भ्रमातून बाहेर येण्याची गरज

विवेक मराठी    02-Aug-2019
Total Views |

लोकसभा निवडणूक निकालानंतर देशभरात स्मशानशांतता पसरली होती. कोणाचाच या भाजपाच्या विजयावर विश्वास बसत नव्हता,’ अशा आशयाचं एक हास्यास्पद विधान या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. ते ऐकताना अगदी दीडच महिन्यांपूर्वी निवडणूक निकालानंतर देशभर झालेला जल्लोष डोळ्यासमोर येत होता. त्याची आणि या विधानाची काहीच संगती लागत नव्हती. लोक खरोखरच यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असते तर सुपारीच्या सभांना झालेली गर्दी निवडणुकीतही पाठिशी उभी राहिली असती. तिने विजय मिळवून दिला असता. मात्र तसं झालं नाही.  

 
मोठा गाजावाजा करत त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. सहजी लोकप्रियता मिळवून देतील असे काही कार्यक्रम, उपक्रमही सुरुवातीच्या काळात केले. जोडीला एकपात्री फटकेबाजीही चालू होतीच. चार घटका मनोरंजन म्हणून लोकं त्यांना ऐकत राहिले, गांभीर्याने मात्र घेतलं नाही. हळूहळू हे सगळं त्यांच्याही लक्षात यायला लागलं. पण परतीचे दोर त्यांनी स्वत:च्या हातानेच कापलेले होते. मग राजकीय पक्ष जरी असला तरी माझ्या पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा त्यांनी बाणेदारपणे केली. आणि स्वत:च्या घरचं काही काम नसल्याने दुसर्यांच्या प्रचारसभांचं घाऊक कंत्राट घेऊ लागले. प्रचारसभा म्हणजे सुपारी सभा असं एक समीकरण यांच्यामुळेच जनमानसात दृढ झालं. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला त्यांचं उल्लेखनीय योगदान ते हेच. सुपारी सभा ही मनोरंजन सभा आहे असं समजून सगळ्या सभांना तुडुंब गर्दी झाली. लोकांनी आपलं मनोरंजन करून घेतलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला दारूण पराभव. त्यांचाही नाईलाज होता. कारण यांच्याकडे निवडणूक लढवायला पात्र उमेदवार नव्हते आणि या दोघांकडे प्रचारसभा घ्यायला हुकुमी वक्ता नव्हता. म्हणून ही युती झाली. पण ती अभद्र युती होती हे लोकसभा निवडणुकांनी स्पष्ट केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी प्रचार सभा घेऊन त्यांना पराजयाच्या अधिकाधिक जवळ जायलाच यांनी मदत केल. दारूण पराभवाची चव चाखायला लावणारी हीलिटमस टेस्टनुकतीच झालेली असतानाही, पुन्हा एकदा त्यांच्याच नेतृत्वाखालीईव्हीएम नको, मतपत्रिकाच हव्यातया पोरकट मागणीसाठी जनआंदोलन उभारण्याची तयारी चालू झाली आहे. इव्हीएमविषयी लोकांच्या मनात शंका आहेत अशी लोणकढी ते देत आहेत. लोकसभेच्या वेळी बहुतेक मतदारांनी आपण दिलं त्याच पक्षाला मत गेल्याची खातरजमा करून घेतली होती. त्याविषयी सातत्याने होणारं प्रबोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं होतं. पूर्ण मतदान प्रक्रियेत कोणताही गोंधळ झाला नाही हा अनुभव सर्वांनी घेतला आहे. तरीही लोकांच्या नावे गोंधळ घालायचा हा आंदोलन नामक कार्यक्रम हाती घेतला जात आहे.


लोकसभेतला
दारूण पराभव, काँग्रेसला लागलेली अखेरची घरघर, भाजपाच्या भरतीत राष्ट्रवादीला लागलेली गळती या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी राज ठाकरे नावाच्या आगीशी खेळ खेळायचा घाट घातला आहे. त्यांच्या साथीला अन्य काही असंतुष्ट आहेतच. पण त्यांना फारसं गांभीर्याने घेण्याचं कारण नाही.

अशा आंदोलनांनी राज ठाकरे यांचं वा त्यांच्या पक्षाचं काही नुकसान होणार नाही, कारण नुकसान व्हायला आधी काही मिळवलेलं असावं लागतं. त्यांच्या जमेच्या खात्यात सध्या तरी खडखडाट आहे. ज्याच्याकडे गमवायलाच काही नाही त्याच्या शौर्यावर इतकं भाळून जाऊ नये, याचं भान या जाणकारांनी बाळगायला हवं. पण त्या दोन पक्षांपैकी एक, सध्याच्या निर्नायकी अवस्थेने भांबावलेला आणि दुसरा, पडलेल्या भगदाडामुळे हतोत्साहित. या परिस्थितीचा फायदा उठवत पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी त्यांना वेठीस धरलं आहे.

आतापर्यंत प्रचारसभा विनोदी होत होत्या, पत्रकार परिषदही किती विनोदी होऊ शकते हे या परिषदेवरून कळलं.

काही जण मैदानात उतरण्याआधीच पराभूत मानसिकतेत असतात, त्याचं ही पत्रकार परिषद एक मूर्तिमंत उदाहरण समजता येईल. राज ठाकरे यांच्यासह मंचावर उपस्थित असलेल्या एकाही नेत्याची देहबोली त्यांच्या बोलण्याशी मेळ खात नव्हती. टीकेला धार नाही की बोलण्यात जोश नाही. अशा पत्रकार परिषदा पाहून या राज्यातली सर्वसामान्य जनता यांच्या तथाकथित जनआंदोलनात सहभागी होईल अशी आशा बाळगणं हेच किती हास्यास्पद आहे! या आंदोलनात भाजपा आणि शिवसेनेलाही सामील व्हायचं आवाहन करण्यात आलं. याहून मोठा विनोद कोणता असू शकतो? सुतकी चेहर्याने घेतलेल्या या पत्रकार परिषदेत असे अनेक किस्से घडले.


मुळात
आजच्या जागरूक आणि प्रतिसादी जनतेला जनआंदोलन उभारण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने हाक देण्याची गरज नाही. जनआंदोलन उभारलं जातं जेव्हा खरोखरीच बहुसंख्य लोकांची तशी इच्छा असते तेव्हा. ते लोकांमधूनच स्वयंप्रेरणेने उभं राहतं. त्यासाठी सोशल मीडियासारखं प्रभावी आणि बलशाली माध्यम आज लोकांच्या हाती आहे. आणि ते आपल्या हितासाठी कसं वापरावं याची उत्तम जाणही त्यांना आहे. तेव्हा राजकारण्यांच्या या कांगाव्याला फसून आपल्या खेळात जनता सामील होईल या भ्रमात निदानजाणत्यांनीतरी राहू नये. ज्याला काही गमवायचंच नाही त्याला या नव्या खेळाचा आनंद जरूर घेऊ द्यावा.

ज्यांना आगामी विधानसभा निवडणुका गांभीर्याने घ्यायच्या असतील, सत्तेवर यायची स्वप्नं असतील त्यांना करता येण्यासारख्या आजही अनेक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपलं राजकारण हे समाजहितासाठी आहे याबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणं. तो तशा प्रकारच्या ठोस कामांमधूनच निर्माण होईल. नुसती सनसनाटी वक्तव्यं करून नाही वा बोलबच्चनगिरी करून नाही, याची जाणीव व्हायला हवी. त्यासाठी लोकांत मिसळून काम करणार्या कार्यकर्त्यांचं मोहोळ पक्षाकडे असायला हवं. आत्ता पक्षात आहेत तेच रामराम करत असतील तर आधी पक्षउभारणीचं काम हाती घ्यायला हवं.


लोकसभा निवडणूक निकालानंतर देशभरात स्मशानशांतता पसरली होती. कोणाचाच या भाजपाच्या विजयावर विश्वास बसत नव्हता,’ अशा आशयाचं एक हास्यास्पद विधान या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. ते ऐकताना अगदी दीडच महिन्यांपूर्वी निवडणूक निकालानंतर देशभर झालेला जल्लोष डोळ्यासमोर येत होता. त्याची आणि या विधानाची काहीच संगती लागत नव्हती. लोक खरोखरच यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असते तर सुपारीच्या सभांना झालेली गर्दी निवडणुकीतही पाठिशी उभी राहिली असती. तिने विजय मिळवून दिला असता. मात्र तसं झालं नाही.

 आता हातात असलेल्या थोडक्या कालावधीत लोकांना आपल्याकडे वळवून घेण्यासारखं, सांगण्यासारखं ठोस नसल्याने अशा गोष्टी सुचताहेत. म्हणूनच पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या बेगडीपणाला ते शरण गेले आहेत. राजकीय आगतिकता ती हीच. त्यामुळे निवडणुकीआधीच त्यांचा निकाल लागून गेला आहे.