मनीषा अतुल
निरोगी त्वचेसाठी आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतर कारणांनी झालेल्या त्वचाविकारांवरचा उपायदेखील योग्य आहारात आहे. आपल्याला शरीराच्या वाढीकरिता, चयापचयाकरिता व शरीराच्या सर्व क्रियांकरता आवश्यक ते अन्नघटक आहारातून मिळतात. अन्नघटकांची कमतरता त्वचेवर निरनिराळया रूपांत उमटते.
त्वचा हा शरीराचा आरसा आहे. तुमचे आरोग्य तुमच्या त्वचेवरून मापता येऊ शकते. सतेज, रसरशीत, गुलाबीसर त्वचा आपल्याकडे सुंदर गणली जाते. वैद्यकीयदृष्टयादेखील निरोगी त्वचेची लक्षणे हीच आहेत. किंबहुना निरोगी माणसाची हीच प्राथमिक लक्षणे आहेत. त्वचा सुंदरही तेव्हाच दिसते, जेव्हा ती निरोगी असते. त्वचेचा रंग हा सौंदर्याचा मापदंड नसतो, कारण तो रंग आनुवंशिकतेवर जसा अवलंबून असतो, तसाच आपल्या भौगोलिक परिस्थितीवरही बराचसा अवलंबून असतो. आफ्रिकन लोकांच्या त्वचेचा रंग घट्ट काळा असतो, तर पाश्चिमात्य देशांमधील स्वच्छ पांढुरका गोरा. आशिया खंडातील त्वचा या दोघांच्या मधल्या स्केलवर असते. साधारण गुलाबी गोरी ते सावळी - सरासरी गहूवर्ण म्हणता येईल. त्यामुळे त्वचेच्या रंगापेक्षा त्याच्या निरोगीपणाला जास्त महत्त्व आहे, हे लक्षात ठेवू या.
त्वचाविकारांची कितीतरी कारणे असतात, ती आधी समजून घेऊ या. सगळयाच कारणांवर आहारशास्त्रात उपाय नसले, तरी हे घटक एकमेकांवर परिणाम करणारे असतात. त्यांचे परिणाम व आहार परस्परावलंबी असतात.
कारखान्यांचा अथवा वैद्यकीय कचरा वाहवला जात असेल, तर पाण्याचे स्रोत दूषित होतात व त्वचेवर रासायनिक व जैविक हल्ला होऊन त्वचाविकार होऊ शकतात. तरणतलावात मिसळलेले क्लोरीन, ब्लीचिंग पावडर जास्त प्रमाणात असेल तरी त्वचेवर दुष्परिणाम होतो. आपण वापरत असलेले शाम्पू, साबण, कॉस्मेटिक्स, परफ्यूम्सदेखील आपल्या त्वचेसाठी घातक ठरू शकतात.
8) स्वच्छतेचा अभाव - आपल्या त्वचेवर रोमछिद्रे असतात. त्यातून त्वचेच्या ओलाव्यासाठी व शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी घामाचे बाष्पीभवन होत असते. त्यासाठी रोमछिद्रे उघडी राहणे आवश्यक आहे. त्वचेवर घाण, धूळ जमा झाल्यास किंवा मेकअप असल्यास रोमछिद्रे बंद होतात ज्यामुळे जंतुसंसर्ग होऊन त्वचेवर पुरळ येणे, मुरूम येणे, खाज सुटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. बरेचदा जंतुसंसर्ग वाढून खरूज, एक्झिमा यासारखे विकार होऊ शकतात.
9) अयोग्य आहार - अपुरा व असंतुलित आहार त्वचाविकारांचे मुख्य कारण आहे.
- जीवनसत्त्व 'क' - हे दाढेच्या व दातांच्या मजबुतीकरिता आवश्यक आहे. त्याच्या अभावाने दाढेतून रक्त येते, दाढा सुजतात व काळपट पडून दात ढिले होत पडू शकतात.
जीवनसत्त्व 'क' ऍंटीऑक्सिडंटचे काम करते, जे त्वचेला सूर्यकिरणांपासून होणारी हानी कमी करते आणि सूर्यकिरणांमुळे त्वचेत निर्माण होणाऱ्या मेलानिन रंगद्रव्याच्या प्रभावामुळे येणारे एजिंग स्पॉट्स फिके करते किंवा नाहीसे करते. शरीरातील हायल्यूरॉनिक (hyaluronic) ऍसिडचा उपयोग करायला मदत करते. हायल्यूरॉनिक ऍसिड हा कोलॅजेनच्या निर्मितीकरिता आवश्यक घटक आहे. 'कोलॅजेन' काय आहे? तर हा त्वचेच्या आरोग्यासाठी मुख्य घटक आहे. हे एक प्रकारचे प्रथिन आहे. ते शरीरातील विविध अवयवांना जोडण्याचे व आधार देण्याचे काम करीत असते, त्वचेला आकार देते, त्वचेची लवचीकता व ओलावा कायम राखते. जसजसे वय वाढू लागते, तसतशी शरीरात कॉलेजन निर्मिती कमी होऊ लागते व परिणामी त्वचेवर सुरकुत्या पडतात, त्वचा कोरडी पडते. कोलॅजेनपूरक आहार तारुण्य राखण्यास मदत करतो. त्वचेवरील मुरूम, पुरळ कमी करतो. केसांची व नखांची वाढ व्हायला मदत करतो. याच्या कमतरतेने केस गळणे, केसात कोंडा होणे, नखे ठिसूळ होणे अथवा तुटणे, नखांवर डाग पडणे इत्यादी लक्षणे दिसतात. म्हणून त्वचा-नखे-केस यांच्या आरोग्याकरिता आपण जीवनसत्त्व 'क'ची प्रचुर मात्रा असलेले लिंबू, संत्रा, टमाटे, दही यांचा वापर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन म्हणून करतो. जीवनसत्त्व 'क'चे आहारातील प्रमाण वाढवायला हिरव्या पालेभाज्या, विशेषतः कोथिंबीर, रंगीत भाज्या व फळे, टमाटे, लिंबू वर्गातील फळे - उदा. मोसंबी, संत्री, आवळा इत्यादींचा समावेश करता येईल.
गव्हाचे सत्त्व, सनफ्लॉवर, कॉर्न, सोयाबीन, सोयाबीन तेल, शेंगदाणा, बदाम यापासून जीवनसत्त्व 'ई' मिळवता येते.
- खनिजे - लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, कॉपर यासारखी खनिजे आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. लोहाच्या कमतरतेने रक्तक्षय होतो. त्वचा पांढरी व फिकट पडते. गूळ, मसूर, हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर, गोड लिंब, शेवगा, मोड आलेली कडधान्ये, अंडयाचा पिवळा भाग इत्यादींमध्ये विपुल प्रमाणात लोह आढळते.
सालींसह संपूर्ण कडधान्य - विशेषतः चवळी, तसेच बदाम, काजू, पोल्ट्री पदार्थ यात झिंक भरपूर असते.
- स्निग्ध पदार्थ - आपण ओमेगा-3 फॅटी ऍसिड हे नाव सतत ऐकतो. काय आहे हा घटक? ओमेगा-3 फॅटी ऍसिड हा स्निग्ध पदार्थांमधील घटक आहे. स्निग्ध पदार्थ शरीरपेशींचा महत्त्वाचा घटक. शरीराला ऊर्जा देणे हे स्निग्ध पदार्थांचे काम. शरीरात वसा म्हणजे 'फॅट'च्या रूपात ऊर्जा साठवून ठेवली जाते. हे फॅट त्वचेखाली सबक्युटेनस पेशींमध्ये साठवली जाते किंवा यकृत, हृदय, मूत्रपिंड, डोळे यासारख्या अतिमहत्त्वाच्या अवयवांभोवती त्यांना संरक्षक कवच म्हणून साठवली जाते.
या स्निग्ध पदार्थात काही जीवनावश्यक जीवनसत्त्वे विरघळलेली असतात - उदा., अ, ड, ई, के. शिवाय महत्त्वाची फॅटी ऍसिड्स स्निग्ध पदार्थात असतात. त्यामुळे ते आहारातील महत्त्वाचा घटक ठरतात.
ओमेगा 3 फॅटी ऍसिड हा घटक त्वचेवरील सूज उतरवतो. त्वचेला ओलावा व तजेला देतो. तिचा पोत घट्ट जाड, मात्र लवचीक करतो. सुरकुत्या दूर करतो. मास, मासे, माशांचे तेल, कॉड लिव्हर ऑइल, पोल्ट्री, अंडयातील पिवळे बलक (egg yolk), तेलबिया - विशेषतः जवस, सूर्यफूल बिया व तेल, सोयाबीन, कापसाच्या बियांचे तेल (कॉटन सीड ऑईल), सुकामेवा - विशेषतः अक्रोड यात हा घटक भरपूर प्रमाणात आढळतो.
वर दिलेल्या त्वचाविकारांच्या कारणांचा परिणाम योग्य आहार घेऊन कमी करता येतो का, बघू या. अगदी सरळ सरळ ते परिणाम नाहीसे करता येत नसले, तरीदेखील योग्य आहाराने त्याला नक्कीच कमी करता येऊ शकते. ते परस्पर निगडित असल्याने अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. मधुमेह, यकृत व मूत्रपिंडविकार, अन्नघटकांच्या कमतरतेमुळे झालेले विकार यावर औषधी व आहार नियोजनाने संपूर्ण नियंत्रण मिळवता येऊ शकते. अपुऱ्या झोपेमुळे त्वचेवर परिणाम होतो. त्याचाही संबंध आहाराशी आहेच. कॅल्शियमची कमतरता हे कमी झोप लागण्याचे कारण असू शकते. वयपरत्वे पोटातून कॅल्शिअमचे शोषण कमी होते, त्यामुळे आहारात उपलब्ध कॅल्शिअम पूर्ण वापरता येत नाही. त्यासाठी जीवनसत्त्व 'क' उपयोगी ठरू शकते.
झोपेवर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे, जड व न पचणारा आहार. विशेषतः रात्री उशिरा जेवण व जेवल्याबरोबर झोपायला जाणे. तळकट, तेलकट, जास्त तिखट पदार्थांचे सेवन, या गोष्टी झोपेवर प्रभाव टाकतात. यावर उपाय म्हणजे रात्रीचे जेवण लवकर घ्यावे. झोपण्याच्या (किमान दोन तास आधी). जेवण हलके व कमी मसाल्याचे असावे. झोपेपूर्वी गरम दूध फायद्याचे ठरेल.
थोडक्यात सांगायचे झाल्यास *निरोगी व सुंदर त्वचेसाठी* हवी असेल तर खालील गोष्टी कराव्यात -
तळकट, तेलकट पदार्थांपासून दूर राहावे. त्यांच्या अतिसेवनाने चेहऱ्यावर मुरूम, पुरळ व फोड येतात.
भरपूर पाणी प्यावे. दिवसातून कमीत कमी दहा प्याले पाणी प्याल्याने शरीरातील सर्व हानिकारक द्रव्ये वाहून नेली जातात. त्वचेची ओल व लवचीकता वाढते. त्वचा रसरशीत व तजेलदार दिसते.
'समतोल आहार' घ्यावा. समतोल आहार म्हणजे ज्यात अन्नवर्गातील सर्व घटकांचा आवश्यक प्रमाणात समावेश असेल - उदा., एकदल व द्विदल धान्य (गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, कडधान्ये, उसळी, स्निग्ध पदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मास, मासे, पालेभाज्या, फळभाज्या, इतर भाज्या, फळे, गूळ इत्यादी.)
आहारात हिरव्या पालेभाज्या, रंगीत भाज्या व फळे ठेवावी. जेवताना किमान बशीभर सलाड जरूर खावे, लिंबू, टमाटे यांचा भरपूर उपयोग करावा. लिंबू खाण्यापूर्वी त्वरित चिरावे. आधी चिरून ठेवल्याने लिंबातील जीवनसत्त्व 'क'चे प्रमाण कमी होते.
दुधाचे व दह्याचे नियमित सेवन करावे.
गायीचे तूप, शेंगदाणा, तीळ, जवस, खोबरे, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादीचे तेल आलटून पालटून घ्यावे.
एकाच प्रकारचे धान्य रोज खाण्यापेक्षा सर्व प्रकारचे धान्य व तेलबिया आलटून पालटून खाण्यात असाव्यात.
कोरफड (ऍलो वेरा) पोटात घेता येईल किंवा त्वचेवर वरून लावल्यास त्वचेला कांती येईल, त्वचेची झीज भरून निघेल व जखमा दुरुस्त होतील.
आंबा, पपई, टरबूज, डाळिंब इत्यादींमधील कॅरोटीन या घटकामुळे त्वचेला जीवनसत्त्व 'अ'चा पुरवठा होईल, त्वचा नितळ गुलाबीसर दिसेल.
योग्य व पोषक आहाराने आपण त्वचेचे सौंदर्य व आरोग्य मिळवू शकतो व कायम राखू शकतो, जेणेकरून त्वचाविकार होणार नाहीत व झाल्यास औषधांचा भडिमार न करता आहारातून इलाज करता येईल.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
9823262966