सुदैवाने राष्ट्रभावनेला सर्वोच्च प्राधान्य देणारे शासकही आज केंद्रीय सत्तेत असल्यामुळे न्यायालयाने कौल दिल्यानंतर फार वेळ न दवडता आता न्यासाची घोषणा करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच श्रीरामाच्या भव्य मंदिराची निर्मिती सुरू झालेली आपल्याला दिसेल.
'सौगंध राम की खातें है, हम मंदिर वहीं बनाएंगे..' स्वत्वाच्या अभिमानाचं स्फुल्लिंग जागृत करणारी ही घोषणा देत, रामजन्मभूमीवर श्रीरामाचं भव्य मंदिर उभारण्याचं स्वप्न या देशातील हिंदूंच्या तीन पिढयांनी उराशी बाळगलं. त्या स्वप्नाची पूर्तता होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या स्थापनेद्वारे पडलं आहे. अर्थात, हे पाऊल पडण्यापूर्वीची सारीच वाटचाल ही संघर्षाची, काटयाकुटयांची आणि अनंत अडचणींची होती, हे आपण सर्व जण जाणतोच. म्हणूनच, प्रत्येक राष्ट्राभिमानी हिंदूसाठी हा क्षण आत्यंतिक आनंदाचा, अभिमानाचा आणि मुख्य म्हणजे स्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल होण्याचा क्षण आहे.
कोटयवधी भारतीय नागरिकांच्या हृदयांत रामाचं स्थान हे केवळ एका दैवतापुरतं मर्यादित नसून राम हे या भारतवर्षाच्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आसेतुहिमाचल पसरलेल्या आणि कित्येक भाषा-बोली, जाती-जमाती, भौगोलिक विविधतेने नटलेल्या या भारतातील ठिकठिकाणच्या परंपरा, चालीरिती, साहित्य-कला, मूल्यं-संस्कार यांमध्ये राम हे खोलवर रुजलेले आहेत. आदर्श, कल्याणकारक, सुजलाम-सुफलाम राज्याला आपण 'रामराज्य' म्हणतो. येता-जाता भेटणाऱ्यास आपण 'राम राम' म्हणतो, तर व्यक्तीच्या अंतिम संस्कारांच्या वेळीही आपल्याकडे रामनामाचाच जप केला जातो. राम हा आपल्यासाठी आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श योध्दा, आदर्श राजकारणी, आदर्श मित्र आणि असा अनेक बाबतींत 'आदर्श' मानण्यात आलेला आहे. इतक्या प्रचंड विविधतेने समृध्द असलेल्या भारतवर्षाला एकत्र आणण्यास, या राष्ट्राची राष्ट्रभावना जागृत ठेवण्यास जे काही घटक कारणीभूत ठरतात, त्या घटकांत 'राम'नाम अग्राक्रमाने घ्यावं लागतं. म्हणूनच, राम हे भारताच्या अस्मितेचं प्रतीक ठरतं आणि आपण ज्या अयोध्येस रामाचं जन्मस्थान मानतो, ते स्थान व त्यावरील रामाचं प्रस्तावित मंदिर हे केवळ एखाद्या हिंदू मंदिरापलीकडे जाणारं एक राष्ट्रीय स्मारक ठरतं.
सुदैवाने राष्ट्रभावनेला सर्वोच्च प्राधान्य देणारे शासकही आज केंद्रीय सत्तेत असल्यामुळे न्यायालयाने कौल दिल्यानंतर फार वेळ न दवडता आता न्यासाची घोषणा करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच श्रीरामाच्या भव्य मंदिराची निर्मिती सुरू झालेली आपल्याला दिसेल. अर्थात, यामध्येही अडथळे आणण्याचे प्रयत्न काही किरकोळ मंडळी करतीलच. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासात अमुक जातीचेच लोक का, अमुक जातीचे का नाहीत वगैरे गरळ काही मंडळींनी ओकली आहेच. परंतु इतकी वर्षं उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ततेच्या दिशेने वाटचाल करत असताना अशा स्थितीत सकल हिंदू समाज अशा क्षुल्लक मंडळींना थारा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तूर्तास, न्यास स्थापनेच्या या निर्णयाबद्दल केंद्रीय नेतृत्वाचं व मंत्रीमंडळाचं अभिनंदन. आता या स्वप्नाची पूर्तता लवकरच होईल आणि अयोध्येतील 'त्या' जागेवर भव्य राममंदिर लवकरच उभं राहील, अशी अपेक्षा करू या.
- विशेष संपादकीय