ज्या काळात पुरोहितवादाचे अवडंबर माजले होते, यज्ञाचे, बळीचे स्तोम होते, ज्या काळात परलोकातील प्रश्नांसाठी इहलोकाकडे क:पदार्थ म्हणून पाहिले जात होते, त्या काळात हा बंडखोर मतप्रवाह निर्माण झाला. निर्भेळ सुखवाद, सत् आचरणाने भोग भोगणे हेच जीवन. व्रत, वैकल्ये, उपासतापास, नवस, देव, यज्ञयाग, परलोकचिंता, कर्मफल, पाप-पुण्य संकल्पना, पुनर्जन्म, श्राद्धविधी यांचे मानवी जीवनात स्थानच नाही, असे प्रतिपादन करणारे चार्वाक.
चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे. वेदांचे प्रामाण्य मानणारी दर्शने आस्तिक म्हणून ओळखली जातात, तर वेदप्रामाण्य न मानणारी दर्शने नास्तिक दर्शने म्हटली जातात.
चार्वाक दर्शन हे भारतातील बहुचर्चित दर्शन आहे. या दर्शनाबाबत दोन टोकांचे मतप्रवाह आहेत. एकीकडे बघा!! ‘आम्हाला न पटणार्या मतालादेखील आम्ही तत्त्वज्ञानात स्थान देतो!’ अशी शेखी मारली जाते, तर दुसरीकडे ‘चार्वाकांच्या हत्या करण्यात आल्या. त्यांना भूमिगत होऊन काम करावे लागत असे.. त्यांचे साहित्य नष्ट केले गेले’ असेही मत व्यक्त केले जाते.
मुळात भारतात कोणी एखादे वेगळे मत मांडले म्हणून त्यास मारणे, साहित्य नष्ट करणे असले काही घडलेले नाही, हे निश्चित आणि विरोधी मत सहज स्वीकारले जाणे हीदेखील भारतीय तत्त्वचिंतन परंपरा आहे! त्यात कोणी बढाई मारण्याचीही गरज नाही.
न्यायदर्शन, कौटिलीय अर्थशास्त्र यात चार्वाकांचे उल्लेख आले आहेत. चार्वाकांची परंपरा साधारणपणे तिसर्या-चौथ्या शतकापासून आढळून येते. त्यांना लोकायत दर्शन, बार्हस्पत्य दर्शन या नावाने ओळखले जाते. बृहस्पती नामक व्यक्ती या दर्शनाची प्रणेता होती. या दर्शनाचा प्रसार करणार्यांना चार्वाक म्हटले जात असे.
‘चारू वाक्’ म्हणजे आवडेल असे बोलणारा आणि लोकायत म्हणजे इंद्रिये जाणतात तेवढेच जग! चार्वाक हे बंडखोर दर्शन आहे. वेद, ईश्वर, आत्मा, कर्मफल, परलोक हे काहीच ते मानत नाहीत. आणखी वेगळेपण म्हणजे ते केवळ प्रत्यक्ष हेच एकमेव प्रमाण मानतात.
ग्रीसमध्येही असाच एक मतप्रवाह होता इसवीसनाच्या पहिल्या-दुसर्या शतकात. त्याला एपिक्युरियन पंथ असे म्हणतात. याचा आद्य प्रवर्तक एपिक्युरस हा त्याच्या अनुयायांना घेऊन एका मोठ्या बागेत राहत असे. तेथेच सर्वांच्या कुटी होत्या. यांचे ध्येयवाक्य होते - ‘खा! प्या! मजा करा!’ शुद्ध भौतिक दृष्टी.
एकदा अथेन्सचा राजा एपिक्युरस गार्डनमध्ये गेला. त्याला वाटले - सर्व सुखसाधने असलेले ऐश्वर्यसंपन्न जीवन तेथे असणार. सुखोपभोग घेणारी माणसे दिसणार.
प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच होते. बागेत लोक आनंदाने कामे करत होते. संध्याकाळी त्यांनी एकत्र येऊन गायन, वादन, नृत्ये केली. साधेसुधे अन्न, परंतु अत्यंत आनंदाने खाल्ले. अस्तित्व, निसर्ग यांना आजच्या जीवनासाठी धन्यवाद दिले. राजा पाहातच राहिला. त्याला वाटले, हे असे असेल तर यांना अधार्मिक नास्तिक का म्हटले जाते?
चार्वाकांच्या सुखवादामुळे असेच काहीसे घडलेले आहे.
यावज्जीवं सुखं जीवेत।
ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।
भस्मीभूतस्य देहस्य।
पुनरागमनं कुत:।
या चरणांचा आधार घेऊन चार्वाक हे नीतिनियम न पाळणारे होते असा विपर्यास केला जातो. केलेले ऋण फेडू नका असे त्यांनी कधीही सांगितले नाही.
चार्वाक असे म्हणतात की शहाण्या माणसाने व्यापारउदीम करावा, गोपालन करावे, सत् उपायांनी भोग भोगावेत.
देहापेक्षा भिन्न असा आत्मा मानून त्याच्या परलोकातील गतीच्या चिंतेत इहलोकी दुःखात राहणे हा शहाणपणा नाही.
ते असेही सांगतात की जसे गूळ, तांदूळपीठ व पाणी यांच्यात मद्याचे गुण नसतात, परंतु हे एकत्रित केल्याने मद्य तयार होते, तसेच महाभूतांच्या मिश्रणाने तयार झालेल्या शरीरात वेगळे असे चैतन्य दिसते. ते शरीरासोबतच नाहीसे होते. ‘भूतेभ्य:चैतन्यम्॥‘
फक्त ज्ञानेंद्रिये म्हणजे नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ हे जाणू शकतात, तेच प्रमाण.. अनुमान नाही, आगम वेदोक्त वगैरे तर नाहीच नाही.
पुरुषार्थ फक्त दोनच खरे - अर्थ आणि काम.
महाभूते चारच आहेत - पृथ्वी, पाणी, तेज आणि वायू. आकाश नाही, कारण ते इंद्रियगोचर नाही.
चार्वाक सृष्टिकर्त्या ईश्वराचे अस्तित्व मानत नाहीत. त्यांच्या मते सृष्टीच्या स्वाभाविक, भौतिक नियमांनुसार जगातील सर्व घटना घडतात. आत्मा, पुनर्जन्म असे काहीही नसते. देहाबरोबरच चैतन्यही लोप पावते.
ते वेदकर्त्यांना व अनुसरण करणार्यांना ‘भण्ड, धूर्त’ असे म्हणतात.
असे हे सृष्टीचा स्वभाववाद सांगणारे लोकायत चार्वाक दर्शन!
ज्या काळात पुरोहितवादाचे अवडंबर माजले होते, यज्ञाचे, बळीचे स्तोम होते, ज्या काळात परलोकातील प्रश्नांसाठी इहलोकाकडे क:पदार्थ म्हणून पाहिले जात होते, त्या काळात हा बंडखोर मतप्रवाह निर्माण झाला. निर्भेळ सुखवाद, सत् आचरणाने भोग भोगणे हेच जीवन. व्रत, वैकल्ये, उपासतापास, नवस, देव, यज्ञयाग, परलोकचिंता, कर्मफल, पाप-पुण्य संकल्पना, पुनर्जन्म, श्राद्धविधी यांचे मानवी जीवनात स्थानच नाही. त्यामुळे अमूर्त गोष्टींनी चिंताग्रस्त मन नाही. खा!! प्या!! मजा करा!!
9922902552