‘मधुगंध’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन
जालना : देवगिरी प्रांताचे पहिले संघचालक मधुकरराव उर्फ अण्णा गोसावी यांच्या आठवणींना उजाळा देणार्या व त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणार्या ‘मधुगंध’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन 28 फेब्रुवारी रोजी भारती लॉन्स येथे रा.स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते भव्य सोहळ्यात करण्यात आले. सा. विवेक आणि कै. मधुकरराव उपाख्य अण्णा गोसावी स्मृतिग्रंथ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. भगवान महाराज आनंदगडकर होते, तर देवगिरी प्रांत संघचालक मधुकरराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विवेक समूहाचा नवीन उपक्रम असलेल्या ‘कृषी विवेक’ या मासिकाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण महिको सीड्सचे राजेंद्र बारवाले यांच्या हस्ते करण्यात आले. ‘विवेक समूह’चे महेश पोहनेरकर, जयंत धानोरकर, दाजी जाधव, संतोष तिवारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या सोहळ्याला शेकडो संघप्रेमी, तसेच जालना आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येनेे उपस्थिती होती.
यावेळी सुहासराव म्हणाले, ‘‘स्व. मधुकरराव उर्फ अण्णा गोसावी हे उत्तम संघटक होते. अण्णांनी स्वत:ला संघकार्यासाठी झोकून दिले होते. संघकार्यास प्रथम स्थान देऊन त्यांनी आध्यात्मिक कार्यासाठी वेळ दिला. पस्तीस ग्रंथांचे लिखाणही केले. अण्णाजी म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. परंतु त्यांनी आपले वेगळेपण समाजापासून कायम दूर ठेवून साधे सरळ जगणे पसंत केले.’’
मधुकरराव जाधव यांनीही अण्णांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘स्व. अण्णांनी स्वयंसेवक म्हणून अतिशय वैराग्यपूर्ण आयुष्य काढले. सहज बोलणे व हितोपदेश करणे हा अण्णांचा स्वभावविशेष होता. अण्णा गोसावी यांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायक असून त्यांनी हयात असताना सर्वांना मार्गदर्शन केले. आता त्यांच्या स्मृतीदेखील मार्गदर्शन व प्रेरणादायक ठरतील.’’
स्मृतिग्रंथ समितीचे सचिव जयंतराव धानोरकर यांनी प्रास्ताविक केले. ‘‘अण्णा गोसावी यांनी आपल्या जीवनात संघकार्याबरोबरच अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. ते प्रसिद्ध वकील होते. जनसंघ-जनता पार्टी-भाजपा अशा राजकीय प्रवासाचे ते साक्षीदार होते. आध्यात्मिक क्षेत्रातही अण्णांनी खूप मोठे कार्य केले आहे. ते संतसाहित्याचे अभ्यासक होते. संतसाहित्यावर त्यांनी विपुल लिखाण केले आहे. पुढील पिढीस त्यांच्या जीवनकार्याचा परिचय व्हावा आणि त्यांच्या प्रेरणादायक स्मृती जपता याव्या, यासाठी ‘मधुगंध’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करत आहोत,’’ असे ते म्हणालेे.