इतिहासाचे सोनेरी पान

विवेक मराठी    01-Oct-2020
Total Views |

  बाबरी ढाचा पाडला यांचे दुःख वाटणारे जिथे बाबरी ढाचा उभारण्यात आला तेथे आधी मंदिर होते हे मान्य करत नाहीत. कारण हे मान्य केले, तर मुस्लीम समाजाचे लांगूलचालन कसे करता येईल? बाबरी ढाचा हा मुस्लीम समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नव्हता, कारण त्या वास्तूत कधी नमाज पढला जात नव्हता. मात्र 'चहापेक्षा किटली गरम' याच न्यायाने मुस्लीम समाजापेक्षा त्या समाजाला गृहीत धरणारे जास्त आक्रमक होते. बाबरी ढाचा जमीनदोस्त करणे म्हणजे मुस्लीम समाजावर आघात आहे असा या मंडळींनी सातत्याने प्रचार केला. मतांसाठी मुस्लीम समाजाची तळी उचलणाऱ्या या मंडळींना बदललेले मुस्लीम मानस कळले नाही.

babari_1  H x W
ऑगस्ट महिन्यात पाच तारखेला अयोध्येत श्रीराममंदिराची पायाभरणी झाली आणि बाबरी ढाचा जमीनदोस्त करण्याचा कट केला म्हणून दाखल केलेल्या खटल्याचा निकाल ३० सप्टेंबर रोजी लागला. अठ्ठेचाळीस जणांवर हा खटला दाखल करण्यात आला होता. कालच्या निकालात सर्वांना निर्दोष ठरवले असून बाबरी ढाचा जमीनदोस्त करण्यासाठी कोणताही कट, पूर्वनियोजन, योजना नव्हती, हे न्यायालयाने मान्य केले आहे. बाबरी ढाचा जमीनदोस्त होणे ही सामूहिक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, हे या निकालाने अधोरेखित केले आहे. मात्र हा निकाल जाहीर झाला आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या. स्वाभाविकच त्या हिंदुहिताच्या विरुद्ध होत्या. मुस्लीम समाजाला उत्तेजित करणाऱ्या होत्या. संविधानाची पायमल्ली केली गेली असे तर्कट मांडणाऱ्या होत्या. या मंडळींचा पोटशूळ का सुरू झाला आहे? एकदम एवढी तडफड व्हायचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर हेच आहे की, त्यांच्या हातून मुस्लीम लांगूलचालनाचे एक एक मुद्दे सुटत चालले आहेत. मुस्लीम समाजाला आपली मतपेढी म्हणून वापरण्यासाठी आवश्यक असणारा दारूगोळा न्यायालयाने नेस्तनाबूत करून टाकला आहे. आता लांगूलचालन करण्यासाठी नवा मुद्दा कोणता? हा प्रश्न या मंडळींना सतावू लागला आहे.

बाबरी ढाच्याच्या नावाने या मंडळींनी गेली सत्तावीस वर्षे आपली दुकाने चालवली होती.

 

सत्तावीस वर्षांपूर्वी सहा डिसेंबरला न्यायालयाची परवानगी घेऊन कारसेवक अयोध्येत एकत्रित झाले होते. त्याआधी अनेक वेळा प्रभू श्रीरामाची जन्मभूमी मुक्त करण्यासाठी हिंदू समाजाने न्यायालयीन व सामाजिक पातळीवर प्रयत्न केला होता. शासनाची बोटचेपी भूमिका, मुस्लीम समाजाकडे असणारा ओढा लपून राहिलेला नव्हता. अशा पार्श्वभूमीवर अयोध्येत एकत्रित आलेल्या हिंदू समाजाने उत्स्फूर्त कृती करत बाबरी ढाचा जमीनदोस्त केला आणि एक इतिहास घडवला. हिंदू अस्मितेवर, हिंदू समाजावर लागलेला पराभूत मानसिकतेचा कलंक नष्ट झाला. हिंदू समाज संघटित झाला तर काय होऊ शकते, याचे छोटे प्रात्यक्षिकच त्या दिवशी अयोध्येत पाहायला मिळाले होते. देशभरात चैतन्य जागृत करणारी ही घटना होती. हिंदूच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाचा एक टप्पा त्या वेळी पूर्ण झाला होता.
 

या खटल्यातील मुस्लीम पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना "यापुढे वाद नकोत, हिंदू-मुस्लीम समाजाने भावाभावाप्रमाणे राहिले पाहिजे" असे मत व्यक्त केले आहे. जो पक्षकार होता, त्याने न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. मात्र ज्यांनी रामजन्मभूमी मुक्ती लढा आणि बाबरी ढाच्याचे पतन केवळ राजकीय खेळीसाठी वापरले, त्यांची मळमळ सुरू झाली आहे. बाबरी ढाचा पाडला यांचे दुःख वाटणारे जिथे बाबरी ढाचा उभारण्यात आला तेथे आधी मंदिर होते हे मान्य करत नाहीत. कारण हे मान्य केले, तर मुस्लीम समाजाचे लांगूलचालन कसे करता येईल? बाबरी ढाचा हा मुस्लीम समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नव्हता, कारण त्या वास्तूत कधी नमाज पढला जात नव्हता. मात्र 'चहापेक्षा किटली गरम' याच न्यायाने मुस्लीम समाजापेक्षा त्या समाजाला गृहीत धरणारे जास्त आक्रमक होते. बाबरी ढाचा जमीनदोस्त करणे म्हणजे मुस्लीम समाजावर आघात आहे असा या मंडळींनी सातत्याने प्रचार केला. मतांसाठी मुस्लीम समाजाची तळी उचलणाऱ्या या मंडळींना बदललेले मुस्लीम मानस कळले नाही. भारतात आता असणारा मुसलमान हा १९४८ सालचा नाही. २०२० सालचा राष्ट्रीय विचार त्याने आत्मसात केला आहे. म्हणूनच रामजन्मभूमीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुस्लीम समाजाने त्या निकालाचे स्वागत केले होते आणि काल आलेल्या निकालानंतरही तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुस्लीम समाज इथल्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचा आणि परंपरांचा स्वीकार करत आहे, याची ही प्रचिती आहे. भलेही उपासना पद्धती वेगळी असेल, पण या देशाशी, या मातीशी आपले नाते आहे हे मुस्लीम समाज मान्य करतो आहे, हे चित्र एका बाजूला आहे; तर आपणच मुस्लीम समाजाचे तारणहार आहोत असे समजणारे वेगळ्या जगात वावरत आहेत. आणि म्हणून काल आलेल्या निकालानंतर ते मुस्लीम समाजाला उत्तेजित करणारी भाषा बोलत आहेत. बाबरी ढाचा जमीनदोस्त होणे ही केवळ हिंदू समाजाच्या दृष्टीने नव्हे, तर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या एका घटनेने इतिहास घडवला आहे. या इतिहासाचे आणखी एक पान कालच्या निकालाने लिहिले गेले आहे.