भाजप काय किंवा काँग्रेस काय किंवा अन्य कुठलाही पक्ष काय, बहुतांश सर्व ज्येष्ठ – वरिष्ठ नेते सरकारच्या सोबतीने, एकजुटीने लढण्याची भाषा करतायत, तिथे राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तीने किरकोळ राजकीय वजन वाढवण्याच्या प्रयत्नात अशी दिशाभूल करणारी वक्तव्यं करावीत, हे दुर्दैवी आहे. राहुल गांधींचं चित्त थाऱ्यावर नसणं आपण समजू शकतो कारण आपल्या सर्वांप्रमाणे त्यांनाही ‘लॉकडाऊन’चा फटका बसला आहे, त्यांना वारंवार थायलंड वगैरे ठिकाणी ‘अध्यात्मिक सहलीसाठी’ (?) जावं लागतं ते आता जाता येत नाही. त्त्यातून आलेली निराशा, चिडचिड या बेताल बोलण्यामागे असू शकते.
या ‘क्वारंटाईन’च्या काळात भलेभले लोक बिथरल्यासारखे वागू लागले आहेत. मग अगदी गल्लीगल्लीतले ‘तळीराम’ आणि ‘पुडीबहाद्दर’ काहीच ‘सोय’ होत नसल्याने अस्वस्थ झाले आहेत आणि दुसरीकडे अगदी ‘सेलिब्रिटी’ वर्गातील काही लोकही घरात बसून राहावं लागत असल्याने बिथरलेले दिसतात. आपले माननीय राहुलबाबा गांधीदेखील अशाच काही अडचणीत सापडलेत की काय, अशी शंका येऊ लागली आहे. कारण, नुकताच या महाशयांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेला संवाद आणि त्यामध्ये उधळलेली मुक्ताफळं. एखाद्याने अगदीच हिंमत करून राहुल गांधींचं हे सर्व बौद्धिक ऐकायचं ठरवलं तर त्याला स्वतःला एकतर मानसिक धक्का तरी बसेल किंवा राहुल गांधींविषयी चिंता तरी वाटू लागेल. त्याचं झालं असं, कोरोना व्हायरस आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे ओढवलेल्या ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये राहुल यांनी अशी काही स्वैर फटकेबाजी केली की जणू ते गेला महिनाभर घरी बसावं लागल्याचा राग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर काढत आहेत.
राहुल गांधी यांचं एक बरं असतं. जगात काहीही होऊ दे, हे महाशय कायम एका निवांत मूडमध्ये असतात. त्यांची देहबोली, हावभाव बघून असं वाटतं जणू काही आता जगात काही समस्याच शिल्लक राहिल्या नाहीत. या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या संकटाबद्दल बोलत असतानाही ते असेच होते. पंतप्रधान, केंद्रा सरकार, ठिकठीकाणची – सर्व पक्षांची राज्य सरकारं, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा आणि सारा देश आज ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अथक प्रयत्न करत असताना राहुलजी ‘लॉकडाऊन’वर टीका करून मोकळे झाले. ‘लॉकडाऊन हा काही कोरोनावरील उपाय नाही, ते केवळ एक ‘पॉझ बटन’ आहे’ असे उद्गार त्यांनी काढले. आता या अख्ख्या जगात कोण असं म्हणतंय की लॉकडाऊन हाच एकमेव उपाय आहे? स्वतः पंतप्रधान तरी असं कधी म्हणाले आहेत काय? पण जोवर कोरोनावर प्रभावी औषध शोधलं जात नाही तोवर हा रोग असाच फैलावू द्यायचा काय? तो समूळ नष्ट नाही पण किमान अधिक वाढीपासून रोखावा यासाठी ‘सोशल डीस्टन्सिंग’ हाच एकमेव प्रभावी मार्ग सध्यातरी उपलब्ध आहे. खुद्द काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यापासून अनेक विरोधी नेत्यांनी याबाबत सहमती दर्शवली आहे आणि या ‘लॉकडाऊन’ला पाठींबाही दिला आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेसचं सरकार त्यांच्या मित्रपक्षांसह या ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी करत आहे. पंतप्रधानांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याआधी पंजाबात काँग्रेसशासित राज्य सरकारचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी पंजाबातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा सर्वप्रथम केली. अशा स्थितीत राहुल गांधींसारख्या काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेल्या वरिष्ठ नेत्याने अशाप्रकारे वक्तव्याची पुडी इतक्या ‘कॅज्युअली’ सोडावी, हे नक्कीच शोभा देणारं नाही. पंतप्रधान लॉकडाऊनचा निर्णय असाच झोपेतून उठून जाहीर करत नसतात, त्याआधी सर्वपक्षीय नेते, राज्यांचे मुख्यमंत्री, प्रशासन, आरोग्य – सुरक्षा यंत्रणा, अर्थव्यवस्थेतील घटक अशा अनेकांशी सखोल चर्चा करून मगच हा निर्णय घेतला जातो. अशा परिस्थितीत राहुल गांधी जर ‘लॉकडाऊननंतर व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा सुरू होईल’ असं उथळ विधान करत असतील तर याला काय म्हणायचं? म्हणजे लॉकडाऊन हा उपाय नव्हे असंही म्हणायचं आणि लॉकडाऊन संपल्यावर व्हायरसचा पुन्हा प्रादुर्भाव होईल, असंही लगेच पुढच्या वाक्यांत म्हणायचं, हे चित्त थाऱ्यावर असलेल्या व्यक्तीचं लक्षण नक्कीच नव्हे.
या संवादात मग राहुल गांधींनी आरोग्य यंत्रणा सशक्त करणं, चाचण्यांचं प्रमाण वाढवणं आदी गोष्टी करणं नितांत आवश्यकता बोलून दाखवली. म्हणजे इतके दिवस आमचं प्रशासन, आरोग्य यंत्रणा, सगळे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, संशोधक, पोलीस आणि बाकी सर्व व्यवस्था जणू झोपाच काढत होती आणि राहुल गांधी यांनी हे बौद्धिक घेतल्यावर ते सर्व झाडून कामाला लागणार आहेत! मग मोठ्या उदार मनाने त्यांनी सरकारला सल्ले वगैरे दिले की काय करायला हवं आणि काय नको. ‘यातलं काय घ्यायचं ते घ्या, नाही घ्यायचं ते घेऊ नका’ असंही सांगत आपण जणू टोपलीभर सल्ले घेऊन भाजीमंडईत ते विकायला बसलो आहोत, हे राहुल गांधी यांनी दाखवून दिलं. अर्थव्यवस्थेचंही कसं नुकसान होतं आहे, त्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, हेही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारं आर्थिक संकटातून सावरण्यासाठी काय काय उपाययोजना करत आहेत, याच्या बातम्या बहुधा राहुल यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसाव्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदा आणि त्यातून दिली जाणारी इत्यंभूत माहितीही राहुल गांधींपर्यंत पोहोचत नसावी. कशाचाही काहीही अभ्यास नाही, माहिती नाही, कशाचा आवाका नाही तरीही हे महोदय इतक्या आत्मविश्वासाने इतकी उथळ वक्तव्यं कशी काय ठोकू शकतात, हे गेल्या दहा-पंधरा वर्षांत देशातील जनतेला पडलेलं एक कोडंच आहे. परंतु, अशा संकटाच्या काळातही, जेव्हा देश एकत्र होऊन या संकटाशी लढू इच्छितोय, भाजप काय किंवा काँग्रेस काय किंवा अन्य कुठलाही पक्ष काय, बहुतांश सर्व ज्येष्ठ – वरिष्ठ नेते सरकारच्या सोबतीने, एकजुटीने लढण्याची भाषा करतायत, तिथे राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तीने किरकोळ राजकीय वजन वाढवण्याच्या प्रयत्नात अशी दिशाभूल करणारी वक्तव्यं करावीत, हे दुर्दैवी आहे. राहुल गांधींचं चित्त थाऱ्यावर नसणं आपण समजू शकतो कारण आपल्या सर्वांप्रमाणे त्यांनाही ‘लॉकडाऊन’चा फटका बसला आहे, त्यांना वारंवार थायलंड वगैरे ठिकाणी ‘अध्यात्मिक सहलीसाठी’ (?) जावं लागतं ते आता जाता येत नाही. त्त्यातून आलेली निराशा, चिडचिड या बेताल बोलण्यामागे असू शकते. परंतु, म्हणून त्यांनी अशाप्रकारे आपल्या बौद्धिक क्षमतेचं प्रदर्शन मांडू नये. सध्याच्या स्थितीत तर मुळीच नाही. त्यातच त्यांचं आणि सर्व देशाचं भलं आहे.