नाथमहाराज लोकगायकाच्या तोंडून मोठ्याने वदवून दाखवित आहेत.... अहो, मी मुका झालो! माझी वाचा गेली!! आपली वाचा जाण्याचे कारण स्पष्ट करताना नाथमहाराजांचा हा लोकगायक सांगतो-
मुका झालो वाचा गेली ॥धृ ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्शास्त्र पुराणी ।
चारी वेद मुखोद्गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥1॥
मी कोण होतो? लोकहो! मी एक महापंडित होतो. माझ्यासारखा ज्ञानी माणूस जगता दुसरा नव्हता. मला चार वेद, दहा ग्रंथ, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे हे सर्वकाही मुखोद्गत होते. पण याच गोष्टीचा मला अहंकार झाला आणि माझी पूर्णपणे हानी झाली.
संत तुकाराम महाराज हीच गोष्ट सांगताना असे म्हणतात की,
अंगी भरे ताठा कुणासी मानीना ।
साधूची हेळणा स्वये करी ॥
अहंकारासारखा दुर्गुण या जगात दुसरा नाही. याच एका अवगुणामुळे आपले आयुष्य मातीमोल होते, असे संत आपल्याला बजावून सांगतात.
जिव्हा लाचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।
निंदीले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥2 ॥
कमलमुख रामभजन को दिया! असे संत उच्चरवाने सांगत असताना आपण केवळ जिव्हालौल्य जोपासले आहे.
विषयजनित जे जे सुख । तेथेचि होय परमदुःख ।
आधी गोड अंती शोक । नेमस्त असे॥
असा संतांनी उपदेश केल्यानंतरही मनुष्य रसनेचा कसा गुलाम होऊन जाते ते पाहा. उत्तमोत्तम पदार्थांची खादाडी करण्यातच अशांचा जन्म वाया चालला आहे. पंचपक्कानाशिवाय यांना अन्न गोड लागत नाही. मग हेच लोक अन्नाला ‘कदान्न’ म्हणून निंदा करण्यासही मागेपुढे पाहात नाही. आपण वास्तविक जीवनात भरल्या ताटाला लाथाडणारी मंडळी पाहात नाही का?
‘उदरभरण नोहे अन्न हे पूर्णब्रह्म’ हे केवळ म्हणण्यापुरतेच असते का? अन्नाला ब्रह्मरूप समजून त्याचे सेवन केले तरच ते अंगी लागणार ना!
साधू संतांची निंदा केली । हरिभक्तांची स्तुती नाही केली ।
तेणे वाचा पंगू झाली । एका जनार्दनी कृपा लाधली ॥3 ॥
याशिवाय मुक्या मंडळींचा आवडता उपक्रम म्हणजे साधुसंतांची निंदा करणे, समाजातील चांगल्या गोष्टींची अवहेलना करणे, सज्जनांना नावे ठेवणे... ही मंडळी आपण स्वतः काही चांगले करत नाहीत आणि दुसर्यांनी चांगले केलेले त्यांना पाहावत नाही!
असाच एक मनुष्य वैद्याकडे गेला. त्याचे पोट दुखत होते. त्याचा स्वभाव जाणून वैद्यांनीच त्याला प्रश्न विचारला, ‘‘भाऊसाहेब, तुमचे पोट दुखते आहे म्हणजे तुमच्या शेजार्यापाजार्याचे काही चांगलेच भले झाले आहे का?’
अशा विघ्नसंतोषी लोकांची हरिभक्ताची स्तुती करताना मात्र जिव्हा अगदी टाळ्यालाच चिकटते, अगदी दातखीळी बसते म्हणा ना! यामुळेच यांची वाचा ही पांगळी झालेली आहे...
याचप्रकारे भाष्य करताना संत तुकाराम महाराज म्हणतात -
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
तयाहूनि मुका बराच मी ॥
अपवित्र वाणी बोलायचे सोडून संत मूकपणा पत्करतात! पण संताघरचा ‘मुका’ वेगळा आणि विघ्नसंतोषी अपप्रवृत्तींचा ‘मुका’ हे वेगळा हे सांगायलाच हवे का?
**