कामगार हितैषी

विवेक मराठी    01-Jul-2019
Total Views |

  महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, भारतीय मजदूर संघ यांसारख्या 20 संघटनांची जबाबदारी नि:स्पृह व पितृतुल्य भावनेतून सांभाळत कामगारांचे प्रदीर्घ कालावधीसाठी हित साधण्याची कामगिरी कामगार नेते अण्णासाहेब रामचंद्र देसाई यांनी साधली आहे. 1 जुलै 2019 या दिवशी त्यांच्या वयाला 80 वर्षे पूर्ण होत आहेत. कामगार चळवळीतील त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळेच त्यांचे अनुयायी, कार्यकर्ते व हितचिंतक यांच्यासाठी घेतलेल्या त्यांच्या कार्याचा आढावा.....

 

प्रत्येक राज्याची व देशाची जडणघडण त्या ठि काणच्या कामगारांमुळेच होत असते. कामगारांमुळेच केवळ औद्योगिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक तसेच संबंधित अनेक बाबींचा विकास होत असतो. या कामगारांचे हित जोपासत या चळवळीला बळकटी आणण्यासाठी अनेक नेत्यांनी परिश्रम घेतले. त्यात अण्णासाहेब देसाई यांचेदेखील योगदान मोलाचे आहे. आज या चळवळी इतिहासजमा होण्याची भीती असतानाच आणि बदलत्या कामगार कायद्यांची आव्हाने संघटनांपुढे असतानाही त्या टिकवण्याची आणि पितृतुल्य भावनेतून दोन्ही बाजूंनी अत्यंत जबाबदारीने समन्वय साधून कार्य करण्याची वृत्ती त्यांनी जोपासली आहे आणि त्यातच त्यांच्यातील कामगार नेत्याचे यश दडलेले आहे.

सांगली जिल्ह्यातील शिपूर गावातून मुंबईला आल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला तो आजतागायत. सुमारे 20हून अधिक संघटनांचा ते कारभार पाहत आहेत. एक कार्यकर्ता ते कुशल नेतृत्व असा त्यांचा प्रवास ही त्यांच्या जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची शैली अशा विविध पैलूंचा प्रत्यय त्यातून दिसून येतो.

भारतीय मजदूर संघाशी संलग्न राहिल्यानंतर वेगवेगळया पातळयांवर त्यांचे कार्य सुरू झाले. संघटनकौशल्य स्वभावामुळे साहजिकच त्यांच्याकडे माणसे जोडली जात होती. वेगवेगळया आस्थापनांमध्ये संघटन झपाटयाने वाढत गेले. त्यातून त्यांच्यातील नेतृत्वाला वाव मिळत गेला आणि कामगार चळवळीला त्यांच्या रूपाने एक वेगळे व बलशाली नेतृत्व मिळाले. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड हे त्याचे स्पष्टीकरण आहे. राज्यात सुमारे 33 हजार कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. वीजकायदा, खासगीकरण, घाईगडबडीत विद्युत महामंडळाचे विभाजन करूनही वीज उत्पादनात भर पडली नव्हती. नियोजित प्रकल्प पूर्ण होत नाहीत. सिंगल फेझ पुरवण्याच्या माध्यमातून अप्रत्यक्ष वीज नाकारण्याचा प्रकार अशा कठीण परिस्थितीत वीज कामगारांचे रोजगार वाचवणे, वीजग्राहकांवरील अन्याय दूर करणे तसेच प्रकल्पांनादेखील चालना देण्याची सचोटी अण्णासाहेबांनी अवलंबिली आणि विद्युत क्षेत्राला दिलासा देण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून झाले. सर्वांगीण विचार करून वेगवेगळया घटकांचा मेळ साधून कामगारांचे हित जपण्याचा त्यांचा स्वभाव चळवळीतील नव्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे.

भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, भारतीय टॅक्सी संघ, भारतीय पत्रकार संघ, चित्रपट उद्योग, मुंबई मजदूर संघ, ग्रंथालय कर्मचारी संघ, घरेलू कमगार संघ, सुरक्षारक्षक संघ अशा अनेक संघटनाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. घरेलू व बांधकाम कामगारांच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यास सक्रिय सहभाग राहिला आहे. त्याचबरोबर विद्युत मंडळातील 40 हजाराहून अधिक रोजंदार व तात्पुरत्या स्वरूपाच्या कामगारांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. त्या त्या ठिकाणच्या कामगारांना कुठेही आक्रस्ताळेपणा न करता शांत, संयमी वृत्तीने योग्य न्याय ते मिळवून देत आहेत. त्यामुळेच त्यांच्यासारख्या कामगार नेतृत्वाची आज गरज आहे. वीज कामगार कल्याण निधीच्या माध्यमातून त्यांनी 1300 सदस्यांना सुमारे 1.25 कोटी रुपयांची मदत मिळवून दिली आहे.

वीज उद्योगात अंतर्गत सुधारणा कमिटीचा मार्च 2003मध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून वीज प्रशासन व कामगार संघटना यांच्यामध्ये ऐतिहासिक करार करून घेतला. त्यामुळे वीजगळती कमी झाली, सततचा वीजपुरवठा, चांगली ग्राहक सेवा मिळाल्यामुळे वीज उद्योगाची प्रतिमी चांगली झाली. वीज कामगारांना निवृत्तिवेतन मिळावे यासाठी कमिटी नेमली. त्याचा सभासद म्हणून काम पाहिले. आपल्याच पैशातून वीज कामगारांना सरकारी नोकरीनंतर निवृत्तिवेन मिळावे, असा प्रस्ताव तयार केला.

उल्हासनगर येथील शासकीय मुलांच्या बालगृह समन्वय समितीचे अध्यक्ष, दूरदर्शन व इतर चॅनल्स स्ट्रिंगर न्यूज कॅमेरामन महासंघाचे उपाध्यक्ष, देसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष, हनुमान व्यवस्थापक मंडळाचे सस्थापक, जिजाऊ बाल विकास मंदिराचे संचालक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाचे व केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्डाचे सल्लागार व छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्यादेखील सांभाळत आहेत.

कामगारांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी त्यांनी वेगवेगळया आस्थापनांमध्ये सहकारी पतसंस्थांची निर्मिती करून दिली आहे. कुलाबा जिल्हा वीज उद्योग कर्मचारी पतसंस्था, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी पतसंस्था, एमएसईबी एम्प्लॉइज सहकारी पतसंस्था आदींसाठी ते कार्यरत आहेत. त्याशिवाय अनेक सामाजिक, सांस्कृतिक, सहकार संस्थांशीही त्यांचा संबंध आहे. गेली 45 वर्षांहून अधिक काळ ते कामगारांचे नेतृत्व करत आहेत. वयाच्या 75 वर्षांनंतरही ते अविरत काम करत आहेत. कामगारांच्या हिताच्या अनेक प्रश्नांवर त्यांचे कार्य सुरूच आहे.

त्यांच्यासारख्या सत्शील, तात्त्वि विचारसरणीतून कार्य करणाऱ्या कामगार नेतृत्वाला अभिवादन.

आदित्य शिंदे

9819989536