शिकवण कोरोनाची - 2

विवेक मराठी    21-Apr-2020
Total Views |

 

'उदरभरण नोहेजाणिजे यज्ञकर्म!' हा आमचा जेवणासंबंधीचा संस्कार आम्ही भारतीय विसरून गेलोकोरोनाने आम्हाला पुन्हा तो आठवण्याची संधी प्राप्त करून दिली आहेगेल्या काही वर्षांत 'चायनीजखाद्यपदार्थ विकणारे अनेक छोटे-मोठे व्यवसायिक उभे राहिलेत्यासाठी वापरण्यात येणारे नूडल्स किंवा अन्य पदार्थ या संदर्भात सगळा आनंदच आहेदादा कोंडके यांच्या आत्मचरित्रात त्यांनी बाहेरच्या देशात चीन किंवा हाँगकोंग यात कशा पद्धतीने सरपटणारे सगळे प्राणी आपल्याकडे मिसळपाव किंवा वडापावसारखे लटकवून ठेवलेले असतातहे त्यांच्या शैलीत वर्णन केले आहेपण एकूणच खाद्यसंस्कृती ते अन्नविकृती हा प्रवास गेल्या ४० वर्षांत जीवघेणा ठरला आहे.

या ठिकाणी निरीक्षणे आणि सूचना यांची नोंद आपण घेत आहोत.

 


कोरोनासंदर्भात विविध संशोधन होत आहे, अंतिम निष्कर्ष काही काळाने पुढे येतील. पण या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय वंशाच्या लोकांवर हा विषाणू त्या प्रमाणात परिणाम करू शकला नाही, असे काहींचे म्हणणे आहे. रोगप्रतिकारक शक्ती हा एक कळीचा मुद्दा यात आहे. ज्या देशात आरोग्याची अतिउत्तम व्यवस्था आहे असे मानले जाते किंवा जेथे हायजीन म्हणून खूप काळजी घेतली जाते, त्या देशात प्रसार आणि मृत्युदर जास्त कसा? हा सर्व संशोधकांना आणि whoला प्रश्न पडला आहे. एक मत असे पुढे येत आहे की अधिक सुरक्षित वातावरण निर्माण केल्याने शरीरातील अँटीबॉडीज तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया खुंटली तर नाही ना? मग त्या पार्श्वभूमीवर भारतीय लोकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली म्हणायची का? याला पुष्टी देणारे आहार, विहार आणि जीवनशैली हे येथे निर्णायक ठरत आहे.


food_1  H x W:

) आहार - हे सर्वमान्य आहे की खाद्यसंस्कृती जन्माला आली तीच मुळी आपल्या देशात. हा देश आजही आणि पूर्वीपासून मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. जेंव्हा जगातील मानवजातीला काय खावे हा प्रश्न होता आणि प्राण्यांना मारून जगणे ह्या पलीकडे प्रगती झाली नव्हती, त्या काळात आमच्याकडे कुठले धान्य कुठल्या काळात खावे आणि कुठल्या हवामानात काय आहार असावा या संदर्भात आहारशास्त्र विकसित होते. व्रतवैकल्ये म्हणून जरी त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तरी चातुर्मास्यात विशिष्ट गोष्टी न खाणे ही कल्पना शास्त्रीयच होती. जीवनसत्त्व आणि प्रथिने, पिष्टमय पदार्थ, इतर अन्नघटक शरीराला मिळण्यासाठी आहाराचा समन्वय होता. आज लिंबू, काळे मिरे, हिंग, लसूण, मिरची किंवा तमालपत्र याचा आहारात आवश्यकता यावर भर दिला जात आहे. आपल्या जेवणातील दक्षिण किंवा उत्तर आणि पूर्व किंवा पश्चिम या भागातील अन्नपदार्थ समोर आणले, तर आहाराचा समतोल दिसून येतो. मग इडली-सांबार-डोसा किंवा पुरी-भाजी किंवा फाफडा किंवा हिमाचलच्या सिद्धू किंवा ओरिसातील घुग्णी किंवा बिहारचा लित्ती चोखा आणि पंजाबचा चना-भटोरा. अगदी अलीकडील वडापावसुद्धा! मांसाहार ही आपल्याकडे सरसकट प्रथा नाही, पण त्यातही भक्ष आणि अभक्ष याची काही परिमाणे आमच्या येथे नमूद केली होती. समुद्रकिनाऱ्यावरील सर्वच मंडळींमध्ये मासे खाणे अपरिहार्य होते. त्याबरोबर काही ठरावीक प्राण्यांचे मांस मनुष्याला खाण्यासाठी योग्य मानले जायचे. शाकाहाराचे काही शास्त्र होतेच, पण मांसाहाराच्या बाबतीतही काही नियम होते. दुर्दैवाने काळाच्या ओघात आता मांसाहार हे आमचे फॅड झाले आहे. मांसाहार करणाऱ्या भारतीय समाजानेसुद्धा त्यात हायजीन सांभाळले जाते आहे का? चिकन आणि मटणाच्या टपऱ्या कुठे असतात? ते विकणारे स्वच्छतेचे नियम किती पाळत असतात? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे! अमेरिकेत एक मीट पॅकिंग कंपनी बंद करावी लागली, कारण तेथील एकदम ३०० कर्मचारी कोरोना positive आढळले. हे सत्य स्वीकारावे लागेल.

कोरोना विषाणू पसरवण्यात काही विशिष्ट पक्षी-प्राणी यांचे भक्षण हे महत्त्वाचे कारण काही संशोधकांनी मांडले आहे. काही जण मांडत आहेत की beef (गोमांस) खाणाऱ्या लोकांवर कोरोनाने जास्त गतीने आक्रमण केले आहे. याचे statistical analysis यथावकाश येईल. पण इटली, फ्रान्स, स्पेन आणि अमेरिका व अर्थातच चीन येथील आकडे या निष्कर्षाला पुष्टी देणारे आहेत. एक लोकप्रिय वाक्य प्रचलित आहे - जे जे चालते, ते सर्व प्राणी खाण्यास चालतात! माणसाच्या या मस्तवाल वागण्याला कोरोना ही एक सणसणीत थप्पड आहे.

शाकाहाराचा पुरस्कार किंवा मांसाहाराच्या बाबतीत विरोध हा या लेखाचा उद्देश नाही. पण लाइफ सायकल हा अन्नपदार्थांच्या बाबतीत एक संशोधनाचा पैलू आहे. त्यात कार्बन वातावरणात सोडण्याची प्रक्रिया (फ्रॉम raw to end) ही मांसाहार पद्धतीत जास्त आढळली आहे, असे संशोधक म्हणतात ही वस्तुस्थिती आहे.

'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!' हा आमचा जेवणासंबंधीचा संस्कार आम्ही भारतीय विसरून गेलो. कोरोनाने आम्हाला पुन्हा तो आठवण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. गेल्या काही वर्षांत 'चायनीज' खाद्यपदार्थ विकणारे अनेक छोटे-मोठे व्यवसायिक उभे राहिले. त्यासाठी वापरण्यात येणारे नूडल्स किंवा अन्य पदार्थ या संदर्भात सगळा आनंदच आहे. दादा कोंडके यांच्या आत्मचरित्रात त्यांनी बाहेरच्या देशात - चीन किंवा हाँगकोंग यात कशा पद्धतीने सरपटणारे सगळे प्राणी आपल्याकडे मिसळपाव किंवा वडापावसारखे लटकवून ठेवलेले असतात, हे त्यांच्या शैलीत वर्णन केले आहे. पण एकूणच खाद्यसंस्कृती ते अन्नविकृती हा प्रवास गेल्या ४० वर्षांत जीवघेणा ठरला आहे.

आमच्या येथे शेती उत्पन्न घेणारा बळी राजा हा संपूर्ण मानवजातीचे पालनपोषण करण्याची जबाबदारी आपली आहे ह्या भावनेने शेतात पीक पिकवतो, अशी त्याची महती. मध्यंतरी अधिक उत्पन्न घेण्याच्या पाश्चात्त्य मॉडेलचे अनुकरण करण्याच्या नादात आम्ही शेती उत्पादनात अक्षम्य चुका केल्या आहेत. रासायनिक खते, फवारणी याचा बेधुंद वापर करत आम्ही आमच्याच जिवाशी खेळायला लागलो. भौतिक सुखाच्या धुंदीने आम्ही समस्त मनुष्यजातीने आमच्याच हाताने आमची रोगप्रतिकारक शक्ती शून्यावर आणून ठेवली. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेती उत्पादने याचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे, ते कोरोनाने अधोरेखित होईल. चटणी-भाकरी खाऊन मोलमजुरी करणारा आमचा कष्टकरी बंधू अशा प्रकारच्या विषाणूला पराभूत करू शकतो, पण आठ आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाणारा बुद्धिवादी आणि बुद्धिजीवी या विषाणूला कसे तोंड देणार?

जेवण करण्याची आमची परंपरागत पद्धत आम्ही सोडली. खाली बसून जेवणात आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेचे कुठेतरी नाते होते. मग डायनिंग टेबल आले. आणि आता उभे राहून बफे! अनुकरणाने कुठेतरी आम्ही आमची जीवनशैली विसरलो, जी आज आताच्या भाषेत 'सस्टेनेबल' किंवा कालातीत होती. आगामी काळात या सगळ्या गोष्टींचे संशोधन होणार, हे नक्की.

घरात आग्रह असायचा - बाहेरून आल्यावर सर्व हात-पाय व्यवस्थित धुऊन, बाहेरून आलेले कपडे बदलायचे आणि मग जेवायला बसायचे. आज हात धुण्याबद्दल ज्या जाहिराती दाखवल्या जात आहेत, त्या वेळेस आम्हाला आमच्या लहानपणी हाच आग्रह धरणारे आमचे आजी-आजोबा किंवा आई-वडील नक्की आठवत असतील.

कशानंतर काय आणि कशाबरोबर काय, हे आपण आपल्या आहारशास्त्रात शिकलो, पण व्यवहारात विसरलो. (गरम अन्न खाऊन नंतर आइसक्रीम थंड.) पश्चिमी संस्कृतीचा मेकॉलेने केलेल्या शैक्षणिक प्रयोगाचा आमच्या खाद्यसंस्कृतीवर परिणाम झाला. पण आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, उद्या कोरोनानंतरच्या जागतिक परिस्थितीत भारताला जी भूमिका बजावावी लागणार आहे, त्यासाठी अशा अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे.

उद्या 'विहार' या मुद्द्याची चर्चा करू.

(क्रमशः)
नीरक्षीरविवेक.