आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण सुखाच्या आणि यशाच्या मागे लागला आहे. नोकरी मिळणे, आयुष्यात स्थैर्य मिळणे यातच आयुष्याचे यश असल्याचे मानणाराही एक वर्ग आहे. या सगळया प्रस्थापित यशाच्या संकल्पनांना धक्का देत एका तरुणाने वेगळी वाट निवडली. ऐन उमेदीच्या काळात आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून त्याने खडतर मार्ग निवडला, तो म्हणजे समाजसेवेचा. आज हा तरुण अनेकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. त्याचे नाव आहे अशोक बाबाराव देशमाने. परभणी जिल्ह्यातील मानवतमधील मंगळूर हे त्याचे मूळ गाव. ऐन उमेदीच्या काळात आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून समाजसेवेचा खडतर मार्ग निवडून त्याने 'स्नेहवन'ची स्थापना केली. आत्महत्या केलेल्या, तसेच गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी, त्यांचे शिक्षण सोपे व्हावे, यासाठी त्याने ही संस्था स्थापन केली.
एक चांगली नोकरी असतानाही अशोकचे मन स्वस्थ बसत नव्हते. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळात होरपळून निघाला होता. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची कुटुंबे वाऱ्यावर पडली. या शेतकरी कुटुंबांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे अशोकचे संवेदनशील मन सांगत होते. दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी, तसेच आत्महत्या झालेल्या कुटुंबातील मुलांसाठी काम करायचे त्याने ठरवले. या मुलांनी केवळ शहरात स्थलांतर करून चालणार नाही, तर त्यांचे दारिद्रय संपवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षणाची, निवासाची सोय करणे गरजेचे होते. पण नोकरी करत असताना हे काम करणे त्याला शक्य नव्हते. त्याला पूर्ण वेळ काम करायचे होते. त्यामुळे त्याने ऐन उमेदीत (वयाच्या 26-27व्या वर्षी) असताना नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पण हा प्रवास फार संघर्षमय होता. घरच्यांना पटवणार कसे, हा मोठा प्रश्न होता. पण त्याची तळमळ आणि कामाचे महत्त्व पाहून अशोकच्या कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला आणि अशोकच्या खऱ्याखुऱ्या संघर्षाला सुरुवात झाली.
अशोकने निवडलेल्या वेगळया वाटेविषयी बोलताना अशोकच्या आई सत्यभामाबाई देशमाने सांगतात, ''पहिल्यांदा आम्ही हे सर्व ऐकून अचंबित झालो होतो. नोकरी सोडून देऊन याच्या डोक्यात नेमके काय खूळ घुसले, ही चिंता आम्हाला असायची. आपली शेती बऱ्यापैकी असूनही दुष्काळामुळे दयनीय परस्थितीमध्ये त्याचे शिक्षण झालेले. वेळप्रसंगी दुसऱ्याच्या बांधाला जाऊन आम्ही काम करून अशोकचे व त्याच्या बहिणीचे शिक्षण, संगोपन केले. आता कमावत होता, सुखाचे दिवस आले असे वाटत असताना अशोकचा हा निर्णय आम्हाला तेवढा पटला नव्हता. दर वर्षी आळंदीला आम्ही दिंडीला येत असू. त्याही वेळी आलो होतो. इथे येऊन सर्व परिस्थिती पाहिली. एवढी मुले हा सांभाळतोय. त्यांच्या जेवणाचे हाल व अशोकची होणारी कसरत पाहवली नाही आणि इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा कठीण गेले, पण नंतर आम्ही मुलांमध्ये रमत गेलो. त्यालाही आपला हातभार लागतो या गोष्टीचे आज समाधान आहे.''
या मुलांचा महिन्याचा खर्च 60 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे अशोकला मदतीसाठी नेहमी धावाधाव करावी लागते. अशी बिकट परिस्थिती येणार हे माहीत असतानाही अशोकने मळलेली वाट सोडून आपल्यातील माणुसकीचा ओलावा आणि सकारात्मक दृष्टीकोन जागृत ठेवून आपल्या आयुष्याचेच जणू 'स्नेहवन' करून घेतले आहे. समाजातील अनेक संवेदनशील माणसांचे हात पुढे येत आहेत. गेल्या वर्षी भोसरीतील डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि स्मिता कुलकर्णी या दांपत्याने कोयाळी गावात स्नेहवनला दोन एकर जमीन दान स्वरूपात दिली. या जागेत संस्थेची नवीन वास्तू उभी राहिली असून 'स्नेहवन' परिवार आता येथेच नांदत आहे.
ज्ञानेश्वर भंडारे
9527966225
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/