प्रियव्रत्त देवदत्त पाटील हा वयाच्या सोळाव्या वर्षी शास्त्र पोषक सभेची 'तेनाली महापरीक्षा' उत्तीर्ण होणारा इतिहासातील प्रथम विद्यार्थी म्हणून तो यशस्वी ठरला. संस्कृतभारतीचे संस्थापक चा.मु. कृष्णशास्त्री यांनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रियव्रतच्या या यशाचे कौतुक केले आहे.
वयाच्या अकराव्या वर्षी नगरच्या वेदांत विद्यापीठात असलेल्या परीक्षा केंद्रातून दोन वर्ष परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर प्रियव्रतने तेनालीच्या संस्थेत प्रवेश मिळवला. तेनालीच्या पाठशाळेत सहा वर्षांत पूर्ण करण्याच्या ह्या चौदा स्तरीय परीक्षा त्याने केवळ दोन वर्षांत पूर्ण केल्या. दिवसभरात 17-18 तास अभ्यास करून त्याने अतिशय परिश्रमपूर्वक या परीक्षांचा अभ्यास केला. महापरीक्षा देण्याच्या आधी आहार, विहार, व्यवहार या सगळया गोष्टींवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवत त्याने या परीक्षेची तयारी केली आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण होणारा इतिहासातील प्रथम विद्यार्थी म्हणून तो यशस्वी झाला. आता आगामी काळात व्याकरणाचा महाभाष्य नावाचा एक मोठा ग्रांथ, त्यात असलेल्या 81 प्रकरणांची एक महापरीक्षा असते, जी अजूनपर्यंत कुणीही दिलेली नाही, तिचा अभ्यास प्रियव्रतने सुरू केला आहे. त्याने औपचारिक शिक्षणाची आठवीची परीक्षा दिली आहे, आगामी वर्षात तो दहावीची परीक्षा देईल.
दरम्यान सुमारे 2015पर्यंत पुण्यात राहून अध्यापन करीत असताना देवदत्तगुरुजींनी पुन्हा आपल्या पितृगृही स्थायिक होऊन गुरुकुलम पध्दतीने पाठशाळा सुरू करायचा निर्णय घेतला. गोव्यातल्या थोडया दुर्गम अशा रिवण या छोटयाशा गावात हेमंत प्रभुदेसाई यांनी आपलं एक मोठं दोन मजली घर पाठशाळेसाठी दान म्हणून दिलं आणि तिथे ही पाठशाळा सुरू झाली.
श्रीसुब्रमण्य वाङ्मय ट्रस्टच्या अंतर्गत या श्री विद्या पाठशाळेत सध्या 39 विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासी पध्दतीने शिकतात. हे सर्व विद्यार्थी भारतातल्या सात-आठ विविध प्रांतांतून आलेले आहेत. देवदत्तगुरुजींनी आपल्या गुरूंना दिलेल्या वचनाप्रमाणे कुठल्याही विद्यार्थ्याकडून कुठलेही शुल्क घेतले जात नाही. कुठल्याही जातीपातीचे बंधन नाही. संपूर्ण पाठशाळेत 30 विद्यार्थी आणि 9 विद्यार्थिनी आहेत. एका शास्त्राचा संपूर्ण पाठयक्रम साधारण सहा वर्षांचा असतो. वयाच्या साधारण बारा ते तेराव्या वर्षी प्रवेश दिला जातो. विद्यार्थिनींची निवास आणि भोजन व्यवस्था सोडली तर बाकी सर्व कार्यक्रम सगळयांबरोबर आणि सगळयांना समान असेच असतात. विद्यार्थी आपलं रोजचं भोजन स्वतः बनवतात. परिसरातली सर्व कामं स्वतः करतात आणि दिवसभरातला अधिकाधिक वेळ ज्ञानार्जनात घालवतात. रिवण ह्या अतिशय निसर्गरम्य परंतु आडवाटेला असलेल्या गावात एका डोंगरावर ही पाठशाळा आहे.
काही दानशूर संस्थांच्या आणि व्यक्तींच्या साहाय्यावर पाठशाळेचा सर्व योगक्षेम चालतो. मात्र कुठल्याही अटी अथवा शर्तीविनाच हे दान स्वीकारले जाते. पाठशाळेत प्रमुख भाषा संस्कृतच आहे. सगळे दैनंदिन व्यवहार, पाठ, शिक्षण हे सगळं संस्कृतमध्येच चालतात. महिन्यातून दोनदा येणाऱ्या प्रतिपदांना पाठशाळेला सुटी असते. एरवी रोज पहाटे पाच वाजता उठून आपली दिनचर्या पार पडणाऱ्या विद्यार्थ्यांना या दिवशी कुठलंही बंधन नसतं. उशिरापर्यंत उठून नदीवर पोहायला जातात, मैदानात मनसोक्त क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी असे खेळ खेळतात. पाठशाळेच्या गुरुपत्नी अपर्णाताई प्रियव्रतप्रमाणेच या सगळया मुलांची काळजी घेतात. या पाठशाळेत देवदत्तगुरुजींबरोबर अध्यापन करणारे मोहनशास्त्री आणि अन्य शिक्षक स्वतः काही विषयांचे विद्यार्थी म्हणून शिक्षणही घेतात आणि काही विषयांचं अध्यापनही करतात. येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून गुरुजींची एकच अपेक्षा असते, ती म्हणजे येथून बाहेर पडल्यानंतर त्यांनीदेखील अशाच प्रकारे निःस्वार्थीपणे विद्यादानाचं कार्य सुरू ठेवावं. आजपर्यंत या गुरुकुलातून बाहेर पडलेल्या सर्व 19 विद्यार्थ्यांनी हे व्रत अखंडितपणे सुरू ठेवलं आहे.
परवा मोदींनी चांद्रयानाच्या अवतरणाच्या वेळी उल्लेखलेल्या, ''आम्ही सारे अमृताचे पुत्र आहोत आणि आम्ही ज्ञान-विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात असेच देदीप्यमान यश संपादित करू'' हा विश्वास प्रियव्रतसारख्या तरुणांमुळे सार्थ होताना दिसतोय. संस्कृतभारतीचे संस्थापक चा.मु. कृष्णशास्त्री यांनी आणि भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी प्रियव्रतच्या या यशाच्या केलेल्या कौतुकामुळे संस्कृतीच्या संवाहक असलेल्या या पाठशाळा भविष्यात अधिक प्रकाशात येतील आणि जनाधारामुळे हे कार्य अविरत सुरू राहील, हे निश्चित..
अभिजीत खेडकर
9420602780