केवळ स्वतःकरिता नव्हत्या. (जन्मठेप, पृष्ठ 219-220.)

सावरकरांना ह्याची जाणीव होती की काही झाले तरी ब्रिटिश आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत व राजकारणात भाग घेऊ देणार नाहीत, म्हणून मग 'कारागारीय अन्वेक्षेक मंडळा' पुढे त्यांनी अशी भूमिका मांडली - राजकारण करू देत नसाल, तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरे मी ते वचन मोडले तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल. तसेच राज्यपालांशी झालेल्या सुटकेसंदर्भातील चर्चेतही त्यांनी ह्याचे सूतोवाच केले होते. काही अवधीपर्यंत राजकारणात - प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही. परंतु बाहेर राजकारणव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाड्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती, युध्द चालू आहेतो प्रत्यक्ष रणात उतरू नये, 'धरीना मी शस्त्रा कदनसमयीं या निजकरी' अशी यदुकुलवीराप्रमाणेच प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर (on Parole) सोडण्यात येतच असतात आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसंन्यास तेवढा करावा लागला, तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानीत नाहीत, तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात. (जन्मठेप, पृष्ठ 162.) ह्यानुसार सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त समाजसुधारणा, शुध्दी, विज्ञाननिष्ठता, भाषाशुध्दी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड राष्ट्रसेवा केली.

जे जे राजबंदीवान अंदमानातून सुटले, त्यातील बहुतंशी जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. उदा. मी यावर पुन्हा कधीही - किंवा अमुक वर्षे - राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिध्द झाला तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन! (जन्मठेप, पृष्ठ 309.)

सावरकरांचे जे पत्र 'क्षमापत्र' म्हणून दाखवतात ते पाहण्यासाठी नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जायची आवश्यकता नाही. 'अंदमानच्या अंधेरीतून' ह्या पुस्तकात 'पत्र 8वे - दिनांक 6-7-1920' शीर्षकाखाली ते पत्र छापलेले आहे. (इंग्राजांना पाठविलेल्या आवेदनाचा मूळ दिनांक 2-4-1920). हा पाहा त्यातील मुख्य गाभा -

हिंदुस्थानातील वरिष्ठ कार्यकारी मंत्रीमंडळाच्या सभासदासारख्या प्रतिष्ठित अधिकाऱ्यांनी मला आणि इतरांना पुढील प्रश्न पुष्कळदा टाकला होता - तुम्ही पूर्वीच्या हिंदी राज्याच्या विरुध्द उठावणी केली असती तर तुमची स्थिती काय असती? ते विद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवीत! त्याला माझ्याकडून उत्तरही मिळाले होते. हिंदुस्थानातच काय, जगाच्या कोणत्याही देशात - प्रत्यक्ष इंग्लंडमध्येसुध्दा - विद्रोह्यांना कधी कधी असली भयंकर शिक्षा भोगण्याचे दैवी येई. पण मग इंग्रज लोकांनी युध्दाच्या वेळी जर्मन लोक आमच्या बंद्यांना वाईट रितीने वागवतात आणि त्यांना रोटी आणि लोणी देत नाहीत अशा कोल्हेकुईने जगाच्या कानठळया का बसवाव्या? एक काळ असा होता की ज्या वेळी कारागृहातील बंद्यांची जिवंतपणी कातडी सोलीत आणि त्यांना मोलॉक, ठॉर किंवा असल्याच युरोपातील युध्ददेवतांना बळी देत असत, अशी आठवण दिली. खरी गोष्ट अशी आहे की ही जी जगाच्या संस्कृतीत मनुष्यप्राण्याने सुधारणा घडवली आहे, ती सर्व राष्ट्रांतील मनुष्याचे प्रयत्नांचे संकलित फळ आहे आणि म्हणून तिच्यावर सर्व मनुष्यजातीचा वारसा आहे व तिचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. त्या रानटी युगाच्या तुलनेनेच म्हणावयाचे तर माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे; आणि मनुष्यभक्षक जाती आपल्या बंद्यांना जी शिक्षा देत किंवा चौकशीचे जे नाटक करीत, त्यापेक्षा या सरकारची अधिक चांगली पध्दती आहे या प्रशस्तिपत्राने सरकारचे समाधान होत असेल तर त्याला माझी ना नाही. पण त्या वेळीच हेही विसरता कामा नये की, पूर्वीच्या काळात राजे विद्रोह्यांना जसे जिवंत सोलीत, त्याचप्रमाणे विद्रोहीही त्यांची भाग्यतारा जोरात आल्यावर या राज्यकर्त्यांना जिवंत जाळीत! आणि इंग्राजी जनतेने मला किंवा इतर विद्रोह्यांना अधिक न्यायाने म्हणजे थोडया रानटीपणाने वागवले असेल तर त्यांनाही आश्वस्त असावे की परिस्थितीची उलटापालट होऊन हिंदी क्रांतिकारकांची तशी पाळी आली, तर त्यांच्याकडून त्यांनाही असेच अत्यंत दयेच्या रितीने वागविण्यात येईल!  

सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते, पण ब्रिटिश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना 'दोन ओळींमधील' (between the lines) वाचता आले पाहिजे. जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात, ते एकतर 'दोन ओळींमधील' वाचण्यास सक्षम नसतात किंवा 'दोन ओळींमधील' वाचण्याची त्यांची तयारीच नसते.

अंदमानच्या कारावासात त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच, त्यांनी तशा अमानुष बंदिवासातही हाती साधी कागद-पेन्सिल नसतानाही कारागृहातील भिंतींवर 5 हजार ओळींचे उत्कट काव्य लिहिले आणि ते सर्व मुखोद्गत केले! संपूर्ण जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण आहे. मनोधैर्य खचल्याचे हे लक्षण म्हणता येईल का?

सावरकरांच्या ह्या अटी, ही आवेदनपत्रे, ह्यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका स्वत: सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाहीत. सावरकरांचे आत्मचरित्र 'माझी जन्मठेप'मध्ये ह्या सर्वाचा सांगोपांग ऊहापोह केलेला आहे. त्यामुळे आम्ही नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जाऊन संशोधन करून पत्र शोधून काढली, अशा फुशारक्या कोणी मारू नयेत.

व्हिएतनामच्या कम्युनिस्ट हो-चि-मिन्हनेसुध्दा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशाच प्रकारचे पत्र व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चँगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडोचायनात स्थापन झालेल्या डाँग-मिन्ह-होई (जी हो-चि-मिन्हच्या 'व्हिएत-मिन्ह'ला शह देण्यासाठी स्थापिली होती) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली. (कानिटकर, वि.ग., व्हिएतनाम - अर्थ आणि अनर्थ, मनोरमा प्रकाशन 1998, पृष्ठ 53.) तसेच रशियाने जेव्हा जर्मनीशी केलेला अनाक्रमणाचा करार संपुष्टात आल्यावर मित्र राष्ट्रांशी हातमिळवणी केली, तेव्हा एका रात्रीत कम्युनिस्टांनी आपली निष्ठा बदलली. म्हणजे कम्युनिस्ट करतील ती राजकीय खेळी व सावरकर करतील तो द्रोह? तात्पर्य हेच की 'झोपलेल्याला उठविता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठविता येत नाही.'

लेखक - अक्षय जोग