कायद्यामागचे कारण लक्षात घ्यावे

विवेक मराठी    27-Nov-2020
Total Views |
धर्मांतरबंदी कायद्याला निमित्त ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे झाली असली, तरी या कायद्याची व्याप्ती आणि त्याचे परिणाम त्याहून अधिक आहेत, हे टीकाकारांनी लक्षात घ्यावे आणि ही उरबडवेगिरी थांबवावी.

love_1  H x W:
कोणत्याही व्यक्तीच्या फसवणुकीने करण्यात आलेल्या धर्मांतराला 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेला त्याचबरोबर, स्वेच्छेने धर्मांतर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍याची पूर्वपरवानगी अनिवार्य करणारा आणि तसे न केल्यास त्यासाठीही शिक्षेची तरतूद करणारा अध्यादेश काढणारे उत्तर प्रदेशचे मंत्रिमंडळ अभिनंदनास पात्र आहे. लवकरच या अध्यादेशाचे धर्मांतरबंदी कायद्यात रूपांतर होईल.
प्रसारमाध्यमे या कायद्याचा उल्लेख लव्ह जिहादविरोधी कायदा असा हेतूपुरस्सर करत आहेत. तेे त्यांच्या आजवरच्या परंपरेला साजेसे आहे. उत्तर प्रदेशातली ‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे या अध्यादेशाला निमित्त ठरली असली तरी या कायद्याची व्याप्ती त्याहून अधिक आहे हे लक्षात घ्यायला हवे. कोणत्याही धर्मातील व्यक्तीने अन्य धर्मातील व्यक्तीला आपल्या धर्मात येण्यासाठी आमिष दाखवू नये वा त्यासाठी तिची फसवणूक करू नये. असा व्यवहार करणारी व्यक्ती तुरूंगवासास व दंडास पात्र ठरेल, अशी तरतूद या अध्यादेशात करण्यात आली आहे.

 

लव्ह जिहादच्या सापळ्यात सापडूनही सुखरूप बाहेर येणाऱ्या रणरागिनीची ही कहाणी.
प्रत्येक भारतीयाच्या घरात असलीच पाहिजे अशी कादंबरी.
आजच नोंदणी करा…

  उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या या कायद्याच्या निमित्ताने ‘लव्ह जिहाद’विषयी थोडी विस्ताराने मांडणी करणे आवश्यक वाटते. हा धर्मांध मुस्लिमांनी काफरांना आपल्या धर्मात ओढण्याचा शोधलेला नवा मार्ग आहे. धर्मांतराच्या मार्गाने धर्मप्रसार हे इस्लामसाठी करावयाचे पवित्र काम आहे अशी समजूत आहे. त्यासाठी जिहाद करणे हे कट्टर मुस्लिमाचे कर्तव्य आहे. ‘लव्ह जिहाद’ हा हिंदू मुलींना जाळ्यात अडकविण्यासाठी स्वीकारलेला मार्ग आहे. या माध्यमातून जगातील एकमेव हिंदुबहुल असलेला हा देश हिंदुबहुल राहू नये यासाठी मांडलेला हा कुटील डाव आहे. त्यासाठी लक्ष्य केले जात आहे ते हिंदू धर्मातील किशोरवयीन मुली, तरुणींना. नवनवीन भौतिक गोष्टींचे, छानछोकीचे आकर्षण वाटण्याचे हे वय. या वयात अशी आमिषे दाखवून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे सोपे असते. त्यात जर मुलगी अगदी गरीब घरातली असेल तर खूप पटकन या प्रलोभनांना भुलते. प्रेमाचे नाटक करणारी व्यक्ती हेच तिचे जग होऊन बसते. अशी पूर्णपणे कह्यात आलेली मुलगी तो सांगेल त्या गोष्टीसाठी तयार होते. तिच्या या भारावलेपणाचा गैरफायदा घेत निकाह करण्याआधी धर्मांतर करण्याची अट घातली जाते वा निकाह झाल्यावर जबरदस्तीने, धाकदपटशाने तलाकची भीती घालत धर्म बदलायला भाग पाडले जाते. तेवढ्याने त्या अभागी मुलीचे दुर्दैव संपत नाही. मुले झाल्यानंतर कधीही तिला ‘तलाक’ म्हणत बाहेरचा रस्ता दाखवला जातो वा जीवे मारले जाते. अशी ही ‘लव्ह जिहाद’ची कार्यपद्धती आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 100हून अधिक अशा घटना समोर आल्या आहेत. यात ृअडकलेल्या सर्वच हिंदू मुलींचे लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलेले आहे. 
 
‘लव्ह जिहाद’ या प्रकारात मोडणार्‍या घटनांना प्रेमविवाह म्हणत अनेकजण सर्वसामान्यांची दिशाभूल करत असतात. इथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. विवाह - मग तो जुळवलेला असो वा प्रेमविवाह, भारतीय कायद्याच्या दृष्टीने एक प्रकारचा करार असतो. त्यानुसार, अशा विवाहासाठी मुलीची कोणत्याही दडपणाशिवायची षीशश लििीशिीं अपेक्षित असते. जेव्हा आंतरधर्मीय ‘प्रेमविवाह’ होतात तेव्हा दोन्ही व्यक्ती आपापला धर्म न सोडता ‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’खाली विवाहबद्ध होतात. मात्र जेव्हा प्रेमाचं नाटक करून मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं जातं, ‘धर्म बदललास तर लग्न लागेल वा तरच लग्न टिकेल’असं दडपण त्यांच्यावर आणलं जातं, तेव्हा विवाहातल्या षीशश लििीशिीं या संकल्पनेलाच सोडचिठ्ठी दिली जाते. तेव्हा कोणीही भलामण केली तरी ‘लव्ह जिहाद’ला प्रेमविवाह समजण्याची चूक करता कामा नये. 
 
लग्नासाठी धर्मांतर करणे हे बेकायदेशीर असल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटल्याचा आधार घेत,‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कडक पाऊल उचलण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका निवडणूक प्रचारसभेत केली होती. या वचनाची पूर्ती हा अध्यादेश काढून करण्यात आली आहे. हा विषय एका राज्यापुरता मर्यादित राहिलेला नसल्याने हा अध्यादेश सर्वांसाठी पथदर्शक ठरणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातही अनेक भोळ्याभाबड्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अलगद अडकत आहेत. यापायी अनेकींच्या आयुष्याची वाताहत झाली आहे तर अनेकजणींचे जीवन संपून गेले आहे.
 
 
म्हणूनच या संदर्भात कठोर कायदा करण्याबाबत पक्षनिरपेक्ष विचार होण्याची गरज आहे. सध्या मात्र जिथे भाजपाचे शासन आहे त्या राज्यात हा कायदा आणण्याचा विचार चालू आहे, असे दृश्य आहे. वास्तविक 2009 साली केरळ येथील उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यास सरकारला सांगितले होते. तरीही आजवर कोर्टाच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि ज्यांनी त्यासाठी पावले उचलली त्यांच्याविरोधात टीकेचा धुरळा उडवायला सुरुवात झाली. ही गोष्ट टीकाकारांच्या मुस्लीमधार्जिण्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. हिंदूविरुद्धच्या नियोजनबद्ध कटाकडे डोळेझाक केली, तर कदाचित आणखी काही वर्षांनी या देशातील लोकसंख्येची धर्माधारित विभागणी वेगळी असू शकते हे, केवळमतपेट्यांवर डोळा ठेवून एका गंभीर विषयाकडे डोळेझाक करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांना समजते आहे का?
 
 
कोणाच्याही दुष्कृत्यामुळे समाजाची घडी विस्कटू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असे कायदे केले जातात. त्यासाठी जे जबाबदार असतात त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्याचा उद्दामपणा टीकाकार दाखवत आहेत. त्यांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे.
 
तात्पर्य - धर्मांतरबंदी कायद्याला निमित्त ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे झाली असली, तरी या कायद्याची व्याप्ती आणि त्याचे परिणाम त्याहून अधिक आहेत, हे टीकाकारांनी लक्षात घ्यावे आणि ही उरबडवेगिरी थांबवावी.