‘लोकसभा निवडणूक निकालानंतर देशभरात स्मशानशांतता पसरली होती. कोणाचाच या भाजपाच्या विजयावर विश्वास बसत नव्हता,’ अशा आशयाचं एक हास्यास्पद विधान या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. ते ऐकताना अगदी दीडच महिन्यांपूर्वी निवडणूक निकालानंतर देशभर झालेला जल्लोष डोळ्यासमोर येत होता. त्याची आणि या विधानाची काहीच संगती लागत नव्हती. लोक खरोखरच यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असते तर सुपारीच्या सभांना झालेली गर्दी निवडणुकीतही पाठिशी उभी राहिली असती. तिने विजय मिळवून दिला असता. मात्र तसं झालं नाही.
लोकसभेतला दारूण पराभव, काँग्रेसला लागलेली अखेरची घरघर, भाजपाच्या भरतीत राष्ट्रवादीला लागलेली गळती या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी राज ठाकरे नावाच्या आगीशी खेळ खेळायचा घाट घातला आहे. त्यांच्या साथीला अन्य काही असंतुष्ट आहेतच. पण त्यांना फारसं गांभीर्याने घेण्याचं कारण नाही.
अशा आंदोलनांनी राज ठाकरे यांचं वा त्यांच्या पक्षाचं काही नुकसान होणार नाही, कारण नुकसान व्हायला आधी काही मिळवलेलं असावं लागतं. त्यांच्या जमेच्या खात्यात सध्या तरी खडखडाट आहे. ज्याच्याकडे गमवायलाच काही नाही त्याच्या शौर्यावर इतकं भाळून जाऊ नये, याचं भान या जाणकारांनी बाळगायला हवं. पण त्या दोन पक्षांपैकी एक, सध्याच्या निर्नायकी अवस्थेने भांबावलेला आणि दुसरा, पडलेल्या भगदाडामुळे हतोत्साहित. या परिस्थितीचा फायदा उठवत पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी त्यांना वेठीस धरलं आहे.
आतापर्यंत प्रचारसभा विनोदी होत होत्या, पत्रकार परिषदही किती विनोदी होऊ शकते हे या परिषदेवरून कळलं.
काही जण मैदानात उतरण्याआधीच पराभूत मानसिकतेत असतात, त्याचं ही पत्रकार परिषद एक मूर्तिमंत उदाहरण समजता येईल. राज ठाकरे यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या एकाही नेत्याची देहबोली त्यांच्या बोलण्याशी मेळ खात नव्हती. टीकेला धार नाही की बोलण्यात जोश नाही. अशा पत्रकार परिषदा पाहून या राज्यातली सर्वसामान्य जनता यांच्या तथाकथित जनआंदोलनात सहभागी होईल अशी आशा बाळगणं हेच किती हास्यास्पद आहे! या आंदोलनात भाजपा आणि शिवसेनेलाही सामील व्हायचं आवाहन करण्यात आलं. याहून मोठा विनोद कोणता असू शकतो? सुतकी चेहर्याने घेतलेल्या या पत्रकार परिषदेत असे अनेक किस्से घडले.
मुळात आजच्या जागरूक आणि प्रतिसादी जनतेला जनआंदोलन उभारण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने हाक देण्याची गरज नाही. जनआंदोलन उभारलं जातं जेव्हा खरोखरीच बहुसंख्य लोकांची तशी इच्छा असते तेव्हा. ते लोकांमधूनच स्वयंप्रेरणेने उभं राहतं. त्यासाठी सोशल मीडियासारखं प्रभावी आणि बलशाली माध्यम आज लोकांच्या हाती आहे. आणि ते आपल्या हितासाठी कसं वापरावं याची उत्तम जाणही त्यांना आहे. तेव्हा राजकारण्यांच्या या कांगाव्याला फसून आपल्या खेळात जनता सामील होईल या भ्रमात निदान ‘जाणत्यांनी’ तरी राहू नये. ज्याला काही गमवायचंच नाही त्याला या नव्या खेळाचा आनंद जरूर घेऊ द्यावा.
ज्यांना आगामी विधानसभा निवडणुका गांभीर्याने घ्यायच्या असतील, सत्तेवर यायची स्वप्नं असतील त्यांना करता येण्यासारख्या आजही अनेक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपलं राजकारण हे समाजहितासाठी आहे याबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणं. तो तशा प्रकारच्या ठोस कामांमधूनच निर्माण होईल. नुसती सनसनाटी वक्तव्यं करून नाही वा बोलबच्चनगिरी करून नाही, याची जाणीव व्हायला हवी. त्यासाठी लोकांत मिसळून काम करणार्या कार्यकर्त्यांचं मोहोळ पक्षाकडे असायला हवं. आत्ता पक्षात आहेत तेच रामराम करत असतील तर आधी पक्षउभारणीचं काम हाती घ्यायला हवं.
‘लोकसभा निवडणूक निकालानंतर देशभरात स्मशानशांतता पसरली होती. कोणाचाच या भाजपाच्या विजयावर विश्वास बसत नव्हता,’ अशा आशयाचं एक हास्यास्पद विधान या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. ते ऐकताना अगदी दीडच महिन्यांपूर्वी निवडणूक निकालानंतर देशभर झालेला जल्लोष डोळ्यासमोर येत होता. त्याची आणि या विधानाची काहीच संगती लागत नव्हती. लोक खरोखरच यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असते तर सुपारीच्या सभांना झालेली गर्दी निवडणुकीतही पाठिशी उभी राहिली असती. तिने विजय मिळवून दिला असता. मात्र तसं झालं नाही.