गोदातटाला अखंड शारदोत्सवाची परंपरा

विवेक मराठी    02-Dec-2021
Total Views |
नाशिकला साहित्याची व संस्कृतीची दीर्घ व समृद्ध परंपरा लाभलेली आहे. येथील भूमीत अनेक ऋषिमुनींनी तपश्चर्या करून पुराणे व दुर्मीळ ग्रंथ लिहिले. अनेक सारस्वतांनी येथे साहित्यसेवा केली व नाशिकचे नाव उज्ज्वल केले. त्याचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

Marathi  literature_1&nbs

जवळपास सारे जग वेठीस धरणार्‍या कोरोनाच्या संकटामुळे, यंदा मार्च महिन्यात नाशिकला होणारे 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 9 महिने लांबणीवर पडले. आता ते 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या परिसरात होणार्‍या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ व विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर आहेत, तर पालकमंत्री छगन भुजबळ स्वागताध्यक्ष आहेत. यापूर्वी नाशिकला 1942 साली ऑक्टोबर महिन्यात 27वे व 2005 साली जानेवारी महिन्यात 78वे अशी दोन संमेलने झाली होती. नाशिकला समृद्ध अशी साहित्यिक, सांस्कृतिक परंपरा आहे. नाशिक ही मंत्रभूमी, देवभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी, स्वातंत्र्यचळवळीतील शौर्यभूमी, साहित्य क्षेत्रातील सारस्वतांची भूमी, मोक्षभूमी तसेच आधुनिक काळातील तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. नाशिक हे जनस्थान म्हणजे साधकांसाठी सिद्धस्थान आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तपोभूमी आहे. येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो, तशीच सारस्वतांची मांदियाळी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस जमणार आहे. गोदातटाला अखंड शारदोत्सवाची परंपरा लाभलेली आहे.
 
 
book_1  H x W:
 
नाशिकला साहित्याची व संस्कृतीची दीर्घ व समृद्ध परंपरा लाभलेली आहे. येथील भूमीत अनेक ऋषिमुनींनी तपश्चर्या करून पुराणे व दुर्मीळ ग्रंथ लिहिले. काही वर्षांपूर्वी ‘संवाद’ या संस्थेतर्फे सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवले जात. प्रस्थापितांचा व नवोदितांचा त्यात उत्स्फूर्त सहभाग असायचा. बाळासाहेब मगर, शरद पुराणिक, सुभाष सबनीस व सहकारी ‘नाशिक कवी’ ही संस्था चालवतात. जुन्या-नव्या कवींची सांगड घालून विविध काव्यमैफली आयोजित केल्या जातात. सांस्कृतिक क्षेत्रात गायन, वाद्यवादन, नृत्य या कलाप्रकारांमध्ये अनेक दर्जेदार कलाकारांनी योगदान दिले आहे. आजही ताज्या दमाचे कलाकार आपला ठसा उमटवत आहेत.


Marathi  literature_3&nbs
गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गायनकलेचा प्रसार-प्रचार येथूनच केला. त्यांनी अनेक शिष्य घडवले. गांधर्व महाविद्यालयाने व विष्णू संगीत विद्यालयाने नाशिकमध्ये संगीत रुजवले. महिलांनाही गायनाचे प्रशिक्षण देऊन संगीतकलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. कथक नृत्यशैलीत कीर्ती कला मंदिरच्या रेखा नाडगौडा, तसेच संजीवनी कुलकर्णी, विद्या देशपांडे आणि भरतनाट्यम नृत्यशैलीत सोनाली करंदीकर या सातत्याने कार्यरत आहेत. विद्यार्थिनी घडवून परंपरा पुढे नेत आहेत. चित्रमहर्षी वा.गो. कुलकर्णी यांनी जलरंग निसर्गचित्रणाची परंपरा नाशिकच्या गोदाघाटावर निर्माण केली. पुढे शिवाजी तुपे, पंडित सोनवणी, आनंद सोनार यांनी ती जपत पुढच्या पिढीला हा वारसा दिला. शिल्पकलेत मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांनी नाममुद्रा कोरली आहे. नासिक कलानिकेतन व इतर काही संस्था चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देतात.


 
नाशिक ही नाशिक जिल्ह्यातील भगूरचे भूमिपुत्र असलेल्या सावरकरांची कर्मभूमी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये सशस्त्र क्रांतीची मशाल प्रज्वलित केली. त्यांनी ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्याचे महान कार्य केले. स्वातंत्र्यसंग्रामात त्यांचे अद्वितीय योगदान होतेच, त्याचबरोबरीने साहित्य क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी केली. ते स्वत: श्रेष्ठ साहित्यिक, प्रतिभावंत कवी, नाटककार होते. इंग्लिश शब्दांना पर्यायादाखल अत्यंत समर्पक असे अनेक मराठी प्रतिशब्द त्यांनी दिले. आता आपण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा खास अंक काढत आहोत. त्यासाठी ‘विशेषांक’ हा शब्द सावरकरांनीच दिला आहे. याशिवाय दररोजच्या वापरातील अनेक शब्द ही त्यांची मराठी भाषेला लाभलेली देणगी आहे. (आयोजकांना याचा सोईस्कर विसर पडला होता. मात्र नागरिकांच्या सामूहिक रेट्याने त्यांना वेळीच जाग आणली!) आता संमेलन गीतामध्ये सावरकरांचा ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ग्रंथदिंडीत समग्र सावरकर साहित्याचा चित्ररथ भगूर येथून सहभागी होणार आहे. मुख्य प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावे, तसेच व्यासपीठावर प्रतिमा असावी या मागण्यांनीही जोर धरला आहे. काळाराम मंदिराचा लढा याच नाशिकमध्ये झाला. येथील गोदाघाटाला पेशवे आणि अहल्याबाई होळकर यांनी सौंदर्य प्राप्त करून दिले. अनेक सारस्वतांनी येथे साहित्यसेवा केली व नाशिकचे नाव उज्ज्वल केले. त्याचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.


Marathi  literature_4&nbs

 
संत निवृत्तीनाथ, समर्थ रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी, शृंगेरीपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी, देवमामलेदार यशवंतराव महाराज यासारख्या सिद्ध पुरुषांचे वास्तव्य या मातीला लाभले. साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ ही कादंबरी नाशिकच्या कारागृहात लिहिली. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची बीजे येथेच रोवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गीत व ध्वज नाशिकच्या भूमिपुत्राने तयार केले. स्वच्छतेचे पुजारी गाडगेबाबा यांनी सोप्या शब्दात लोकप्रबोधन केले. नाशिक शहराला लाभलेल्या अनेक प्रतिभावंतांच्या प्रज्ञेने एकूणच समग्र साहित्यविश्वाला उंचीवर नेले. त्यांच्या प्रेरणेने पुढील पिढ्या घडल्या आणि घडत आहेत. श्री चक्रधर स्वामींनी ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला ग्रंथ लिहिला. दोन वर्षे ते नाशिकला वास्तव्यास होते. या काळात त्यांनी अनेक मठ, मंदिरे उभारली. समर्थ रामदास स्वामींनी नाशिकच्या टाकळी मठात मारुतीची स्थापना करून गायत्री पुरश्चरण केले. राममंत्राचा तेरा कोटी जप करून त्यांनी अनेक ग्रंथ रचले. दासबोध, मनाचे श्लोक लिहून समाजप्रबोधन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद सुरुवातीला शृंगारिक लावण्या लिहीत. लोकमान्य टिळक व सावरकर बंधू यांच्या सहवासात आल्यावर त्यांच्याच प्रेरणेने गोविंद यांनी देशभक्तिपर रचना केल्या. सावरकरांच्या मित्रमेळ्यामध्ये ते सहभागी झाले. पुढे याच मित्रमेळ्याचे अभिनव भारत संस्थेत रूपांतर झाले. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले, नमने वाहून स्तवने उधळा, कारागृहाचे भय काय त्याला’ अशा त्यांच्या अनेक कविता गाजल्या व त्यांनी युवकांना स्फूर्ती दिली.

 
वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. नाशिककरांचे ते लाडके ‘तात्यासाहेब’! दत्तक गेल्याने ते विष्णू वामन शिरवाडकर झाले. महाविद्यालयात शिकत असताना ‘रत्नाकर’ मासिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. नंतर कथा, कादंबर्‍या, नाटके व ललित साहित्य ते लिहू लागले. साप्ताहिकांत व दैनिकांमध्ये लेखन करायला लागले. 1942मध्ये ‘विशाखा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला व मराठी साहित्यातील वैभव ठरला. ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, दूरचे दिवे ही त्यांची नाटके गाजली. नटसम्राट ही सर्वोत्कृष्ट नाट्यकृती ठरली. हे नाटक मैलाचा दगड मानले जाते. अनेक कलाकारांनी आव्हान पेलून त्याचे असंख्य प्रयोग केले व ते गाजले. 1987 साली कुसुमाग्रजांना सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिककरांनी हा आपलाच गौरव मानला. 1950 साली कुसुमाग्रजांनी लोकहितवादी मंडळ सुरू केले. हे मंडळच यंदाच्या साहित्य संमेलनाचे यजमान आयोजक आहे.
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाला 175 वर्षांची दीर्घ परंपरा आहे. 1962 ते 1972 अशी तब्बल 10 वर्षे तात्यासाहेब या वाचनालयाचे अध्यक्ष होते. त्यांच्या हयातीतच कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. त्याच्या माध्यमातून वर्षाआड जनस्थान व गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येतात. नाशिकमध्ये मध्यवर्ती भागात कुसुमाग्रज स्मारक हे वास्तुसंकुल उभे असून तेथे सातत्याने साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात.

Marathi  literature_1&nbs 
 
वसंत शंकर कानेटकर यांनी एच.पी.टी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून ज्ञानदान केले. कथा, कादंबरी लेखन करतानाच ते नाटकांकडे वळले. ‘वेड्याचं घर उन्हात’ हे त्यांनी 1957 साली लिहिलेले पहिले नाटक रंगभूमीवर आले. त्याला राज्य नाट्यमहोत्सवात लेखनाचे पारितोषिक मिळाले. त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला गतवैभव प्राप्त करून दिले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या त्यांच्या नाटकाला संगीत नाट्य अकादमीने गौरविले. 52व्या मराठी नाट्यसंमेलनाचे, तसेच इंदूरच्या महाराष्ट्र साहित्य सभेच्या शारदोत्सवाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात त्यांची स्मृती जपण्यासाठी महापालिकेने एक उद्यान निर्माण केले आहे. मात्र त्याचीही हेळसांड झाल्याने दुर्दशा झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब गायकवाड, भीमगीतांचे लेखक वामनदादा कर्डक, बाबूराव बागुल यांचेही दलित साहित्यात मोलाचे योगदान आहे. वामनदादांनी गीतगायनाचे अनेक कार्यक्रम केले. वर्धा येथे झालेल्या पहिल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बाबूरावांनी प्रखर वास्तववादी कथा, कादंबर्‍या लिहिल्या. कामगार चळवळीतही त्यांचा सहभाग होता. ‘जेव्हा मी जात चोरली...’ ही कथा त्यांनी सुरतला आलेल्या अनुभवावर लिहिली व ती खूप गाजली.
 
नाशिकला 1840मध्ये पहिली सिटी लायब्ररी सुरू झाली. 1924 साली तिचे सार्वजनिक वाचनालयात रूपांतर झाले. 180 वर्षांपेक्षा जास्त काळ हे वाचनालय वाचकांची गरज भागवत आहे. येथे प्रचंड ग्रंथसंपदा, तसेच दुर्मीळ पोथ्या, हस्तलिखिते आहेत. वस्तुसंग्रहालय, नाट्यगृह, प्रदर्शन हॉल असून सातत्याने साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. याशिवाय अनेक सार्वजनिक व खासगी वाचनालये नाशिककरांसाठी साहित्यसेवा बजावत आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1905मध्ये नाशिकच्या गोदाकाठी वसंत व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवली. प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या व्याख्यानमालेत अनेक दिग्गज व्याख्याते येऊन गेले आहेत. दर वर्षी 1 ते 31 मे ही व्याख्यानमाला भरते. कोरोनाच्या काळात ऑनलाइन व्याख्याने झाली. याशिवाय नाशिकमध्ये अनेक छोट्या-मोठ्या संस्था कार्यरत आहेत. नाशिकमध्ये त्र्यंबक हरी काळे यांनी 1869मध्ये नासिकवृत्त हे पहिले साप्ताहिक सुरू केले. नंतर नासिकवैभव, लोकसेवा, नासिक समाचार, तसेच वि.ग. केळकर यांचे लोकसत्ता ही साप्ताहिके निघत. पुढच्या काळात काही साप्ताहिके सुरू होऊन अल्पकाळात बंद पडली. स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब पोतनीस यांनी आधी ‘गावकरी’ हे साप्ताहिक सुरू केले. 1947 साली त्याचे दैनिकात रूपांतर झाले. नंतर देशदूत, रामभूमी, भ्रमर व इतर अनेक दैनिके सुरू झाली. आज महाराष्ट्रातील बहुतेक मोठ्या दैनिकांची कार्यालये नाशिकमध्ये असून स्वतंत्र आवृत्त्या प्रकाशित होतात. नववाचकांना वाचनाची गोडी लावण्याचे काम वृत्तपत्रे करतात. साहित्य-संस्कृतीने समृद्ध अशा नाशिकमध्ये 94वे साहित्य संमेलन होईल. त्यातून उत्तम साहित्यिक विचारमंथन व्हावे, हीच अपेक्षा.