१४ एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सध्या आपण गृहबद्धतेचा अनुभव घेत आहोत. बाह्य जगाशी आपला संपर्क थांबला आहे. त्यामुळे आगामी काळात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे एक उत्तर शोधण्याचा सा. विवेकने केलेला हा प्रयत्न - १४ एप्रिलपर्यंत दररोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग, एक गीत आणि प्रश्नमंजुषा. तर, राहा तयार या आगळ्यावेगळ्या अभिवादनासाठी आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी. *कालच्या प्रश्नाचे उत्तर* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी खुले करण्यासाठी आंदोलन केले. त्या आंदोलनात सहस्रबुद्धे, टिपणीस, चित्रे इत्यादी मंडळी डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर होती. *आजचा प्रश्न* माता रमाबाई आंबेडकर यांचे माहेर कोणते? या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा. *समतेचे पंढरपूर* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सतत दौऱ्यावर असत. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना ते खूप कमी वेळ देत असत. रमाबाई, मुले यांच्याकडे लक्ष देण्यास आपण कमी पडलो, ही खंत बाबासाहेबांना होतीच. रमाबाईंबद्दल बाबासाहेब म्हणतात, "मी परदेशात असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व अजूनही वाहावी लागते आहे, मी स्वदेशात परत आल्यावर माझ्या विपन्नदशेत शेणीचे भारे स्वतःच्या डोक्यावर वाहून आणण्यास जिने मागेपुढे पाहिले नाही, अशा ममताळू, सुशील व पूज्य पत्नीच्या सहवासात दिवसातील २४ तासांतून मला अर्धा तासही घालविता येत नाही." बाबासाहेबांना सभेसाठी नेणाऱ्या लोकांचा रमाबाईंना राग येई. एकदा त्यांनी बाबासाहेबांबरोबरच दौऱ्यावर जाण्यासाठी तयारी केली आणि बाबासाहेबांना म्हणाल्या, “घरी राहून तुमच्या जीविताची चिंता वाहत बसण्यापेक्षा तुम्ही जाल जिकडे यावयाचे मी ठरवले आहे." बाबासाहेबांनी रमाबाईच्या मनातील भीती दूर केली. रमाबाईंना सदैव बाबासाहेबांची चिंता लागलेली असे. एकदा रमाबाईंनी पंढरपूरला जाण्याचा हट्ट धरला. रमाबाईंची समजूत काढताना बाबासाहेब म्हणाले, “जेथे भक्तांना विठोबाचे दर्शन मिळत नाही, ते पंढरपूर काय कामाचे? तू खंत करू नकोस. त्यागपूर्ण जीवन घालवीत सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्षा सेवा करू आणि येथेच दुसरे पंढरपूर निर्माण करू." बाबासाहेबांनी रमाबाईंना दिलेले हे वचन शब्दशः खरे केले. आपले आयुष्य, विद्वत्ता सारे सारे दलितांच्या उत्थानासाठी खर्ची घातले आणि समतेचे पंढरपूर आकाराला आणले. |