सीताफळातून लाभले आर्थिक स्थैर्य

विवेक मराठी    01-Oct-2020
Total Views |

धुळे जिल्ह्यातील बोरीस गावातील शेतकरी विजय देवराम बेहरे या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत तीन एकरात सीताफळाची यशस्वी लागवड केली असून त्यातून सहा लाखांचा निव्वळ नफा कमवला आहे. त्यांची ही कथा इतर शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.

shitafal_1  H x

आज शेतीवर विविध संकटे घोंघावत आहेत, ही शेती उन्नत करण्यासाठी विविध पातळ्यांवर कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायाला फळबागांची जोड अतिशय फायदेशीर ठरत आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही बारमाही चांगला मिळणारा भाव आणि निर्यातीसाठी दिली जाणारी चालना यामुळे फळबागांची लागवड यशस्वी ठरत आहे.

आपल्या राज्यात हवामान कधीही सारखे नसले, तरी विविध भागांत विविध फळे प्रसिद्ध आहेत - उदा., कोकणात आंबा, काजू, पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षे, पेरू आणि डाळिंब, उत्तर महाराष्ट्रात केळी, विदर्भात संत्रे. आपल्या राज्यात माळरान, डोंगरउतार, तर काही ठिकाणी सपाट प्रदेश आहे, अशा ठिकाणी फळबाग लागवाडीला मोठा वाव आहे. कोरडवाहू जमिनीला सीताफळ लागवड एक प्रकारे वरदानच ठरत आहे. राज्यातील असंख्य शेतकरी सीताफळ लागवडीतून आर्थिक उन्नती साधत आहेत.

सीताफळ ठरले वरदान

धुळे शहरापासून ३५ किलोमीटरवर अंतरावर बोरीस हे जवळपास साडेपाच हजार लोकसंख्येचे गाव. गावातील जमीन ढोबळमानाने हलकी, मध्यम प्रतीची व काळी कसदार या तीन प्रकारांत मोडते. गावातच बेहरे कुटुंबीयांची सहा एकर शेती आहे. या कुटुंबीयांतील विजय बेहरे यांनी घटते पर्जन्यमान, बदलते हवामान, माती परीक्षण, पाण्याची उपलब्धता आणि पीक बदलाचा अभ्यास करून कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणारे नगदी पीक म्हणून सहा वर्षांपूर्वी सीताफळ लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. आज हा त्यांचा निर्णय त्यांच्या शेतीसाठी वरदान ठरला आहे. अधिकाधिक उत्पादन आणि दर्जेदार फळनिर्मिती यामुळे बेहरे यांच्या सीताफळास बाजारपेठेतही योग्य भाव मिळाला आहे.

आपल्या यशाचे गमक उलगडताना विजय बेहरे म्हणाले, "मी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. लहान भाऊ दीपक हा प्राध्यापक आहे. मी पुढे शिकून नोकरी पत्करावी अशी घरातल्या लोकांची इच्छा होती. पण मला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. वडील देवराम यांचे कष्ट मी जवळून अनुभवले होते. वडिलांच्या प्रेरणेमुळे मी शेतीत उतरलो. आपली शेती प्रयोगशील कशी करता येईल? यासाठी मी चिंतन करू लागलो. त्यासाठी यशस्वी शेतकर्‍यांच्या भेटी घेऊ लागलो, अशा शेतकर्‍यांच्या शेतीतले प्रयोग पाहून मी भारावून गेलो आणि पुढे शेतीचा लळा लागला. आजच्या काळात शेती परवडत नसली, तरी ती किफायतशीरपणे केली तर त्यातून योग्य आर्थिक नफा मिळवू शकतो, हे मला अभ्यासातून, शेती कार्यशाळेतून लक्षात आले. शेतीतील अनिश्चितता लक्षात घेऊन मी २०१४ साली तीन एकरावर सीताफळ लागवड केली. जमिनीवर दहा बाय दहाचे अंतर ठेवून सीताफळाची (MMK गोल्डन जातीची) एक हजार रोपे लावली. सतत दोन वर्षे रोपांची योग्य जोपासना केली.

या काळात औषध फवारणी आणि छाटणीकडे विशेष लक्ष दिल्यानंतर सीताफळाची उत्तम वाढ होऊन तिसर्‍या वर्षी फळविक्री करण्यास सुरुवात केली. सीताफळ लागवड ते विक्रीपर्यंतचा खर्च वजा करता सहा लाखांचा फायदा मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने हा नफा मिळत चालला आहे."

"
सीताफळ हे जरी कोरडवाहू फळ असले, तरी व्यापारी तत्त्वानुसार या पिकांकडे पाहिल्यास भरपूर नफा मिळतो, असे माझ्या लक्षात आले, त्यामुळे अनेक शेतकरी माझी बाग पाहण्यासाठी येत असतात, जे शेतीकडे निराशेने पाहतात अशा शेतकर्‍यांना फळबाग लागवड करण्यासाठी सल्ला देत असतो" असेही बेहरे यांनी सांगितले.


shitafal_2  H x

बागेचे उत्कृष्ट व्यवस्थापन

बागेच्या व्यवस्थापन संदर्भात बोलताना बेहरे म्हणाले, "सीताफळाची रोपे लावल्यानंतर त्याची योग्य निघा राखली पाहिजे, ते मी केलेच आहे. उन्हाळ्यात रोपांना पाण्याची गरज असते. ही गरज मला पूर्ण करता आली. आमच्या विहिरीला वर्षभर पाणी असते, त्यामुळे रोपांना योग्य वेळी पाणी देता आले. शिवाय बागेची वेळोवेळी खुरपणी करून तण काढत असतो. सुरुवातीच्या काळात झाडाची छाटणी केली. सीताफळावर सहसा रोग वा कीड पडत नाहीत, पण पावसाळ्यात काडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळाची वाढ होताना ही कीड रस शोषून घेते. त्यामुळे फळे आकाराने लहान आणि कडक होतात, रंग काळसर होतो, अशा योग्य काळजी घेऊन औषध फवारणी करून घेत असतो. सीताफळाचे शेणखत उपयुक्त असून त्याची मात्रा वेळोवेळी देत असतो."

काढणी आणि उत्पादन संदर्भात बेहरे सांगतात, "सीताफळाच्या झाडांना जून-जुलै महिन्यात फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यापासून फळे तयार होण्यास साधारणपणे चार-पाच महिन्यांचा कालावधी लागतो. ही फळे सप्टेंबर महिन्यात परिपक्व होतात आणि ती पुढे बाजारात उपलब्ध होतात. दर वर्षी प्रत्येक झाडापासून मला ६० किलोचे उत्पादन मिळते. जसजसे झाडाचे वय वाढते, तसतसे फळाचे उत्पादन वाढते. त्यामुळे मला पुढील काळातही अधिकच आर्थिक नफा मिळत जाणार आहे."

कुटुंबाचा संपूर्ण सहभाग

शेतमजुरांचा तुटवडा, पिकांची वेळेवर काढणी अशा अनेक समस्या आज राज्यातील शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यामुळे शेतीत कुटुंबाचा संपूर्ण सहभाग आवश्यक असतो, असे बेहरे सांगतात. फळबाग व्यवसायात त्यांना पत्नी चारुशीला, वडील देवराम, आई निर्मला, वहिनी वैशाली यांची मोठी मदत होते. लहान भाऊ दीपक हे प्राध्यापक असूनही सुट्टीच्या दिवशी पूर्णवेळ शेतात राबतात.

"
कुटुंबाची चांगली साथ मिळाल्याने मजुरांची फारशी आवश्यकता पडत नाही. फळाची काढणी करताना मजुरांची गरज अधिक भासते, पण कुटुंबातला प्रत्येक सदस्य काढण्याच्या दिवशी अधिक परिश्रम करतात. आमची उमराण जातीची बोर बागही बहरली आहे, तेही येत्या एक-दीड महिन्यात विक्रीला येईल" असेही बेहरे म्हणाले.

धुळे, गुजरात येथे फळाची विक्री

सीताफळ हे नगदी पीक बाजारभाव मिळवून देत असले, तरी हे फळ नाशिवंत असल्याने ह्याची योग्य निगा राखणे हे जिकिरीचे काम असते, असे बेहरे यांचे म्हणणे आहे. "यंदाचा हंगाम सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसाला ४० ते ५० कॅरेट माल निघतो. एका कॅरेटमध्ये २० किलो माल बसतो. हा माल बॉक्समध्ये पॅकिंग करून धुळे येथे व गुजरातमध्ये विक्रीसाठी नेत असतो. या बाजारपेठेत रोख व्यवहार होत असतो. त्यामुळे पैसे विक्रीनंतर लगेच हातात मिळतात. अनलाॅकसारख्या काळात खर्च वजा जाता सहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे, याचे मला समाधान आहेच, मुख्य म्हणजे योग्य नियोजन आणि परिश्रम यामुळे हे सगळे साध्य होऊ शकले" असे बेहरे यांनी सांगितले.

आजच्या काळात शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे, अशी हाकाटी सर्वत्र पिटली जात असताना दुसरीकडे विजय बेहरे यांच्यासारखे असंख्य शेतकरी पारंपरिक शेतीला कल्पकतेची जोड देत शेतीतून आर्थिक उन्नती साधत आहेत, हे कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.

संपर्क
विजय बेहरे
९६३७२५८१२५