‘द पोस्टमन’ हे चॅनेल नुकत्याच झालेल्या एका वादामुळे माध्यमात गाजले. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाऊ तोरसेकर यांच्या एका व्हिडीओखालील कमेंट पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या लक्ष्मीकांत खाम्बिया नावाच्या एका पदाधिका-याने पोलिसात तक्रार दिली. या माध्यमातून सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली जाते आणि हे चॅनेल चालवणारे लोक शरद पवार यांच्या हत्येचा कट रचत असल्याचेही या व्यक्तीने तक्रारीत म्हटले होते. ‘हत्येचा कट’ हा शब्द ऐकताक्षणीच माध्यमांनी त्याची ब्रेकिंग न्यूज केली हे वेगळे सांगायलाच नको. सनसनाटी हेडलाईनसाठी सदासर्वकाळ भुकेले असलेल्या पत्रकारांनी आणि वाहिन्यांनी हे प्रकरण लावून धरले.
‘द पोस्टमन’ हे चॅनेल नुकत्याच झालेल्या एका वादामुळे माध्यमात गाजले. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाऊ तोरसेकर यांच्या एका व्हिडीओखालील कमेंट पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या लक्ष्मीकांत खाम्बिया नावाच्या एका पदाधिका-याने पोलिसात तक्रार दिली. या माध्यमातून सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली जाते आणि हे चॅनेल चालवणारे लोक शरद पवार यांच्या हत्येचा कट रचत असल्याचेही या व्यक्तीने तक्रारीत म्हटले होते. ‘हत्येचा कट’ हा शब्द ऐकताक्षणीच माध्यमांनी त्याची ब्रेकिंग न्यूज केली हे वेगळे सांगायलाच नको. सनसनाटी हेडलाईनसाठी सदासर्वकाळ भुकेले असलेल्या पत्रकारांनी आणि वाहिन्यांनी हे प्रकरण लावून धरले. ‘शरद पवार यांच्या हत्येचा कट’ अशा मथळ्याखाली बातम्याही छापून आल्या. टीव्ही वाहिन्यात कवरेज दिले गेले. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याने ही बातमी तितकाच रस घेऊन चघळली गेली. पण मुळात ज्या कमेंटवरून राष्ट्रवादीच्या त्या पदाधिका-याने 'द पोस्टमन' आणि भाऊ तोरसेकर यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली ती कमेंट नक्की काय होती? महाराष्ट्रात कुणी खरंच शरद पवार यांच्या हत्येचा कट रचत आहे का? युट्युबवरील एखाद्या व्हिडीओखाली केलेली कमेंट एखाद्याच्या हत्येचे कारण ठरू शकते का? मुळात ती कमेंट किती दखलपात्र आहे हा विचार कुणी केल्याचे पाहण्यात नाही. राष्ट्रवादीच्या समस्त कार्यकर्त्यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना तो विचार केला नाही. ब्रेकिंग न्यूजच्या हव्यासापोटी बातमी देऊन बसलेल्या प्रस्थापित माध्यमांनी तर हे सगळे सत्यशोधन करण्याचा दुरान्वयेही संबंध येत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन नेमक्या कोणत्या कारणावरून तक्रार करण्यात आली हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
गेल्या काही काळात पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी 'द पोस्टमन'च्या माध्यमातून शरद पवार यांच्या राजकारणावर टीका करत विरोधाची बाजू बळकट करण्याचे काम केले आहे. सुमारे पन्नास वर्षे पत्रकारिता करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने शरद पवारांसारख्या ज्येष्ठ राजकारण्यावर मत व्यक्त करणे आणि उघडउघड टीका करणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना आधीपासूनच खुपत होते हे विसरून चालणार नाही. विरोधाचा आवाज मोठा होत गेला तशी त्यांची अस्वस्थता वाढत गेली हे भाऊ तोरसेकर यांच्यावर वेळोवेळी झालेल्या शाब्दिक हल्ल्यांतून सहज लक्षात येते. पण तोरसेकर यांनी तरीही या विरोधाला न जुमानता शरद पवारांच्या राजकारणावर ताशेरे ओढणे चालूच ठेवले. 'द पोस्टमन'च्या अशाच एका व्हिडीओखाली कुठल्यातरी प्रेक्षकाने ‘शरद पवार यांच्या चड्डीत सुतळी बॉम्ब लावण्याची हीच योग्य वेळ आहे' अशी कमेंट केली. वास्तविक अशा अर्थाच्या अनेक दुर्लक्षणीय कमेंट प्रत्येक व्हिडीओच्या खाली येत असतात. खुल्या माध्यमांवर कुणीही कुणाच्या मत व्यक्त करण्याच्या अधिकारावर बंधन घालू शकत नाही. पण तिथे आलेल्या कमेंट्सपैकी कोणती गंभीर आणि कोणती अदखलपात्र हे किमान राजकीय समज असलेल्या कुणालाही सहज समजू शकते. वर उल्लेख केलेली कमेंट राष्ट्रवादीच्या एका पदाधिका-याला, लक्ष्मीकांत खाम्बिया यांना अत्यंत गंभीर वाटली. कुठल्यातरी अज्ञात व्यक्तीने केलेली ती कमेंट पाहून 'द पोस्टमन' चॅनेलचं शरद पवार यांच्या हत्येचा कट रचत असल्याचे त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने ताडले. ताबडतोब त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्थानक गाठले आणि ‘द पोस्टमन' तसेच भाऊ तोरसेकर हे शरद पवार यांच्या हत्येचा कट रचत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. आणि तक्रारीचे ‘गोपनीय’ पत्र पोलिसांना दिल्यानंतर ते अतिशय तत्परतेने माध्यमांच्या हवाली केले. माध्यमांनीही क्षणाचाही विलंब न लावता ‘शरद पवार यांच्या हत्येचा कट’ अशा शीर्षकाखाली ब्रेकिंग न्यूज चालवली आणि या ‘गोपनीय’ पत्राचे छायाचित्र वाहिन्यांवरून जगाला दाखवले.
खरंच कुणीतरी पवारांच्या हत्येचा कट करत असल्याच्या भयाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संपप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करण्यात आली आणि दोन-तीन दिवसांनी हे वादळ शमले. एकूण प्रकरणात नक्की कुणी शरद पवारांच्या हत्येचा कट रचला? हत्या कुठे घडवून आणण्यात येणार आहे? हत्येसाठी शस्त्र कोणते वापरले जाणार आहे? या सर्व गोष्टी तरी किमान माध्यमांनी गोपनीय ठेवल्या हेही नसे थोडके, पण या निमित्ताने आपली प्रस्थापित माध्यमे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किती उथळ समज असलेले आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. बातमीची शहानिशा न करता कच्च्या माहितीवर आधारलेली तथ्ये सांगून तहलका माजविण्यासाठी ही माध्यमे किती आतूर असतात हेही या निमित्ताने दिसून आले. शरद पवार यांच्यावरची एखादी बातमी जेव्हा या माध्यमांच्या फेसबुक पेजेस किंवा युट्युबवर टाकली जाते, तेव्हा पवार यांच्या विरोधात यापेक्षा द्वेषपूर्ण कमेंट्स येतात, त्याबाबतीत ही माध्यमे किती जागरूक असतात? ‘चड्डीत सुतळी बॉम्ब फोडण्याची हीच ती वेळ’ या उथळ कमेंटमधून पवारांच्या हत्येचा कट शिजत असेल तर महाराष्ट्रात आजवर पवारांच्या हत्येचे किती कट रचले गेले याची मोजदादही करता येणार नाही इतके शरद पवारांचे नेतृत्व 'लोकप्रिय' आहे. या सगळ्या गोष्टी विचारात न घेता, एखाद्या कार्यकर्त्याला वाटले आणि त्याने तक्रार दिली. तिचा संदर्भ देत आकाशपाताळ एक करणाऱ्या माध्यमांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या राजकीय बुद्धीची तपासणी करून घेण्याची ‘हीच ती वेळ’ आहे हे यातून ठळकपणे जाणवले आहे.
अक्षय बिक्कड
८९७५३३२५२३