मृत्युपत्र : गरज, समज, गैरसमज

विवेक मराठी    10-Jun-2020
Total Views |
 मृत्युपश्चात त्यांच्या मालमत्तेची वाटणी वारसदारात करताना सर्वांची ससेहोलपट तर होतेच, पण बरेचदा त्या भावंडांत कायमचे वितुष्ट येते. हे सर्व टाळायचे असेल तर प्रत्येकाने, विशेषत: साठी पुढील व्यक्तींनी मृत्युपत्र करणे आवश्यक आहे.


Will: Need, understanding

जुन्या हिंदी चित्रपटातील नायकाचे करोडपती वडील मरतात. सगळे घरचे पांढNया कपड्यात शोक करत असतात. तेव्हाच एक काळा कोट घातलेला वकील अवतीर्ण होतो आणि सांगतो की, शेठजींनी मृत्युपत्र केले होते. त्याचे मी आता वाचन करतो... मग कोणी राव बनतो तर कोणी रंग... नंतर धमाल...
 
तर असे हे मृत्युपत्र काय फक्त शेठजींनीच करायचे असते का? उत्तर आहे नाही. जो कोणी स्वत:ला शेठ समजत असेल, म्हणजे ज्या कोणाकडे स्थावर जंगम मालमत्ता, सोनंनाणं, रोख रक्कम, शेअर्स, फिक्स्ड डिपॉझिट इत्यादी असेल अशा प्रत्येकाने मृत्युपत्र करणे केवळ श्रेयस्कर नव्हे तर आवश्यक असते.
 
Where there is a `will', there are relatives विंâवा death and will wait for none गमतीशीर वाक्प्रचार इंग्रजीत प्रचलित आहेत. यात मी अजून एक वाक्प्रचार जोडीन, `Where there is no will, there are miseries,
मृत्युपत्र न केल्याने झालेल्या मनस्तापाची सत्य घटना सांगतो.
 
सामान्यत: नाताळच्या सुट्टीत अमेरिकेहून नागपूरला येणारा माझा मित्र मागील वर्षी मला मार्च-एप्रिलच्या टळटळीत उन्हाळ्यात नागपूरला आल्याचं कळल्याने मी त्याच्या भेटीस गेलो. मी त्याला आता कसा काय नागपूरला आलास हे विचारायचाच अवकाश, त्याला झालेला आणि होत असलेल्या त्रासाची मनस्तापाची जंत्रीच त्याने माझ्यापुढे ठेवली. म्हणाला, ‘निलेश तुला कळलं असेल की नुकतंच माझ्या आईचं निधन झालं. माझे वडील ५-६ वर्षांपूर्वीच वारले. वडील गेल्यानंतर आईने अमेरिकेला येणं बंद केलं. आम्हीच नाताळच्या सुटीत येत होतो. तिला विचारायचो की बँक खात्यांवर, पोस्टात, एलआयसीच्या पेन्शन प्लॅनवर वगैरे नामांकन (nomination) केलं आहेस ना तर हो म्हणायची आणि ती गेल्यावर आम्ही बघितलं तर सगळीकडे माझ्या वडिलांचे नामांकन जे तिच्या आधीच ५-६ वर्ष निवर्तले. आता उत्तराधिकारी प्रमाणपत्र (Succession Certificate) मिळवण्याची धडपड करतोय. हा फ्लॅटही तिच्या नावे आहे, पण सोसायटीचे रेकॉर्डवरही नॉमिनेशन माझ्या वडिलांचे. सांग आता, आहे की नाही गंमत!
 
वृद्ध मंडळी अशा गमती बरेचदा करतात आणि मग त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या मालमत्तेची वाटणी वारसदारात करताना सर्वांची ससेहोलपट तर होतेच, पण बरेचदा त्या भावंडांत कायमचे वितुष्ट येते. हे सर्व टाळायचे असेल तर प्रत्येकाने, विशेषत: साठी पुढील व्यक्तींनी मृत्युपत्र करणे आवश्यक आहे. कारण मृत्यु निश्चित आहे, पण मृत्युची वेळ अनिश्चित आहे.
पूर्वीच्या काळी जसा विमा प्रतिनिधी विमा विक्रीला आला की त्याला विचारलं जायचं, ‘‘कारे, मला मारायला निघालास का?’’ अगदी तसंच कोणाला मृत्युपत्र केलंस असं विचारलं की, तो म्हणतो, ‘‘का रे, मी काय मरतोय का एवढ्यात?’’
 
पण विमा हा जसा तुमच्यासाठी नसून तुमच्या पश्चात राहणाNया कुटुंबियांसाठी असतो, तसंच मृत्युपत्र हा दस्तावेज हा तुमच्या पश्चात तुमच्या स्थावर जंगम मालमत्तेची वाटणी तुमच्या इच्छेनुसार निर्धोकपणे करण्यासाठी असतो.
१) मृत्युपत्र कोण करू शकतो?
भारतीय वारसा कायदा १९२५ नुसार कोणतीही सज्ञान व्यक्ती तिच्या स्वकष्टार्जित स्थावर आणि जंगम मिळकती संदर्भात आपले मृत्युपत्र करू शकते. मृत्युपत्र लेखीच असावे लागते. मात्र मुस्लिम धर्मीय व्यक्ती तोंडी मृत्युपत्र करू शकतात. मृत्युपत्राचा कुठलाही विहित नमुना नाही.
२) मृत्युपत्र कसे लिहावे?
मृत्युपत्र साध्या कागदावर जरी लिहिले तरी चालते. सर्वप्रथम आपल्या स्थावर जंगम मिळकतीची यादी करावी. बँकांतील खाती, विमा पॉलिसी, वाहने, सोने, घरे, प्लॉटस्, शेत जमीन, शेअर्स, बँक लॉकर वगैरे जे काही तपशील असतील ते स्पष्टपणे मांडावे. पत्नी, मुले, मुली, भाऊ, बहीण, धर्मादाय संस्थेस दान देण्याची इच्छा असल्यास त्या संस्थेचा पूर्ण तपशील त्यात लिहावा. या व्यतिरिक्त मृत्युपत्रानंतर जर मालमत्तेत भर पडली जसे नंतर नवे बँक खाते उघडले तर त्याची मालकी कोणाकडे जाईल याची स्पष्टता मृत्युपत्रात हवी.
 
३) साक्षीदार
मृत्युपत्राला कायदेशीर वैधता प्राप्त होण्यासाठी त्यावर ज्याने मृत्युपत्र केले त्याची सही आणि किमान दोन साक्षीदारांच्या सह्या असणे आवश्यक आहे. शक्यतो साक्षीदार वयाहून लहान असावेत. साक्षीदारांना मृत्युपत्र वाचून दाखवणे आवश्यक नाही. तसेच मृत्युपत्रात नमूद केलेला लाभार्थी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करू शकत नाही. मृत्युपत्राच्या शेवटी बरेचदा डॉक्टरांचा दाखला असतो. मृत्युपत्र करण्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असल्याचा तो दाखला असतो. अर्थात, असा डॉक्टरांचा दाखला असणे हे कायद्याने सक्तीचे नाही.
 
मृत्युपत्राची नोंदणी (Registration)
मृत्युपत्राच्या दस्तावेजास कोणताही स्टॅम्प लागत नाही. तसेच त्याची निबंधकांच्या कार्यालयात नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही. तसेच मृत्युपत्र कितीही वेळा बदलता येते. अर्थात, मृत्युपूर्वीचे शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते.
प्रोबेट घेणे आवश्यक आहे का?
मृत्युपत्राचे प्रोबेट घेणे फक्त मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांतच बंधनकारक आहे. इतर कुठल्याही गावात / शहरात मृत्युपत्र केले असल्यास ‘प्रोबेट ऑफ विल’ करणे गरजेचे नाही.
नामांकनाहून मृत्युपत्र श्रेष्ठ नामित व्यक्तीला मालकी हक्क मिळत नाही. ती व्यक्ती विश्वस्त असते. समजा, मृत्युपत्रात केवळ ‘अ’चे नाव नमूद असेल आणि बँक खात्यावर विंâवा विमा पॉलिसीवर ‘ब’चे नाव नॉमिनी म्हणून नमूद केले असेल तर ‘ब’चे मिळकतीचे अधिकार निरस्त होतात. अशा रितीने मृत्युपत्र हे नॉमिनेशनला निरस्त करते.
मृत्युपत्र ही त्या व्यक्तीची मृत्युपूर्वीची इच्छा दर्शवते. त्याच्या इच्छेला सर्व कुटुंबियांनी मान द्यावा. मृत्युपत्रात आपल्यावर अन्याय झाला आहे अशा विचाराने त्याला कोर्टात आव्हान वगैरे देण्याचे काम करू नये.
रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे
‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तो ही पुढे जात आहे’
श्लोकाचा अर्थ समजून घेऊन ‘अजून वेळ आहे’, ‘पुरे करा ती नसती पॅâडं’, ‘आप मरे जग बुडे’ असा अविचार न करता मृत्युपत्राचे लाभ लक्षात घेऊन ते त्वरित करावे, सूज्ञास अधिक सांगणे न लगे.