दिल्लीतील दंगलीमध्ये हिंसक मुस्लीम जमावाने केलेल्या गोळीबारात मुख्य पोलीस हवालदार रतनलाल बारी हुतात्मा झाले. हुतात्मा रतनलाल बारी राजस्थानमधील फतेपूर शेकावटी जिल्ह्याचे मूळ रहिवासी होते. त्यांचे जन्मगाव तिहावली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदी विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांनी विवेक समूहातर्फे तिहावली गावी जाऊन हुतात्मा रतनलाल बारी यांच्या परिवाराची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
पेडणेकर यांनी हुतात्मा रतनाल यांच्या पत्नी पूनम बारी यांची भेट घेऊन विवेक परिवाराची सहसंवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवली. या वेळी पूनम बारी यांनी पती रतनलालजींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, “रतनलालजींना त्यांच्या गणवेशाविषयी अतिशय प्रेम होतेे. एका सैनिकाप्रमाणे ते कर्तव्यभावनेने निरंतर त्यांची ड्युटी करत असत. आपल्या जीवनात कायम कर्तव्याला प्राधान्य देणार्या रतनलालजींचा अंतिम क्षणही कर्तव्य पूर्ण करत असतानाच आला.” हे सांगताना त्यांच्या बोलण्यातून पतीविषयीचा अभिमान व्यक्त होत होता. आपल्या मुलाला, रामलाही पोलीस दलात किंवा सैन्यदलात भरती करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
पुत्रवियोगामुळे अश्रू अनावर झालेली रतनलालजी यांची आई म्हणाली, “रतनलालच्या जाण्याने आम्हाला मोठाच धक्का बसला आहे. रतनलाल हा कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा असल्याने सर्व जबाबदारी सांभाळणार्या मुलाला आम्ही गमावले आहे.”
रतनलाल यांचा भाचा राकेश बारी म्हणाले, “हा काही सामान्य मृत्यू नाही. मुस्लीम दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलेय. गोळी लागल्यानंतरही रतनलालजी यांनी आपले वरिष्ठ डीसीपी अमित शर्मा यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी डिव्हायडरच्या एका बाजूने मुस्लीम जमाव गोळीबार करत होता आणि मधोमध डीएसपी आणि अन्य पाच पोलीस कर्मचारी अडकले होते. त्या वेळी रतनलाल यांनी जखमी डीएसपींना उचलून डिव्हायडरच्या पलीकडच्या बाजूला ठेवले. डीएसपींचा जीव तर वाचला, मात्र काही क्षणातच रतनलाल जमिनीवर कोसळले. त्यांना गोळी लागल्यामुळे रस्त्यावरच जखमी अवस्थेत कोसळले. त्या स्थितीतही मुस्लीम जमावातील काहींनी त्यांना ओढून आपल्या जमावाकडे नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सजगतेमुळे ते शक्य झाले नाही. त्यांच्या एका खांद्यातून गोळी घुसून हृदयाचा छेद घेत दुसर्या खांद्यात येऊन थांबली होती.” राकेश बारी पुढे म्हणाले की, “ती गोळी कोणत्याही साध्या बंदुकीतून चालवलेली नव्हती. ती 15 एमएमची गोळी होती, जी आधुनिक पिस्तुलातून चालवलेली होती. अशी हत्यारे सर्वसामान्य लोकांकडे नसतात. अशा प्रकारच्या दहशती कारवायांची पूर्ण तयारी दहशतवादी संघटनांकडेच असते.” या गोष्टीचा उल्लेख करताना राकेश बारी न्याय आणि प्रशासन व्यवस्थेविषयी म्हणाले, “आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही. पण ज्या प्रकारे देशातील वातावरण बिघडवण्यासाठी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीसारख्या शहराला दंगलीच्या आगीत बेचिराख करण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते पाहता अशा दहशतवादी विचारधारेच्या दोषींना पकडून लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे.”
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी रतनलाल यांना हुतात्मा घोषित केल्याचे समाधान या वेळी रतनलालजी यांचे भाऊ दिनेश बारी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, “हे हौतात्म्य रतनलालजी यांचा गौरव आहे.” माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजपाचे शिकर येथील खासदार स्वामी सुभेदानंद, भाजपाचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज त्रिपाठी, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बारी परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल्याचेही दिनेश यांनी सांगितले.
विवेक परिवाराच्या माध्यमातून बारी परिवाराला दिलेल्या या सांत्वनपर भेटीदरम्यान ‘विवेक विचार मंच’द्वारे भविष्यात पूनम बारी यांना आवश्यक ते सहकार्य देण्याबाबत आश्वस्त करणारे पत्र देण्यात आले. तसेच हिंदी विवेक प्रकाशित ‘महात्मा गांधी : एक सोच’ आणि ‘महिला विशेषांक’ही त्यांना देण्यात आला. या भेटीदरम्यान तिहावली गावातील प्रमुख लोक उपस्थित होते. त्यांनी गावात हुतात्मा रतनलालजी यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत सरकारदरबारी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प या वेळी व्यक्त केला.