जयंती बाबासाहेबांची

विवेक मराठी    11-Apr-2020
Total Views |
१४ एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सध्या आपण गृहबद्धतेचा अनुभव घेत आहोत. बाह्य जगाशी आपला संपर्क थांबला आहे. त्यामुळे आगामी काळात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे एक उत्तर शोधण्याचा सा. विवेकने केलेला हा प्रयत्न -

Babasaheb Bhimrao Ramji A


कालच्या प्रश्नाचे उत्तर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहिला.

आजचा प्रश्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती नियतकालिके सुरू केली?

या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा


प्रथम राष्ट्र

१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथील सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली. "मी हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही." बाबासाहेबांच्या या घोषणेने खळबळ माजली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतरापासून परावृत्त करण्यासाठी मुंबईच्या हिंदू महासभेने तातडीची सभा बोलाविली आणि ठराव पास केला. २४ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. मो.बा. वेलणकर यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटायला गेले. या शिष्टमंडळाशी चर्चा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "केवळ अस्पृश्यांच्या शाश्वत कल्याणाच्या दृष्टीने मी धर्मांतराचा उपदेश केला. धर्मांतराने देशाचे नुकसान होणार नाही." याची खात्री देताना ते म्हणाले, “प्रथम देश, नंतर अस्पृश्य समाज आणि त्यानंतर हिंदी समाज अशी माझ्या कर्तव्याची त्रिसूत्री आहे." मो.बा. वेलणकर यांच्या बरोबरच्या मंडळींशी बाबासाहेबांनी आपल्या धर्मांतराच्या घोषणेबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेचा समारोप करताना ते म्हणाले, “वैयक्तिक धर्मांतरात लाभ नाही आणि कल्याणही नाही. धर्मांतराचा प्रसंग येऊन ठेपला की सर्व हिंदू नेत्यांशी मी विचारविनिमय करीन. जे काही करू, ते लढवय्या शिपाईगड्याप्रमाणे करू."


बाबासाहेबांच्या या आश्वासनाने समाधानी होऊन शिष्टमंडळ परतले. बाबासाहेबांच्या घोषनेनंतर ख्रिश्चन, इस्लाम व शीख धर्मीय नेते व धर्मगुरू बाबासाहेबांना भेटले आणि आमच्या धर्मात या अशी विनंती केली. पुढे वीस वर्षे वाट पाहून बाबासाहेबांनी इथल्या मातीत जन्मलेल्या तथागताचा धम्म अंगीकारला.