साप्ताहिक ‘विवेक’ने लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘लोकमान्य टिळक - शतसूर्याचे तेज’ या भव्य ग्रंथाच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे.
काही थोर पुरुषांची छाया भविष्यावर फार दूरपर्यंत पडलेली असते. ‘लोकमान्य’ बाळ गंगाधर टिळक अशा महापुरुषांपैकी एक आहेत. महान स्वातंत्र्यसेनानी, धुरंधर राजनेता, भारतीय समाजाचे आत्मभान जागृत करणारे संघटक, प्रकांड विद्वान तत्त्वज्ञ-साहित्यिक-संशोधक, परखड व राष्ट्रनिष्ठ संपादक-पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, गणितज्ञ आणि एक ‘निष्काम कर्मयोगी’.. लोकमान्य टिळकांच्या व्यक्तित्वाचे आणि कार्याचे हे असे शेकडो पैलू शब्दांत सांगायचे झाले तर शब्दही अपुरे पडतील. महात्मा गांधींनी ‘आधुनिक भारताचे निर्माते’ अशा सार्थ शब्दांत लोकमान्यांचा गौरव केला. इंग्रजांनी लोकमान्यांना ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ म्हटले, तर काहींनी ‘फादर ऑफ इंडियन रेनेसान्स’देखील म्हटले.
2020 हे लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीचे वर्ष. अशा ऐतिहासिक प्रसंगी टिळकांसारख्या एका महातेजस्वी सूर्याचा वारसा पुन्हा जागृत करणे आणि त्याकरिता मुळात टिळकांच्या व्यक्तित्वाचे आणि कार्याचे असंख्य पैलू नव्याने समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. याचकरिता साप्ताहिक ‘विवेक’ने टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘लोकमान्य टिळक - शतसूर्याचे तेज’ या भव्य ग्रंथाच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे.
‘लोकमान्य टिळक - शतसूर्याचे तेज’ या विवेकच्या आगामी ग्रंथातून लोकमान्यांच्या कार्याचा अत्यंत विस्तृत व व्यापक असा आढावा घेतला जाणार असून यामध्ये टिळकांचे राजकारण, समाजकारण, राष्ट्रवाद, धर्मविषयक चिंतन, शिक्षणविषयक विचार, आर्थिक विचार, पत्रकारिता, साहित्य, टिळकांची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा, टिळकांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या विविध क्षेत्रांतील संस्था-संघटना, टिळकांचा वारसा अशा अनेक पैलूंचा समावेश आहे. तसेच, महाराष्ट्र राज्यातील व देशाच्या अन्य राज्यांतील अनेक ठिकाणच्या विविध तज्ज्ञांचे, अभ्यासकांचे अभ्यासपूर्ण लेख यामध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरविंद गोखले, ज्येष्ठ लेखक व इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे, राज्यसभा खासदार प्रा. राकेश सिन्हा, माजी आमदार व ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक मोडक, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक गिरीश प्रभुणे, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, ज्येष्ठ लेखक व इतिहास संशोधक डॉ. शेषराव मोरे, गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, माजी राज्यसभा खासदार तरुण विजय, ज्येष्ठ लेखिका डॉ. शामा घोणसे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रा. डॉ. संजय तांबट, अर्थतज्ज्ञ डॉ. प्रदीप आपटे, ज्येष्ठ लेखक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबा नंदनपवार, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. सुवर्णा रावळ, स्तंभलेखक मल्हार गोखले, ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे आदींसह अनेक दिग्गज, तज्ज्ञ मान्यवरांचा समावेश आहे.
‘लोकमान्य टिळक - शतसूर्याचे तेज’ या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे टिळकांच्या कार्याचा केवळ इतिहास न मांडता आजच्या काळाच्या अनुषंगाने त्याचा अन्वयार्थ या ग्रंथामध्ये वाचावयास मिळेल. उदाहरणार्थ, आज देशात ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेची आणि नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, स्वयंसाहाय्यता, राष्ट्रीय शिक्षण आदी अनेक मुद्द्यांतून या सर्व विषयांवर शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच विस्तृत भाष्य केले आहे. त्यामुळे देशात आज ‘राष्ट्रीयत्व’ केंद्रस्थानी ठेवून राजकीय, आर्थिक, शैक्षणिक पुनर्मांडणी होत असताना टिळकांचे त्याबाबतचे भाष्य समजून घेणे निश्चितच महत्त्वाचे ठरते.
या ग्रंथप्रकल्पाद्वारे साप्ताहिक विवेकद्वारा लोकमान्यांच्या कार्याबाबत सखोल व व्यापक भाष्य करणारा एक भव्य असा ग्रंथ वाचकांपुढे प्रस्तुत करण्यात येत आहे. साप्ताहिक विवेक वा एकूणच विवेक समूह ही खरे तर कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांसाठीच चालवलेली माध्यमसंस्था. या संस्थेला कोणी ‘मालक’ नाहीत. ही संस्था कुणा बड्या उद्योगपतीच्या किंवा एकाच राजकीय घराण्याच्या खासगी मालकीची नाही. एका प्रखर विचाराने प्रेरित असे कार्यकर्तेच या संस्थेचे चालक, मालक, वाचक असे सर्वकाही आहेत. याच कार्यकर्त्यांच्या अपार कष्टांच्या, संघर्षाच्या जोरावर, कित्येक वाचक-वर्गणीदार-जाहिरातदार-हितचिंतकांच्या शुभेच्छांच्या आणि आशीर्वादांच्या पाठबळावर ‘विवेक’सारखी संस्था वाढली, बहरली. कोरोनाच्या प्रादुर्भावात, आपणा सर्वांच्याच एकूणच दैनंदिन जीवनमानावर प्रतिकूल परिणाम झालेला असतानाही अशा काळात साप्ताहिक विवेकने ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ हा अभिनव आणि भव्य प्रकल्प हाती घेतला आणि आपणा सर्व वाचक-हितचिंतकांकडून त्याला तितकाच भव्य आणि उदंड प्रतिसाद मिळाला. किंबहुना तो अजूनही मिळतोच आहे. आपणा सर्वांचे हे पाठबळ विवेकचा हुरूप वाढवणारे, प्रेरणा देणारे आहे. ‘लोकमान्य टिळक - शतसूर्याचे तेज’ या आगामी प्रकल्पासही आपणा सर्वांचे असेच आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभतील व त्यातून हा ग्रंथ असेच उदंड यश मिळवेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.