रोहिदासनी केवळ फाटलेले जोडेच शिवले नाहीत, तर दुभंगलेला समाज एका सूत्रात बांधण्याचे कार्य त्यांनी केले आहे. रोहिदास नुसते राष्ट्रसंघटक संतच नव्हते, तर ‘बेगमपुरा’ नगर अर्थात आधुनिक लोकशाहीतील ‘लोककल्याणकारक राज्याचा जाहीरनामा’ मांडणारे महान संत होते.
मानवी मनाला चमत्काराचे आकर्षण असते, म्हणूनच ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही!’ अशी म्हण आढळते. ज्या संताच्या जीवनात सर्वांत जास्त चमत्कार तो संत मोठा असाही भाबडेपणा समाजात आढळतो. त्या दृष्टीने संत रैदास यांच्या जीवनात साक्षात गंगामातेने कंकण देणे, देह चिरला असता रक्ताऐवजी दूध वाहू लागणे, सुवर्ण यज्ञोपवित प्रकट होणे इत्यादी चमत्कारांची रेलचेल आहे. पण वास्तविक दृष्टीने रैदासांच्या जीवनातील सर्वांत मोठा चमत्कार होता मुस्लीम आक्रमक सम्राट सिकंदर लोदी याला शरण आणणे, एवढेच नव्हे, तर मुस्लीम सदना पीर यास शास्त्रार्थात हरवल्यावर त्याला हिंदू बनवून त्याचे ‘रामदास’ असे नामकरण करणे. त्यामुळे आपण सर्वांत आधी हे असंभव चमत्कार पाहू.
रैदासांच्या काळात सिकंदर लोदी हा दिल्लीचा सुलतान होता. चर्मकार समाजातील महान संत रैदास यांना कर्मठ ब्रह्मवृंदाने दिलेला त्रास जेव्हा लोदीच्या कानावर गेला, तेव्हा रैदास जर इस्लाम धर्मात आले, तर धर्मप्रसाराच्या दृष्टीने फार चांगले काम होईल या भावनेने लोदीने रैदासांना दिल्लीस बोलाविले. तेथे रैदासांना लौकिक व पारलौकिक दृष्टीने मोठमोठी प्रलोभने दाखविण्यात आली. तेव्हा रैदास हसून लोदीला म्हणाले, “मला आपले कुराणसुद्धा नको आणि त्याच्या पठणाने मिळणार्या स्वर्गातील हजारो पर्यासुद्धा नकोत. माझ्या गळ्यावर कट्यार ठेवलीत तरीसुद्धा मी आपला परमप्रिय धर्म त्यागणार नाही!”
श्रुति शास्त्र स्मृति गाई, प्राण जाय पुनि धर्म न जाई॥
कुरान बहिश्त न चाहिए, मुझको हूर हजार।
वेद धर्म त्यागू नहीं, जो गल चलै कटार॥’
‘चोटी शिखा कबहुँ नहिं त्यागू, वस्त्र समान देह भल त्यागू
कंठ कृपाण का करौ प्रहारा, चाहै डुबाओ सिन्धु मंझारा।’
“जर पवित्र कुराण अल्लाहचे कलाम मानले, तर खुदा साकार आहे असे सिद्ध होते. मग तो निराकार आहे असे म्हणता येईल का?” रैदासांनी विचारले.
निराकार तुम खुदा बताओ
कुरान खुदा का कलाम ठहराओ ।
कलाम कहै तो बने साकारा
फिर कहाँ रहा खुदा निरंकारा?
हे ऐकून सदनाची बोबडीच वळली.
सदना म्हणाला, “ते खुदासाठी बलिदान असते.”
फिर क्यों जीव मारकर खाओ?
खुदा नाम बलिदान चढाओ
सो अल्लाह को दोष लगाओ ।
दिन भर रोजा नमाज गुजारें
संध्या समय पुनः मुर्गी मारें।
भक्ति करें फिर खून बहावें
पामर किस विधि दोष मिटावें?
जिसमें जीवहिंसा लिखी, वह नहिं खुदा कलाम ।
दया करे सब जीव पर, सोई अहले इस्लाम ॥
हे ऐकून सदना पीर खरोखर निरुत्तरच झाला. हिंदू धर्म खरोखर श्रेष्ठ असून आपल्या इस्लाममध्ये दोष आहेत, असे सदना पीर याने मान्य करून रैदासांच्या पायावर मस्तक ठेवले. तेव्हा शिष्य म्हणून रैदासांनी त्याचा स्वीकार केला व त्याचे नाम ‘रामदास’ ठेवून त्याला रामभक्तीचा उपदेश केला.
खरेच एवढे चमत्कार घडविणारे रैदास कोण होते?
रैदास होते प्रत्यक्ष काशीच्या नरेश वीरसिंहदेव यांचे गुरू!
रैदास होते चित्तौडचे महाराणा उदयसिंह यांची पत्नी झाली राणी यांचे गुरू.
रैदास होते महान संत मीराबाईचे गुरू.
राजसत्ता ज्या संतांच्या पायाशी विनम्र होते, त्याच्याशी टक्कर घेण्याची हिंमत विदेशी आक्रमकांच्या अंगात नव्हती. ज्या ज्या वळणावर हिंदू समाज विखंडित झाला, तेव्हा तेव्हा हिंदूंची धर्मप्रतीके उद्ध्वस्त करण्याची हिंमत आक्रमकांनी दाखविली, पण संघटित हिंदू शक्तीशी दोन हात करण्याचे धैर्य त्यांच्यात नव्हते. भारतीय संतांनी केलेला हाच सर्वांत मोठा चमत्कार होता. त्यामुळेच भारतीय संत खर्या अर्थाने राष्ट्रसंघटक ठरतात.
संत रैदास राणा सांगा यांचे पुत्र कुंवर भोजराज आणि मीरा यांच्या लग्नाच्या समयी तेथे उपस्थित होते. लग्नानंतर अवघ्या चारच वर्षांत मीराबाई यांना वैधव्य प्राप्त झाले. अशा शोकमग्न काळात त्यांना चित्तोडच्या कुंभश्यामजी मंदिराच्या प्रांगणात संत रविदासांचे (रैदासांचे) भजन-कीर्तन नित्य ऐकायला मिळाले. त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनातून मीराबाईंना आत्मिक समाधान मिळाले. मार्च 1526मध्ये मीराबाईंनी रविदासांकडून दीक्षा घेतली. आपल्या गुरूबद्दल मीराबाई म्हणतात -
‘रैदास सन्त मिले मोहि सतगुरू दीन्ही सुरत सहदानी।
मैं मिली जामा पाय पिय अपना तब मेरी पीर बुझानी॥’
अशा रितीने संत रैदासांची ख्याती दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहून स्वतःला समाजाचे ठेकेदार समजणारा पुरोहित वर्ग खवळला. काशी नगरी म्हणजे धर्मक्षेत्र. येथे एका चांभार कुलातील मनुष्याने मोठा शिष्यसमुदाय जमविणे, हे त्यांना मुळीच रुचले नाही. आता आपले महत्त्व लयाला जाईल, अशा भीतीमुळे काशीनरेश वीरसिंहदेव बघेला यांच्याकडे पुरोहितांनी संत रैदासांच्या विरोधात तक्रार केली. मात्र काशीनरेशांचा स्वभाव अत्यंत न्यायप्रिय होता. त्यामुळे त्यांनी दरबार भरवून संत रैदास आणि पुरोहित वर्ग यांना आपापला पक्ष मांडण्यास सांगितले. संत रैदास हे क्रांतदर्शी रामानंदांचेच पट्टशिष्य होते. त्यांनी अगदी साध्या आणि सुलभ शब्दांत भक्तिविवेचन केले. पुरोहित वर्गाचा सर्व युक्तिवाद द्वेष, तिरस्कार आणि भेदभाव यांनीच भरलेला असल्यामुळे त्यांचा संत रैदासांसमोर काहीच टिकाव लागला नाही. उलट काशीनरेशांना संत रैदासांचा उपदेश धर्मसंमत आणि युगानुकूलच वाटला. त्यांनी संत रैदासांना भगवंताची मूर्ती देऊन त्यांचा भव्य सत्कार केला. काशीनरेशांचा भाव असा होता की, पुरोहित वर्गाचे मन द्वेष, तिरस्कार आणि जातीपातीच्या भेदभावाने ग्रस्त झाल्यामुळे ते भगवंताला आवाहन करण्यास आणि त्याचे पूजन करण्यास लायक राहिलेले नाहीत आणि संत रैदासांसारखा महान भगवद्भक्तच त्याला लायक आहे.
या घटनेचा उल्लेख करून, भगवंताची मूर्ती स्वतः येऊन संत रैदासांच्या मांडीवर विराजमान झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या घटनेचा उल्लेख करताना संत पलटूदास म्हणतात -
‘हारे हम कुलीन सब कोटि कोटि कै उपाय
कैसे तुम ठाकुर हम अपने हूँ न पाई है।
‘पलटुदास’ देखी रीझ मेरे साहब की,
गये हैं कहाँ, जब रविदास ने बुलाई है।’
संत रैदासांची भक्ती पाहून स्वतः काशीनरेश त्यांच्या चरणी लागले आणि रोहिदासांचे (रैदासांचे) शिष्य बनले. काशीनगरीत संत रैदासांची मोठी मिरवणूक काढण्यात आली.
‘गता गीता नाशं क्वचिदपि पुराणं व्यपगतं
विलिनाः स्मृत्यर्था निगमनिचयो दूरमभवत्।
इदानीं रैदासप्रभृतिवचनैर्मोक्षपदवीं
तदेव जानीमो कलियुग तवैवेष महिमा॥’
म्हणजे, ‘गीतेचे महत्त्व संपले आहे, पुराणांचा लोप झालेला आहे, स्मृतींचा अर्थ कळेनासा झाला आहे, वेद विस्मृतीत जमा झाले आहेत. हे कलियुग ओढवले आहे. पण या युगाचा महिमा असा सांगता येईल की, संत रैदासांसारख्या महान संतांच्या केवळ उपदेशानेच लोकांना मोक्षमार्गाचे अनुसरण करण्याची प्रेरणा लाभत आहे.’
याचा सरळ अर्थ सांगायचा म्हणजे ज्याप्रमाणे संत ज्ञानदेवांनी ‘संस्कृताचि गहन तीरें।’ अशा गूढ वचनांमध्ये अडकलेली भक्ती भावार्थदीपिकेच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी सुलभ करून सांगितली होती, त्याच तोडीचे कार्य संत रैदासांनी आपल्या काळात करून दाखविले आहे. केवळ धर्मविस्मृतीमुळे परधर्मात जाणारा लोंढा थोपविण्याचे कार्य करणारे महान राष्ट्रवीर म्हणजे संत रैदास होत.
संत चोखामेळा यांनी तर असे जाहीरच केले होते -
‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण।
वेदांचे वचन न कळे आम्हा॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा।
गाईन केशवा नाम तुझे॥’
संत रैदासांनी जनसामान्यांसाठी भक्तिमंदिराचे महाद्वार उघडून दिले. आपल्या संप्रदायात जातीपातीचा भेदभाव न करता संपूर्ण समाजालाच सामावून घेतले. त्यांचे आपल्या समाजावर कधीही न फिटणारे उपकार आहेत. वास्तविक पाहता, ज्या पुरोहित वर्गाची मक्तेदारी ज्या धर्मावर आणि समाजावर अवलंबून होती, त्यांनीच त्या धर्माच्या व समाजाच्या रक्षणासाठी प्रयत्न करायला हवे होते. ते प्रयत्न त्यांनी न करता रैदासांवरच टीकाटिप्पणी करण्याचे कुटिल कार्य त्यांनी केले. मात्र या सर्व प्रकरणातून संत रैदासांचेच बावनकशी सुवर्ण उजळून निघाले. त्यामुळे लाक्षणिक अर्थाने असे म्हणता येईल की, इतरांची जानवी कापसाच्या सुताची होती, मात्र रैदासांचे यज्ञोपवित हेच खर्या सोन्याचे होते. कदाचित त्यांनी ते आपले शरीर फाडून दाखविलेही असेल; पण आपल्या समाजासाठी या महान संताचे अंतःकरण तिळ तिळ तुटत होते, हे कोणालाच नाकारता येणार नाही. रैदासांनी केवळ फाटलेले जोडेच शिवले नाहीत, तर दुभंगलेला समाज एका सूत्रात बांधण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
रैदास यांच्या महाप्रयाणानंतर मीराबाई आणि झाली राणी यांनी कुंभश्यामजी मंदिराच्या उंच चबुतर्याच्या उजव्या बाजूस ‘श्री रविदास की छतरी’ (समाधी) बनविली. तेथे रैदास यांचे चरणचिन्ह अंकित केलेले आहेत. सध्या मीरा मंदिराच्या समोरच आपल्याला रैदासांच्या या समाधीचे दर्शन होते.
रैदास नुसते राष्ट्रसंघटक संतच नव्हते, तर ‘बेगमपुरा’ नगर अर्थात आधुनिक लोकशाहीतील ‘लोककल्याणकारक राज्याचा जाहीरनामा’ मांडणारे महान संत होते.
संत शिरोमणि रविदास ने किया
बेगम अगम नगर का निर्माण।
जिस में कहीं न शोषण, दोहन
और न जाति, धन का अभिमान॥
संत रविदास के साम्य-संदेश से फैले
अखिल भुवन में दिव्य प्रकाश।
जिस से अवर्ण-सवर्ण का भेदभाव मिटे
और न रहे कोई निःशक्त निराश॥