'जत'च्या सर्वांगीण प्रगतीसाठी

विवेक मराठी    23-Sep-2019
Total Views |

प्रकाश जमदाडे हे जत तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गेली 25 वर्षे अविरत कार्यरत असणारे एक तळमळीचे कार्यकर्ते आहेत. तालुक्याच्या समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे. त्यांच्याकडे तालुक्याच्या विकासकामांचा लेखाजोखा तयार आहे.



महाराष्ट्राच्या विधानसभेत अनुक्रमांकाने अखेरचा म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे सांगली जिल्ह्यातील जत. पश्चिम महाराष्ट्र हा खरे तर राष्ट्रवादी काँग्रोसचा बालेकिल्ला. मात्र गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाने या विभागात चांगला जम बसविला आहे. या परिवर्तनात जी काही मोजकी मंडळी सुरुवातीपासूनच कार्यरत आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्रकाश विठोबा जमदाडे. आधी शासकीय नोकरी, त्यानंतर समाजकार्य आणि आता त्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात यशाची एकेक पायरी ते चढत आहेत.

1986 ते 2001 या काळात त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जत विभागात स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक म्हणून नोकरी केली. या पदावर कार्यरत असताना त्यांनी तालुक्यातील अनेक नळपाणी योजना मार्गी लावल्या. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ते सार्वजनिक क्षेत्रात पूर्णवेळ काम करू लागले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या पुणे विभागाचे सदस्य या नात्याने त्यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केली आहे. पुणे रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून कवठे महाकाळ, जत, गुड्डापूर ते विजापूर तसेच विजापूर-पंढरपूर-उमदी या नव्या रेल्वेमार्गांचा प्रस्ताव त्यांनी रेल्वे बोर्डाकडे दिला. ते आता त्याचा पाठपुरावा करीत आहेत.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून वंचित 65 गावांसाठी सुधारित सिंचन योजना राबवावी, म्हणून खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

म्हणून हवी संधी...

मी गेली 25 वर्षे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, नोकरदार आणि व्यापारी यांची गरज, अपेक्षा यांची मला बऱ्यापैकी जाण आहे. सर्व वर्गांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. मला कोणताही राजकीय वारसा नाही. मात्र राजकीय क्षेत्रात काही पदे भूषविता आली आणि मी नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा उपयोग केला. सांगली कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत असताना अनेक महत्त्वाचे प्रकल्प साकारले. त्यामुळे जत तालुक्याच्या विकासाला गती मिळाली. भविष्यात स्मार्ट सिटी तत्त्वावर जत शहराचा आणि तालुक्याचा विकास करण्याची माझी योजना आहे. जत मार्केट कमिटीचे विभाजन होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. अखेर त्याला यश आले. आम्ही मार्केट कमिटीचे विभाजन होऊ दिले नाही. कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भूषविताना विविध योजना मार्गी लावल्या. त्यामुळे येथील व्यापारी उलाढाल वाढली.

जत हा मूलत: दुष्काळी तालुका. विविध पाणी योजना राबवून येथील दुष्काळावर कशी मात करता येईल, याचा मी सातत्याने विचार केला. काही योजना मार्गी लावल्या. त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले. काही योजना मनात आहेत. विधानसभेत आमदार म्हणून या विभागाचे प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळाली, तर निश्चितच या प्रयत्नांना मोठे बळ मिळू शकेल.

एकीकडे मी राजकारणात सक्रीय असताना पत्नी मंगल जमदाडेही माझ्या पावलावर पाऊल टाकून या क्षेत्रात कार्यरत आहे. फेब्र्रुवारी-2017मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या. त्यांना सभापतिपद भूषविण्याची संधीसुध्दा मिळाली. तालुक्यातील सर्वसामान्यांना या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ झाला. त्याबद्दल आम्हा उभयतांना नेहमीच समाधान वाटत आले आहे. राजकीय जीवनात मिळेल त्या पदाचा वापर करून जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला अधिकाधिक सुविधा देण्याचा निश्चितच प्रयत्न मी आणि माझे सहकारी करणार आहोत. मात्र जर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तर मनातील स्वप्ने लवकर पूर्ण होतील.

प्रकाश जमदाडे


 

सांगली कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये प्रकाश जमदाडे यांचे काम खूप मोलाचे आहे. ते सभापती म्हणून कार्यरत असताना जत येथे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल उभारण्यात आले. अडीच कोटी रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या या भव्य इमारतीमुळे येथील उलाढाल वाढली. तसेच जत मार्केट यार्डात 50 लाख रुपये खर्च करून भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धान्य चाळण यंत्र ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी 50 लाख रुपये खर्च आला. 25 लाख रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीकट्टा उभारण्यात आला. या सुविधांमुळे जत बाजारपेठेचा चेहरामोहराच बदलला. तसेच शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि इतर घटकांना सुविधा उपलब्ध झाल्या. जत शहराच्या वैभवातही त्यामुळे भर पडली.

2010मध्ये शासनाने बेदाण्यावर पाच टक्के व्हॅट रद्द करण्यासाठी लढा उभारला. खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील या लढयाला यश आले. अखेर शासनाने व्हॅट रद्द केला.


कृषिउत्पन्न समितीचे सभापती म्हणून कार्यरत असताना विविध उपक्रम राबवले. त्यामुळे सांगली मार्केट कमिटीचे उत्पन्न पाच कोटी रुपयांवरून साडेबारा कोटी रुपयांपर्यंत वाढले. हळद, डाळिंब, द्राक्ष आदी लागवडींना प्रोत्साहन मिळावे, म्हणून जिल्ह्यात अनेक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. 2011मध्ये हळदीला प्रतिक्विंटल 21 हजार रुपये इतका भाव मिळाला.

जत तालुक्यातील गुड्डापूर येथील साठवण तलावाच्या मंजुरीसाठी तत्कालीन मंत्री जयंत पाटील आणि शासनाकडे पाठपुरावा करून तलाव मंजूर करून घेतला. कंठी, कोसारी, जिरग्याळ, खोजानवाडी, कासलिंगवाडी आणि मुचंडी साठवण तलावांच्या मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न केले.

जत तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रकाश जमदाडे अगदी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहेत. त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जत तालुक्यातील रस्त्यांसाठी आणि वीजपुरवठयासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून रस्त्यांचे जाळे निर्माण झाले, तसेच वीजपुरवठाही अद्ययावत झाला आहे.

जत तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून तालुक्यातील उर्वरित गावांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. बनाळी, सनमडी, येळवी, बिळुर या भागातील शेतकऱ्यांना योजनेतून पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

जत येथे उप विभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय मंजुरीसाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केल्याने अखेर इथे हे कार्यालय आले. त्यामुळे तालुक्यातील शासकीय कामकाजांना गती प्राप्त झाली.

प्रकाश जमदाडे हे जत तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गेली 25 वर्षे अविरत कार्यरत असणारे एक तळमळीचे कार्यकर्ते आहेत. तालुक्याच्या समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे. त्यामुळे आमदार म्हणून विधानसभेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली, तर निश्चितच ते त्याचे सोने करतील, यात शंका नाही. तालुक्यात आवश्यक असणाऱ्या विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी तयार केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून ही विकासकामे त्यांच्या डोळयासमोर आहेत. 

1. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या शेतीसाठी पाणी पुरत नाही. जत भागात 65 गावांसाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना राबवली, तर हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकेल. त्यामुळे या कामाला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न प्रकाश जमदाडे प्राधान्याने करीत आहेत.

2. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचा घास त्यांच्यापासून हिरावून घेतला जातो. जत तालुक्यातील 67 गावांमध्ये रब्बी पिके घेतली जातात. त्यांना खरीपाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, अशी प्रकाश जमदाडे यांची मागणी आहे. त्यासाठी ते पाठपुरावाही करीत आहेत.

3. संख अप्पर तहसीलमध्ये जोडलेली 13 गावे पूर्वीप्रमाणे जत तहसीलला जोडावीत, अशी प्रकाश जमदाडे यांची मागणी आहे. तेथील लोकभावना विचारात घेऊन शासनाने तसा निर्णय घ्यावा, असे त्यांचे मत आहे. त्यासाठी ते सनदशीर मार्गाने प्रयत्न करीत आहेत.

4. गेल्या 25 वर्षांत सार्वजनिक क्षेत्रात अतिशय निष्ठेने कार्यरत असल्याने प्रकाश जमदाडे यांना येथील समस्यांची नेमकी जाण आहे. काय केले म्हणजे हिताचे होईल, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच टेंभू योजनेत वाळेखिंडी, बेवनूर, नवाळवाडी या गावांचा समावेश व्हावा, असा त्यांचा आग्राह आहे.

5. अपुरे कर्मचारी हे शासकीय कामकाजाच्या कासवगतीचे मुख्य कारण आहे. स्वत: प्रकाश जमदाडे स्वत: बरीच वर्षे शासकीय विभागात काम करीत होते. त्यामुळे पदे रिक्त असल्याने काय परिस्थिती उद्भवते, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळेच उमदी अप्पर तहसील कार्यालयासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावेत, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. शासनाने ती पदे त्वरित मंजूर करावीत, अशी त्यांची मागणी आहे.

6. म्हैसाळ कालवा मायथळ येथे खोदून माडग्याळ ओढयातून पाणी सोडावे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकेल.

7. लहरी हवामान हा राज्यातील शेतकऱ्यांना शाप आहे. अनेकदा कोरडया, तर कधीकधी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी येते. यंदा तर सांगली, कोल्हापूर परिसरात अतिवृष्टीने आणि त्यापाठोपाठ आलेल्या पुराने हाहाकार माजला. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी बुडत्याचा आधार असतो, तो म्हणजे पीक विमा. या पीक विमा योजनेतून त्वरित नुकसाईभरपाई मिळावी, यासाठी प्रकाश जमदाडे प्रयत्न करीत आहेत.

8. जत उत्तर विभागातील 11 गावे संख महावितरणला जोडली आहेत. ती जत उप विभागाला जोडावीत, अशी त्यांची मागणी आहे.

9. शासकीय कामकाजाचे संगणकीकरण हा खरे तर अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. मात्र त्यात घोळ झाले, तर रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती होते. जत तालुक्यातील संगणकीकरणाबाबत तसेच काहीसे झाले आहे. 7/12, 8 अ उतारे संगणकीकरण करताना डाया ऑपरेटरकडून चुका झाल्या आहेत. त्या वेळीच दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. कारण त्यातून भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. प्रकाश जमदाडे यांना त्याची पूर्ण कल्पना आहे. त्यासाठी त्या दुरुस्तीचा त्यांचा आग्राह आहे.

10. आधुनिक काळात कोणत्याही शहराच्या प्रगतीसाठी उद्योग-व्यवसायाची आवश्यकता आहे. जत तालुक्याचा झपाटयाने उत्कर्ष होण्यासाठी इथे तातडीने एखादी औद्योगिक वसाहत उभारणे गरजेचे आहे, असे प्रकाश जमदाडे यांचे मत आहे. त्यासाठी ते शासन दरबारी प्रयत्नही करीत आहेत. औद्योगिक वसाहतीमुळे तालुक्यातील तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. तसेच कृषिआधारित उद्योग-व्यवसाय केंद्र तालुक्यात उभारण्याचीही त्यांनी योजना आहे. प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून नवउद्योजकांना तालुक्यात जम बसविता येईल. विविध शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून देता येईल, असे त्यांचे मत आहे.

11. कोणत्याही विभागाच्या प्रगतीत रेल्वे मार्ग महत्त्वाची भूमिका बजावतो. कवठे महाकाळ-जत-गुड्डापूर-विजापूर, तसेच पंढरपूर-उमदी-विजापूर या नियोजित रेल्वे मार्गासाठी ते प्रयत्न करीत आहेत. रेल्वे बोर्डाचे सदस्य असल्याने त्यांना या बाबतीत योग्य व्यासपीठावर विचार मांडता येतात. पुढील रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गासाठी आर्थिक तरतूद करवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

12. जत शहराविषयी त्यांना अतिशय आस्था आहे. भविष्यात जत हे केवळ सांगलीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे निश्चित अशी योजना आहे. शहरात सुसज्ज रस्ते, गटारे, पायवाटा, पिण्याचे पाणी, उद्याने, विरंगुळा केंद्र उभारण्याची त्यांची योजना आहे. आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास पाच वर्षांत जत तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही ते देतात.





---------