आयसिसचे पाच बुरखे

विवेक मराठी    06-Oct-2020
Total Views |

 आयसिसची ई-माध्यमातील प्रचारयंत्रणा हे त्यांचे बलस्थान होते. तिच्या विरोधी उपाययोजना करण्यात अनेक देशांतील प्रशासने कमी पडली. अतिरेकी विचारांपासून परावृत्त करण्यासाठी आणि मुस्लीम समाजातील आयसिसच्या मनोवृत्तीला बळी पडणाऱ्या अथवा भविष्यात बळी पडू शकणाऱ्या, विशेषत: तरुणांवर याच माध्यमांचा वापर करून त्यांचे पाच बुरखे फाडण्याच्या कल्पक योजना तातडीने आखून अंमलात आणण्याची आवश्यकता आहे.

pathak_1  H x W
गेला महिना-दोन महिने भारतात केंद्रीय तपास यंत्रणेने (एनआयएने) केरळपासून तो बिहारपर्यंत अनेक ठिकाणी आयसिसशी संबंधित ६०-७० लोकांना पकडले. त्यांच्याकडून घातपात करण्याचे साहित्य, काही प्रमाणात दारूगोळा, आक्षेपार्ह साहित्य आणि त्यांच्या संपर्कात असलेले लोक इ. माहिती मिळाली. भारतात अनेक ठिकाणी घातपाती कृत्ये करण्याची त्यांची योजना होती. ती उधळून लावण्यात तपास यंत्रणांना यश मिळाले. त्यातील काहीं सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची छायाचित्रे प्रसारमाध्यमांनी दिली. त्यात पकडलेल्या लोकांच्या तोंडावर बुरखा होता. गुन्हेगारांना बुरखे घालून दाखविण्याची कारणे व्यवहारात अनेक असतात. त्या बुरख्यांमागे न दिसणारे, त्यांच्या बुद्धीवर चढलेले बुरखे असतात. ते बुरखे घातल्यामुळे हे लोक घातपाती कारवाया करण्यास प्रवृत्त होतात. ते बुरखे कोणते हे समजले, तर ते फाडून त्यांचे अंतरंग उघडे पाडल्यास घातपात करण्याच्या प्रकारांना आळा घालता येईल.

गैरसुन्नींसाठी
सरसकट बुरखा
सर्वसाधारणपणे बहुसंख्य सुन्नी हा बुरखा घालून असतात. त्याचा मला अनेकदा अनुभव आला आहे. एखादया मुस्लीम व्यक्तीशी जराही कुराण अथवा धर्मसंबंधात बोलणे सुरू केले की तो एक प्रश्न विचारतोच - "तुम्ही इस्लाम का स्वीकारत नाही?" असे विचारणारी व्यक्ती एखादा अपवाद सोडता, सुन्नीच असते. मी या प्रश्नावर त्याला तो सुन्नी आहे का हे प्रथम विचारतो, नंतर मी समोरच्या माणसाच्या कुवतीप्रमाणे निरनिराळी उत्तरे देतो. अनोळखी माणसाला एकदम धर्मपरिवर्तनाबाबत प्रश्न विचारणे आपल्याला अतर्क्य वाटते. त्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की गैरसुन्नींना इस्लाममध्ये आणणे हे आपले धर्मकर्तव्य आहे, असे सर्वसाधारण मुस्लीम अगदी मनापासून मानतो. त्याला इतर कुठलाही धर्म समोरच्या माणसाला तारणारा अथवा स्वर्गात ईश्वर-अल्लाकडे नेणारा वाटत नाही. तुम्ही जर थोडा मवाळपणा दाखवला, तर तो लगेच इस्लाम कसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे याचा भडिमार करतो. हिंदू धर्म कसा अन्यायपूर्ण असून नरकाकडे नेईल हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो; शिवाय अल्ला आणि शेवटचे प्रेषित पै. महंमदच कसे तारणारे आहेत आणि त्यांच्यावर श्रद्धा असणे हेच अंतिम सत्य आहे, हे सांगतो. घरी तसेच मशिदींमधील प्रवचनांमधून अगदी बालपणापासून त्याच्या बुद्धीवर या एकांगी मानसिकतेचा बुरखा चढवला जातो. इंग्लंडमधील एक सहा वर्षांचे मूल स्थानिक गोऱ्या महिलांना वेश्या समजत होते (इंडि. एक्स्प्रेस, ९ ज्यून २०१४). त्या मुलावर घरातल्या वातावरणाचा परिणाम झाला, हे सहज लक्षात येते. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातील लाल मशीद मदरशावरील Among the believers या माहितीपटातील एका ५-६ वर्षांच्या मुलाचे भाषण येथे आठवते. ते मूल काफिरांच्या विरोधात करायच्या जिहादवर जिवाच्या आकांताने भाषण करताना दाखविले होते. ते आता १५-१७ वर्षांचे झाले असेल. इतक्या वर्षांनी ते मूल आयसिसचा सदस्य बनले नसेल तरच नवल. खरे तर त्या मुलाचा शोध घेऊन सध्या त्याची मानसिकता काय आहे हे तपासायला पाहिजे. ते जर जिहादी मानसिकतेतून बाहेर पडले असेल, तर तसे होण्यास काय कारण घडले हे कळणे आजच्या भारलेपण (radicalisation) निस्तरण्याच्या प्रयत्नांना मार्गदर्शक ठरेल. युरोप-इंग्लंडमधून आयसिसला जाऊन मिळणाऱ्या तरुण-तरुणींचा वाढती संख्या लक्षात घेऊन तिच्यामागे कोणती मानसिकता दडली आहे, याचा शोध २०१४-१५ साली घेण्यात आला. त्यातून बाहेर आले की विशेषता: सुन्नी मुस्लीम समाजातील भारलेपण हे मशिदींमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणात आणि घरातील वातावरणात आहे (टा. ऑफ इंडिया, २७ सप्टेंबर २०१६). भारतात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.


pathak_1  H x W
 

गैरसुन्नी आणि फसाद
आयसिसचा लुटुपुटूचा खलिफा अबू बक्र बगददीने आपले औट घटकेचे राज्य खिलाफत म्हणून जाहीर करताच अनेक देशांमधून हजारोंच्या संख्येने येनकेन प्रकारेण त्याला जाऊन मिळणाऱ्या तरुण-तरुणी कोणत्या विचारांनी भारल्या होत्या? भारतातून तिकडे जाऊ पाहणाऱ्या तरुणांची संख्या एकट्या केरळातून शंभरावर होती. कधी एकटे, तर कधी कुटुंबासह जे आयसिसला मिळाले, त्यांना समजत नव्हते का की आयसिसचे दैत्य ज्या प्रकारे गैरसुन्नी लोकांवर खुले अत्याचार करत, ते माणुसकीला काळिमा फासणारे होते? आयसिसविरोधात भारतात पोलीस यंत्रणा सजग आहे, हे माहीत असून तामिळनाडूतील ग्रामीण भागात आयसिसचे चिन्ह मिरविणारे काळे कपडे घालून ती छायाचित्रे माध्यामांत टाकणारे तरुण होतेच. आयसिससाठी काम करताना गेल्या काही दिवसांत जे तरुण पकडले गेले, त्यात त्या काळे कपडे घालणाऱ्या तरुणांमधून कोणी असल्यास, ते अपेक्षित आहे.


इतर वेळी कुणाही मुस्लिमाशी बोला, इस्लाम कसा माणुसकी शिकविणारा धर्म आहे यावर तो भाषण देईल. आयसिसचे बंदे शिरच्छेद केलेल्या माणसाचे मुंडके पाच वर्षांच्या मुलाला खेळायला देऊन त्याचे चित्रण ई-माध्यमातून जगभरात बिनदिक्कतपणे वितरित करत, हे माणुसकीच्या कोणत्या सदरात बसते? या प्रश्नावर ती चित्रणे निर्विवादपणे खोटी आहेत असे त्यांचे उत्तर असे. आयसिसला जाऊन मिळू पाहणारे लोक यावर डोळसपणे विचार करू शकत नाहीत. भारतातील आससिसच्या विचाराने भारले गेलेले जे लोक पकडले गेले, त्यांच्याही बुद्धीवर त्याच अतिरेकी विचारांचा बुरखा घट्ट बसला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. गैरमुस्लीम काफिरांचे अस्तित्व हेच मुळी पृथ्वीवर अन्याय - 'फसाद' आहे, या कुराण शरीफ आयत ५.३२मधील मार्गदर्शनाशी हा बुरखा सुसंगत आहे. असा अन्याय करणाऱ्याला ठार करणे हे कुराणसंमत आहे. ते योग्य ठरते अशी या आयसिसला मानणाऱ्या मुस्लिमांची मनोभूमिका असते. त्यालाच जोडून आलेला आयतेतील मजकूर - 'ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वीवर उपद्रव (फसाद) पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले असेल, तर त्याने जणू काही सर्व मानवजातीला ठार केले आणि ज्याने कोणाला (मुस्लिमाला) जीवदान दिले, त्याने जणू सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले' हे मुस्लीम प्रवक्ते न चुकता सांगतात. इथे 'फसाद' पसरविणारे काफिर आहेत, हे सर्व मुस्लिमांच्या गळी उतरविलेले असते. 'फसाद' – बिघाड अनाचार याचा अर्थ विशद करणारी टीप 'कुरआन सौरभ' या भाषांतर ग्रंथात दिली आहे. 'मानव समाजाची (सामाजिक) व्यवस्था आणि जमिनीचा प्रबंध (मालकी हक्क इ.) जर अल्लाहच्या आज्ञा आणि आदेशांनुसार (कु.. आणि शरीया) होत नसतील आणि तो माणूस (गैरमुस्लीम) आपल्या क्षुद्र इच्छांचा दास बनून राहिला (मुसलमान झाला नाही), तर ही मोठ्या उपद्रवाची (फसादची) गोष्ट आहे. जेव्हा (कोणी मुस्लीम) अल्लाहचे आदेश (कु..) आणि त्याने दिलेले कायदे आणि नियम (शरीया) यांना सोडून दुस-यांनी दिलेले (काफिरांचे) नियम आणि जीवनपद्धती स्वीकारतात आणि अल्लाहप्रणीत मार्गाचा त्याग करतात, त्याचा परिणामस्वरूप पृथ्वीवर अनाचार माजतो. (संपूर्ण पृथ्वीवर) मानव समाज जोवर अल्लाहचा पूर्ण आज्ञाधारक बनत नाही (सर्व लोक मुस्लीम बनत नाहीत) आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याच्या आदेशांचे (शरीयाचे) पालन करत नाहीत, तोवर पृथ्वीवर न्याय आणि शांती प्रस्थापित होणार नाही' (कुरआन सौरभ, पृ. १७२). ही टीप इतक्या विस्ताराने देण्याचे कारण असे की तालीम घेणाऱ्या तालिबानांना मदरशांमधून काफिरघृणेच्या (Kafirophoiaच्या) विचारांचे बाळकडू मिळत असावे, याचा मासला वाचकांना मिळावा.


स्थानिक धर्मभूमी
यातून काही निष्कर्ष निघतात. काफिरांचे कायदे मानणारा मुस्लीम समाज धर्मबाह्य काम करतो, अशी त्यामागची धारणा असते. भारतात समान नागरी कायद्याला मुस्लीम विरोध करतात, त्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे. ते काफिरांनी केलेले कायदे असतील. मुस्लीम समाज ते धार्मिक कारणांसाठी स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाही.
अनेक ठिकाणी मुस्लीम समाजाची संख्या काही कारणाने वाढली की पद्धतशीरपणे गैरमुस्लिमांना त्रास देऊन हुसकावण्याचे प्रयत्न होत असतात. कैरानाचे प्रकरण पुढे आले. आता विशेषत: बंगालच्या आणि आसामच्या सीमावर्ती भागात हे सुरू आहे. हिंदूंच्या अशा पलायनामुळे तो भाग मुस्लीमबहुल झाला की तेथे शरीयाचा कायदा लागू करण्यात येतो. हे भारतातच घडते असे नव्हे, तर इंग्लंडमध्ये असे शरीयाशासित विभाग आहेत. त्या भागात जाण्यासाठी पोलीस नाखूश असतात. त्या भागात राहणारे बहुसंख्य मुस्लीम आपण 'दार उल इस्लाम' धर्मभूमीमध्ये राहतो, या मानसिकतेत जगत असतात. त्या भागात राहणाऱ्या मुस्लीम समाजाच्या बुद्धीवर हा तिसऱ्या प्रकारचा बुरखा ओढलेला असतो.

 
कु.. आयत ५.३३प्रमाणे, 'जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि भूमीवर याकरिता धावपळ करतात की हिंसाचार माजवावा, त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील अथवा सुळावर चढविले जातील अथवा परस्परविरुद्ध दिशेने त्यांचे हात-पाय कापले जातील, अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल' ('दिव्य कुरआन', पृ. २०५). कु..मध्ये असलेल्या या आदेशांप्रमाणे, 'हाल हाल करून काफिरांना मारणे धार्मिकदृष्ट्या योग्य आहे' या भावनेचा बुरखा जे मुस्लीम अधिक भारले गेले, त्यांच्या मनावर घट्ट बसलेला असतो. त्यातून ते अतिरेकी कारवाया करण्यास प्रवृत्त होतात. आज त्यांना आपण आयसिसशी जोडलेले मानतो. पण हे नवे नाही. खिलाफत नष्ट झाल्यावर काँग्रेंसशी असलेला संबंध तोडून प्रतिक्रिया म्हणून केरळमध्ये मोपल्यांनी हिंदूंविरोधात अत्याचार, बाटवाबाटवी, बलात्कारांचे थैमान घातले होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगदी काही महिने आधी सुऱ्हावर्दीच्या काळात बंगालमध्ये डायरेक्ट अॅक्शनच्या भीषण दंग्याच्या वेळी मुसलमानांनी काँग्रेसला भीती घालून भारताचे विभाजन घडविण्यासाठी तेच केले. त्यानंतर निझामाच्या राज्यात रझाकारांनी मराठवाडा-तेलंगणात तेच केले. त्या सर्वांमागे हीच मानसिकता होती. त्या वेळी झुंडीने हे अत्याचार करत असत. आता तसे करता येत नाहीत, म्हणून असे छोट्या समूहात अथवा एकट्याने करण्याचे सत्र चालू झाले. आसाममध्ये आणि हैदराबादमध्ये अनुक्रमे AIUDF आणि AIMIM या दोन्ही पक्षांची खरी ओळख तीच आहे. काफिरघृणेतून जे इथे तेच युरोपातही घडताना दिसते. नुकताच २६ सप्टेंबरला पॅरिसमध्ये सुरामारीचा प्रकार घडला. सुरामारी करणाऱ्या, पाकिस्तानी मुळाच्या जाहेर हसन महमूदने शार्ली हेब्दो मासिकाने पैगंबरांची व्यंगचित्रे पुन्हा छापली म्हणून हल्ला केला असे कारण दिले.


खिलाफतीचे मृगजळ
सर्व जग मुसलमान होऊन सर्वत्र एकाच खलिफाचे राज्य असेल तरच पृथ्वीवर शांतीचे राज्य येईल, ही वर दिलेली कु..मधील संकल्पना सुन्नी, त्यातल्या त्यात वहाबी विचारसरणीने भारलेल्या मुसलमानांना सदैव भुरळ घालत आली आहे. त्यासाठी घातलेल्या जिहादच्या हाकेला हातात मिळेल ते शस्त्र घेऊन ते तयार असतात. खूनखराबा करून आजच्या जगात अशी आदर्श राज्यव्यवस्था अवतरू शकणार नाही, हे कुणालाही पटण्यासारखे आहे. ज्यांनी 'आदर्श खिलाफतीच्या' पाचव्या बुरख्यात स्वत:ला जखडून घेतले आहे, त्यांना या पाच बुरख्यांआडून ते समजणे कठीणच आहे.


बुरखे फाडण्याचे मार्ग
आयसिसची सहानुभूती बाळगणरे भारतात तसेच इतर देशांतही आहेत. भारतातल्या सर्व अतिरेक्यांना आर्थिक मदत आणि शस्त्रास्त्रे पुरवठा पाकिस्तान करतो, हे म्हणणे पूर्णपणे खरे नाही. भारतातच त्यांना प्रोत्साहन देणारे, पैसे आणि शस्त्रास्त्रे पुरविणारे, मदतीचा हात देणारे कमी नाहीत. अतिरेक्यांना भारतातूनच आर्थिक मदत करण्याचे दोन मार्ग संभवतात. भारतात मुस्लीम वक्फ बोर्डाच्या हजारोंनी मिळकती आहेत. त्यात गैरव्यवहार चालत नसतील हे शक्यच नाही. जसे अनेक हिंदूंबहुल सोसायट्या, बँका इ.मधील आर्थिक गैरव्यवहार बाहेर येतात, तसे वक्फ स्थावर-जंगम मालमत्तांच्या बाबतीत का घडत नाही? याचे एक कारण संभवते, ते म्हणजे वक्फची मालमत्ता घशात घालणारे मुस्लीम मुखंड त्यातील काही पैसे आयसिसच्या इथल्या सदस्यांना पोसण्यासाठी, शस्त्रास्त्रांची मदत देण्यासाठी वापरतात. त्याला धर्माचे काम समजून इथला मुसलमान मूक संमती देत वक्फ बोर्डातील हेराफेरींकडे दुर्लक्ष करतो. तो आर्थिक मदतीचा स्रोत बंद करायचा असेल, तर वक्फ मालमत्तेचा हिशोब लावण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. मुस्लीम महिलांच्या शिक्षणासाठी आणि तलाकपिडित महिलांसाठी त्या पैशाचा उपयोग करावा.
दुसरा स्रोत ठिकठिकाणी जे मुस्लीम बाहुबली आहेत, ज्यांनी आपल्या दहशतीच्या जोरावर अमाप माया बळकावली आहे, ते धर्माचे काम म्हणून या अतिरेक्यांना पोसत असतील. त्यांची अवैध साम्राज्ये मोडीत काढली, तर अतिरेकी काम करणाऱ्यांच्या संख्येला आळा बसेल. सध्या मुख्यमंत्री आदित्यनाथ अनेक बाहुबलींची साम्राज्ये धुळीस मिळविण्याचे काम करताना दिसतात. तेच इतर ठिकाणी व्हायला पाहिजे.


-माध्यमांचा वापर
आयसिसची ई-माध्यमातील प्रचारयंत्रणा हे त्यांचे बलस्थान होते. तिच्या विरोधी उपाययोजना करण्यात अनेक देशांतील प्रशासने कमी पडली. अतिरेकी विचारांपासून परावृत्त करण्यासाठी आणि मुस्लीम समाजातील आयसिसच्या मनोवृत्तीला बळी पडणाऱ्या अथवा भविष्यात बळी पडू शकणाऱ्या, विशेषत: तरुणांवर याच माध्यमांचा वापर करून त्यांचे वर दिलेले पाच बुरखे फाडण्याच्या कल्पक योजना तातडीने आखून अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. याबाबत हिंदू समाज उदासीन आहे. मात्र बुरखे फाडण्याचे काम करताना चीन 'वीगर' मुस्लिमांच्या बाबतीत ज्या प्रकारे बळजबरीने करते आहे, त्या प्रकारे केले तर उलट परिणाम होतील. लोकशाही व्यवस्था न मोडता २०४७पर्यंत ते परिवर्तन आणण्याचे आव्हान हिंदू समाजापुढे आहे.