पुन्हा एकदा अखंड भारत

विवेक मराठी    26-Feb-2021
Total Views |

मोहनजी भागवत यांनी एका भावनिक प्रश्नाला आणि सामरिक प्रश्नाला हात लावलेला आहे. अखंड भारत ही कोट्यवधी भारतीयांची भूक आहे. गांधारीमुळे गांधार विसरता येत नाही, विद्यापीठामुळे तक्षशिला विसरता येत नाही, ज्या सिंधू नदीवरून हिंदू या शब्दाचा उगम झाला, ती सिंधू विसरता येत नाही. बामियानचा बुद्ध विसरता येत नाही, बलुचिस्तानातील हिंगलाज माता विसरता येत नाही, पाणिनीला विसरता येत नाही. हे सर्व आपल्या भावविश्वाचे भाग आहेत, म्हणून भारत अखंड झाला पाहिजे.


RSS_1  H x W: 0
 
हैदराबाद येथील एका कार्यक्रमात भाषण करताना सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले की, “अखंड भारत ही काळाची गरज आहे.ती काळाची गरज का आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनी आपल्या भाषणात केले. ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड वेव्हेलचे म्हणणे मोहनजींनी उद्धृत केले. वेव्हेल म्हणाले होते की, “परमेश्वराने अखंड भारत बनविला होता. त्याचे तुकडे कोण करू शकेल?” पुढे ते असे म्हणाले की, “काही कारणांमुळे जे भूभाग भारतापासून अलग झाले, तेथे कायमची अशांतता आहे. गांधारचा अफगाणिस्तान झाला आणि पाकिस्तान नव्याने अस्तित्वात आले. हे दोन्ही देश अस्थिर आहेत. मुळापासून दूर गेल्याने तेथे सुख-शांती नाही. भारताशी जोडल्यानंतर सुख-शांती प्राप्त होईल. कोण कोणत्या धर्माची पूजा करतो हा मुद्दा राहणार नाही.असेही ते म्हणाले.
 

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik
  

मोहनजी भागवत यांनी एका भावनिक प्रश्नाला आणि सामरिक प्रश्नाला हात लावलेला आहे. अखंड भारत ही कोट्यवधी भारतीयांची भूक आहे. गांधारीमुळे गांधार विसरता येत नाही, विद्यापीठामुळे तक्षशिला विसरता येत नाही, ज्या सिंधू नदीवरून हिंदू या शब्दाचा उगम झाला, ती सिंधू विसरता येत नाही. बामियानचा बुद्ध विसरता येत नाही, बलुचिस्तानातील हिंगलाज माता विसरता येत नाही, पाणिनीला विसरता येत नाही. हे सर्व आपल्या भावविश्वाचे भाग आहेत, म्हणून भारत अखंड झाला पाहिजे. वेळोवेळी त्याचे स्मरण करीत राहिले पाहिजे आणि करून देत राहिले पाहिजे. मोहनजी भागवतांनी हे काम केले आहे. ते ज्या स्थानावर आहेत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर देशात उलटसुलट चर्चा होत राहते. असाही एक वर्ग देशात आहे, ज्यांना अखंड भारत ही संकल्पना अव्यवहार्य वाटते. त्यांचे एक तर्कशास्त्र आहे. परंतु देश आणि इतिहास कोणत्याही तर्कशास्त्राने घडत नाही.

जे देश भारतापासून फुटून निघाले आहेत, ते स्थिर नाहीत. याचे कारण आपली स्वतंत्र ओळख आहे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडत नाही. इस्लाम ही राष्ट्राची स्वतंत्र ओळख असू शकत नाही, ती एक उपासना पद्धती आहे. ती ओळख प्रमाण मानली, तर जगातील सगळ्या इस्लामी देशांचा मिळून एकच देश झाला पाहिजे. तसे होणे अशक्य आहे. देशाची ओळख तिथला निसर्ग, जनजीवन, संस्कृती, परंपरा, मूल्यव्यवस्था, प्राचीन थोर स्त्री-पुरुषांचे स्मरण इत्यादी घटकांमुळे होत असते. पाकिस्तान म्हणतो की पाणिनी आमचा आहे, तक्षशिला आमची ओळख आहे, मोहेंजोदडो आणि हडप्पा ही आमची संस्कृती आहे. यापैकी कुणाचाही इस्लामशी संबंध नाही. या सर्व भारतीय संकल्पना आहेत. म्हणून काबूल ते कछार (आसाम) भारत एक आहे. संस्कृतीने एक आहे, मानववंशाने एक आहे, आणि मूल्यसंकल्पनांनीदेखील एक आहे. तो अखंड होणे ही जितकी नैसर्गिक गोष्ट आहे, तितकीच अपरिहार्य गोष्ट आहे. या सर्व भूभागाला निसर्गाने पर्वताच्या साहाय्याने, नद्यांच्या साहाय्याने आणि समुद्राच्या साहाय्याने बांधून ठेवले आहे.

 भारतातून वेगळ्या झालेल्या देशांवर आक्रमण करून त्यांना भारताशी जोडणे शक्य नाही. हिंदुत्वाच्या विचारात ते बसत नाही, हे मोहनजींनी स्पष्ट केले. तिथल्या लोकांमध्येच ही भावना निर्माण होणे आवश्यक आहे की, आपल्याला पुन्हा एक झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील पहिल्या भाषणात असे म्हटले की, एकत्र राहण्यातच आपले कल्याण आहे, असे मुसलमानांनादेखील आज न उद्या वाटू लागेल. वेगळा उपासना पंथ स्वीकारणार्‍यांना हा विश्वास वाटला पाहिजे की, आपण हिंदूंबरोबर सुखासमाधानाने राहू शकतो. हा विश्वास निर्माण करण्याचे काम हिंदू समाजाच्या सर्व अंगांचे आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, अशा सर्व अंगांनी हिंदू समाजाला सर्वसमावेशक, सर्वांना विश्वास देणारे झाले पाहिजे. हा हिंदू समाजाचा मूळ स्वभाव आहे. हा स्वभाव जागृत करण्याचे कार्य नव्वद वर्षांहून अधिक काळ चालू आहे.
 

अमेरिका हा अनेक राज्यांचा संघ आहे आणि एक राष्ट्र आहे. ब्रिटन चार राष्ट्रांचा समूह आहे आणि तरीही एक राज्य आहे. रशिया अनेक राष्ट्रांचा समूह आहे, पण तो राष्ट्र आणि राज्य जरी नसला तरी एक साम्राज्य म्हणून अस्तित्वात आहे. भारताला यापेक्षा वेगळा मार्ग शोधावा लागेल. समान संस्कृतीचा समूह म्हणून भारताला वाट शोधता येईल का, याचा विचर केला पाहिजे. इंग्लिश शब्द वापरायचा तर कल्चरल कॉमन वेल्थही आपली भावी दिशा राहू शकते. देशाचे आजचे राजकीय नेतृत्व पुरेसे परिपक्व असल्यामुळे ते या संदर्भात काही पावले टाकतील, अशी आशा करू या.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik