गणपती असो, नवरात्र असो, दिवाळी असो वा कोणताही सण असो, प्रत्येक सणासुदीला कायद्याने संविधानानुसार काही बंधने घालून दिलेली आहेत, मग ती मिरवणुकीवरील असतील, फटाक्यांच्या वेळेविषयी असतील अथवा ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची असतील. सामान्य माणूस हे नियम पाळून आपले सर्व सण-उत्सव तितक्याच जल्लोशाने साजरे करीत असतो.
सण-उत्सव हे कधीतरीच येतात, पण मशिदींवरील भोंगे तर रोजच मोठ्या आवाजात वाजत असतात, मग त्यांच्या ध्वनिक्षेपकाला वेळेची, आवाजाची मर्यादा का नाही? असा साधा प्रश्न मानखुर्दला पीएमजी कॉलनीत राहणाऱ्या करिष्मा भोसले या विद्यार्थिनीला पडला. मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाचा सर्वांनाच त्रास होत होता. पण याविरुद्ध आवाज उठवून शिवाजी कोण होणार? हा प्रश्न असतो. शेवटी भोसलेंच्याच करिष्माने शिवाजी होण्याचे ठरविले आणि या संदर्भात स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या संदर्भात कुठलीच कारवाई न केल्याने आता आपणच प्रत्यक्ष जाऊन त्याबाबत जाब विचारावा, असा विचार करून करिष्मा मशिदीजवळ पोहोचली.
२४ जून २०२०, दुपारचे ३ वाजले होते, "अभी मौलवी साहब नही हैं, ५ बजे आना।" असे तिला सांगण्यात आले. ती माघारी फिरली. तोपर्यंत मुस्लीम समाजातील बरेच लोक तिच्या घराच्या आसपास जमून तिला शिवीगाळ करू लागले होते. तिला घाबरविण्याचा प्रयत्न चालू होता. पण या वेळी करिष्माने मनाशी खूणगाठ बांधलीच होती. ती ५ वाजता पुन्हा मशिदीजवळ गेली. तोपर्यंत तिच्या आईने पोलिसांना फोन केला होता.
जवळजवळ ५ मिनिटे ती मशिदीजवळ उभी होती, पण मौलवींचा काही पत्ता नव्हता. एकेक करून मुस्लीम समाजातील तरुण मुले जमा होऊ लागली. बऱ्यापैकी गर्दी जमल्यानंतर मौलवीसाहेब बाहेर आले. "कोण आहेस तू, काय काम आहे तुझं?" असे तिला विचारण्यात आले. तिनेही तेवढ्याच धाडसाने "मला मशिदीवरील भोंग्याचा खूप त्रास होतो, तुम्ही आवाज कमी करा" असे सांगितले. "त्रास होत असेल तर कानात कापूस घाल, आणि इथून निघून जा" असे उद्धट उत्तर तिला मिळाले.
शेवटी हे प्रकरण पोलीस स्टेशनला पोहोचले आणि दोघांनाही नोटिसा मिळाल्या. करिष्मा भोसलेला सांगण्यात आले की तुम्ही मशिदीत किंवा मशिदीच्या आवारात जायचे नाही. पण करिष्मा म्हणते, मी मशिदीत गेलेच नव्हते आणि आवाराच्या बाबतीत बोलायचे, तर, मशिदीच्या आवाराची जागा त्यांनी बळजबरीने हस्तगत करून तिथे आपले गाळे टाकले आहेत. प्रत्येक गाळ्याचे ५० हजार रुपये भाडेही आकारले जाते. तर दुसऱ्या बाजूला तुम्हीही ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करावा आणि ध्वनिक्षेपकाचे तोंड आतल्या बाजूला फिरवावे, अशी नोटीस त्यांना देण्यात आली. पण आवाज कमी होण्याऐवजी त्यात वाढच झाली.
एका मुलीने मशिदीवरील भोंग्यांबाबत आवाज उठविला, म्हणून मुस्लीम समाज काही क्षणात एकत्र आला; पण एकटी मुलगी लढते आहे, आपण तिच्या सोबत नाही पण किमान पाठी तरी खंबीरपणे उभे राहू, असे हिंदू समाजातील कोणालाही वाटले नाही, याची खंत मात्र करिष्माने व्यक्त केली. खरे तर मशिदीवरील भोंग्याबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत, मात्र पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत. या निमित्ताने न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यावर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी हिंदू समाजाने केली पाहिजे.
करिष्मा पुढे म्हणते, "माझा हा लढा सांविधानिक लढा आहे. या लढ्याला इतर कुठलाही रंग देऊ नये. आपल्या संविधानाने आपल्याला अटी आणि नियम घालून दिलेले आहेत, ते आपण पाळले पाहिजेत. पोलीस असो, राजकीय मंडळी असो, त्यांनी त्यांच्या अधिकाराचा योग्य वापर केला पाहिजे. तरच सामान्य माणूसदेखील संविधानाचा आदर करेल. हिंदू किंवा मुस्लीम म्हणून या प्रश्नाकडे न बघता, आपण भारताचे जबाबदार नागरिक म्हणून या प्रश्नाकडे बघितले पाहिजे."
- शीतल खोत