जयंती बाबासाहेबांची

विवेक मराठी    08-Apr-2020
Total Views |

१४ एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सध्या आपण गृहबद्धतेचा अनुभव घेत आहोत. बाह्य जगाशी आपला संपर्क थांबला आहे. त्यामुळे आगामी काळात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कशी करावी? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. त्या प्रश्नाचे एक उत्तर शोधण्याचा सा. विवेकने केलेला हा प्रयत्न -

babasaheb_1  H

*
कालच्या प्रश्नाचे उत्तर *
माता रमाई आंबेडकर यांचे माहेर वणंद या गावात होते.


* आजचा प्रश्न *
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ साली कोणत्या राजकीय पक्षांची स्थापना केली होती?

या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा.


* व्यापक दृष्टी *
चवदार तळे सत्यागृहाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. स्पृश्य-अस्पृश्य यांच्यातील भेदरेषा नष्ट करण्यासाही बाबासाहेबांनी ही चळवळ आरंभली होती. पण या चळवळीला विरोध झाला. सभा उधळली गेली. एवढ्यावर सनातनी थांबले नाहीत, तर त्यांनी चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले. ही बातमी ऐकून बाबासाहेबांचा संताप अनावर झाला. ते म्हणाले, “साध्या उपायांनी बरा होणारा हा रोग दिसत नाही. सबब जालीम उपाय योजण्याची गरज आहे." याच काळात महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर समाजाचे पुढारी जेधे आणि जवळकर बाबासाहेबांना भेटले आणि म्हणाले, “जर आपल्या चळवळीतून ब्राह्मणांना वगळले, तर आम्ही सर्व ब्राह्मणेतर आपल्या लढ्यात सामील होतो." बाबासाहेबांनी जेधे-जवळकरांचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि तितक्याच शांतपणे उत्तर दिले, “माझी चळवळ ब्राह्मणांविरुद्ध नसून ब्राह्मण्याविरुद्ध आहे." बाबासाहेबांनी अशा शब्दात जेधे व जवळकर यांची सूचना झिडकारली. २६ जून १९२७ रोजी बाबासाहेबांनी 'बहिष्कृत भारत'मध्ये लिहिले होते - 'आपला अस्पृश्यतेचा कलंक ज्यांना धुवायचा असेल, त्यांनी सत्याग्रहात भाग घेण्यासाठी बहिष्कृत भारतच्या कचेरीत नावे नोंदवा.' या सत्याग्रहाचा आपला ठाम निर्धार व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात, "धर्म हा माणसाकरिता आहे की माणूस धर्माकरिता? आम्ही हिंदू घटक आहोत का नाही, याचा सोक्षमोक्ष आम्हाला लावायचा आहे."